माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Wednesday, January 20, 2021

अविस्मरणीय दौंड्या

कोरोना विलगीकरणाचे ते १४ दिवस संपता संपत नव्हते. एक-एक दिवस मोजत पूर्ण केला आणि हा कालावधी संपल्यानंतर पाचव्या दिवशी आठ महिने घरी बसून काढलेला दुष्काळ संपवण्याची वेळ आली. जुन्नर मधला नवीन पर्वत सर करण्याचे ध्येय होते. त्यातच माळशेजच्या रांगेमध्ये असलेला दौंड्या डोंगर सापडला.
फेसबुकवर वाचलेली जुजबी माहिती ज्ञात होती. तिच्या आधारावर ट्रेकिंगच्या नव्या मोसमाची सुरुवात आम्ही करणार होतो. ऑक्टोबर महिना आणि गारवा यांचं फार असं नातं नसतं पण पहाटे पहाटे थोडी का होईना थंडी जाणवत असते. याच थंडीमध्ये सकाळी सहा वाजता मार्गक्रमण सुरू केले. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी याच डोंगरावर एक आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे विमान कोसळले होते. त्यामुळे हा डोंगर इथल्या लोकांना विशेष परिचित आहे. सकाळी सातच्या सुमारास आम्ही तळमाची गावामध्ये पोहोचलो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ मधून आत गावाकडे जाणारा वळणावळणाचा व काहीसा घाट मार्ग असलेला रस्ता मात्र अतिशय सुंदर आहे. पावसाळ्यात बहरलेली झाडी वातावरणात गारवा निर्माण करत होती. गावामध्ये पोहोचलो तोवर सुर्योदय झालेला होता. तळमाचीच्या तीनही बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या दिसल्या. बऱ्याच ठिकाणी सरळसोट कडे आहेत आणि या कड्यांच्याच मागच्या बाजूला माळशेज घाट आहे. डोंगराकडे बघितल्यावर वाटत नाही की इथून वर माथ्यावर जायला रस्ता असावा. तो शोधून काढण्याचे पहिले आव्हान आमच्यासमोर होते. गावांमध्ये एकाला रस्ता विचारला. त्यांने माहिती सांगितली. पण प्रत्यक्ष चालायला सुरुवात केल्यावर आपण जंगलातील न मळलेल्या वाटेवर चालत आहोत, हे ध्यानात आले. वाट चुकली तर होतीच. पण त्यातूनही मार्ग काढत काढत आम्ही जंगलातल्या एका मळलेल्या वाटेला लागलो. जंगल बर्‍यापैकी घनदाट होतं पण पायवाट देखील तितकीच सहज व सुंदर होती. ती पाहता या वाटेने सातत्याने लोकांची ये-जा असावी असे वाटले. कदाचित जंगलांमध्ये लाकडे तोडण्यासाठी लोक येत असावेत. आता वाट रस्त्याच्या दिशेने जात होती. वातावरण तसं स्तब्ध होतं होतं. अधून-मधून रस्त्याच्या कडेला डोंगरावरून तुटून आलेले मोठमोठाले दगड दिसून यायचे. त्याला वळसा घालून पुन्हा मळलेल्या वाटेला लागायचो. अगदी थोड्याच वेळात चढण सुरू झाली. काही ठिकाणी दगड व्यवस्थित रचून रस्ता तयार केलेला होता. चढण फारशी खडी नव्हती. अगदी लहान मुलेही व्यवस्थित या रस्त्याने चालू शकतील, असे वाटून गेले. थोडेच वरती गेल्यावर जंगलाच्या वरच्या भागात आम्ही पोहोचलो. इथून तळमाची गाव व्यवस्थित दिसत होतं. सूर्याची ढगांबरोबर लपाछपी चाललेली होती. रस्ता योग्य आहे, याची खात्री करून आम्ही पुन्हा मार्गक्रमण चालू केले. अनेक ठिकाणी रस्ता खोदून तयार केल्याचे