माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Sunday, January 27, 2013

दुर्गराज राजगड

गडांचा राजा व राजांचा गड असे ज्या किल्ल्याचे वर्णन केले जाते, तो किल्ला म्हणजे दुर्गराज राजगड. मराठा साम्राज्याची पहिली राजधानी म्हणून राजगड ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात अनेक वर्षे राजगड स्वराज्याची राजधानी होती. राजगड हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात मोडतो. राजगड हा एक बुलंद, बळकट व बेलाग असा किल्ला आहे. शिवाजीराजांनी त्याचा ताबा घेण्यापूर्वी या गडाला मुरुंबदेवाचा किल्ला म्हणून ओळखले जायचे. सातवाहनकाळात ब्रह्मर्षी ऋषींचे वास्तव्य या किल्ल्यावर होते. आजही किल्ल्यावर ब्रह्मर्षी ऋषींचे मंदिर दिसून येते. कालांतराने हा किल्ला आदिलशाही व निझामशाही राजवटींमुळे फिरत राहिला. त्या काळात राजगडचा बालेकिल्लाच मुख्य किल्ला म्हणून गणला जात होता. शिवाजी महाराजांनी त्याचा ताबा कधी घेतला, याचा लिखित उल्लेख कोणत्याही कागदपत्रांत सापडत नाही. सन 1646-1647च्या सुमारास तोरणासोबत राजांनी हाही किल्ला जिंकून घेतला होता. त्याचे नामकरण त्यांनी   ‘राजगड’ असे केले.
मुरुंबदेवाच्या या डोंगराचे चार भाग पाडतात. त्यात संजीवनी, सुवेळा व पद्मावती या तीन माची व बालेकिल्ल्याचा समावेश होतो. त्यामुळे किल्ल्याचा विस्तार प्रचंड मोठा असल्याचे दिसून येते. राजगडावर पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे, सिंहगड मार्गे पावे गावातून भोसलेवाडी या गावी येणे होय. पुण्यापासून राजगड 75 कि.मी. अंतरावर आहे. सिंहगड रस्त्याने सिंहगडच्या पायथ्याशी डोणजे या गावी पोहोचल्यावर वेल्हे गावात जाण्याकरिता उजवीकडे एक फाटा फुटतो. या ठिकाणावरून राजगड तीस कि.मी. अंतरावर आहे. या मार्गे बसने फक्त पावे गावापर्यंतच पोहोचता येते. तेथून पुढे कानद नदी पार करून राजगडाच्या पायथ्याशी जाता येते. राजगडचा मुख्य दरवाजा-पाली दरवाजा हा याच मार्गे सर करता येतो. पाली दरवाजाचा मार्ग पाली गावातून येतो. रस्त्यात निम्म्यापर्यंत पायवाट व निम्मा रस्ता पायर्‍यांनी बांधलेला आहे. दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार हे भक्कम व मोठे आहे. त्यातून हत्तीसुद्धा आत येऊ शकतो. दुसरे प्रवेशद्वार बुरुजांवर बांधलेले व पहिल्यापेक्षा अधिक भक्कम आहे. या प्रवेशद्वाराद्वारे आपण पद्मावती माचीवर येऊन पोहोचतो. डाव्या बाजूला संजीवनी माचीकडे व उजव्या बाजूचा रस्ता सुवेळा माचीकडे जातो. प्रथम संजीवनी माची, नंतर सुवेळा माची, पद्मावती माची व बालेकिल्ला असा क्रम ठेवला तर एका दिवसात किल्ला पाहण्यास सोपे पडते. मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूने एक चिंचोळा रस्ता संजीवनी माचीच्या दिशेने जातो. या माचीची एकूण लांबी सुमारे अडीच किलोमीटर आहे. माचीवरून तोरणा किल्ला स्पष्ट दिसतो. तीन टप्प्यांमध्ये ही माची बांधली गेलेली आहे. अनेक राहत्या घरांचे अवशेष या माचीवर दिसून येतात. शिवाय तिच्या प्रत्येक टप्प्यावर चिलखती बुरुज बांधलेले आहेत. एकंदर 19 बुरुज या माचीवर बांधलेले आहेत. माचीच्या मध्यभागी उंच टेहळणी बुरूज उभारण्यात आलेला आहे. या बुरुजावरून व माचीच्या टोकावरून आजूबाजूचा प्रचंड परिसर न्याहाळता येतो. माचीवरून परत