माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label नाशिक जिल्हा. Show all posts
Showing posts with label नाशिक जिल्हा. Show all posts

Monday, July 22, 2024

गौतमी गोदावरी धरण

चहूबाजूंनी डोंगरांच्या रांगा आणि कुठेतरी छोट्याशा खिंडीतून पलीकडे जाणारे रस्ते ओलांडत मी या जलाशयाच्या काठाशी पोहोचलो. मानवी वस्तीपासून बऱ्यापैकी दूर असणारा हा परिसर सकाळच्या वेळी खूपच शांत दिसत होता. ऐकू येत होती फक्त पक्षांची किलबिल. मध्येच वाऱ्याचा मंदसा आवाज देखील यायचा. जलाशयाच्या पाण्यामध्ये जलचर मस्ती करत होते, असं वाटत होतं. पलीकडच्या डोंगररांगातून सूर्यदेव त्या जलाशयात आपलं प्रतिबिंब न्याहाळत होता. पाणी स्थिर आणि स्थितप्रज्ञ भासत होतं. निसर्गाची अशी अद्वितीय अनुभूती फारच क्वचित वेळा पाहायला मिळते. या प्रसंगांचा अनुभव आपल्याला निसर्गाशी एकरूप करायला मदत करतो. मन:शांती मिळवण्यासाठी कुठलाही कोर्स करण्याची आवश्यकता भासत नाही. मानवी गर्दी पासून दूर निसर्गाच्या कुशीत गेलं की निसर्गलेणी आपल्याला मनःशांती मिळवून देतात.


 

Thursday, June 27, 2024

सोनेरी अविष्कार

त्या छोटेखानी जलाशयाच्या काठावर पोहोचलो तोवर संध्याकाळ झाली होती. सूर्य त्याच्या पुढच्या प्रवासाच्या वाटेला क्षितिजाखाली जाऊ लागला होता. अंजनेयाच्या पर्वताचे ते दोन सुळके सूर्याला रात्रीपूर्वीचा नमस्कार करण्यासाठी स्थिर उभे होते. सूर्यकिरणे जलाशयामध्ये जेव्हा पडली तेव्हाचा सोनेरी अविष्कार निसर्गाच्या एका चमत्काराची अनुभूती देऊन जात होता. बराच वेळ मी त्या जलाशयाच्या काठावर सूर्याकडे पाहत होतो. निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी बंध असतो. कदाचित हाच बंध जल, वायू, प्रकाश आणि पर्वत यांच्यामध्ये देखील असावा, असे चित्र त्या सायंकाळी समोर उभे राहिले.


 

Wednesday, March 20, 2024

लांडोर

बेलगाव ढगा आणि तळेगाव अंजनेरी या दोन गावांना जोडणारा एक डांबरी रस्ता त्र्यंबकेश्वर रस्त्याला समांतर आहे. सहसा या रस्त्याने वाहनांची गर्दी तशी कमीच असते. दोन्ही गावांच्या मधल्या भागात काहीसा ओसाड आणि थोडासा जंगली परिसर आहे. याच रस्त्याने सायकल चालवत असताना. महिरावणीच्या संतोषा डोंगराच्या पायथ्याशी एक छोटेसे रान दिसून आले. ते बऱ्यापैकी उजाड झालेले आहे. शिवाय वणव्यांमुळे त्याची हानी देखील झालेली आहे. याच रानात पाण्याच्या शोधार्थ दोन लांडोर भटकताना दिसल्या. रानाची हिरवळ नाहीशी झाल्याने त्या अगदी सहजपणे दुरून दिसून येत होत्या. पाण्याचे स्त्रोत शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. संध्याकाळीच्या त्या निरव वातावरणात माझ्या सायकलच्या चाकांचा आवाज ऐकून त्यांचे लक्ष माझ्याकडे गेले आणि पटकन जंगलाच्या दिशेने पळून गेल्या. त्यांच्यातीलच ही एक. 