दिसत होते. काही ठिकाणी तर माथ्यावरुन येणारे झुळझुळ पाणी रस्ता पार करताना दिसत होते. डोंगर चढाई सुरू झाल्यानंतर मात्र आजूबाजूला फारशी झाडे दिसली नाहीत. एव्हाना दुरवर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही व्यवस्थित दिसत होती. डोंगर चढणीच्या मध्यावर गेल्यावर माथ्याच्या दिशेने काही लोक रस्ता उतरताना दिसले. आता मात्र आमची वाट योग्य आहे, याची खात्री झाली. ते झपाझप पावले टाकत खाली उतरत होते. आम्ही मात्र अनेक महिन्यांचा वनवास संपवून अतिशय आनंदाने रमत-गमत डोंगर चढत चाललो होतो. दूरवरून या उंच डोंगराला कुठून रस्ता असेल, याची खात्री नव्हती. पण रस्ता मात्र अतिशय सुंदर तयार झालेला दिसला. डोंगर बऱ्यापैकी चढून आल्यावर एक मोठी घळ दिसून आली. आजूबाजूला अजस्त्र दगड चक्क लोंबकळताना दिसत होते. कदाचित ते कधीही पडतील, अशी परिस्थिती होती. त्याच्याच कडेकडेने आमची चढाई चालू राहिली. घळी मधून अजूनही झुळझुळ वाहणारे पाणी व त्याचा खळखळाट जाणवत होता. याठिकाणी भर पावसाळ्यामध्ये चांगला मोठा धबधबा असावा, असे जाणवले. थोडं आणखी चढून आल्यावर आम्ही लवकरच माथ्यावर पोहोचलो. माळशेजच्या सर्व डोंगररांगा तसे सिंदोळा आणि निमगिरी किल्ला आता व्यवस्थित दिसत होता. सूर्याची कोवळी किरणं अंगावर येत होती. अशा वातावरणात फोटोग्राफीचा मोह मात्र आवरला नाही. इथून पुढचा रस्ता शोधायला लागणार होता. समोरच काही कच्ची घर दिसून आली. जवळ जाउन पाहिले तर तिथे कुणीही राहत नव्हते. पाळीव प्राण्यांना विशेषतः गाई-म्हशींना बांधण्यासाठी त्या घरांचा वापर होत असावा, असे दिसले. आम्हाला माळशेजच्या डोंगरांवर जायचे होते म्हणून घरांच्या उजव्या बाजूने मार्गक्रमण चालू केले. माथ्यावर जंगल फारसे घनदाट नव्हते. अजूनही बऱ्याच ठिकाणी पावसाचा ओलावा जाणवत होता. इथे फुलपाखरांची काही कमी नव्हती. वातावरणात बऱ्यापैकी शांतता होती. त्यामुळे पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ऐकू यायचे. डोंगरमाथ्यावर उजव्या बाजूने कडेकडेने आम्ही मार्ग शोधायला सुरुवात केली. पुढे गेल्यावर जंगलाच्या आत जाणारा रस्ता होता. तो आम्ही पकडला पण दुरून कोणीतरी आम्हाला पाहिले होते. त्याने ओरडूनच उजव्या बाजूचा रस्ता पकडा असे आम्हाला सांगितले. इतक्या लांबून कोणीतरी आम्हाला पाहत आहे, याचे जरा आश्चर्य वाटले. रस्ता दाखवणारा मार्गदर्शक मिळाल्याने आमचे काम सोपे झाले होते. थोडं अंतर चालून गेल्यावर दोन डोंगरांना जोडणारा एक अतिशय रुंद रस्ता होता. या जागेला वानरदरा असे म्हटले जाते. तो ओलांडून पुढे आलो तर दूरवर अस्वलदरा दिसून आला. अतिशय छोट्या प्रवाहासह जमिनीवर कोसळणारे धबधब्यांचे आवाज ऐकू यायला लागले होते. डोंगराच्या मागच्या बाजूला आलो तर जुन्नर मावळातला सर्व परिसर दिसून आला आणि समोर दिसत होता नाणेघाटातील जीवधन किल्ला! जीवधन किल्ल्याची इतक्या लांबून एका वेगळ्याच डोंगरावरची छटा आम्ही पहिल्यांदाच पाहिली. नाणेघाट