फिरताना उजव्या बाजूला भाटघर धरण दृष्टीस पडते. डोंगरांच्या रांगांत मोठ्या परिसरात भाटघर धरण पसरलेले आहे. संजीवनी माचीकडून सुवेळा माचीकडे जाण्याकरता बालेकिल्ल्याच्या उजव्या बाजूने रस्ता आहे. हा रस्ता म्हणजे, एक पायवाटच असल्याने येथून हळू चालत जावे लागते. सुवेळा माचीही संजीवनी माचीइतकीच प्रशस्त व लांब आहे. तिची लांबी दोन किलोमीटर आहे. मुरुंबदेवाचा किल्ला हस्तगत केल्यावर शिवरायांनी प्रथम या माचीचे बांधकाम केले होते. संजीवनीपेक्षा सुवेळा माचीची रुंदी तुलनेने कमी आहे.
सुवेळा माचीलाही तीन टप्पे आहेत. शेवटपर्यंत तिची रुंदी कमी होत गेलेली आहे. या माचीवरून डावीकडे सिंहगड व समोरच्या बाजूला पुरंदर व वज्रगड पडतात. माचीच्या सुरुवातीला एक टेकडीसारखा भाग आहे. त्याला ‘डुबा’ असे म्हटले जाते. सुवेळा माचीवर मध्यभागी एक उंच खडक लागतो. या खडकावर 3 मीटर व्यासाचे छिद्र आढळून येते. त्यास हस्तीप्रस्तर म्हणतात. माचीवर हस्तीप्रस्तराच्या विरुद्ध बाजूला गुप्त दरवाजा आहे. त्यास ‘मढे दरवाजा’ म्हणतात. हस्तिप्रस्तर संपल्यावरही असाच गुप्त दरवाजा नजरेस पडतो.
सुवेळा माचीवरून परत फिरताना बालेकिल्ल्याच्या उजव्या बाजूने पद्मावती माचीकडे जाता येते. लांबीने कमी असली तरी ही प्रशस्त माची आहे. पद्मावती माची प्रशस्त असल्याने इथे निवासाची बरीच ठिकाणे दिसून येतात. शिवाय पद्मावती देवीचे मंदिर, सईबार्इंची समाधी, पद्मावती तलाव, रत्नशाळा, सदर, हवालदारांचा वाडा, दारूगोळ्याची कोठारे व गुप्त दरवाजा ही ठिकाणे पद्मावती माचीवर आहेत. शिवरायांनी मुरुंबदेव किल्ल्याचे राजगड असे नामकरण केल्यावर पद्मावती मंदिराची स्थापना केली होती. या मंदिरात सध्या 20-25 जणांची राहण्याची सोय होते. तसेच शेजारीच असलेल्या पाण्याच्या टाकांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणीही उपलब्ध होते. माचीच्या टोकावर गुप्त दरवाजा आहे. वाजेघर गावातून या दरवाजामार्गे किल्ल्यावर येता येते. राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. पद्मावती माचीकडून बालेकिल्ल्याकडे सरळ रस्ता आहे. हा रस्ता कठीण व अरुंद असल्याने त्यावर सांभाळून चालावे लागते. या रस्त्यावर सध्या संरक्षक कठडे टाकल्याने बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जाण्याचा रस्ता फारसा अवघड वाटत नाही. महादरवाजा आजही अत्यंत सुस्थितीत असल्याचे दिसून येते. त्यावर कमळ व स्वस्तिक ही शुभचिन्हे कोरलेली आहेत. दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर नजरेस पडते व मागे पाहिल्यास महादरवाजातून सुवेळा माचीचे दर्शन होते. बालेकिल्ल्याला साधारण 15 मीटर उंचीची तटबंदी बांधलेली आहे. तसेच चंद्रतळे ओलांडून गेल्यावर उत्तरबुरूज नजरेस पडतो. बालेकिल्ल्यावरून पद्मावती माची, सुवेळा माची व संजीवनी माची पूर्णपणे न्याहाळता येतात. पद्मावती माचीकडे उतरणारी एक वाट सध्या बंद केली गेलेली आहे. उत्तर बुरुजाच्या बाजूलाच ब्रह्मर्षी ऋषींचे मंदिर आहे. शिवाय बालेकिल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी भग्न इमारती, वाडे व दारूगोळ्याच्या कोठारांचे अवशेष दिसून येतात. स्वच्छ वातावरण असेल तर केवळ तोरणा, सिंहगड, पुरंदरच नाही तर रोहिडा, रायरेश्वर, लोहगड, विसापूर व रायगड हेही किल्ले पाहता येतात.

