माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Thursday, February 12, 2026

वा. सी. बेंद्रे: एक ध्येयवेडे इतिहासकार

जगाची प्रगती शहाण्या लोकांमुळे होत नाहीत ती होते वेड्या लोकांमुळे अर्थात ध्येयवेड्या लोकांमुळेच! महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असाच एक ध्येयवेडा व्यक्ती होऊन गेला ज्याने आपल्या इतिहास लेखनाची दिशा बदलून गेली. विस्कळीत असलेला मराठी इतिहास सुसंगतपणे पूर्णत्वास आला.
सुमारे शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आयुष्यात काहीतरी वेगळं, उच्च आणि समाजाला उपयोगाचे होईल असं काहीतरी करण्याच्या हेतूने रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये जन्मलेल्या या युवकाने शीघ्रलेखनपद्धती शिकायला सुरुवात केली. शिवाय त्या काळात अतिशय कमी लोकांना ज्ञात असणारी टंकलेखनपद्धती अर्थात टाईपरायटिंग देखील त्याने सहजपणे आत्मसात केली. इसवी सन १९२२ मध्ये त्याचे मराठीतील शीघ्रलेखन पद्धती हे पुस्तक प्रकाशित झाले. नुसते पुस्तक प्रकाशित करूनच तो थांबला नाही. तर या कौशल्याचा वापर प्रत्यक्ष करायला त्याने सुरुवात केली. त्याचे सन १९२८ मध्ये "साधन-चिकित्सा: शिवशाहीचा चर्चात्मक इतिहास" हे पुस्तक प्रकाशित झाले. इतिहास लेखन पद्धती, इतिहासाची रचना आणि साधनांचा अभ्यास कसा करायचा, याची चिकित्सा या पुस्तकांमध्ये विस्तृतपणे केली होती. तोपर्यंत महाराष्ट्राचा इतिहास विस्कळीत असाच होता. काही मराठी आणि इंग्रजी इतिहासकारांनी आपल्या पद्धतीने इतिहास लिहिला होता. पण त्यामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या. म्हणूनच या युवकाने आपले सारे आयुष्य महाराष्ट्राच्या इतिहासाला वाहून घेण्याचे ठरवले. पुण्यातील पेशवे दप्तरमध्ये असणारी कागदपत्रे व्यवस्थित रचनावर लावून दिली आणि याच कार्यामुळे तंजावर संस्थानातील कागदपत्रे देखील रचनावार लावण्याचे कार्य त्याला मिळाले. त्याची धडपडी आणि ध्येयवेडी वृत्ती बघून इंग्रज अधिकाऱ्यांनी इतिहास संशोधनासाठी त्याला युरोपला पाठविण्याचे ठरवले. हा युवक म्हणजे इतिहासाचे भीष्माचार्य वा. सी. बेंद्रे होत.