जवळ असला तरी नानाचा अंगठा काही दिसला नाही मावळातला खूप मोठा परिसर मात्र नजरेत आला होता. अगदी अंजनावळे गावातली वऱ्हाडी रांगही स्पष्ट दिसत होती. या डोंगराचा माथा पहिल्यांदाच पाहायला मिळाला. सहसा तो कोणत्याही इतर डोंगरावरून दिसत नाही. अगदी जीवधन किल्ल्यावरूनही नाही. दौंड्याच्या मागच्या बाजूला देखील तितकीच मोठी झाडी आहे आणि आणि दूरवर वसलेली छोटी आदिवासी गावेही आहेत. त्यांचं निरीक्षण करत या टोकावर आम्ही बसलो. वातावरणातील गारवा मनाला प्रसन्न करत होता. दौंड्याचा पहिला टप्पा आम्ही समर्थपणे पार केला होता व त्याचा आनंद घेत होतो. इथून पुढे पुन्हा वाटचाल सुरू केली. जायला पुन्हा दोन वाटा होत्या त्यापैकी डावी वाट निवडली. माथ्यावर गाईंचे सर्वत्र पडलेले शेण पाहून इथे जनावरांचा सातत्याने वावर असावा, असे दिसले. मनुष्य प्राण्याचा वावर मात्र कुठेच नव्हता! दहा मिनिटांच्या वाटचालीनंतर आम्ही एका मोठ्या पठारापाशी पोहोचलो. समोर आणखी एक टेकडी होती. ती खालूनही आम्हाला दिसली होती. याच टेकडीवर एक छोटेखानी मंदिर बांधलेले आहे. तिथे जाणारी पायवाट सापडत नव्हती. कदाचित ती दुसऱ्या बाजूने असावी, असे वाटून गेले. म्हणून उगलेल्या गवतातूनच आम्ही आमची पाय वाट तयार केली व त्या माथ्याच्या दिशेने जाऊ लागलो. एव्हाना पोटात कावळे ओरडायला लागले होते. म्हणून पुढे जाण्याआधी एखादी रिकामी जागा शोधली व पेटपूजा उरकून घेतली. त्यामुळे तरतरी आली होती. आता आम्ही त्या माथ्याच्या अगदी समोर होतो. त्याच्या उजव्या बाजूने एक रस्ता पुढे जात होता. तिथून मार्गक्रमण चालू केले. परंतु टेकडीवर जाण्याचा रस्ता मात्र सापडला नाही. तिच्या कडेकडेने जंगलातून जाणारी वाट आम्ही धरली. हीसुद्धा बऱ्यापैकी मळलेली होती. डोंगर पायथ्याचा बराच मोठा परिसर जंगलांनी व्यापलेला दिसत होता. पहिली टेकडी मागे पडली तर पुढे आणखी तशीच टेकडी दिसून आली. ती मात्र सरळसोट होती. तिच्यावर कोणत्याही प्रकारचे मंदिर दिसून आले नाही. किंबहुना तिच्यावर जाण्यासाठी रस्ताही नसावा. काही अंतरावर अनेक प्रयत्न करून देखील पुढचा रस्ता सापडला नाही. कदाचित पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा वाटा नष्ट झाल्या असाव्यात. तिथे आम्ही डोंगराच्या तिसऱ्या टप्प्यावर होतो. येथून दुसर्‍या टप्प्यावर दूरवर एका पानवठ्यापाशी सांबराचे दर्शन झाले. तसे पाहिले तर सांबर एकटी फिरत नाहीत. पण ते एकटेच दुडूदुडू फिरताना दिसले. त्याला आमची चाहूल लागली असावी, म्हणून त्याने लगेच जवळच्या झाडीमध्ये झेप घेतली व ते गायब झाले. आमच्या प्रवासाचा हा अंतिम बिंदू होता. येथून पुन्हा माघारी फिरायचे आम्ही ठरवले. जंगलातली आणखी कोणती वाट सापडते का, ते पाहिले. पण त्यात यशस्वी झालो नाही. परतीच्या वाटेने अतिशय कमी वेळात आम्ही पुन्हा पायथ्याशी पोहोचलो. येताना चुकलेली वाट पुन्हा समजली. गावांमध्ये पोहोचलो तेव्हा वर जाण्याची योग्य वाट कोणती, हे ध्यानात आले.
