माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Saturday, May 22, 2021

अणे घाट

जुन्नर मधल्या अनेक घाटवाटा यांपैकी बहुतेक हा सर्वात सोपा घाट आहे. घाट चढून वरती गेलं की, जुन्नर मधलं आणि पर्यायाने पुणे जिल्ह्यातलं सर्वात शेवटचं गाव अर्थात अणे गाव लागतं. याच गावावरून या घाटाला नाव मिळालं आहे. या घाटाचे वैशिष्ट्य म्हणजे याच परिसरामध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा नैसर्गिक पूल आहे. डोंगरावरून सातत्याने कोसळणाऱ्या पाण्याने हा नैसर्गिक पूल अनेक वर्षांपूर्वी तयार झालेला आहे. शिवाय या परिसरामध्ये बरीच मोठी निसर्गराजी दिसून येते. तसेच इथे मळगंगा मातेचे एक छोटेखानी मंदिर देखील आहे. घाटातील डोंगररांगा तशा फारशा विस्तीर्ण नाहीत. घाटा खालच्या एका गावातून वरील माथ्यावर एक छोटे मंदिर दिसून येते. खरं तर त्याचा पाठलाग करायचा होता. परंतु असे समजले की, डोंगराच्या खालच्या बाजूने मंदिरात जाण्यासाठी कुठली ही पायवाट अस्तित्वात नाही. त्या करिता घाट चढून वरच्या दिशेने जावे लागते. अर्थात मीही हाच मार्ग अवलंबिला.
घाट चढून वरती गेल्यावर उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता घाटाच्या डोंगर माथ्याच्या दिशेने जातो. त्याच दिशेने मीही मार्गक्रमण सुरु केले. बराच अंतर गेल्यावर रस्ता अधिक कठीण होत असल्याचे जाणवले आणि मी बर्‍यापैकी घाटाच्या डोंगरांवर आलो आहे, असेही जाणवले. इथून पुढे पायी चालावे म्हणून गाडी रस्त्याच्या कडेला लावली व पदभ्रमंती चालू केली. तसा हा परिसर निर्जन होता. अगदी दूरवर एखादं घर दिसून यायचं. बाकी सर्व परिसर हा शेतीचा होता. घाट महामार्गावर असल्यामुळे व इथल्या शांततेमुळे घाटातील गाड्यांचे आवाज व्यवस्थित ऐकू येत होते. शिवाय संध्याकाळच्या प्रसंगी आपल्या घरट्याकडे जाण्यासाठी चाललेली पक्ष्यांची किलबिलही व्यवस्थित ऐकून येत होती. पंधरा-वीस मिनिटांच्या भ्रमंतीनंतर काही घरे दिसून आली आणि तिथूनच दूरवर ते छोटेखानी मंदिर दिसून येत होते. तिथे जाण्याचा रस्ता फार बिकट नव्हता. एका छोट्याशा टेकडीच्या कडेकडेने मार्ग काढत मी मंदिराच्या दिशेने निघालो. थोड्याच अंतरावर टेकडी संपली आणि पुन्हा पश्चिमेकडे जाणारा सूर्य व्यवस्थित दिसायला लागला. एव्हाना मी पूर्णपणे घाटमाथ्यावर आलेलो होतो. खालचा रस्ता आता व्यवस्थित दिसत होता. वाहतुकीची हालचालही लक्षात येत होती. या ठिकाणी एक विस्तीर्ण माळरान दिसून आले. अनेक गुरे इथे चरत होती. पावसाळा संपून केवळ एकच महिना झाला होता. त्यामुळे गवत बऱ्यापैकी ओले व दाट होते. त्यातली पायवाट मात्र व्यवस्थित दिसत होती. कदाचित या रस्त्यावरून सातत्याने ये-जा होत असावी, असे वाटले. मंदिर आता खूपच जवळ आले होते. दोनच मिनिटाच्या प्रवासानंतर मी मंदिराच्या जवळ पोहोचलो. अतिशय छोटा उंचवटा व त्यावर बांधलेले ते मंदिर खूप सुंदर भासत होते. थोड्याच अंतरावर काहीशी झाडी दिसू लागली. शिवाय अजूनही परिसर निर्जन होता. मंदिराच्या प्रवेशद्वारी एक श्वान कदाचित त्याचे रक्षण करत असताना दिसत होता. दूरदूरवर केवर माळरान दिसत होते. मी घाटाच्या डोंगरांच्या बरोबर मागच्या बाजूला आलेलो होतो. एक नितांत शांतता या ठिकाणी अनुभवायला मिळाली. तिचा आनंद घेत पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो. परत फिरताना घाटाचा व्यवस्थित अंदाज येत होता. डोंगराच्या दिशेने जाऊन रस्त्यांची पाहणी केली. झाडी फारशी नव्हतीच. त्यामुळे डोंगरमाथ्यावरून घाटातील वळणदार रस्ते व्यवस्थित दिसत होते. माळशेज घाटापुढे या घाटाची उंची तशी काहीच जाणवली नाही. पण एका आगळ्या वेगळ्या वाटेने डोंगरमाथ्यावर फिरण्याचा आनंद मात्र घेता आला.
 