लॉर्ड ब्रेबॉर्न या इंग्रज अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली वा. सी. बेंद्रे यांची रवानगी इतिहास संशोधनासाठी इंग्लंडला करण्यात आली. भारतामध्ये त्याकाळी उपलब्ध असणारी अनेक कागदपत्रे इंग्रजांनी त्यांच्या देशामध्ये नेली होती. याशिवाय तत्कालीन भारतावर राज्य करणाऱ्या अनेक परकीय राज्यकर्त्यांची कागदपत्रे देखील युरोपात त्यांच्या देशांमध्ये उपलब्ध होती. या कागदपत्रांचा अभ्यास करण्याचे काम बेंद्रे यांच्यावर सोपवण्यात आले. आधीच ध्येयवेडी वृत्ती अंगात असल्याने आणि आपल्या आवडीचे काम मिळाल्याने बेंद्रे यांनी अहोरात्र लाखो कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यातून हजारो पानांची टिपणे देखील काढली. महाराष्ट्राच्या इतिहासाची अद्भुत आणि अज्ञात माहिती देखील त्यांना याच कागदपत्रांतून मिळाली. यातमध्येच एक महत्त्वाचे चित्र देखील त्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळाले. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्हॅलेंटाईन नावाच्या डच चित्रकाराने काढलेले चित्र होय. महाराष्ट्राला तोपर्यंत एका वेगळ्याच चित्राद्वारे शिवाजी महाराज दिसले होते. परंतु बेंद्रे यांनी पुराव्यानिशी शिवाजी महाराजांचे पहिले चित्र भारतीयांना दाखवले. सन १९३३ मध्ये ह्याच चित्राची प्रत त्यांनी पुण्यात प्रदर्शित केली होती. इंग्लंडमध्ये अभ्यास करत असताना तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान नेव्हिल केंबर्लेन यांच्यापर्यंत त्यांचे नाव पोहोचले. या अभ्यासू इतिहासकाराची त्यांनी भेट देखील घेतली होती. तो काळ द्वितीय महायुद्धाचा होता. जर्मनी अतिशय मोठ्या फौजेसह इंग्लंड बरोबरच अन्य दोस्त राष्ट्रांवर चालून आलेले होते. म्हणूनच इंग्लंडमधील स्थिती आणखी बिघडत चाललेली होती. याच कारणास्तव बेंद्रे यांना केवळ दोन वर्षांमध्ये आपला अभ्यास पूर्ण करून परतीच्या मार्गाने जावे लागले. पण या दोन वर्षांमध्ये त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांचा भला मोठा साठा तयार केला होता. जल मार्गाने परतत असताना देखील त्यांच्यावर युद्धजन्य परिस्थितीची टांगती तलवार होती. आपली दोन वर्षांची मेहनत घेऊन ते जहाजात चढले. प्रवास अतिशय कठीण होता. भारताच्या दिशेने निघालेले त्यांचे जहाज केवळ रात्री प्रवास करत होते. एकीकडे भारतामध्ये त्यांचे आप्तस्वकीय त्यांच्या वाटेला डोळे लावून बसलेले होते. अखेरीस ऐतिहासिक ज्ञानाचा तो सागर घेऊन त्यांनी महासागर पार केले व अनेक महिन्यांनी भारतामध्ये पोहोचले.
भारतात परतल्यानंतर त्यांनी इतिहास संशोधनाच्या विविध विषयांमध्ये हात घातला. पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळ तसेच मुंबईच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या पायाउभारणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. युरोपामध्ये जमवलेल्या सर्व कागदपत्रांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. पुरावे तपासले आणि महाराष्ट्राचा व विशेषतः शिवशाही कालखंडाचा विस्कळीत इतिहास सुसंगतपणे आणि विस्तृतपणे लिहायला सुरुवात केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीवर नाटककार आणि कादंबरीकारांनी लावलेले डाग त्यांनी पुराव्यानिशी धुवून काढले व शंभूराजांचे पहिले विस्तृत चरित्र त्यांनी लिहिले. शिवाय पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक गावामध्ये झाडाझुडपांमध्ये दडलेली संभाजी महाराजांची समाधी देखील त्यांनी शोधून काढली. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांची समाधी देखील त्यांनीच शोधली. मालोजीराजे, शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज  या सर्वांची शास्त्रशुद्ध चरित्र लिहिणारे बेंद्रे हे आजही एकमेव इतिहासकार आहेत. त्यांच्या इतिहास संशोधन प्रवासामध्ये मिळालेले अनेक संस्कृत ग्रंथही त्यांनी मराठीमध्ये भाषांतरित केले. यात प्रामुख्याने केशव पंडितकृत राजाराम चरितम, गागाभट्टकृत शिवराज्याभिषेक प्रयोग:, दंडनीतीप्रकरणम सारख्या दुर्मिळ ग्रंथांचा समावेश होतो. याशिवाय गोवळकोंड्याची कुत्बशाही, विजापूरची आदिलशाही, राणा जयसिंग, पोर्तुगीज यांच्यावरही त्यांनी ग्रंथ लिहिले. 
संत तुकाराम महाराजांचा इतिहासकाराच्या दृष्टीने अभ्यास करणारे ते पहिलेच संशोधक होते. भगवद्गीतेचा अभंगात्मक अनुवाद असणारी तुकाराम महाराज रचित 'मंत्रगीता' देखील बेंद्रे यांनी शोधून काढली, संपादित आणि प्रकाशित केली. तुकारामांचे चरित्र तीन खंडांमध्ये त्यांनी लिहून काढले. याशिवाय त्यांची अनेक इंग्रजी पुस्तके देखील प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या एकूण ग्रंथांची संख्या ६० पेक्षा अधिक आहे. वयाच्या ९० व्या वर्षांपर्यंत त्यांचा अभ्यास आणि लिखाण सुरू होते.
आजही वा. सी. बेंद्रे यांचे ग्रंथ नवइतिहासकार प्रमाण मानतात. त्यांच्याकडे असणारी इतिहास अभ्यासदृष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या विस्कळीत इतिहासाला सुसंगत दिशा देणाऱ्या या इतिहासकाराची आज १४२ वी जयंती. त्यामुळे त्यांच्या कार्याचे स्मरण करणे आणि वारसा पुढे घेऊन जाण्याचे कार्य करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 