तीन ते चार तासांचा कित्येक महिन्यांपासून रखडलेला ट्रेक सफल झाला होता. परतीच्या वाटेत गाडीमध्ये बसलो आणि पुढच्या प्रवासाची अर्थात ट्रेकची मनोमनी तयारी सुरू केली.



















Sunday, January 10, 2021

एका अतिदुर्गम किल्ल्याची भ्रमंती

स्वातंत्र्यपूर्व काळातील गोष्ट आहे. हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांमध्ये विश्रांती घेण्यासाठी एक ब्रिटिश अधिकारी नियमितपणे येत असे. तो या परिसरात निवासास असायचा. स्थानिक लोक या अधिकाऱ्याला पोप असे म्हणायचे व तो दर रविवारी अर्थात संडेच्यादिवशी या ठिकाणी मुक्कामास असायचा. याच कारणास्तव या भागातील गावाला अपभ्रंशित असे "फोफसंडी" नाव पडले.
नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भागात हे निसर्गरम्य गाव वसलेले आहे. पुणे आणि नगर जिल्ह्याची सीमा व डोंगरदऱ्यात वसलेल्या परिसर ही या गावाची मुख्य ओळख होय. या गावामध्ये शिवकालीन कुंजरगड किल्ला आहे. गावात जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्यामुळे या गडावर भ्रमंती करण्यासाठी फारशी वर्दळ नसते. परंतु शिवस्पर्श लाभलेला हा किल्ला एकदा तरी सर करायचा, असे आम्ही मनोमन ठरवले होते. त्यानिमित्ताने फोफसंडी मधील अद्भुत निसर्गही पाहता येईल, अशी आमची मनीषा होती.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर वसलेले जुन्नर मधील उदापूर हे गाव होय. या गावातून उत्तरेकडे एक डांबरी रस्ता जातो. या मधल्या डोंगररांगांमध्ये मांदारने घाट आहे. तो ओलांडला की मांडवी नदीचं खोरं सुरू होतं. मुथाळणे, मांडवे व कोपरे ही गावे संपली की जुन्नर तालुका व पर्यायाने पुणे जिल्हाही समाप्त होतो.
इथवर रस्त्याची स्थिती अत्यंत चांगली होती. परंतु, कोपरे गाव संपले आणि रस्त्याचा खळखळाट चालू झाला. डोंगर-दर्‍यांमधे वेढलेला निसर्ग मात्र मन प्रफुल्लित करणारा होता. डाव्या बाजूला उंचच उंच कड्यांनी सजलेले हिरवेगार डोंगर आणि उजव्या बाजूला दरीमधून वाहणारी मांडवी नदी. अशा वातावरणात आमचा प्रवास चालू झाला. या दुर्गम भागामध्ये अनेक मोठाले धबधबे दिसून येतात. ऑक्टोबरचा काळ असल्यामुळे त्यांच्यातील प्रवाह बराच कमी झाला होता. हे सर्व पाणी मांडवी नदीच्या पात्रात जात असावे. मांडवी नदीपात्र दोन्ही बाजूंनी डोंगरदऱ्यांनी वेढलेले आहे. तिचा असा प्रवाह पाहिला की, काश्मीरच्या खोऱ्यामधून वाहणार्‍या सिंधू नदीची आठवण होते. ही नदी फोफसंडी गावातच उगम पावते. तिथपासून चिल्हेवाडी धरणापर्यंत ती केवळ डोंगरदऱ्यातूनच वाहत येते.