Friday, May 7, 2021

कानिफनाथाच्या डोंगरावर

हायवेवरून दुरच्या डोंगरावर असणारं ते मंदिर बऱ्याचदा मी पाहिलं होतं. पण तिथे जाण्याचा निश्चित रस्ता माहीत नव्हता. अशावेळी गुगल मॅप पुन्हा मदतीला धावला. आळे गावाच्या बरोबर मागच्या डोंगरांमध्ये असणारं ते मंदिर गुगल मॅपवर शोधून काढलं. हे मंदिर होतं कानिफनाथाचं आणि गाव होतं कोळवाडी. दुपारचं ऊन ओसरल्यानंतर आळे गावात प्रवेश केला. इथून एक रस्ता संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी मंदिराकडे अर्थात संतवाडीच्या दिशेने जातो. याच रस्त्यावर थोड्या अंतरावर एक फाटा उजवीकडे कोळवाडीच्या दिशेने जातो. हे वळण घेतलं आणि समोरच्या डोंगरावर कानिफनाथाचे ते मंदिर दिसून यायला लागलं. मुख्य फाट्यापासून सुमारे दोन किलोमीटरवर कोळवाडी गाव असावं. गावात पोहोचल्यावर पुनश्च एक रस्ता उजवीकडे डोंगराच्या दिशेने जाताना दिसला. हा डांबरी रस्ता नसला तरी त्याची स्थिती बर्‍यापैकी चांगली होती. आजूबाजूला फक्त शेतीच शेती नजरेत येत होती. दहा मिनिटांमध्ये मी डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या एका जंगलामध्ये पोहोचलो. इथे पुर्णतः शांतता होती. फक्त झाडांवर फिरणाऱ्या पक्ष्यांचे आवाज येत होते. मानवी अस्तित्वाचा कोणताच आवाज ऐकू आला नाही. जंगलाच्या सुरुवातीलाच गाडी पार्क केली आणि पदभ्रमंतीला सुरुवात केली. वारा नसल्यामुळे जंगलातील सर्व झाडे स्तब्ध होती. थोड्याच वेळामध्ये जंगल संपले आणि डोंगरावर जाणाऱ्या पायवाटेला सुरुवात झाली. सुरुवातीलाच सिमेंटच्या पायऱ्या याठिकाणी बनवलेल्या दिसून आल्या. कदाचित या मार्गाने नियमितपणे गावकरी डोंगरावर कानिफनाथांच्या दर्शनाला जात असावेत. थोडं चढुन गेल्यावर पायवाट आणखीन मळलेली दिसून आली. पायऱ्या संपल्या होत्या. पण दगडांच्या साहाय्याने अनेक ठिकाणी पायऱ्या निर्मिल्याच्या दिसून येत होत्या. झाडांची गर्दी कमी झाली होती. पण डोंगरावरून आलेले मोठमोठाले दगड रस्त्यामध्ये दिसून येत होते. पावसाळ्यात याच मार्गाने पाणी खाली येत असावे, असेही भासत होते. वाट उत्तम आणि वळणावळणाची होती. सूर्य मावळतीकडे झुकत होता आणि मी सूर्याच्या विरुद्ध दिशेने डोंगरावर चढत चाललो होतो. उन्हाची तीव्रता कमी झाली असल्याने दमछाक होत नव्हती. अगदी पंधरा मिनिटांमध्येच डोंगराच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचलो. येथून आजूबाजूचा विस्तीर्ण परिसर नजरेच्या टप्प्यात आला होता. शिवाय दूरवर सूर्यकिरणांचा अभिषेक होत असलेला नारायणगड किल्लाही व्यवस्थित दिसत होता. सूर्यकिरणांच्या वर्षावामुळे आजूबाजूचा परिसर प्रकाशमय झाला होता. त्यामुळे मध्यभागी असलेला नारायणगड अधिक उठून दिसत होता. पहिला डोंगर संपल्यानंतर थोडीशी सपाटी लागली आणि पुढच्या चढाकडे मार्गक्रमण चालू केले. इथपर्यंत पायवाट अतिशय चांगली होती. पुढची पायवाट काही शांत जंगलातल्या रस्त्याने पुढे जात होती. चढण सुरु झाली नि पायर्‍यांची रचना केलेला रस्ता दिसू लागला. डोंगराच्या वरच्या भागात असलेले हे जंगल पायथ्यापासूनही व्यवस्थित दिसत होते. इथे पोहोचल्यावर मात्र त्याची शीतलता मन प्रसन्न करून गेली. आता चढाईचा रस्ता सुरू झाला होता. ही चढण आधीच्या सर्व चढणीपेक्षा अधिक तीव्र होती. परंतु पायर्‍यांचा मार्ग असल्याने ती अवघड जाणवत नव्हती. आजूबाजूला उगवलेले गवत अजूनही आपला हिरवा रंग ठेवूनच होते. वळणावळणाची ती वाट हळूहळू डोंगरमाथ्याकडे जाऊ लागली. अतिउच्च माथ्यावर पोहोचल्यावर वरील मंदिराचे अस्तित्व झाडीतून दिसायला लागले होते. डोंगराच्या पूर्ण माथ्यावर आलो तेव्हा पुन्हा सूर्यकिरणे अंगावर पडायला लागली व समोरच पूर्ण मंदिर स्पष्ट दिसायला लागलं. अलीकडच्या काळातच त्या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार झाला असावा, असे दिसले. शेजारीच रहाण्यासाठी एक छोटेसे झोपडीवजा घर दिसून आले. मी मंदिरापाशी पोहोचलो तेव्हा आजूबाजूला कोणीही नव्हते. एव्हाना मागच्या बाजूचा परिसरही दिसायला लागला होता. मागील बाजूस बऱ्याच अंतरापर्यंत झाडीच झाडी दिसून आली. जंगलाची घनता मात्र अधिक नव्हती. शिवाय त्या बाजूने डोंगरावर उतरण्यासाठी एक पायवाट जाताना दिसली. समोरच्या डोंगरावर दूरवर एक छोटेखानी दर्गा दिसत होता. डोंगराच्या पायथ्यापासून हे दोन्ही डोंगर सलग वाटत होते. परंतु इथे आल्यावर ते एकमेकांपासून वेगळे असल्याचे दिसले. समोरच्या डोंगरावरील दर्ग्याकडे जाण्यासाठी कानिफनाथांचा हा डोंगर पूर्ण उतरून समोरचा डोंगर चढावे लागत होते. पायवाटेने थोडे खाली उतरलो आणि उजव्या बाजूला एका भव्य पाषाण नजरेस पडला. तिथे बसून समोरचा विस्तीर्ण परिसर न्याहाळता येऊ शकत होता. मनन, चिंतन आणि ध्यान करण्यासाठी ही एक सर्वोत्तम अशी जागा होती. सूर्य बऱ्यापैकी पश्चिम क्षितिजाकडे झुकलेला होता. त्यामुळे सूर्याची कोवळी किरणे अंगावर तीव्रतेने पडत नव्हती. या ठिकाणी बसून समोरचा परिसर तासनतास न्याहाळत बसावा, असे वाटत होते. पण दहा मिनिटांमध्ये मी घरी लवकर जायचे म्हणून तेथून काढता पाय घेतला. पुन्हा मंदिरापाशी आलो तोवर कोणीतरी वाटसरू मंदिरात आल्याचा दिसला. मंदिराच्या मागच्या बाजूने पुन्हा परतीच्या वाटेला लागलो. उतरताना मात्र फारसे कष्ट पडले नाहीत. परंतु एक सुंदरश्या ट्रेकचा आनंद घेतल्याचे समाधान मात्र लाभले.
#ऑक्टोबर #२०२०

 












 