--- तुषार भ. कुटे



Tuesday, December 30, 2025

नाणेघाटातील 'हरवलेले' ऐतिहासिक पुतळे

सह्याद्रीच्या कुशीत लपलेला 'नाणेघाट' हा केवळ निसर्गप्रेमींचे आवडते ठिकाण नाही, तर तो महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यात असलेला हा घाट कोकण आणि देश (पठार) यांना जोडणारा सर्वात जुना व्यापारी मार्ग मानला जातो.
या घाटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील एका गुहेत एकेकाळी अस्तित्वात असणारे सातवाहन राजघराण्यातील राजांचे आणि राणीचे भव्य पुतळे. आज हे पुतळे पूर्णपणे तुटलेले आहेत, पण त्यांच्या खुणा आजही आपल्याला त्या सुवर्णकाळाची आठवण करून देतात. 

१. सातवाहन साम्राज्य आणि नाणेघाट
सुमारे २२०० वर्षांपूर्वी (इ.स. पूर्व पहिल्या शतकात) महाराष्ट्रावर 'सातवाहन' राजांचे राज्य होते. हे अतिशय पराक्रमी आणि श्रीमंत राजघराणे होते. त्यांची राजधानी 'प्रतिष्ठान' (आजचे पैठण) आणि दुसरी राजधानी 'जुन्नर' होती.
व्यापारासाठी कोकणातून घाटावर येण्यासाठी नाणेघाटाचा रस्ता वापरला जाई. या रस्त्यावरून खूप मोठी उलाढाल होत असे. याच ठिकाणी सातवाहनांनी जकात (Toll) गोळा करण्यासाठी एक नाका तयार केला होता. याच घाटातील एका मोठ्या गुहेत त्यांनी आपल्या कुटुंबाचे पुतळे कोरले होते.

२. भारतातील पहिली 'पोर्ट्रेट गॅलरी' (चित्रदालन)
नाणेघाटातील जी प्रमुख गुहा आहे, तिला पुरातत्वशास्त्रज्ञ 'प्रतिमागृह' किंवा 'statue gallery' म्हणतात. असे मानले जाते की, भारताच्या इतिहासात व्यक्तींचे हुबेहूब पुतळे कोरण्याचा हा पहिलाच मोठा प्रयोग होता. दुर्दैवाने, आज आपण जेव्हा या गुहेत जातो, तेव्हा तिथे आपल्याला एकही पुतळा सलग दिसत नाही. भिंतीवर केवळ काही पायांचे अवशेष आणि तुटलेले भाग दिसतात. पण तरीही, आपल्याला हे पुतळे कोणाचे होते हे नक्की सांगता येते.
हे कसे शक्य झाले? कारण, जिथे हे पुतळे होते, त्याच्या ठीक वरच्या बाजूला 'ब्राह्मी लिपी'मध्ये त्या व्यक्तींची नावे कोरलेली आहेत. या नावांवरूनच संशोधकांनी शोधून काढले की, तिथे एकूण ८ महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे होते.


३. तिथे कोणाकोणाचे पुतळे होते?

शिलालेखांनुसार, त्या गुहेत खालील महत्त्वाच्या ऐतिहासिक व्यक्तींचे पुतळे उभे होते:
- राजा सीमुक सातवाहन: हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. म्हणजे ज्याने हे साम्राज्य उभे केले, तो पहिला राजा.
- सम्राज्ञी नागनिका (नायनिका): ही या घराण्यातील अत्यंत पराक्रमी राणी होती. ती राजा सातकर्णी (पहिले) यांची पत्नी होती.
- राजा सातकर्णी (सातकडी): हा राणी नागनिकेचा पती आणि एक महान सम्राट होता. त्याच्या काळात सातवाहन साम्राज्य खूप विस्तारले होते.
- राणीचे वडील (महारठी त्रनकयिरो): राणी नागनिका ही 'महारठी' कुळातील होती. तिच्या वडिलांचा पुतळाही इथे होता, जे त्या काळी राजकीय मैत्रीचे प्रतीक होते.
- राजकुमार: या मुख्य राजा-राणीशिवाय त्यांचे राजकुमार – कुमार भाय, कुमार हकुसिरी (शक्तीश्री) आणि कुमार सातवाहन यांचेही पुतळे तिथे होते.