फोफसंडीला जोडणारा हा रस्ता चार चाकी गाडीसाठी मात्र निश्चितच योग्य नव्हता. त्यामुळे चांगला रस्ता कधी लागेल याची वाट बघतच आम्ही त्या हिरव्यागार परिसरातून भ्रमंती सुरू ठेवली होती. पंधरा ते वीस मिनिटातच दूरवर डोंगरातच्या पायथ्याशी फोफसंडी गाव नजरेस पडले. एव्हाना सूर्योदय झाला होता. सूर्यकिरणे गावातील घरे उजळवून टाकत होती. अशा वातावरणातच आम्ही गावात प्रवेश केला. गावच्या मुख्य वेशीसमोरून एक रस्ता उत्तरेकडील डोंगराकडे जात होता. त्याची स्थितीही फारशी चांगली नव्हती. परंतु स्थानिक गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तिथून किमान दोन चाकी गाडी तरी वरील जांभळे वस्ती पर्यंत जाते. त्यामुळे त्या अवघड वाटेने आमचा खडतर प्रवास सुरू झाला. जसजसे आम्ही वर जाऊ लागलो तसतसा आजूबाजूचा परिसर दृष्टीच्या टप्प्यात येऊ लागला होता. परंतु, वाट ही बिकट होती. उत्तरेच्या वाटेवर आम्हाला कुंजरगड किल्ला दृष्टीस पडला. स्थानिक लोक त्यास कोंबड किल्ला असेही म्हणतात. त्याचे कारण माहीत नाही. परंतु किल्ल्याची रचना हत्तीच्या सोंडेप्रमाणे असल्याने त्यास कुंजरगड म्हणत असावेत, असे वाटते. कारण 'कुंज' या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती असा होतो.
साधारणत: दीड ते दोन किलोमीटर अंतर पार केल्यावर डोंगरावर एक छोटी वस्ती लागली. हीच ती जांभळे वस्ती होती. तिथे गेल्यावर पहिल्यांदाच आम्ही मागे वळून पाहिले. दूरदूरवर आम्ही पार केलेल्या डोंगररांगा दिसत होत्या. जुन्नरमध्ये असणारी हटकेश्वर डोंगररांग व तिच्यावरील नैसर्गिक पूल अगदी स्पष्ट दिसत होता. म्हणजे इतकी पायपीट करूनही आम्ही फार लांब आलो नव्हतो, हे ध्यानात आले! पुणे आणि नगर जिल्ह्याची सिमा असणारा रांजना डोंगर आकाशाकडे टोक दाखवत उभा असलेला दिसला. या ठिकाणावरून आमची खरी चढाई चालू झाली. जुन्नरपेक्षा दाट रानवाटा याठिकाणी दिसून येत होत्या. पावसामुळे वरून घसरत आलेले दगड रस्त्यांवर चहुकडे पडलेले होते. त्यातूनच मार्ग काढत आम्ही चढाई चालू ठेवली. दहा मिनिटांमध्ये पहिला टप्पा पार केला. इथे एक छोटेखानी आदिवासी घर बांधलेले होते. आता मात्र किल्ल्याचा मुख्य बुरुज व्यवस्थित दिसायला लागला. शिवाय उत्तरेपर्यंत किल्ला व त्यातील ढासळलेले बुरुज नजरेस पडत होते. बहुतांश किल्ल्यांवर शिवकाळात बांधलेल्या बुरुजांचे अवशेष दिसून येत नाहीत. परंतु, इतक्या दुर्गम भागात असूनही या किल्ल्यावरील दोन्ही बाजूंचे बुरुज बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत दिसून येत होते.
किल्ल्याची इथून पुढची चढण मात्र गवताळ वाटेने जाणारी होती. ऊन लागलं होतं. पण आम्ही बऱ्याचशा उंचीवर आल्याने त्याची तीव्रता जाणवत नव्हती. थंड हवेचे झोत अंगावर येत होते. त्या गवताळ पायवाटेने समोरचा भग्न बुरुज समोर ठेवून आम्ही भ्रमंती चालू ठेवली. ही पायवाट वगळता अन्य ठिकाणी बऱ्यापैकी झाडी होती. पायवाट संपली तिथून पुढे काही अंतरावर ढासळलेला बुरुज दिसून आला. हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा नव्हता. त्यामुळे त्या तुटलेल्या अवशेषांवरून किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी थोडीशी कसरत करावी लागली. ती फारशी अवघड नव्हती. बुरुज चढून आल्यावर आम्ही किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो. किल्ल्याचे दक्षिण-उत्तर टोक व्यवस्थित दिसत होते. अगदी हत्तीच्या सोंडेप्रमाणे उत्तरेकडचे टोक लांब असल्याचे दिसले. किल्ल्याचा पूर्ण परिसर रानगवताने आच्छादित झाल्याचा दिसत होता. येथून उजव्या बाजूने एक पायवाट उत्तरेकडे जाताना दिसली.