Monday, April 26, 2021

पुनेवाडी

याठिकाणी दोन वर्षांपूर्वी आलो होतो. रस्ता अजूनही तसाच होता. टेकडीवरचा सूर्यास्त लवकरात लवकर गाठावा म्हणून गाडी वेगाने हाकत चाललो होतो. महामार्गातून गाडी आतल्या दिशेने घेतली. अर्ध्या तासानंतर गावाकडे जाणारा फाटा लागला. तोवर सूर्य बऱ्यापैकी खाली आलेला होता. मुख्य रस्त्यातून आज जाणारा रस्ता अन्य रस्त्याप्रमाणेच पूर्णतः खराब झाला होता. त्यामुळे अर्थातच पोहोचायला उशीर झाला. गावामध्ये पोहोचलो तोवर साडेपाच वाजत आले होते. पंधरा-वीस मिनिटांमध्ये सूर्यास्त होणार होता. गाडी थांबली आणि लगोलग मंदिरांमध्ये पोहोचलो. मंदिराच्या मागच्या बाजूला ती छोटेखानी टेकडी आहे. वर जाण्याकरता अतिशय सुंदर पायरी मार्ग सिमेंटने बांधलेला दिसतो. अगदी वेगाने धावतच आम्ही त्या पायरी मार्गाने वरच्या दिशेने गेलो. माथ्याच्या अलीकडेच डाव्या बाजूला एक लेणी वजा मंदिर दिसून येते. तेच मूळ देवाचे मंदिर आहे, असे म्हणतात. तिथून काही सेकंदातच डोंगराचा माथा लागतो. आम्ही लगोलग माथ्यावर पोहोचलो. पण दुर्दैव... सुर्यास्त झालेला होता आणि संध्याकाळचा संधिप्रकाश अवकाशामध्ये सर्वत्र पसरलेला दिसला. दूरदूरवर सपाट प्रदेश दिसून आला. वाटत होते की आपण या सर्वांच्या वर तरंगत आहोत आणि त्यांच्यावर दृष्टी ठेवून पाहत आहोत. इथला सूर्यास्त निसटला पण वर्षातून एकदा का होईना येथे येण्याची भाग्य लाभले याचेच समाधान वाटले!








Monday, March 1, 2021

कुंजरगडाचे भुयार

फारसे अवशेष नसलेल्या किल्ल्यांवर काहीतरी वेगळं सापडणं म्हणजे पर्वणीच असते. प्रत्येक किल्ल्याचा स्वतःचं काहीतरी निराळं वैशिष्ट्य असतं. नसलं तरी कधी कधी ते अचानकपणे सापडतही. अकोले तालुक्यातल्या टोकावर वसलेल्या फोफसंडी या गावातील कुंजरगडावर आम्हाला काहीसा असाच अनुभव आला. किल्ल्यावर तटबंदीचे फारसे अवशेष शिल्लक नाहीत. जे आहेत ते ही पूर्णतः ढासाळलेल्या स्थितीमध्ये आहेत. ज्या बाजूने आम्ही किल्ल्यावर चढलो तिथून तुटलेला बुरुज दिसून येतो. परंतु किल्ल्याचा महादरवाजा हा पूर्व दिशेला मध्यभागी आहे. इथून मळलेली पायवाट वर येते. यावरूनच कदाचित इथेच महादरवाजा असावा असे दिसते. या रस्त्याने खाली गेलं की थोडी झाडी सुरू होते. हा रस्ता थेट विहीर नावाच्या गावाकडे जातो. इथूनच एक पायवाट उजवीकडे फोफसंडी गावाकडे जाते. ज्या ठिकाणी हे दोन्ही रस्ते एकत्र येतात तिथे कुंजरगडाला एक भव्य नैसर्गिक गुहा तयार झालेली आहे. ऋतू कोणताही असो सह्याद्रीतल्या दर्या-खोर्यात वाहणारा गार वारा या ठिकाणी मनाला शांत करतो. समोरच्या विस्तीर्ण डोंगररांगा येथून न्याहाळता येतात. तसेच मांडवी नदीच्या उगमस्थानी तिचा खळाळता प्रवाहदेखील ऐकू येतो. याच गुहेला लागून थोड्या अंतरावर एक मानवनिर्मित भुयार तयार केलेले आहे. ते दिसतं अगदी एखाद्या लेण्यांसारखं! हे भुयार म्हणजे कुंजरगडाला पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी केलेला एक मार्गच आहे. पूर्वेकडे त्याची व्याप्ती मोठी असली तरी पश्चिमेकडे जाण्यासाठी केवळ एका माणसाच्या आकाराचे भुयार आहे. त्यातून थोडीशी कसरत करत पुढे गेले की, हरिश्चंद्रगडाच्या बाजूचा संपूर्ण सह्याद्री नजरेस पडतो. समोर विहीर गावही दिसून येते किल्ल्याच्या दोनही बाजूंना एकाच वेळी नजर ठेवण्यासाठी कदाचित या भुयाराची निर्मिती केली गेली असावी. असे वैशिष्ट्यपूर्ण भुयार केवळ याच किल्ल्यावर आम्हाला दिसून आले. पावसाळ्यात त्यात बऱ्यापैकी पाणी भरलेले असते. परंतु आपण चालत जाऊन पलीकडच्या दिशेने निश्चितच पाहू शकतो. 

 
 


Saturday, February 13, 2021

इतिहासाचे भीष्माचार्य: वा. सी. बेंद्रे

शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये इतिहास या विषयाच्या अभ्यासाला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. किंबहुना महाराष्ट्रीय समाज आपल्या इतिहासापासून बराचसा वंचित होता. या काळात वि. का. राजवाडेंसारख्या इतिहासकारांनी शास्त्रशुद्ध इतिहास लेखनास सुरुवात केली. त्यांचाच वारसा चालवणारे इतिहास संशोधक लेखक व अभ्यासक म्हणजे वा. सी. बेंद्रे अर्थात वासुदेव सीताराम बेंद्रे होय. 


इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला इतिहासाचे भीष्माचार्य म्हणून वा. सी. बेंद्रे यांची ओळख आहे. इतिहास कसा अभ्यासावा व त्याची लिखाण पद्धती कशी असावी? याची शास्त्रशुद्ध रचना व मार्गदर्शन वा. सी. बेंद्रे यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार केल्यास बेंद्रे यांचे अतिशय बहुमूल्य योगदान आपल्याला दिसून येते. त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८९६ मध्ये रायगड जिल्ह्यातील पेण येथे झाला. त्यांचे एकंदरीत कार्य पाहता महाराष्ट्राच्या भूमी जन्मल्याचे भाग्य मराठी भाषिकांना लाभले, असेच म्हणावे लागेल. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अर्थात शिवजयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरी करतो. महाराष्ट्रभर किंबहुना पूर्ण भारतात व जगभरात शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे व प्रतिमा आहेत. आज शिवाजी महाराज कसे दिसतात? हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु, शंभर वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. महाराष्ट्र पाठ्यमंडळाच्या इतिहासाच्या पुस्तकात निकोलावो मनुची या प्रवाशाने 'इब्राहिम खान' या सरदाराचे काढलेले चित्र छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र म्हणून छापले जात होते. त्या काळात शिवाजी महाराज यांचे हेच एकमेव चित्र अस्तित्वात होते. परंतु, वा. सी. बेंद्रे यांनी या चित्राचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, शिवाजी महाराजांच्या भोवती सर्व मुस्लिम सैनिक दिसत आहेत. यावरून ते शिवरायांचे चित्र नक्कीच नव्हते. त्यामुळे शिवाजी महाराज नक्की कसे दिसत होते, हे शोधण्याचा बेंद्रे यांनी प्रयत्न केला. इतिहासाचे विविध ग्रंथ चाळत असताना त्यांना मॅकेंझीने संपादित केलेल्या ग्रंथाचा भाग हाती लागला. इसवी सन १६६४ च्या सुरत मोहिमेच्या वेळी डच गव्हर्नर व्हॅलेंटाईन आणि शिवाजी महाराजांच्या भेटीदरम्यान यांचे काढलेले चित्र व व्हॅलेंटाईनचे पत्र वा. सी. बेंद्रे यांना या ग्रंथात मिळाले. शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक वर्णन व सदर चित्र जुळवल्यास हे चित्र शिवाजी महाराजांचे आहे, याची त्यांना खात्री पटली. याच चित्राचा आधार घेऊन आज अस्तित्वात असणारी शिवाजी महाराजांची विविध चित्रे तयार करण्यात आलेली आहेत.
शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर खऱ्या अर्थाने प्रकाशझोत टाकण्याचे कार्य वा. सी. बेंद्रे यांनी केले. अनेक वर्षांपासून शिवपुत्र संभाजी म्हणजे व्यसनाधीन, व्याभिचारी, दुर्वर्तनी असा विविध नाटककारांनी तसेच कवींनी जनमानसासमोर रेखाटला होता. बेंद्रे यांसारख्या हाडाच्या इतिहासकाराला ही गोष्ट पटली नाही. म्हणूनच त्यांनी संभाजी महाराजांवर संशोधन करण्यास सुरुवात केली. भारतामध्ये शिवकालीन इतिहासाची साधने फारशी उपलब्ध नसल्याने त्यांनी युरोपियन साधनांचा जसे इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज साधनांचा अभ्यास करून संभाजी महाराजांचे चरित्र पूर्ण केले. यासाठी त्यांना जवळपास चाळीस वर्षे लागली! इसवी सन १९६० मध्ये बेंद्रे यांनी संभाजी महाराजांचे पहिले शास्त्रशुद्ध चरित्र मराठी माणसांसमोर आणले. त्यातून संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा खऱ्या अर्थाने मराठी जनांना समजली. छत्रपती संभाजी म्हणजे पराक्रमी, धोरणी, मुत्सद्दी, स्वाभिमानी, धर्मनिष्ठ, संस्कृत जाणकार अशा विविध रूपाने महाराष्ट्राला समजला. त्यांच्या जीवनातील सर्व विसंगती व कल्पोकल्पित कथा बेंद्रे यांनी खोडून काढल्या. इतिहासाचे पान न पान चाळून त्यांनी हे चरित्र लिहिले होते. याच चरित्राचा आधार घेऊन संभाजी महाराजांवर अनेक नाटके, कथा, कादंबऱ्या व आजच्या काळातील चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका लिहिल्या गेल्या आहेत. बेंद्रे यांचे हे योगदान मराठी माणूस कधीही विसरणार नाही. संभाजी महाराजांच्या मुळ समाधीचा शोधही वा. सी. बेंद्रे यांनीच लावला आहे. प्रारंभी संभाजी महाराजांची समाधी तुळापुर येथे आहे, असे समजले जात होते. परंतु, कालांतराने अनेक ऐतिहासिक संदर्भ शोधल्यानंतर विविध पुराव्यांच्या आधारे ही समाधी वढू बुद्रुक या गावापाशी आहे, असे बेंद्रे यांच्या लक्षात आले. आज त्या समाधीचे सुशोभीकरण करून उत्कृष्ट स्मारक करण्यात आलेले आहे.
केवळ छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी या विषयांचेच नाही तर मालोजीराजे, शहाजी राजे तसेच शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे आणि छत्रपती राजाराम राजे यांचे चरित्र देखील वा. सी. बेंद्रे यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिले आहे. याशिवाय कुतुबशाही व आदिलशाही सारख्या मुसलमानी शाह्यांचे देखील मराठीत लेखन करण्याचे कार्य वा. सी. बेंद्रे यांनी केले आहे. इतिहासकार कसा असावा? याचा वस्तुनिष्ठ पाठ बेंद्रे यांनी घालून दिला. इतिहास म्हणजे कादंबरी नाही, इतिहास म्हणजे नाटकही नाही, आजच्या परिभाषेत चित्रपट किंवा मालिकाही नाही. तर इतिहास शास्त्रशुद्ध पद्धतीने पुराव्यांचा आधार घेऊन लिहिलेला असतो, हेच वा. सी. बेंद्रे यांच्या लिखाणातून प्रतीत झाले. इतिहास कसा लिहावा, त्याचा अभ्यास कसा करावा, याची शास्त्रशुद्ध पद्धती मार्गदर्शक रूपाने त्यांनी "साधन चिकित्सा" नावाच्या पुस्तकामध्ये केली आहे. इतिहास संशोधकांची ती गीता मानली जाते. आज वा. सी. बेंद्रे यांची १२५ वी जयंती आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी यांच्या इतिहास संशोधनात मोलाची कामगिरी केलेल्या बेंद्रेंना महाराष्ट्रीय जनता सदैव स्मरणात ठेवेल, अशी आशा वाटते.