 


 


 

Sunday, March 17, 2024

एक सूर्यास्त

काही सूर्यास्त खासच असतात. त्यातीलच हा एक.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्यास्त अगदी सातच्या नंतर होणार होता. त्या दिवशी सायकल घेऊन मी एका धरणाच्या सफरीवर गेलो होतो. पलीकडे जाण्यासाठी डोंगराच्या मधोमध काढलेला एक रस्ता होता. काळा कुळकळीत आणि सपाट रस्ता डोंगरामधील खिंडीतून खाली उतरत होता. माझी सायकल फेरी संपली आणि मी परतीच्या मागे मार्गाने निघालो तेव्हा सूर्य पश्चिमेच्या क्षितिजाकडे हळूहळू झुकत चालला होता. मला सूर्यास्त होण्याआधी डोंगराच्या त्या खिंडीमध्ये परत पोहोचायचे होते. कारण याच माथ्यावरून दूरवर सूर्यास्त अधिक उत्तम दिसेल याची मला खात्री होती.. डोंगर जसजसा जवळ येत गेला तसतशी त्याची चढण अधिक तीव्र होत होती. शेवटी या चढणीवर सायकल चालवणे मला कठीण होऊन बसले. सायकलवरून उतरलो आणि ती हातात घेऊनच निघालो. झपाझप पावले टाकत अंगातून घाम काढत मी त्या डोंगरावरच्या खिंडीकडे निघालो होतो. सूर्य मागच्या बाजूला होता. खिंडीतील वळणावळणाचा तो रस्ता मला त्याच्या दिशेने खुणावत होता. त्या खिंडीत मधोमध एक छोटेखानी मंदिर देखील बांधलेले होते. दोन पाच मिनिटांनी एखादी चारचाकी व दुचाकी त्या खिंडीतून खाली यायची. माझे ध्येय हळूहळू जवळ येत होते. मी वेगाने चालत चालू लागलो. आणि अखेरीस त्या खिंडीपाशी पोहोचलो. सायकल स्टॅंडवर लावली आणि मागे सूर्याच्या दिशेने वळून बघितले.
आजूबाजूच्या डोंगररांगांमधून सूर्य पश्चिम क्षितिजावर पोहोचलेला होता. त्याची सकाळप्रमाणेच शांत व शितल किरणे आसमंत उजळवून टाकत होती. तसाच खिंडीत बसून राहिलो. शहरापासून दूर गावापासूनही काही अंतरावर असणाऱ्या त्या शांत आणि निवांत परिसरात तो सूर्यास्त अतिशय उठून दिसत होता. तेजस्वी सूर्याची शांतता अनुभवता येत होती. सूर्य मावळून दिवस अंधाराकडे तरी जात असला तरी तो उद्या पुन्हा नव्याने उगवण्याची आशा देऊन जात होता. प्रत्येक सूर्यास्त हीच आशा देऊन जातो. त्यामुळेच त्याच्याकडे पाहत तासनतास बसत रहावसं वाटतं!


 