थोड्याच अंतरावर थंड व शुद्ध पाण्याचे मानवनिर्मित टाके दिसून आले. तसं पाहिलं तर अशी नऊ ते दहा टाकी या किल्ल्यावर बांधलेली आहेत. त्यामधील पाणीही बऱ्यापैकी शुद्ध आहे. या भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे जवळपास सर्वच टाकी काठोकाठ भरल्याची दिसत होती. किल्ल्याच्या मध्यभागी एका उघड्या जागेत महादेवाची पिंडी स्थापन केलेली होती व त्यासमोरच एक पाषाणातून निर्मित नंदी महादेवाला नमन करत होता. या उघड्या मंदिराच्या मागे किल्ल्यावरील वाड्यांचे अवशेष दिसून आले. इतिहासातील नोंदींनुसार सन १६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर मुक्काम केला होता. कदाचित ते याच वाड्यामध्ये थांबले असावे. शिवस्पर्श लाभलेला असा किल्ला पाहणे म्हणजे एक ऐतिहासिक रोमांच असतो, याची जाणीव त्या क्षणी झाली. किल्ल्याच्या उत्तर टोकाकडे जाताना त्याची रचना लोहगडाच्या विंचूकड्यासारखी भासत होती. मागचा भाग आता अधिक स्पष्ट दिसत होता. हरिश्चंद्रगडाच्या रांगा व्यवस्थित दिसू लागल्या होत्या. या डोंगररांगांमधील अनेक खेडी असे विहीर, कोठाळे, शिंदे, कोहणे ही गावे किल्ल्यावरून दृष्टीस पडत होती. किल्ल्याची प्रत्यक्ष उंची या बाजूने खऱ्या अर्थाने ध्यानात येत होती. विहीर गावातून येणारा रस्ता हा पूर्णपणे पायवाटेचा असावा असे दिसले. पुढे थोड्याच अंतरावर एक मानवनिर्मित गुहा होती. परंतु, ती पाण्याने पूर्ण भरलेली दिसून आली व त्या भोवती मोठ्या प्रमाणात गवत उगलेले होते. किल्ल्याचे उत्तरेकडील टोक गाठले तेव्हा अकोले तालुक्यातील बहुतांशी भाग नजरेच्या टप्प्यात आला होता. दूरदूरची खेडी व त्यांना जोडणारे छोटेखानी रस्ते असा हा सारा नजारा या ठिकाणावरून दिसत होता. फोफसंडी गावातून मागच्या बाजूला यायचे म्हणजे समोरील डोंगररांगेला कमीत कमी पस्तीस ते चाळीस किलोमीटरचा वळसा घालावा लागत असावा, असे दिसले. पूर्वेकडील दरीमध्ये मांडवी नदीचे उगमस्थान होते. येथूनच दरीच्या वाटेने अनेक वळणे घेत मांडवी नदी प्रवास करत असताना दिसली. सह्याद्रीचे उंच उंच डोंगर व त्यामध्ये वसलेल्या कुंजरगड किल्ला असा अद्भुत संगम या ठिकाणावरून दिसत होता.
किल्ल्याची शेवटचे टोक गाठल्याने आम्ही दुसऱ्या बाजूने मागे जाण्यास सुरुवात केली. पुन्हा किल्ल्याच्या मधोमध आल्यानंतर डावीकडे बर्‍यापैकी चांगली वाट खाली जाताना दिसली. ही किल्ल्यावर येण्या-जाण्याची मुख्य वाट होती. कोहणे तसेच फोफसंडी गावातून येणारी किल्ल्यावरील वाट या ठिकाणी एकत्र येते. शिवकालामध्ये या ठिकाणी कदाचित किल्ल्याचा महादरवाजा असावा. त्याचे अवशेष मात्र तिथे दिसत नाहीत. या वाटेने आम्ही खाली उतरलो. अगदी थोड्याच अंतरावर डावीकडे एक मोठी निसर्गनिर्मित गुहा होती. वीस पंचवीस लोक इथे सहज उभे राहू शकतील इतकी भव्य जागा होती. शिवाय समोरील डोंगररांगा व जंगलं या जागेवरून स्पष्ट दिसत होती. इथून पुढची पायवाट जंगलातून जाणारी दिसली. अगदी दोनच मिनिटांच्या अंतरावर पुन्हा डावीकडे एक मानव निर्मित गुहा दिसून आली. एखाद्या लेण्यासारखी रचना येथे करण्यात आली होती. त्यावर कोणीतरी "भुयार" असे पेन्ट केल्याचे दिसले.  कुंजरगडावरील हे सर्वोत्कृष्ट प्रेक्षणीय स्थळ होय. कारण ही मानवनिर्मित गुहा म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण भुयार आहे. या भुयारातून आत गेल्यानंतर किल्ल्याच्या दुसर्‍या बाजूचा पूर्ण परिसर पाहता येतो. याचा अर्थ या भुयारातून किल्ल्याच्या दोन्ही बाजूंना व्यवस्थित टेहाळणी करता येऊ शकते. कदाचित याच उद्देशाने त्याची निर्मिती असावी. किल्ल्याच्या सोंडेला भोक पाडून या भुयाराची रचना झाली असल्याचे दिसते. त्यात बऱ्यापैकी पाणी साठलेले होते.
