माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Thursday, July 27, 2023

गोवादुर्ग

गोवा नावाचा किल्ला महाराष्ट्रामध्ये आहे याची माहिती आम्हाला नव्हती. हर्णै बंदरावर पोहोचलो तेव्हा इथे कणकदुर्ग आणि गोवादुर्ग नावाचे दोन किल्ले आहेत, असं समजलं. समुद्रामध्ये जो चिंचोळा भूभाग प्रवेश करतो तो कणकदुर्ग होय आणि त्याच्याच अलीकडे गोवादुर्ग किल्ला आहे. कणकदुर्गवर भेट देऊन परतताना या गोवा किल्ल्यावर जावे असे ठरवले. संध्याकाळी सूर्य मावळायला आला होता. तो पूर्ण गुडूप होण्याच्या आधी या किल्ल्यावर पोहोचावे, म्हणून आम्ही लगबगीने कणकदुर्गावरून निघालो. गोवा किल्ल्यापाशी पोहोचलो तोवर सूर्य मावळलेला नव्हता. मी झपझप पावले टाकत किल्ल्याच्या मुख्य प्रवेश दारातून आत गेलो आणि एका तटबंदीवर जाऊन सूर्याच्या मावळतीचा तो नजारा न्याहाळू लागलो. इथून समोर समुद्रात दिसणाऱ्या सुवर्णदुर्गवरून सूर्य मावळतीकडे चाललेला होता. अर्थात हा नजारा कॅमेऱ्यामध्ये टिपायचा मोह मला आवरला नाही. सूर्य मावळल्यानंतर देखील सायंप्रकाशात आम्ही किल्ला पाहून घेतला. कनकदुर्गपेक्षा बऱ्यापैकी चांगले अवशेष अर्थात किल्ला म्हणावा असे अवशेष अजूनही गोवादुर्गवर दिसून येतात. तटबंदी, बुरुज, पाण्याच्या टाक्या, प्रवेशद्वारे आणि त्यावरील शिल्पे या खुणा किल्ल्यावर अजूनही त्याच्या ऐतिहासिकतेची साक्ष देत आहेत. या किल्ल्याची पुनर्बांधणी करून तो आणखी व्यवस्थित करता येऊ शकतो.
मध्यभागी असणाऱ्या ध्वजस्तंभापाशी गेलो की इथून कनकदुर्ग आणि सुवर्णदुर्गासहित हर्णै बंदरही व्यवस्थित दिसून येते.