इब्राहिम खानचे चित्र

बेंद्रेंनी शोधलेले शिवाजी महाराजांचे पहिले चित्र

Wednesday, January 20, 2021

अविस्मरणीय दौंड्या

कोरोना विलगीकरणाचे ते १४ दिवस संपता संपत नव्हते. एक-एक दिवस मोजत पूर्ण केला आणि हा कालावधी संपल्यानंतर पाचव्या दिवशी आठ महिने घरी बसून काढलेला दुष्काळ संपवण्याची वेळ आली. जुन्नर मधला नवीन पर्वत सर करण्याचे ध्येय होते. त्यातच माळशेजच्या रांगेमध्ये असलेला दौंड्या डोंगर सापडला.
फेसबुकवर वाचलेली जुजबी माहिती ज्ञात होती. तिच्या आधारावर ट्रेकिंगच्या नव्या मोसमाची सुरुवात आम्ही करणार होतो. ऑक्टोबर महिना आणि गारवा यांचं फार असं नातं नसतं पण पहाटे पहाटे थोडी का होईना थंडी जाणवत असते. याच थंडीमध्ये सकाळी सहा वाजता मार्गक्रमण सुरू केले. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी याच डोंगरावर एक आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे विमान कोसळले होते. त्यामुळे हा डोंगर इथल्या लोकांना विशेष परिचित आहे. सकाळी सातच्या सुमारास आम्ही तळमाची गावामध्ये पोहोचलो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ मधून आत गावाकडे जाणारा वळणावळणाचा व काहीसा घाट मार्ग असलेला रस्ता मात्र अतिशय सुंदर आहे. पावसाळ्यात बहरलेली झाडी वातावरणात गारवा निर्माण करत होती. गावामध्ये पोहोचलो तोवर सुर्योदय झालेला होता. तळमाचीच्या तीनही बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या दिसल्या. बऱ्याच ठिकाणी सरळसोट कडे आहेत आणि या कड्यांच्याच मागच्या बाजूला माळशेज घाट आहे. डोंगराकडे बघितल्यावर वाटत नाही की इथून वर माथ्यावर जायला रस्ता असावा. तो शोधून काढण्याचे पहिले आव्हान आमच्यासमोर होते. गावांमध्ये एकाला रस्ता विचारला. त्यांने माहिती सांगितली. पण प्रत्यक्ष चालायला सुरुवात केल्यावर आपण जंगलातील न मळलेल्या वाटेवर चालत आहोत, हे ध्यानात आले. वाट चुकली तर होतीच. पण त्यातूनही मार्ग काढत काढत आम्ही जंगलातल्या एका मळलेल्या वाटेला लागलो. जंगल बर्‍यापैकी घनदाट होतं पण पायवाट देखील तितकीच सहज व सुंदर होती. ती पाहता या वाटेने सातत्याने लोकांची ये-जा असावी असे वाटले. कदाचित जंगलांमध्ये लाकडे तोडण्यासाठी लोक येत असावेत. आता वाट रस्त्याच्या दिशेने जात होती. वातावरण तसं स्तब्ध होतं होतं. अधून-मधून रस्त्याच्या कडेला डोंगरावरून तुटून आलेले मोठमोठाले दगड दिसून यायचे. त्याला वळसा घालून पुन्हा मळलेल्या वाटेला लागायचो. अगदी थोड्याच वेळात चढण सुरू झाली. काही ठिकाणी दगड व्यवस्थित रचून रस्ता तयार केलेला होता. चढण फारशी खडी नव्हती. अगदी लहान मुलेही व्यवस्थित या रस्त्याने चालू शकतील, असे वाटून गेले. थोडेच वरती गेल्यावर जंगलाच्या वरच्या भागात आम्ही पोहोचलो. इथून तळमाची गाव व्यवस्थित दिसत होतं. सूर्याची ढगांबरोबर लपाछपी चाललेली होती. रस्ता योग्य आहे, याची खात्री करून आम्ही पुन्हा मार्गक्रमण चालू केले. अनेक ठिकाणी रस्ता खोदून तयार केल्याचे दिसत होते. काही ठिकाणी तर माथ्यावरुन येणारे झुळझुळ पाणी रस्ता पार करताना दिसत होते. डोंगर चढाई सुरू झाल्यानंतर मात्र आजूबाजूला फारशी झाडे दिसली नाहीत. एव्हाना दुरवर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही व्यवस्थित दिसत होती. डोंगर चढणीच्या मध्यावर गेल्यावर माथ्याच्या दिशेने काही लोक रस्ता उतरताना दिसले. आता मात्र आमची वाट योग्य आहे, याची खात्री झाली. ते झपाझप पावले टाकत खाली उतरत होते. आम्ही मात्र अनेक महिन्यांचा वनवास संपवून अतिशय आनंदाने रमत-गमत डोंगर चढत चाललो होतो. दूरवरून या उंच डोंगराला कुठून रस्ता असेल, याची खात्री नव्हती. पण रस्ता मात्र अतिशय सुंदर तयार झालेला दिसला. डोंगर बऱ्यापैकी चढून आल्यावर एक मोठी घळ दिसून आली. आजूबाजूला अजस्त्र दगड चक्क लोंबकळताना दिसत होते. कदाचित ते कधीही पडतील, अशी परिस्थिती होती. त्याच्याच कडेकडेने आमची चढाई चालू राहिली. घळी मधून अजूनही झुळझुळ वाहणारे पाणी व त्याचा खळखळाट जाणवत होता. याठिकाणी भर पावसाळ्यामध्ये चांगला मोठा धबधबा असावा, असे जाणवले. थोडं आणखी चढून आल्यावर आम्ही लवकरच माथ्यावर पोहोचलो. माळशेजच्या सर्व डोंगररांगा तसे सिंदोळा आणि निमगिरी किल्ला आता व्यवस्थित दिसत होता. सूर्याची कोवळी किरणं अंगावर येत होती. अशा वातावरणात फोटोग्राफीचा मोह मात्र आवरला नाही. इथून पुढचा रस्ता शोधायला लागणार होता. समोरच काही कच्ची घर दिसून आली. जवळ जाउन पाहिले तर तिथे कुणीही राहत नव्हते. पाळीव प्राण्यांना विशेषतः गाई-म्हशींना बांधण्यासाठी त्या