Wednesday, February 9, 2022

एका अल्पावधीत ग्लॅमरस झालेल्या किल्ल्याची गोष्ट

दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नाशकातल्या अनेक अपरिचित किल्ल्यांवर किल्ल्यांची आम्ही भ्रमंती करायला लागलो होतो. त्यातच त्र्यंबकेश्वर जवळच्या हरिहर किल्ल्याबद्दल माहिती समजली.
त्यादिवशी तिथीनुसार येणारी शिवजयंती शनिवारी आली होती. शिवाय सुट्टीचा दिवस असल्याने आम्ही अर्थात मी आणि माझ्या भावाने हरिहर किल्ला सर करण्याची योजना आखली. पहाटे पाच वाजताच आम्ही नाशिक वरून प्रस्थान केले. थंडी संपून उन्हाळ्याची सुरुवात होऊ लागली होती. परंतु वातावरणात गारवा मात्र कायम होता. त्र्यंबकेश्वर परिसरातील दुगारवाडी हा नाशिक जिल्ह्यातला एक सुप्रसिद्ध धबधबा होय. यापूर्वीच्या वर्षाऋतू मध्ये दुगारवाडीला भेट दिली होती. याच रस्त्यावर ढगांमध्ये लपाछपी खेळणारा हरिहर किल्ला पहिल्यांदा पाहिला होता. त्यामुळे त्याचे भौगोलिक स्थान माहीत होते. दुगारवाडीच्या दिशेने जाणारा हाच मार्ग चालत आम्ही हरिहरच्या दिशेने निघालो होतो. सकाळी सातच्या दरम्यान किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या हर्षेवाडी गावामध्ये आम्ही पोहोचलो. रस्त्यामध्ये कुठेच किल्ल्याच्या नावाची पाटी नव्हती. तसेच रस्ते देखील फारसे चांगले नव्हते. परंतु जंगलातील वळणावळणाचे रस्ते असल्यामुळे प्रवासाचे काही वाटले नाही. तसं पाहिलं तर हर्षवाडी एक आदिवासी गाव होतं. या भागात मानवी वस्ती तशी फार कमीच जाणवली. समोर हरिहर किल्ल्याचे सर सरळसोट पाषाण दिसत होते. कदाचित याच बाजूने वर जाण्यासाठी रस्ता असावा, असे आम्हाला वाटले. सकाळच्या वेळेस या परिसरात कुणीच नसल्यामुळे एका उजाड माळरानावर आम्ही बाईक पार्क केली. हेल्मेट कुठे ठेवायचे? हा प्रश्न होताच. त्यामुळे ते आम्ही बरोबरच घेऊन निघालो. थोडीशी मळलेली पायवाट किल्ल्याच्या दिशेने जाताना दिसली. अजूनही कोणत्याही मनुष्याचे दर्शन आम्हाला झाले नव्हते. किल्ल्याच्या दिशेने जाणारी पायवाट चालतच आम्ही मार्गक्रमण करू लागलो. दोन ते तीन ठिकाणी दगडाचे अवघड पॅचेस होते. ते पार करताना कस लागला. अखेरीस बालेकिल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो. समोर पाहिले तर जवळपास ९० अंशामध्ये असणाऱ्या पायऱ्या दिसल्या आणि काळजामध्ये धस्स झाले. या पायर्‍या चढून जायच्या? असा प्रश्नवाचक उदगार मनात उमटला. त्या क्षणी त्या पायऱ्या अतिशय अवघड वाटत होत्या. इथपर्यंत आलो तेच खूप झाले...  आता परत मागे फिरू या, असाही विचार मनामध्ये आला. परंतु थोडे पुढे गेल्यानंतर समजले की, प्रत्येक पायरीला दोन्ही बाजूंना खोबणी केलेल्या आहेत. त्यांना पकडून वरती जाणार जाता येणे शक्य होते. मग आम्ही धाडस करून त्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. इथून खाली निसटलो तर आजूबाजूला बघायला देखील कोणी नाही, हा विचारच भीतीदायक होता. परंतु हा थ्रिलींग अनुभव घ्यायचा आहे, असे आम्ही मनोमन ठरवले व पायऱ्या चढायला सुरुवात केली. एक एक करत साधारणतः पन्नास एक पायऱ्या चढत आम्ही मुख्य दरवाजापाशी पोहोचलो. किल्ले भ्रमंतीमध्ये आलेला तो आजवरचा एक रोमांचकारी अनुभव होता. दरवाजातून पुढे गेल्यावर एका कोरलेल्या कपारीतून पुढे देखील अशाच प्रकारच्या पायऱ्या तयार केलेल्या दिसल्या. आम्ही त्यादेखील तितक्याच सावधतेने हळूहळू चढत वरच्या दिशेने मार्गक्रमण केले. थोड्याच वेळामध्ये शेवटचा दरवाजा देखील दृष्टीस पडला. तो पार केल्यानंतर किल्ला सर केल्याचे समाधान प्राप्त झाले होते. किल्ल्यावर काहीच वर्दळ नव्हती. काही उघडी मंदिरे, दोन-तीन तळी व एक सर्वोच्च टोक. शिवाय एका बाजूला धान्याचे भव्य कोठार...  इतकीच काय ती या किल्ल्याची संपत्ती होती! दूरवर दिसणाऱ्या धान्यकोठारांशी माकडांचा एक समूह उड्या मारताना दिसला. आमची चाहूल लागल्यामुळे त्यातली निम्मी माकडे तर निश्चित पळून गेली असावी. किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावरून खाली उतरताना एक परदेशी आणि एक भारतीय व्यक्ती किल्ला पाहायला आलेली दिसली. या दुर्गदर्शनामध्ये आम्हाला दिसलेले ते दोघेच मनुष्य प्राणी होते. त्यादिवशी एक अद्भुत आणि रोमांचकारी किल्ला बघण्याचे समाधान आम्हाला लाभले.