Monday, July 24, 2023

एका फोटोमागची गोष्ट

बरोबर दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या दिवशी माझ्या लग्नाची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आली होती. अर्थात त्यास अंतिम स्वरूप द्यायचे बाकी राहिले होते. त्याच दिवशी सकाळी मी आणि माझा भाऊ दोघेही ओतूरच्या लागाच्या घाटामध्ये फिरण्यासाठी निघालो होतो. पावसाळ्याचा शेवटचा महिना चालू होता. ओतूर सोडल्यानंतर पुढे फापाळे शिवार नावाचे गाव लागते. तिथे पोहोचल्यावर दूर मुंजाबाच्या डोंगरावर एक धबधबा दिसून आला. या धबधब्यापाशी आम्ही यापूर्वी कधीच गेलो नव्हतो. त्यामुळे आज तिथेच जाऊया असे ठरवले. मग लागाच्या घाटाने वरती पठारावर पोहोचलो. इथे अहमदनगर जिल्हा सुरू होतो. तसा हा भाग बऱ्यापैकी दुर्गम आहे. रस्ते मात्र ठीकठाक आहेत. घाट चढून थोडं पुढे गेल्यावर डाव्या बाजूला वळालो. रस्त्यावर एका ठिकाणी एक सुंदर मंदिर दिसून आलं. तिथूनच पुढे कदाचित या धबधब्यापाशी जाणारा रस्ता असावा, असं वाटलं. रस्त्यावर एक गुराखी गुरे वळताना दिसून आला. त्याला या धबधबाविषयी विचारलं. त्यानेच आम्हाला या धबधब्याचे नाव धूरनळी धबधबा आहे, असं सांगितलं आणि मार्गही दाखवला. वातावरणामध्ये पुन्हा पावसाचा खेळ चालू होता. त्यामुळे पावसाची निश्चितता नव्हतीच.
गुराख्याने सांगितलेल्या मार्गाने आम्ही चालत चालत पुढे गेलो आणि थोडंसं खाली उतरल्यानंतर समोरच धुरनळी धबधबा दिसून आला. त्या दिवशी तिथे बऱ्याच वेगाने वारे वाहत होते. अर्थात त्यामध्ये विस्कळीतपणा होता. म्हणून जेव्हा वाऱ्याचा वेग खालच्या दिशेने जोरात यायचा तेव्हा या धबधब्याचे पाणी वेगाने मागे फेकले जायचे. त्या काळात आजच्या इतकी प्रभावी सोशल मीडिया नसल्यामुळे या धबधब्यापाशी काहीच गर्दी नव्हती. आम्ही पाण्याच्या प्रवाहामध्ये पोहोचलो. अचानक वेगाने वारी आले की धबधब्यातून खाली पडणारे पाणी जोरात मागे फेकले जायचे. हा नेहमीचा उर्ध्व जलप्रपात नव्हता. वातावरणाच्या स्थितीमुळे तो आज आम्हाला तसा दिसून येत होता. मी थोडासा मागे थांबलो होतो. भाऊ पाण्यामध्ये चालत गेला आणि समोरून वेगाने वारे आल्यावर त्याच्या अंगावर पाणी उडायला लागले. त्याने दोन्हीही हात उंचावले. आणि त्या क्षणी मी हा फोटो काढला होता.
अनेकांना असं वाटतं की हा ऊर्ध्व जलप्रपात अर्थात "रिवर्स वॉटरफॉल" आहे. पण तसं नाही. अतिशय क्वचित प्रसंगी त्याचे पाणी उलट्या दिशेला फेकले जाते. विशेष म्हणजे हा धबधबा अहमदनगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यामध्ये कोसळतो. आजकाल पावसाळ्यात या धबधब्याच्या खालच्या दिशेला लोकांची भयंकर गर्दी असते. अनेक जण हा फोटो बघूनच रिवर्स वॉटर फॉल बघायचा म्हणून या ठिकाणी येतात. खराखुरा ऊर्ध्व जलप्रपात बघायचं असेल तर जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी पुणे जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात कोसळणारा धबधबा किंवा दुर्गवाडी पठारावर असणारा छोटेखानी धबधबा पाहता येऊ शकेल.


 