Original Articles:


Sunday, January 6, 2013

स्वराज्याची ऐतिहासिक राजधानी: रायगड

समस्त शिवप्रेमींचे तीर्थस्थान म्हणजे, किल्ले रायगड. छत्रपतींचा राज्याभिषेक याच किल्ल्याने ‘याचि देही याचि डोळा’ पाहिला. असे म्हटले जाते, की ‘वृंदावन, मधुरा, काशी आणि रामेश्वर कोणाला? ज्या अभाग्याने रायगड न देखिला!’

रायगड हा निसर्गत: अभेद्य व अतिशय सुरक्षित ठिकाणी आहे. तो सर्वच बाजूंनी डोंगरद-यांनी वेढलेला आहे. खरेखुरे कोकण या किल्ल्याच्या परिसरात सामावलेले आहे. पावसाळ्यात रायगड अतिशय मनमोहक असतो, तर हिवाळ्यात रायगडाच्या कुशीतील सह्याद्रीचे रौद्र रूप सहज डोळ्यात साठवता येते. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 2900 मीटर उंचीवर आहे. पुणे ते रायगड हे अंतर केवळ 125 किमी आहे. येथे पोहोचण्याकरता सर्वात जवळचे बसस्थानक म्हणजे मुंबई-गोवा मार्गावरील महाड. महाड बसस्थानकावरून रायगडसाठी बसेस सुटतात. शिवाय बसस्थानकाबाहेरून जीपचीही सुविधा उपलब्ध आहे. बस थेट रायगडाच्या चितदरवाजापाशी येऊन थांबते. या दरवाजाचे अवशेष आज अस्तित्वात नाहीत. रायगडाच्या पाय-या येथूनच सुरू होतात. आता रोप-वेची सुविधा उपलब्ध झाल्याने 10-15 मिनिटांत गडावर पोहोचता येते. किल्ल्याच्या नाना दरवाजाकडूनही गड चढता येतो. रायगडाला एकूण 1435 पाय-या आहेत. या चढता चढता किल्ल्याचे सौंदर्य डोळ्यांत साठवता येते.