भुयाराची अनुभूती घेतल्यानंतर आम्ही परतीच्या वाटेला लागलो. डावीकडील रस्ता कोहणे व विहीर गावाकडे जातो तर उजवीकडील पुन्हा फोफसंडीमध्ये उतरतो. दोन्ही रस्ते दाट झाडीमध्ये स्थित आहेत. आम्ही फोफसंडीच्या रस्त्याला लागलो तेव्हा किल्ला उजव्या बाजूला दिसून येत होता. वरील पूर्ण तटबंदी पुन्हा न्याहाळता येत होती. १५ ते २० मिनिटांच्या पायपिटीनंतर आम्ही पुन्हा जांभळे वस्तीमध्ये येऊन पोहोचलो.
एकंदरीत दोन तासांचा हा प्रवास होता. एक अनवट वाटेवरील अपरिचित किल्ला पाहण्याचा प्रसंग त्यादिवशी आम्ही अनुभवला. इथून अकोले तालुक्यातील कोतुळ गाव ४० किलोमीटर अंतरावर आहे. त्या बाजूनेही किल्ल्याला भेट देता येते. शांत आणि निसर्गरम्य वातावरणातील तसेच शहरी वर्दळीपासून दूर असलेल्या एखाद्या किल्ल्याला भेट द्यायची असल्यास कुंजरगड नक्की अनुभवावा असाच आहे.










Sunday, January 3, 2021

खंड्या

सकाळी आठ वाजता किल्ल्याच्या पायथ्याच्या मंदिरापाशी पोहोचलो. तोच समोरच्या कमानीतून 'तो' शेपटी हलवत आमच्यापाशी आला. त्याला कदाचित खायला हवे होते असे वाटले. आम्ही सुरुवातीला त्याच्याकडे काहीसे दुर्लक्ष केले आणि किल्ल्याच्या दिशेने चालू लागलो. मग तोही आमच्या बरोबरच चालायला लागला. पायवाट पूर्णपणे जंगलातून जाणारी होती. बऱ्याच ठिकाणी दोन वाटा जाताना दिसायच्या. अर्थात हा सर्व भुलभुलैयात वाटायला लागला. पण तो त्या वाटेने सराईतपणे आमच्या बरोबर चालला होता. त्याला रस्ता व्यवस्थित माहीत होता. इतक्या घनदाट जंगलातून पुढे सरकायला आम्हाला काहीशी भीती वाटत होती. कारण आमच्या तिघांना व्यतिरिक्त त्या जंगलात कोणीही नव्हते. कदाचित आमच्या आधीही कुणी गेले नसावे. जंगलातल्या त्या पायवाटेवरून चालताना हीच वाट योग्य आहे का? अशी शंका मनात उभी राहायची. पण तो मात्र त्या पायवाटेने सहजपणे पुढे चालला होता. त्यामुळे आम्हीही निर्धास्तपणे त्याच्या सोबत चालू लागलो. कधी कधी तो मध्येच जंगलातल्या चिंचोळ्या वाटेत घुसायचा व परत मळलेल्या वाटेकडे धाव घ्यायचा. रानावनात झाडांच्या टोकावरून उड्या मारणाऱ्या माकडांना आणि वानरांना आमची चाहूल लागली की ते त्यांच्या त्याची खबर आपल्या भाऊबंदांना विशिष्ट आवाज करून देत होते. त्या निबिड जंगलामध्ये तो आवाज भेसूर आणि भीतीदायक वाटत होता. पण आमचा सोबती आणि मार्गदर्शक कधीकधी धावत जाऊन माकडांना हुसकून लावायचा. आम्ही थांबलो की तोही स्वतःसाठी एखाद्या झाडीमध्ये जमीन उकरून थंडावा शोधायचा व तिथे अंग टाकून द्यायचा. तो