घरांचा वापर होत असावा, असे दिसले. आम्हाला माळशेजच्या डोंगरांवर जायचे होते म्हणून घरांच्या उजव्या बाजूने मार्गक्रमण चालू केले. माथ्यावर जंगल फारसे घनदाट नव्हते. अजूनही बऱ्याच ठिकाणी पावसाचा ओलावा जाणवत होता. इथे फुलपाखरांची काही कमी नव्हती. वातावरणात बऱ्यापैकी शांतता होती. त्यामुळे पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ऐकू यायचे. डोंगरमाथ्यावर उजव्या बाजूने कडेकडेने आम्ही मार्ग शोधायला सुरुवात केली. पुढे गेल्यावर जंगलाच्या आत जाणारा रस्ता होता. तो आम्ही पकडला पण दुरून कोणीतरी आम्हाला पाहिले होते. त्याने ओरडूनच उजव्या बाजूचा रस्ता पकडा असे आम्हाला सांगितले. इतक्या लांबून कोणीतरी आम्हाला पाहत आहे, याचे जरा आश्चर्य वाटले. रस्ता दाखवणारा मार्गदर्शक मिळाल्याने आमचे काम सोपे झाले होते. थोडं अंतर चालून गेल्यावर दोन डोंगरांना जोडणारा एक अतिशय रुंद रस्ता होता. या जागेला वानरदरा असे म्हटले जाते. तो ओलांडून पुढे आलो तर दूरवर अस्वलदरा दिसून आला. अतिशय छोट्या प्रवाहासह जमिनीवर कोसळणारे धबधब्यांचे आवाज ऐकू यायला लागले होते. डोंगराच्या मागच्या बाजूला आलो तर जुन्नर मावळातला सर्व परिसर दिसून आला आणि समोर दिसत होता नाणेघाटातील जीवधन किल्ला! जीवधन किल्ल्याची इतक्या लांबून एका वेगळ्याच डोंगरावरची छटा आम्ही पहिल्यांदाच पाहिली. नाणेघाट जवळ असला तरी नानाचा अंगठा काही दिसला नाही मावळातला खूप मोठा परिसर मात्र नजरेत आला होता. अगदी अंजनावळे गावातली वऱ्हाडी रांगही स्पष्ट दिसत होती. या डोंगराचा माथा पहिल्यांदाच पाहायला मिळाला. सहसा तो कोणत्याही इतर डोंगरावरून दिसत नाही. अगदी जीवधन किल्ल्यावरूनही नाही. दौंड्याच्या मागच्या बाजूला देखील तितकीच मोठी झाडी आहे आणि आणि दूरवर वसलेली छोटी आदिवासी गावेही आहेत. त्यांचं निरीक्षण करत या टोकावर आम्ही बसलो. वातावरणातील गारवा मनाला प्रसन्न करत होता. दौंड्याचा पहिला टप्पा आम्ही समर्थपणे पार केला होता व त्याचा आनंद घेत होतो. इथून पुढे पुन्हा वाटचाल सुरू केली. जायला पुन्हा दोन वाटा होत्या त्यापैकी डावी वाट निवडली. माथ्यावर गाईंचे सर्वत्र पडलेले शेण पाहून इथे जनावरांचा सातत्याने वावर असावा, असे दिसले. मनुष्य प्राण्याचा वावर मात्र कुठेच नव्हता! दहा मिनिटांच्या वाटचालीनंतर आम्ही एका मोठ्या पठारापाशी पोहोचलो. समोर आणखी एक टेकडी होती. ती खालूनही आम्हाला दिसली होती. याच टेकडीवर एक छोटेखानी मंदिर बांधलेले आहे. तिथे जाणारी पायवाट सापडत नव्हती. कदाचित ती दुसऱ्या बाजूने असावी, असे वाटून गेले. म्हणून उगलेल्या गवतातूनच आम्ही आमची पाय वाट तयार केली व त्या माथ्याच्या दिशेने जाऊ लागलो. एव्हाना पोटात कावळे ओरडायला लागले होते. म्हणून पुढे जाण्याआधी एखादी रिकामी जागा शोधली व पेटपूजा उरकून घेतली. त्यामुळे तरतरी आली होती. आता आम्ही त्या माथ्याच्या अगदी समोर होतो. त्याच्या उजव्या बाजूने एक रस्ता पुढे जात होता. तिथून मार्गक्रमण चालू केले. परंतु टेकडीवर जाण्याचा रस्ता मात्र सापडला नाही. तिच्या कडेकडेने जंगलातून जाणारी वाट आम्ही धरली. हीसुद्धा बऱ्यापैकी मळलेली होती. डोंगर पायथ्याचा बराच मोठा परिसर जंगलांनी व्यापलेला दिसत होता. पहिली टेकडी मागे पडली तर पुढे आणखी तशीच टेकडी दिसून आली. ती मात्र सरळसोट होती. तिच्यावर कोणत्याही प्रकारचे मंदिर दिसून आले नाही. किंबहुना तिच्यावर जाण्यासाठी रस्ताही नसावा. काही अंतरावर अनेक प्रयत्न करून देखील पुढचा रस्ता सापडला नाही. कदाचित पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा वाटा नष्ट झाल्या असाव्यात. तिथे आम्ही डोंगराच्या तिसऱ्या टप्प्यावर होतो. येथून दुसर्‍या टप्प्यावर दूरवर एका पानवठ्यापाशी सांबराचे दर्शन झाले. तसे पाहिले तर सांबर एकटी फिरत नाहीत. पण ते एकटेच दुडूदुडू फिरताना दिसले. त्याला आमची चाहूल लागली असावी, म्हणून त्याने लगेच जवळच्या झाडीमध्ये झेप घेतली व ते गायब झाले. आमच्या प्रवासाचा हा अंतिम बिंदू होता. येथून पुन्हा माघारी फिरायचे आम्ही ठरवले. जंगलातली आणखी कोणती वाट सापडते का, ते पाहिले. पण त्यात यशस्वी झालो नाही. परतीच्या वाटेने अतिशय कमी वेळात आम्ही पुन्हा पायथ्याशी पोहोचलो. येताना चुकलेली वाट पुन्हा समजली. गावांमध्ये पोहोचलो तेव्हा वर जाण्याची योग्य वाट कोणती, हे ध्यानात आले.
तीन ते चार तासांचा कित्येक महिन्यांपासून रखडलेला ट्रेक सफल झाला होता. परतीच्या वाटेत गाडीमध्ये बसलो आणि पुढच्या प्रवासाची अर्थात ट्रेकची मनोमनी तयारी सुरू केली.



















