माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Thursday, November 10, 2022

म्हसवंडी घाट

म्हसवंडी हे अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातलं आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरचं डोंगरात लपलेलं गाव. पुणे जिल्ह्यातल्या आमच्या गावापासून हे गाव फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे. गावातून म्हसवंडीकडे जाणारा रस्ता देखील पक्का नाही. बालाघाटाच्या या डोंगर रांगेमध्ये अनेक छोट्या छोट्या वाटांनी अहमदनगर आणि पुणे जिल्हा जोडलेला आहे. त्यातीलच पिंपरी पेंढार ते म्हसवंडी जोडणारी ही वाट 'मॉर्निंग वॉक'साठी असणार एक उत्तम ठिकाण होय.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरून उत्तरेकडे जाणारा एक कच्चा रस्ता दिसतो. या रस्त्याने पुढे गेल्यानंतर उजवीकडे जाणारा रस्ता म्हसवंडी कडे जातो. या रस्त्यावर अजूनही मी डांबर पडलेलं पाहिलेलं नाही! डोंगराच्या पायथ्याशी गेलं की बऱ्यापैकी सुंदर वनराई दृष्टीस पडते. याच वनराईतून एक छोटासा घाट रस्ता म्हसवंडीच्या दिशेने जातो.
इथं पायथ्याशी गाडी लावली तेव्हा सकाळच्या प्रहरी निरव शांतता अनुभवता येत होती. विशेष म्हणजे जंगलामध्ये मोरांचे प्रमाण लक्षणीय आहे. पायीच घाटरस्ता चालत असताना उजव्या बाजूला थोडं उंचावर मोर आणि लांडोर अगदी सहजपणे बागडताना दिसले. त्यांच्याही पलीकडे मोरांचे चित्कार ऐकू येत होते. अगदी काही सेकंदांमध्ये त्यांच्याजवळ जाऊन त्यांना पकडू शकतो. इतक्या जवळ ते होते! निसर्गाच्या या खुल्या मैदानामध्ये मुक्त संचार करणारे मोर पाहिले की निसर्ग स्वातंत्र्याची प्रकर्षाने आठवण येते. मोरांव्यतिरिक्त अन्यही निरनिराळ्या पक्षांची किलबिल सकाळच्या प्रहरी व्यवस्थित ऐकू येत होती. या निसर्गसंगीताला कानामध्ये साठवताना काहीतरी नवं शोधल्याचा मलाही भास झाला. तो वळणावळणाचा घाट रस्ता चढत मी मुख्य खिंडीपाशी आलो तेव्हा दोन-तीन गवळ्यांचे दर्शन झाले. इथून उजवीकडचा रस्ता म्हसवंडीच्या दिशेने जातो. मी त्या रस्त्याने चालायला सुरुवात केली. तोवर सूर्योदय झालेला नव्हता. आकाश बऱ्यापैकी ढगांनी अच्छादलेले दिसून आले. पण पूर्वेच्या क्षितिजावर ढगांची तशी कमीच गर्दी होती. चालताना हवेतला गारवा काहीसा जाणू लागला. थोड्याच वेळात सूर्याची केशरी किरणे पूर्व क्षितिजावरून दिसायला लागली आणि दूरवर डोंगराच्या कुशीत वसलेलं म्हसवंडी गाव उजळून निघताना दिसलं. पावसाळा नुकताच संपला असल्याने अजूनही बऱ्यापैकी हिरवाई होती. शिवाय निरनिराळ्या रानफुलांची गर्दी देखील रस्त्याच्या आजूबाजूला दिसून आली. गावाकडचे जीवन म्हणजे याच नैसर्गिक वनराईमध्ये बागडणारं असतं. शहरी जीवनाला वैतागलेल्या अनेक जीवांसाठी तो एक शांततेचा आधार असू शकतो. असेही वाटून गेलं!
बराच वेळ पूर्वेकडून हळूहळू वर येणाऱ्या सूर्याकडे टक लावून मी बघत होतो. त्या समाधीस्थ मुद्रेमध्ये निश्चित किती वेळ गेला असेल, हे मला अजूनही आठवत नाही. 







No comments:

Post a Comment