आमची साथ सोडत नव्हता. कदाचित त्याला आमच्या सोबत किल्ल्यावर यायचे होते. एक तास झाला तरीही किल्ल्याच्या पायर्‍या लागल्या नव्हत्या. पण मळलेली पायवाटही अजून संपत नव्हती. जंगलातला प्रदीर्घ रस्ता संपला आणि समोर सह्याद्रीचा कोकणकडा दिसू लागला. लवकरच एक मंदिरही दिसायला लागले. विश्रांती घेण्यासाठी ती एक उत्तम आणि प्रशस्त जागा होती. आम्ही थांबल्यावर तोही मंदिराच्या बाहेर पहुडला. इथून पुढचा टप्पा मात्र पायर्‍यांच्या वाटेचा होता. आता किल्ल्याच्या मुख्य पायऱ्या व्यवस्थित दिसायला लागल्या होत्या. आधीच आमची दमछाक झालेली होती. त्यात ह्या खड्या पायऱ्या चढून जायचे होते. 
 


 
 
ऊन डोक्यावर आलं तरी झाडांचा थंडावा शरीराला अल्हाददायक शीतलता प्रदान करत होता. त्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती. कातळटप्पा सुरु झाला तिथून मात्र ऊन थेट अंगावर येत होतं. तोही आमच्या सोबतीने तिथवर आला. उभा कातळटप्पा हातांचाही वापर करत आम्ही सर करू लागलो. काही ठिकाणी अवघड पायऱ्यांचा मार्ग होता. पण तो अगदी सराईतपणे त्याने पार केला. त्याच्या चढाईमध्ये अगदीच सहजता जाणवत होती. जणूकाही तो रोजच या किल्ल्यावर येत असावा मुख्य दरवाजा पार केल्यानंतर मात्र त्याने आपले अंग टाकून दिले. कदाचित आमची फोटोग्राफीची गडबड लक्षात घेता अजून पंधरा-वीस मिनीटे तरी आम्ही इथून हालणार नाही, असे त्याला वाटले असावे. आणखी दोन पायऱ्यांचे मार्ग सर केल्यानंतर आम्ही एका भव्य गुहेपाशी येऊन पोहोचलो. ते एक मानवनिर्मित लेणंच होतं. हजारो वर्षांचा इतिहास त्यात सामावलेला होता. कमीत कमी ६० ते ७० लोक मावतील इतकी मोठी ती जागा होती. आल्या आल्या त्याने आपली नेहमीची जागा हेरली आणि अंग टाकून दिले. एव्हाना किल्ल्याच्या पायथ्यापासून दोन तास होऊन गेले होते. आम्हालाही भूक लागली होती. त्यामुळे पाठीवरच्या सॅक काढून ठेवल्या व पोट पूजेची सोय करू लागलो. त्यांने आम्हाला इतपर्यंत सोबत दिली होती. कदाचित त्याला काहीतरी खायला हवे असावे, असे आम्हाला वाटले. पण आम्ही दिलेल्या कोणत्याही पदार्थाकडे त्याने ढुंकूनही पाहिले नाही. आपले मार्गदर्शनाचे कर्तव्य त्याने पूर्ण केले होते. शेवटच्या कातळ टप्प्यासाठी तो आमच्या सोबत नव्हता. येतानाही तो त्या गुहेमध्ये परत दिसला नाही. किंबहुना रस्त्यातही तो आम्हाला परत दिसलाच नाही.
कदाचित केवळ आम्हाला किल्ल्याचा मार्ग दाखवण्यासाठी तो आमच्यासोबत आला असावा. त्याला आम्ही लाडाने "खंड्या" असे नाव ठेवले होते!