Wednesday, July 19, 2023

मोशी -> कुरुळी -> मोई -> चिखली वर्तुळ सायकलस्वारी

रात्रभर कोसळून दमलेल्या पावसाने सकाळी विश्रांती घेतली त्यामुळे जॉगिंग करताना पावसाची भेट झाली नाही. अगदीच पाच किलोमीटर पळल्यानंतर पावसाची रिमझिम चालू झाली होती. त्यामुळे लगेच सायकल काढली आणि मार्ग निश्चित केला. पावसाचा जोर तसा नव्हताच. अगदी कपडे ओले करेल, इतपत पाऊस चालू होता. नंतर त्याचा वेग कमी जास्त व्हायला लागला. पावसामुळे रस्त्यावरची रहदारी कमी होत असते. पण आजकाल तसेही काही होताना दिसत नाही.
पुणे नाशिक महामार्गावला लागलो त्यावेळेस या हायवेवरची गर्दी अजुनही तशीच होती. इंद्रायणीच्या पुलावरून जाताना नदीचा तो वेगवान प्रवाह अनुभवता आला. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच इतक्या वेगाने नदीतून पाणी वाहत होते. काल तर वरच्या दिशेने वाहत आलेल्या जलपर्णी देखील दिसून आल्या. म्हणजेच पावसाचा एकंदरीत जोर वाढतोय, असं दिसतं. नदी ओलांडल्यानंतर डावीकडे एक रस्ता मोई गावाच्या दिशेने जातो. इथे कुरळी गावाच्या हद्दीत अनेक कंपन्या आहेत. एमआयडीसीमधला हा रस्ता आता काँक्रीटचा बांधलेला आहे. सकाळी या रस्त्यावर फारशी गर्दी नव्हतीच. वरून कोसळणाऱ्या रिमझिम पावसामध्ये मी मोईच्या दिशेने सायकल चालवत निघालो. या रस्त्याने मी पहिल्यांदाच आलो होतो. मोई गाव अजूनही गावाच्या खुणा राखून आहे. गावाच्या मुख्य वेशीतूनच प्रवेश केला आणि मागच्या वेशीतून पुन्हा नदीच्या दिशेने निघालो. रस्त्यामध्ये भैरवनाथ मंदिराचे भले मोठे बांधकाम चालू आहे. हे मंदिर बऱ्याच लांब होऊन देखील नजरेस पडते. आज ते पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहिले. थोड्याच अंतरावर नदीवरील पूल लागला. या पुलाची उंची तशी फारशी नाही. पाण्याची पातळी आणखी वाढली तर कदाचित या पुलावरून देखील पाणी जाऊ शकते. नदीचा तर रौद्रप्रवाह इथून चांगलाच अनुभवता येत होता. पूल पार केल्यानंतर शहरीकरणाची चिन्हे पुन्हा दिसू लागली. खराब रस्ते, गटारातून नदीमध्ये वाहणारे पाणी आणि पाण्यामुळे ओला झालेला कचरा व त्यातून येणारा दुर्गंध हे सर्वच काही पाहायला मिळाले. लगेचच देहू-आळंदी रस्ता लागला आणि डावीकडे वळून परतीच्या मार्गाला लागलो. घरी येईपर्यंत पूर्ण भिजून गेलो होतो. आज-काल या भागात जास्त सायकलस्वार दिसून येत नाहीत. कदाचित पावसाचा परिणाम असावा.


 

Tuesday, July 18, 2023

कणकदुर्ग

दापोलीच्या मुरुड समुद्रकिनाऱ्यावरून पश्चिमेकडे समुद्रामध्ये आत आलेला भूभाग नजरेस पडतो. दापोलीच्या दोन दिवसांच्या वास्तव्यामध्ये या ठिकाणी पण जाऊन यायचे ठरवले. हा एक किल्ला होता. माशांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हर्णै बंदरावर स्थित असलेला हा किल्ला म्हणजे कणकदुर्ग होय.
दुपारचे ऊन ओसरल्यानंतर आम्ही हर्णै गावात पोहोचलो. माशांचं बरंच मोठं मार्केट या ठिकाणी आहे. सगळीकडे माशांच्या वासाचा नुसता घमघमाट पसरलेला होता. आमच्यासारख्या शाकाहारी लोकांना या वासाची किळस वाटते! तरीही त्यातून माग काढत आम्ही समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो. हर्णै बंदराचा समुद्रकिनारा नक्की कसा आहे(?), हे तिथे भेट दिलेल्या अनेकांना माहीत असेलच. याच रस्त्याने माग काढत आम्ही कणकदुर्गपाशी येऊन पोहोचलो. सूर्य मावळतीकडे चाललेला होता. बंदरावर नेहमीप्रमाणेच लगबग आणि गोंगाट दिसून येत होता. समुद्रात जो चिंचोळा डोंगर प्रवेश करतो त्या रस्त्याने आम्ही पुढे आलो. याठिकाणी किल्ल्याचे कोणतेच अवशेष दिसून आले नाही. आजच्या काळात बांधलेल्या सिमेंटच्या पायऱ्या मात्र होत्या. त्या चढून वरती गेलो. समोरच समुद्रामध्ये सुवर्णदुर्ग किल्ला नजरेस पडला. याच किल्ल्याच्या संरक्षणासाठी समुद्रकिनाऱ्यावर हर्णै बंदरावर तीन किल्ले बांधले होते, असं ऐकलंय. त्यातीलच हा एक किल्ला होय. येथून संध्याकाळचा सूर्यास्त अतिशय सुंदर दिसतो. केशरी सुर्यकिरणे समुद्राच्या पाण्यावर विविध रंगछटा तयार करतात. सूर्य पूर्णपणे मावळत नाही तोपर्यंत हा नजारा केवळ पाहतच राहावा, असा दिसतो. तीनही बाजूंनी समुद्र आणि एका बाजूने किल्ल्यावर येणारी पायवाट एवढेच नजरेस पडतं.