गड चढू लागल्यावर सर्वप्रथम बुरुजाचे ठिकाण दिसते. हा खुबलढा बुरुज. चित दरवाजापासून याचे व्यवस्थित दर्शन होते. रायगडाच्या पाचाड खिंडीत विरुद्ध दिशेला अवघ्या 4-5 मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला ‘वाघबीळ’ असे म्हटले जाते. पुणे-मुंबईकडील दुर्गप्रेमी तिला ‘गन्स आॅफ पाचाड’ असे म्हणतात. गुहा म्हणजे आपल्या मनात एक विशिष्ट रचना तयार होते. पण, ही गुहा या पारंपरिक रचनेत मोडत नाही. पाचाड खिंडीतून आल्यावर या गुहेचे तोंड दिसते. या तोंडातून समोर असणा-या भोकांमधून पाचाडचा भुईकोट किल्ला नजरेस पडतो. रायगडाची आणखी काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

मशीद मोर्चा - चित दरवाजाने पुढे गेल्यावर काही सपाटीचा भाग आहे. या जागेवर दोन पडक्या इमारती नजरेस पडतात. पहारेक-यांच्या विश्रांतीसाठी यापैकी एका जागेचा वापर होत असे. दुस-या ठिकाणी धान्याची साठवण केली जाई. मदनशहा नावाच्या साधूची समाधी येथे दृष्टीस पडते. शिवाय एक मोठी तोफही येथे आहे.

राजसभा - शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावरील राजसभेत झाला होता. राजसभा सव्वाशे फूट रुंद व सव्वा दोनशे फूट लांब आहे. येथे बत्तीस मणांचे पूर्वमुखी सोन्याचे सिंहासन होते. या राजसभेत प्रवेश केल्यावर प्रत्यक्ष शिवरायांच्या उपस्थितीचा भास झाल्याशिवाय राहत नाही.

नगारखाना - बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे नगारखाना होय. रायगडावरील सर्वात उंच ठिकाण हेच आहे. सिंहासनाच्या समोरच असणा-या नगारखान्यातून पुढे गेल्यावर आपण रायगडाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचतो.

बाजारपेठ - रायगडावर पूर्वी भव्य बाजारपेठ होती. नगारखान्याच्या डावीकडून खाली उतरल्यास समोरच्या सपाट जागेला ‘होळीचा माळ’ असे म्हणतात. शिवछत्रपतींचा पुतळा येथे बसवलेला आहे. पुतळ्याच्या समोर डाव्या व उजव्या बाजूला बाजारपेठेचे भव्य अवशेष नजरेस पडतात. या बाजारपेठेच्या दोन्ही बाजूंना 22 दुकाने आहेत.

टकमक टोक - हौशी ट्रेकर्सचे हे सर्वात आवडते ठिकाण. बाजारपेठेच्या समोरून खाली उतरल्यावर या टोकाकडे जाण्याचा रस्ता आहे. या टोकाच्या दोहोंबाजूनी खोल द-या आहेत. उजव्या बाजूला सुमारे 2600 फूट थेट खाली जाणारा कडा आहे. ब-यापैकी मोकळे वातावरण व पाइपचे कुंपण असल्याने चालण्यास फारसा धोका नसतो. परंतु, जागा कमी असल्याने सावधानता बाळगायला हवी. या ठिकाणी दारूगोळा कोठाराचे अवशेषही दिसून येतात.

जगदीश्वर मंदिर - बाजारपेठेच्या पूर्वेला खाली उतरल्यावर समोर एक भव्य मंदिर नजरेस पडते. हे जगदीश्वर महादेवाचे मंदिर. शिवरायांच्या इतिहासात या मंदिराचा ब-याचदा उल्लेख आलेला आहे. मंदिराच्या समोर भग्न अवस्थेतील नंदीची मूर्ती आहे, तर आतील सभामंडपात मध्यभागी कासवाची मूर्ती दृष्टीस पडते. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक छोटासा शिलालेखही कोरलेला आहे. हिरोजी इंदूलकरांनी रायगडाचे बांधकाम केले होते, ते पूर्ण झाल्यावर हा शिलालेख जगदीश्वराच्या मंदिरापाशी स्थापन केला होता. ‘रायगड किल्ला चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो’ या आशयाचा हा शिलालेख आहे.