Sunday, January 10, 2021

एका अतिदुर्गम किल्ल्याची भ्रमंती

स्वातंत्र्यपूर्व काळातील गोष्ट आहे. हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांमध्ये विश्रांती घेण्यासाठी एक ब्रिटिश अधिकारी नियमितपणे येत असे. तो या परिसरात निवासास असायचा. स्थानिक लोक या अधिकाऱ्याला पोप असे म्हणायचे व तो दर रविवारी अर्थात संडेच्यादिवशी या ठिकाणी मुक्कामास असायचा. याच कारणास्तव या भागातील गावाला अपभ्रंशित असे "फोफसंडी" नाव पडले.
नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भागात हे निसर्गरम्य गाव वसलेले आहे. पुणे आणि नगर जिल्ह्याची सीमा व डोंगरदऱ्यात वसलेल्या परिसर ही या गावाची मुख्य ओळख होय. या गावामध्ये शिवकालीन कुंजरगड किल्ला आहे. गावात जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्यामुळे या गडावर भ्रमंती करण्यासाठी फारशी वर्दळ नसते. परंतु शिवस्पर्श लाभलेला हा किल्ला एकदा तरी सर करायचा, असे आम्ही मनोमन ठरवले होते. त्यानिमित्ताने फोफसंडी मधील अद्भुत निसर्गही पाहता येईल, अशी आमची मनीषा होती.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर वसलेले जुन्नर मधील उदापूर हे गाव होय. या गावातून उत्तरेकडे एक डांबरी रस्ता जातो. या मधल्या डोंगररांगांमध्ये मांदारने घाट आहे. तो ओलांडला की मांडवी नदीचं खोरं सुरू होतं. मुथाळणे, मांडवे व कोपरे ही गावे संपली की जुन्नर तालुका व पर्यायाने पुणे जिल्हाही समाप्त होतो.
इथवर रस्त्याची स्थिती अत्यंत चांगली होती. परंतु, कोपरे गाव संपले आणि रस्त्याचा खळखळाट चालू झाला. डोंगर-दर्‍यांमधे वेढलेला निसर्ग मात्र मन प्रफुल्लित करणारा होता. डाव्या बाजूला उंचच उंच कड्यांनी सजलेले हिरवेगार डोंगर आणि उजव्या बाजूला दरीमधून वाहणारी मांडवी नदी. अशा वातावरणात आमचा प्रवास चालू झाला. या दुर्गम भागामध्ये अनेक मोठाले धबधबे दिसून येतात. ऑक्टोबरचा काळ असल्यामुळे त्यांच्यातील प्रवाह बराच कमी झाला होता. हे सर्व पाणी मांडवी नदीच्या पात्रात जात असावे. मांडवी नदीपात्र दोन्ही बाजूंनी डोंगरदऱ्यांनी वेढलेले आहे. तिचा असा प्रवाह पाहिला की, काश्मीरच्या खोऱ्यामधून वाहणार्‍या सिंधू नदीची आठवण होते. ही नदी फोफसंडी गावातच उगम पावते. तिथपासून चिल्हेवाडी धरणापर्यंत ती केवळ डोंगरदऱ्यातूनच वाहत येते.
फोफसंडीला जोडणारा हा रस्ता चार चाकी गाडीसाठी मात्र निश्चितच योग्य नव्हता. त्यामुळे चांगला रस्ता कधी लागेल याची वाट बघतच आम्ही त्या हिरव्यागार परिसरातून भ्रमंती सुरू ठेवली होती. पंधरा ते वीस मिनिटातच दूरवर डोंगरातच्या पायथ्याशी फोफसंडी गाव नजरेस पडले. एव्हाना सूर्योदय झाला होता. सूर्यकिरणे गावातील घरे उजळवून टाकत होती. अशा वातावरणातच आम्ही गावात प्रवेश केला. गावच्या मुख्य वेशीसमोरून एक रस्ता उत्तरेकडील डोंगराकडे जात होता. त्याची स्थितीही फारशी चांगली नव्हती. परंतु स्थानिक गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तिथून किमान दोन चाकी गाडी तरी वरील जांभळे वस्ती पर्यंत जाते. त्यामुळे त्या अवघड वाटेने आमचा खडतर प्रवास सुरू झाला. जसजसे आम्ही वर जाऊ लागलो तसतसा आजूबाजूचा परिसर दृष्टीच्या टप्प्यात येऊ लागला होता. परंतु, वाट ही बिकट होती. उत्तरेच्या वाटेवर आम्हाला कुंजरगड किल्ला दृष्टीस पडला. स्थानिक लोक त्यास कोंबड किल्ला असेही म्हणतात. त्याचे कारण माहीत नाही. परंतु किल्ल्याची रचना हत्तीच्या सोंडेप्रमाणे असल्याने त्यास कुंजरगड म्हणत असावेत, असे वाटते. कारण 'कुंज' या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती असा होतो.
साधारणत: दीड ते दोन किलोमीटर अंतर पार केल्यावर डोंगरावर एक छोटी वस्ती लागली. हीच ती जांभळे वस्ती होती. तिथे गेल्यावर पहिल्यांदाच आम्ही मागे वळून पाहिले. दूरदूरवर आम्ही पार केलेल्या डोंगररांगा दिसत होत्या. जुन्नरमध्ये असणारी हटकेश्वर डोंगररांग व तिच्यावरील नैसर्गिक पूल अगदी स्पष्ट दिसत होता. म्हणजे इतकी पायपीट करूनही आम्ही फार लांब आलो नव्हतो, हे ध्यानात आले! पुणे आणि नगर जिल्ह्याची सिमा असणारा रांजना डोंगर आकाशाकडे टोक दाखवत उभा असलेला दिसला. या ठिकाणावरून आमची खरी चढाई चालू झाली. जुन्नरपेक्षा दाट रानवाटा याठिकाणी दिसून येत होत्या. पावसामुळे वरून घसरत आलेले दगड रस्त्यांवर चहुकडे पडलेले होते. त्यातूनच मार्ग काढत आम्ही चढाई चालू ठेवली. दहा मिनिटांमध्ये पहिला टप्पा पार केला. इथे एक छोटेखानी आदिवासी घर बांधलेले होते. आता मात्र किल्ल्याचा मुख्य बुरुज व्यवस्थित दिसायला लागला. शिवाय उत्तरेपर्यंत किल्ला व त्यातील ढासळलेले बुरुज नजरेस पडत होते. बहुतांश किल्ल्यांवर शिवकाळात बांधलेल्या बुरुजांचे अवशेष दिसून येत नाहीत. परंतु, इतक्या दुर्गम भागात असूनही या किल्ल्यावरील दोन्ही बाजूंचे बुरुज बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत दिसून येत होते.