 


Sunday, July 2, 2023

मान्सून मधली पहिली राईड

गेले कित्येक महिने इंद्रायणीच्या पाण्यावर जलपर्णी पसरलेल्या दिसत होत्या. परंतु मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे जलपर्णींचं ते जाळं हळूहळू कमी होत गेलं. नदी प्रवाही झाली. नदीचा तो खळाळता प्रवाह पहिल्यांदाच या पावसाळ्यामध्ये अनुभवता यावा म्हणून सायकलद्वारे इंद्रायणीची लघु परिक्रमा करायचे ठरवले.
आज सकाळचं वातावरण ढगाळ असलं तरी पावसाची शक्यता वाटत नव्हती. रविवारचा दिवस, त्यामुळे गर्दी देखील कमी. बऱ्याच महिन्यानंतर आज पहिल्यांदाच ऊन नसताना सायकल चालवत होतो! अलंकापुरीमध्ये प्रवेश केला आणि पावसाचे तुषार अंगावर यायला लागले. जोर फारसा नव्हता. इंद्रायणीच्या पुलावर पोहोचलो तेव्हा नदीचा तो खडाळता प्रवाह दिसून येत होता. नदी ओलांडून थेट मरकळच्या दिशेला लागलो. गावातून बाहेर पडल्यावर पावसाचा जोर कमी झाला होता. आता रस्ते ओले देखील दिसत नव्हते. पण आजूबाजूच्या खड्ड्यांमध्ये पाणी मात्र साठलेले दिसले. आळंदी-मरकळ रस्त्यावर असणाऱ्या धानोरे गावाच्या दिशेने उजवीकडे वळालो. आता शहर वस्ती संपली होती. सगळीकडे हिरवेगार झाडेझुडपे दिसायला लागली होती.
अगदी पाचच मिनिटांमध्ये धानोरे आणि निरगुडी गावाला जोडणाऱ्या इंद्रायणी नदीच्या पुलावर आलो. इथल्या बंधाऱ्या खालून इंद्रायणीचा प्रवाह वेगाने खालच्या दिशेने जात होता. शहरात कडून आलेल्या जलपर्णी ह्या बंधार्‍यापाशी अडकलेल्या दिसल्या. इथून निरगुडी गावामध्ये आलो आणि पश्चिमेच्या दिशेने चऱ्होली बुद्रुकचा रस्ता धरला. वातावरण आल्हाददायक बनलं होतं. डोंगर टेकड्या आता हिरव्या दिसायला लागल्या होत्या. ढगाळ वातावरण काहीसं विरळ होत होतं आणि अधून मधून सूर्याची किरणे डोकावत होती. एका छोटेखानी टेकडीवर आलो तेव्हा तिथून शहरीकरणाचे दृश्य व्यवस्थित दिसत होते. काँक्रीटची जंगले निसर्गाच्या जंगलातून वेगळीच दिसतात. चऱ्होली गावाच्या पूर्वेकडील भाग अजूनही गाव म्हणावा असाच आहे. इथून गावठाणात प्रवेश करताना अतिशय छोटा रस्ता दिसतो. कदाचित त्याला पर्याय म्हणूनच नदीच्या बाजूने बायपास रस्ता करण्यात आला असावा. गावातून जाताना गावाचं जुनं गावपण मात्र ठळकपणे जाणवतं. अजूनही गावात जुने लाकडी बांधाचे वाडे दिसून येतात. अनेक वाड्यांची व्यवस्थित डागडुजी देखील झालेली आहे. आपण पुणे शहरातीलच वाडे पाहत आहोत की काय असाही भास होतो. गावच्या वेशीतून बाहेर आलो तेव्हा पुन्हा काँक्रीटच्या जंगलाच्या दिशेने प्रवास चालू केला. रहदारी वाढली होती, वर्दळ देखील वाढत होती. आणि त्याच वर्दळीमध्ये मी देखील माझा प्रवास चालू ठेवला.