पालखी दरवाजा - बालेकिल्ल्यात प्रवेश करण्यासाठी असणारा आणखी एक दरवाजा म्हणजे पालखी दरवाजा. रायगडावरील स्तंभांच्या पश्चिमेला असलेल्या तटबंदीस 31 पाय-या आहेत. त्या चढून गेल्यास पालखी दरवाजा लागतो.

रत्नशाळा - यास खलबतखाना असेही म्हणतात. गुप्त खलबते करण्यासाठी रत्नशाळेचा वापर होत असावा. राजप्रासादाच्या उजव्या बाजूला एका तळघरात ही रत्नशाळा वसलेली आहे.

शिरकाई देऊळ - शिवरायांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला एक मंदिर आहे, त्याला शिरकाई देऊळ म्हणतात.

हिरकणी टोक - हिरकणी नावाच्या गवळणीची कथा प्रसिद्ध आहे. गडावरून हिरकणी या वाटेने खाली उतरली होती. या टोकास ‘हिरकणी टोक’ म्हणतात. इथे काही तोफा ठेवलेल्या दिसून येतात. बुरुजावर उभे राहून कोकणातील दोन नद्यांची पात्रे येथून दिसतात. डावीकडे गांधारी व उजवीकडे काळ नदीचे खोरे आहे. या ठिकाणावरून गड उतरणे म्हणजे, अग्निपरीक्षाच. युद्धाच्या दृष्टीने मात्र हे ठिकाण अत्यंत मोक्याचे मानले जाते.

महादरवाजा - या दरवाजावर लक्ष्मी व   सरस्वतीची प्रतीके म्हणून दोन कमळाकृती कोरलेल्या आहेत. दरवाजातून आत प्रवेश केल्यास पहारेक-यांच्या देवड्या दिसून येतात. तटबंदीची सुरुवात या दरवाज्यापासून होते. हिरकणी टोक व टकमक टोकापर्यंत या ठिकाणापासून तटबंदी आहे. टकमक टोकाच्या तटबंदीच्या शेवटी एक चोर दरवाजा आहे. त्यास ‘चोरदिंडी’ असे म्हटले जाते. इथे बुरुजातून दरवाजापर्यंत यायला पाय-या बांधलेल्या आहेत. महादरवाजातून पुढे आल्यावर हत्ती तलाव दृष्टीस पडतो. हत्तींसाठी पिण्याच्या पाण्याची सोय या तलावात करण्यात येत असे. हत्ती तलावाजवळ असणा-या धर्मशाळांच्या डावीकडे गंगासागर तलाव आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी आणलेली महानद्यांची तीर्थे याच तलावात टाकली गेली, त्यामुळे यास गंगासागर तलाव म्हणतात.

शिवरायांची समाधी - जगदीश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजापासून पुढे एक अष्टकोनी चौथरा नजरेस पडतो. तीच शिवरायांची समाधी होय. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दु:खद प्रसंग म्हणजे, शिवाजी महाराजांचे निधन रायगडाने अनुभवले होते. वाघ दरवाजा- आणीबाणीच्या प्रसंगी रायगडावरून खाली उतरण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जायचा. इथून वर येणे अवघड होते. परंतु, दोर टाकून खाली जाता येत होते. छत्रपती राजारामांनी या दरवाजाचा वापर वेढा फोडून निसटण्यासाठी केला होता. शिवरायांची राजधानी असलेला हा किल्ला प्रेरणेचा ऊर्जास्रोत आहे. त्याची सैर एका दिवसात पूर्ण करणे हे जवळपास कठीणच असते; परंतु किल्ला पाहून झाल्यावर तेथून काढता पाय घेण्याची इच्छा होत नाही.

मूळ लेख: दै. दिव्य मराठी (दि. ६ जानेवारी २०१३).
लिंक-१: http://digitalimages.bhaskar.com/divyamarathi/epaperpdf/06012013/5RASIKA-PG4-0.PDF

लिंक-२: http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-on-shivaji-rajas-killa-on-raigad-4138558-NOR.html