४. हे पुतळे तिथे का बसवले असावेत?
आज आपण जसे नेत्यांचे किंवा महापुरुषांचे पुतळे चौकात बसवतो, तसेच काहीसे कारण त्यामागे असावे.
- सत्तेचे प्रदर्शन: नाणेघाट हा व्यापारी मार्ग होता. देश-विदेशातील व्यापारी तिथे येत. त्यांनी या गुहेत आल्यावर सातवाहन राजांचे भव्य पुतळे पाहावेत आणि या राजांचा दरारा निर्माण व्हावा, हा उद्देश असावा.
- पूर्वजांचे स्मरण: राणी नागनिकेने आपल्या पतीच्या मृत्यूनंतर राज्यकारभार सांभाळला. तिने आपल्या पूर्वजांचे आणि पतीचे स्मरण म्हणून हे स्मारक बनवले असावे.

५. पुतळे कोणी तोडले? (एक रहस्य)

आज हे पुतळे का नाहीत? ते कोणी तोडले? याबद्दल इतिहासात दोन मुख्य तर्क लावले जातात:
- शत्रूंचे आक्रमण: सातवाहनांचे कट्टर शत्रू 'शक' क्षत्रप होते. जेव्हा शकांनी सातवाहनांचा पराभव करून हा भाग जिंकला असावा, तेव्हा त्यांनी रागाच्या भरात हे पुतळे तोडून टाकले असावेत. (इतिहासकार हा तर्क जास्त ग्राह्य मानतात).
- नैसर्गिक पडझड: हजारो वर्षांच्या ऊन-पावसाने आणि भूस्खलनामुळे हे दगडी पुतळे तुटले असावेत.

६. नागनिकेचा प्रसिद्ध शिलालेख

या पुतळ्यांच्या शेजारीच भिंतीवर एक खूप मोठा आणि प्रसिद्ध शिलालेख कोरलेला आहे. जरी पुतळे नष्ट झाले असले, तरी हा शिलालेख वाचला जातो. यात राणी नागनिकेने केलेले १८ प्रकारचे यज्ञ, तिने दिलेले हजारो गाईंचे, हत्तींचे आणि नाण्यांचे दान यांचा उल्लेख आहे. यावरूनच आपल्याला त्या काळातील समृद्धी समजते. याच शिलालेखाचा आधार घेऊन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे.

आज नाणेघाटाच्या गुहेत गेल्यावर आपल्याला फक्त दगडी भिंती आणि पायांचे ठसे दिसतात. पण जर आपण थोडी कल्पना केली, तर आपल्याला डोळ्यांसमोर ते भव्य दिवस उभे राहतील – जेव्हा तिथे सातवाहन सम्राटांचे उंच, राजेशाही पुतळे उभे होते आणि येणाऱ्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांकडे पाहत होते.

हे तुटलेले पुतळे केवळ दगड नसून, महाराष्ट्राच्या एका अत्यंत वैभवशाली इतिहासाचे मूक साक्षीदार आहेत.

(चित्र: एआय निर्मित)

--- तुषार भ. कुटे 

#महाराष्ट्र #मराठी #इतिहास #जुन्नर #सातवाहन #maharashtra #history #marathi #naneghat #satvahan

Tuesday, December 2, 2025

झपुर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय

पुणे परिसरामध्ये असणाऱ्या एका आगळ्यावेगळ्या संग्रहालयालयांपैकी एक म्हणजे "झपुर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय". एका दिवशी या संग्रहालयाला भेट देण्याचा योग आला. अर्थात रविवार...  सुट्टीचा वार असल्याने बऱ्यापैकी गर्दी होती. संग्रहालयावरील पाटी बघून लक्षात आले की, पुण्याच्या पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्याद्वारे तयार केलेले हे संग्रहालय आहे. 
मराठी माणूस हा कलेचा भोक्ता. पूर्ण भारतभर मराठी माणसाची ही सर्वात सकारात्मक ओळख होय. याचीच प्रचिती या संग्रहालयातील विविध दालनांमधून आली. निरनिराळ्या प्राचीन कलाकृती, चित्रे, वस्तू यांचा अनोखा संग्रह या ठिकाणी पाहायला मिळाला. जुन्या काळातील मातीची भांडी, पितळेची तसेच कांस्याची भांडी या संग्रहामध्ये आहेत. याशिवाय शेकडो वर्षांपूर्वी वापरण्यात येणारे विविध प्रकारचे दिवे, दागिने, वस्त्रे यांची स्वतंत्र दालने इथे पाहता येतात. काळाच्या ओघात महाराष्ट्रीय संस्कृतीतून नामशेष होत असलेली तसेच पूर्णतः नामशेष झालेली अनेक वस्तू आभूषणे, वस्त्रे पाहण्याचा आनंद आपल्याला घेता येतो. चित्रांच्या दालनामध्ये त्यांच्याकडे पाहण्यासाठी खरोखर कलाकाराची दृष्टी लागते याची प्रचिती येते. भारतीय चित्रपटांच्या इतिहासावर आधारित एक छोटेखानी दालनदेखील या संग्रहालयामध्ये पाहता येते. खडकवासला धरणाच्या काठावर हा परिसर वसलेला असल्याने आजूबाजूची निसर्गराजी देखील इथून अनुभवता येते. धरणाच्या काठाहून पलीकडे दिसणारा सिंहगड किल्ला इतिहासाची साक्ष देतो. आणि हे संग्रहालय इतिहासात विस्मरणात जात असलेल्या स्मृतींना पुनश्च जागृत करण्याचे कार्य करते. त्यामुळे एकदा तरी निश्चित भेट द्यावी, असेच हे स्थळ आहे. 