दहा वर्षानंतर...

मधल्या काळामध्ये पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले. या वाहून गेलेल्या पाण्यामध्ये सोशल मीडिया नावाचा घटक अतिशय वेगाने कार्यरत झाला होता. समाज माध्यमांद्वारे हळूहळू हरिहर किल्ल्याची माहिती सर्वदूर पोहोचली. अगदी हौशे, नवशे आणि गवशे ट्रेकर्स फिरण्यासाठी या किल्ल्यावर तुडुंब गर्दी करू लागले. आमच्या हरिश्चंद्रगडासारखी परिस्थिती या ठिकाणी तयार झाली. गुगलवर तुम्ही नुसते हरिहरगड जरी सर्च केले तरी शेकडो व्हिडीओ, लेख व ब्लॉग तुम्हाला दिसून येतील. इतकी लोकप्रियता या किल्ल्याने मधल्या काळात प्राप्त केली. खऱ्याखुऱ्या ट्रेकर्सपेक्षा निव्वळ हुल्लडबाजी करायला येणाऱ्या पर्यटकांची इथे अधिक गर्दी होऊ लागली. याची प्रचिती या वर्षी केलेल्या ट्रेकमध्ये आम्हाला आली.
हर्षवाडी गावामध्ये आता नव्याने टोलनाका सदृश फाटक उभारले गेले होते. तिथे पावत्या पाडण्याची देखील सुविधा करण्यात आली होती. शिवाय आम्ही सकाळी साडे सहाच्या दरम्यान या पोहोचलो. सुट्टीचा दिवस नसून देखील तोवर बऱ्याच गाड्या पार्किंगमध्ये आधीपासूनच उभ्या असलेल्या दिसल्या. त्यातील एक टेम्पो ट्रॅव्हलर दुरून कुठून तरी आलेली होती. तिच्यामध्ये असेच अतिउत्साही पर्यटक आल्याचे दिसत येत होते. किल्ल्याच्या मुख्य पायर्‍यांपर्यंत चढून गेलो तोवर फारशी गर्दी नव्हती. वातावरण आल्हाददायक झालेले होते. शिवाय सूर्यही बऱ्यापैकी वर आलेला होता. एकंदरितच फोटोग्राफीसाठी एक उत्तम वातावरण तयार झाले होते. तेव्हाच दहा वर्षांपूर्वीचा हरिहरगड आठवला. इथवर येईपर्यंत चार ते पाच ठिकाणी विविध खाद्यपदार्थांची दुकाने व उपहारगृहे देखील उघडलेली दिसली. शनिवार-रविवारी कदाचित इथे तुडूंब गर्दी होत असावी. आजूबाजूच्या गावकऱ्यांना रोजगाराचे नवे दालन उघडले असले तरी किल्ल्यावर प्लॅस्टिकच्या कचऱ्याची बरीच गर्दी देखील दिसून आली. आपल्या परिसरातील किल्ले आजही या प्लास्टिकच्या विळख्यात अजून वेगाने अडकत असल्याचे दिसतात. हरिहर याच दिशेने वेगाने प्रगती करताना वाटला. बालेकिल्ल्याच्या पायर्‍या चढायला सुरुवात केली व मध्यावर जाऊन थांबलो. तेवढ्यात किल्ल्यावरील