किल्ल्याची इथून पुढची चढण मात्र गवताळ वाटेने जाणारी होती. ऊन लागलं होतं. पण आम्ही बऱ्याचशा उंचीवर आल्याने त्याची तीव्रता जाणवत नव्हती. थंड हवेचे झोत अंगावर येत होते. त्या गवताळ पायवाटेने समोरचा भग्न बुरुज समोर ठेवून आम्ही भ्रमंती चालू ठेवली. ही पायवाट वगळता अन्य ठिकाणी बऱ्यापैकी झाडी होती. पायवाट संपली तिथून पुढे काही अंतरावर ढासळलेला बुरुज दिसून आला. हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा नव्हता. त्यामुळे त्या तुटलेल्या अवशेषांवरून किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी थोडीशी कसरत करावी लागली. ती फारशी अवघड नव्हती. बुरुज चढून आल्यावर आम्ही किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो. किल्ल्याचे दक्षिण-उत्तर टोक व्यवस्थित दिसत होते. अगदी हत्तीच्या सोंडेप्रमाणे उत्तरेकडचे टोक लांब असल्याचे दिसले. किल्ल्याचा पूर्ण परिसर रानगवताने आच्छादित झाल्याचा दिसत होता. येथून उजव्या बाजूने एक पायवाट उत्तरेकडे जाताना दिसली.
थोड्याच अंतरावर थंड व शुद्ध पाण्याचे मानवनिर्मित टाके दिसून आले. तसं पाहिलं तर अशी नऊ ते दहा टाकी या किल्ल्यावर बांधलेली आहेत. त्यामधील पाणीही बऱ्यापैकी शुद्ध आहे. या भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे जवळपास सर्वच टाकी काठोकाठ भरल्याची दिसत होती. किल्ल्याच्या मध्यभागी एका उघड्या जागेत महादेवाची पिंडी स्थापन केलेली होती व त्यासमोरच एक पाषाणातून निर्मित नंदी महादेवाला नमन करत होता. या उघड्या मंदिराच्या मागे किल्ल्यावरील वाड्यांचे अवशेष दिसून आले. इतिहासातील नोंदींनुसार सन १६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर मुक्काम केला होता. कदाचित ते याच वाड्यामध्ये थांबले असावे. शिवस्पर्श लाभलेला असा किल्ला पाहणे म्हणजे एक ऐतिहासिक रोमांच असतो, याची जाणीव त्या क्षणी झाली. किल्ल्याच्या उत्तर टोकाकडे जाताना त्याची रचना लोहगडाच्या विंचूकड्यासारखी भासत होती. मागचा भाग आता अधिक स्पष्ट दिसत होता. हरिश्चंद्रगडाच्या रांगा व्यवस्थित दिसू लागल्या होत्या. या डोंगररांगांमधील अनेक खेडी असे विहीर, कोठाळे, शिंदे, कोहणे ही गावे किल्ल्यावरून दृष्टीस पडत होती. किल्ल्याची प्रत्यक्ष उंची या बाजूने खऱ्या अर्थाने ध्यानात येत होती. विहीर गावातून येणारा रस्ता हा पूर्णपणे पायवाटेचा असावा असे दिसले. पुढे थोड्याच अंतरावर एक मानवनिर्मित गुहा होती. परंतु, ती पाण्याने पूर्ण भरलेली दिसून आली व त्या भोवती मोठ्या प्रमाणात गवत उगलेले होते. किल्ल्याचे उत्तरेकडील टोक गाठले तेव्हा अकोले तालुक्यातील बहुतांशी भाग नजरेच्या टप्प्यात आला होता. दूरदूरची खेडी व त्यांना जोडणारे छोटेखानी रस्ते असा हा सारा नजारा या ठिकाणावरून दिसत होता. फोफसंडी गावातून मागच्या बाजूला यायचे म्हणजे समोरील डोंगररांगेला कमीत कमी पस्तीस ते चाळीस किलोमीटरचा वळसा घालावा लागत असावा, असे दिसले. पूर्वेकडील दरीमध्ये मांडवी नदीचे उगमस्थान होते. येथूनच दरीच्या वाटेने अनेक वळणे घेत मांडवी नदी प्रवास करत असताना दिसली. सह्याद्रीचे उंच उंच डोंगर व त्यामध्ये वसलेल्या कुंजरगड किल्ला असा अद्भुत संगम या ठिकाणावरून दिसत होता.
किल्ल्याची शेवटचे टोक गाठल्याने आम्ही दुसऱ्या बाजूने मागे जाण्यास सुरुवात केली. पुन्हा किल्ल्याच्या मधोमध आल्यानंतर डावीकडे बर्‍यापैकी चांगली वाट खाली जाताना दिसली. ही किल्ल्यावर येण्या-जाण्याची मुख्य वाट होती. कोहणे तसेच फोफसंडी गावातून येणारी किल्ल्यावरील वाट या ठिकाणी एकत्र येते. शिवकालामध्ये या ठिकाणी कदाचित किल्ल्याचा महादरवाजा असावा. त्याचे अवशेष मात्र तिथे दिसत नाहीत. या वाटेने आम्ही खाली उतरलो. अगदी थोड्याच अंतरावर डावीकडे एक मोठी निसर्गनिर्मित गुहा होती. वीस पंचवीस लोक इथे सहज उभे राहू शकतील इतकी भव्य जागा होती. शिवाय समोरील डोंगररांगा व जंगलं या जागेवरून स्पष्ट दिसत होती. इथून पुढची पायवाट जंगलातून जाणारी दिसली. अगदी दोनच मिनिटांच्या अंतरावर पुन्हा डावीकडे एक मानव निर्मित गुहा दिसून आली. एखाद्या लेण्यासारखी रचना येथे करण्यात आली होती. त्यावर कोणीतरी "भुयार" असे पेन्ट केल्याचे दिसले.  कुंजरगडावरील हे सर्वोत्कृष्ट प्रेक्षणीय स्थळ होय. कारण ही मानवनिर्मित गुहा म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण भुयार आहे. या भुयारातून आत गेल्यानंतर किल्ल्याच्या दुसर्‍या बाजूचा पूर्ण परिसर पाहता येतो. याचा अर्थ या भुयारातून किल्ल्याच्या दोन्ही बाजूंना व्यवस्थित टेहाळणी करता येऊ शकते. कदाचित याच उद्देशाने त्याची निर्मिती असावी. किल्ल्याच्या सोंडेला भोक पाडून या भुयाराची रचना झाली असल्याचे दिसते. त्यात बऱ्यापैकी पाणी साठलेले होते.
भुयाराची अनुभूती घेतल्यानंतर आम्ही परतीच्या वाटेला लागलो. डावीकडील रस्ता कोहणे व विहीर गावाकडे जातो तर उजवीकडील पुन्हा फोफसंडीमध्ये उतरतो. दोन्ही रस्ते दाट झाडीमध्ये स्थित आहेत. आम्ही फोफसंडीच्या रस्त्याला लागलो तेव्हा किल्ला उजव्या बाजूला दिसून येत होता. वरील पूर्ण तटबंदी पुन्हा न्याहाळता येत होती. १५ ते २० मिनिटांच्या पायपिटीनंतर आम्ही पुन्हा जांभळे वस्तीमध्ये येऊन पोहोचलो.
एकंदरीत दोन तासांचा हा प्रवास होता. एक अनवट वाटेवरील अपरिचित किल्ला पाहण्याचा प्रसंग त्यादिवशी आम्ही अनुभवला. इथून अकोले तालुक्यातील कोतुळ गाव ४० किलोमीटर अंतरावर आहे. त्या बाजूनेही किल्ल्याला भेट देता येते. शांत आणि निसर्गरम्य वातावरणातील तसेच शहरी वर्दळीपासून दूर असलेल्या एखाद्या किल्ल्याला भेट द्यायची असल्यास कुंजरगड नक्की अनुभवावा असाच आहे.