माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Friday, June 9, 2023

महर्षी कर्वे जन्मस्थळ

सकाळी रत्नागिरीच्या मुरुड गावामध्ये पोहोचलो, त्यादिवशी सुट्टीचा दिवस नसल्यामुळे गावात पर्यटकांची फारशी रेलचेल नव्हती. गावातील जिल्हा परिषद शाळा महर्षी कर्वे यांच्या नावाने उभारलेली आहे. या शाळेच्या जवळच त्यांचा अर्धाकृती पुतळा आहे. त्या दिवशी या पुतळ्याभोवती फुलांची आरास केलेली होती. तेव्हा समजले की आज महर्षी कर्वे यांची जयंती आहे. भारतरत्न मिळालेल्या या महान व्यक्तीच्या गावात त्यादिवशी आम्ही पहिल्यांदाच आलो. कोकणाने या देशाला अनेक मोठी व्यक्तिमत्वे दिलेली आहेत. त्यातीलच एक महर्षी कर्वे होय. स्त्री शिक्षणच्या प्रणेत्यांपैकी एक असणाऱ्या कर्वे यांच्या मुरुड गावात काही विसाव्याचे क्षण घालवले. 



Wednesday, June 7, 2023

सांगुर्डी सायकलस्वारी

इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेल्या अनेक छोट्या निसर्ग सौंदर्यस्थळांपैकी एक म्हणजे सांगुर्डी हे गाव होय. सकाळी नेहमीप्रमाणे सायकलस्वारी करत देहूच्या दिशेने निघालो. अतिशय कमी वेळा मी प्रत्यक्ष देहू गावातून सायकल चालवत नेली आहे. नेहमीच देहूच्या बाहेरचा रस्ता पकडतो आणि दोन चाकांचा वेगवान प्रवास सुरू होतो. अर्थात या देहू बायपास रस्त्याने पुढे गेल्यावर इंद्रायणी नदीचा एक पूल लागतो. येथून देहू गावाच्या काठावरून वाहणारी इंद्रायणी अतिशय मनमोहक दिसते. सकाळच्या वेळी तर सूर्य त्याच दिशेने वर आलेला असतो. त्याचे प्रतिबिंब देखील नदीमध्ये पडलेले दिसते. इंद्रायणी ओलांडली की लगेचच डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता गावाच्या दिशेने जाताना दिसतो. याच रस्त्याने सायकल वळवली आणि पुन्हा आधीचा वेग धारण केला. इथून बऱ्याच अंतरापर्यंत देहू गावाचे शहरीकरण झालेले दिसते. साधारणत: अर्धा किलोमीटर नंतर गावाकडची खरीखुरी शेती दिसू लागते. थोडं पुढे गेल्यावर डाव्या बाजूला रस्ता वळतो आणि एका छोटेखानी पुलानंतर सांगुर्डी गावाची हद्द सुरू होते. हे गाव इंद्रायणी नदीच्या काठावरच वसलेले आहे. देहू सारख्या निमशहरी गावापासून जवळ असून देखील शहरीकरणाची फारशी चिन्हे इथे दिसत नाहीत. नदी ओलांडण्यासाठी एक सिमेंटचा पूल बांधलेला आहे. या पुलावरूनच इंद्रायणी नदीचे विहंगम दृश्य दिसते. माझी इथली भ्रमंती उन्हाळ्यात झाली होती त्यामुळे नदीला फारसे पाणी नव्हते. जे काही पाणी वाहत होते त्या झुळझुळ वाहणाऱ्या पाण्यामुळे निसर्गाचा नयनरम्य नजारा इथून अनुभवता येत होता. शिवाय नदीचे कुठलेही पात्र सकाळच्या प्रहरी अतिशय सुंदर दिसते. त्याला हा परिसर देखील अपवाद नव्हता. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी जलतुषारांचे विहंगम दृश्य दिसत असावे, हे मात्र नक्की.