माकडांचे आमच्यावर आक्रमण झाले. ही माकडे माणसाळल्यासारखी अतिशय जवळ येत होती. अगदी बॅगला हात लावून तिथे काही सापडते का, याची देखील चाचपणी करत होती! दहा वर्षांपूर्वी हीच माकडे आम्हाला पन्नास फुटावरून बघून पळून गेली होती. आज त्यांची बरीच उत्क्रांती झालेली दिसली! उत्साही पर्यटकांमुळे किल्ल्यांवरील माकडे माणसाळतात आणि त्याचा त्रास सर्वांनाच होतो. तशीच गत झाली होती. उतरताना देखील या माकडांनी इतर पर्यटक आणि ट्रेकर्सना बराच त्रास दिला. कोणत्या प्राण्यांना भूतदया दाखवायची? याचे प्रशिक्षण देखील मानवप्राण्याला द्यायला हवे, असे वाटून गेले. माकडांना माणसाने टाकलेल्या खाद्य पदार्थांची सवय झाल्यामुळे आता ते स्वतःचे खाद्य स्वतः शोधताना दिसत नाहीत. पायर्‍या चढून वर गेल्यावर मुख्य दरवाजाच्या समोरच अजून एक दुकान थाटलेले दिसले. येथून वर जाण्याचा रस्ता लवकर समजत नव्हता. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो तोवर खालून येणाऱ्यांची बरीच गर्दी झालेली होती. शिवाय बराच आरडाओरडा देखील ऐकू येत होता. यावरूनच सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर काय अवस्था असेल, याचा अंदाज बांधता आला. एकेकाळी अतिशय निर्जन व शांत असलेला किल्ला एक 'भयावह' पर्यटन स्थळ झालेला दिसून आला. किल्ल्याच्या माथ्यावर माकडे नसल्यामुळे यावेळेस किल्ला पूर्ण बघता आला, हे सौभाग्यच मानावे असे होते. किल्ला उतरताना विविध प्रकारच्या पर्यटकांची गर्दी दिसून आली. वर सांगितल्याप्रमाणे हौसे, नवसे आणि गवशे अशा सर्वच श्रेणीतील सो-कॉल्ड ट्रेकर्स किल्ल्यावर येत होते. हाफ चड्डी घातलेले, टाईट जीन्स घातलेले आणि थ्री-फोर्थ पॅन्ट घालून देखील ट्रेकिंग करणारे अनेक नवट्रेकर्स किल्ला चढताना दिसले. सोशल मीडिया एखाद्या किल्ल्याला किती ग्लॅमरस रुप देऊ शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण हरिहरच्या रूपाने दिसून आले. खाली येईपर्यंत हर्षेवाडी गावात देखील वाहनांची बरीच गर्दी झालेली दिसली.
यंदाच्या नाशिक दौऱ्यातील पहिल्याच किल्ल्याची भ्रमंती एका वेगळ्या दृष्टिकोनातून करता आली, त्यासाठीच हा लेखप्रपंच.
 