--- तुषार भ. कुटे
 

Saturday, November 22, 2025

ट्रिक व्हिजन म्युझियम

आपल्या हटके आणि काहीशा अनोख्या शैलीमुळे ओळखल्या जाणाऱ्या संग्रहालयांपैकी एक म्हणजे लोणावळा येथील "ट्रिक व्हिजन म्युझियम" होय. द्विमितीय चित्रांमधून त्रिमितीय अविष्कार सादर करणारे, हे संग्रहालय होय. इतर संग्रहालयांप्रमाणे या ठिकाणी कोणत्याही वस्तू ठेवलेल्या नाहीत. आधुनिक काळातील चित्रकारांनी रेखाटलेली रंगीत भित्तीचित्रे इथे पाहता येतात. ती पाहण्यासाठी देखील नाहीत. त्यांच्यासोबत आपले छायाचित्र काढण्यासाठी ती रंगवलेली आहेत. यात विशेष ते काय? 
द्विमितीय चित्रांद्वारे त्रिमितीय अविष्कार सादर करण्याची कला अनेक चित्रकारांना अवगत असते. अशाच प्रकारची चित्रे या संग्रहालयामध्ये रेखाटलेली आहेत. म्हणजे एका विशिष्ट कोनातून आपण जर आपला फोटो या ठिकाणी काढला तर त्यातून आपले चित्र त्रिमितीय असल्याचा भास तयार होतो. म्हणजे चित्रातील प्राणी अथवा वस्तूंपैकीच आपण एक आहोत, असे चित्रांमध्ये दिसून येते. अर्थात याकरिता छायाचित्रणाचे कौशल्यही तितकेच महत्त्वाचे. आपल्या छायाचित्र घेताना कोन, अंतर यांचा समतोल साधून संग्रहालयातील मदतनीस आपली छायाचित्रे काढतो. 
ज्या चित्रकारांनी इथल्या भिंतीवर चित्रे रेखाटली आहेत, त्यांचे कसब प्रदर्शित करणारे हे संग्रहालय. पारंपारिक चित्रकला आणि आधुनिक छायाचित्रकला यांचा अविष्कार आपल्याला येथे पाहता येतो, हाच काय तो सारांश!

--- तुषार भ. कुटे


 

Wednesday, November 19, 2025

कळमजाईचे मंदिर

आळेफाट्याहून पुणे-नाशिक मार्गाने आळेखिंडीकडे जाताना डाव्या बाजूला एका उंच डोंगरावर कळमजाईचे मंदिर आहे. जुन्नर तालुक्यातील बहुतांश ठिकाणावरून हे मंदिर दिसून येते. त्यादिवशी मंदिरापलीकडील गव्हाळ्या डोंगराच्या माथ्यावर ढगांची बरीच गर्दी जमली होती. वारे देखील सुटले होते. वातावरणात थंडावा वाढत चाललेला होता. अशा नेत्रदीपक आणि आल्हाददायक वातावरणात कळमजाईचे हे मंदिर उठून दिसत होते. पुणे आणि नगर जिल्ह्याच्या हद्दीवर आणि वडगाव आनंद गावात असणाऱ्या या मंदिराकडे जाण्यासाठी पायथ्यापासून छोटासा ट्रेक करत जावे लागते. शिवाय याच वाटेच्या उजव्या बाजूने एक डांबरी रस्ता देखील मंदिराच्या दिशेने जातो. या रस्त्याने आपण आधी नगर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये प्रवेश करतो आणि पुन्हा मंदिरापाशी आल्यावर जुन्नर तालुक्याच्या अर्थात पुणे जिल्ह्याच्या सीमारेषेमध्ये परततो. एका विस्तीर्ण वटवृक्षाला लागून असणारे हे मंदिर कौटुंबिक सहलीसाठी एक उत्तम स्थळ आहे.