 









Thursday, April 2, 2020

रामशेज भ्रमंती

रामशेज किल्ल्यावर केलेला पहिला ट्रेक पावसाळी होता तो आजही मला आठवतोय. आशेवाडीपर्यंत रिक्षाने प्रवास व तिथून पायपीट करत पूर्ण किल्ला पालथा घातला होता. तिथून परत माघारी येताना चांभारलेणी पायी फिरून आलो होतो. कमीत कमी दहा किलोमीटर तरी तो पायी प्रवास होता. त्यानंतर बरेचदा रामसेजवर जाणे झाले. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये व सकाळ-दुपार-संध्याकाळ या तीनही वेळेस हा किल्ला मी सर केला आहे. नाशिक पासून सर्वात जवळचा किल्ला होय. तेथे रस्त्यावर आशेवाडी गावात तो स्थित आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील लढवय्या असा देदीप्यमान इतिहास या किल्ल्याला लाभलाय. रामशेज हा इतर कोणत्याही डोंगराशी जोडलेला नाही. स्वतंत्र असा मैदानी किल्ला आहे. शिवाय चढनही सोपी आहे. जास्तीत-जास्त पाऊण तासात हा किल्ला सर करता येऊ शकतो.
नाशिक जिल्ह्यात सर केलेला ज्ञानेश्वरीचा हा पहिलाच किल्ला होय. जानेवारी महिन्यात माझं आरवायके महाविद्यालयात ट्रेनिंग सेशन असल्याने नाशिकला पाच-सहा दिवसांचा आमचा मुक्काम ठरलेला होता. जानेवारी महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत आमचं आगमन नाशिकमध्ये झालं. तारीख होती एक जानेवारी २०२०. पुण्याहून नाशिकला पोहोचता पोहोचता संध्याकाळचे साडेचार वाजले होते. त्यानंतर आमचा प्रवास किल्ले सर करण्याच्या दिशेने चालू झाला. सव्वापाच वाजता पायथ्यापासून आमची सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे ज्ञानेश्वरी उत्साहीत होती. यावेळी तिने एकटीने चालत हा किल्ला सर केला. विशेष म्हणजे यावेळी ती पूर्णपणे माझ्याच सोबत होती! जवळपास अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आम्ही किल्ल्यावरच्या राम मंदिरापाशी आलो. सूर्य किल्ल्याच्या पलीकडच्या बाजूने असल्याने इथपर्यंत सावलीच पडलेली होती. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यावर सूर्यनारायणाचे दर्शन झाले. रामशेजचा सूर्यास्त यावेळी दुसऱ्यांदा अनुभवला होता. ते भाग्य या वेळी लाभले यातच सर्वात मोठे समाधान होते. ज्ञानेश्वरीने नेहमीसारखी मस्ती याही किल्ल्यावर केली. परंतु खचलेला मुख्य दरवाजा व इतर किल्ला पूर्णपणे पाहता आला नाही. खाली येईपर्यंत पूर्णपणे अंधार झाला होता. पार्किंगच्या जागेत शेवटपर्यंत फक्त आमचीच गाडी उभी असलेली दिसली.









Sunday, April 7, 2013

डुबेरे गड

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात डुबेरे गड वसलेला आहे. नाशिकपासून सुमारे ३५ किलोमीटर व सिन्नरपासून आठ किलोमीटर अंतरावर हा डोंगर आहे. गूगल मॅप्सवर याच्या मार्गाची माहिती मिळू शकेल. सिन्नर-घोटी मार्गावर सिन्नर पासून सुमारे पाऊण ते एक किमी अंतर गेल्यावर डावीकडे जाण्याकरिता एक रस्ता लागतो. हा रस्ता जिल्हामार्ग या प्रकारात येत असला तरी खूप चांगल्या स्थितीत आहे. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजुंना बऱ्यापैकी झाडी आहे. त्यामुळे प्रवास सुखद वाटतो. डुबेरे गांव चालू झाल्यावर सुरूवातीलाच उजवीकडे डुबेरे गड दिसून येतो. गांवातून तिथवर जाण्याचा रस्ता मात्र खडकाळलेला आहे. पावसाच्या पाण्याने कदाचित त्याची तशी अवस्था झाली असावी! गडाच्या पायथ्याशी एक महादेवाचे मोठे मंदिर आहे. आत मोठे शिवलिंग दिसून येते. मंदिराच्या उजव्या बाजुने एक पायऱ्यांची वाट डुबेरे गडाच्या दिशेने जाते. हा रस्ता अगदी अलिकडच्या काळात बांधला असावा. पावसाळ्यात डुबेरेचे वातावरण अगदी सुखद अनुभव देऊन जाते. गडाच्या माथ्यावर जाण्यास पंधरा मिनिटे पुरतात. बहुतांश ठिकाणी ऍल्युमिनियमचे रेलिंग्ज टाकल्याचे दिसून येतात. गडमाथा हा एक पठारच आहे. त्याच्या मध्यभागी एक सप्तशृंगी मातेचे मंदिर बांधलेले आहे. दोन ठिकाणी पाण्याची टाकी दिसून येतात. गडाच्या माथ्यावरून सिन्नर शहराचे तसे नाशिकचेही दर्शन घडते. नशिकच्या पांडवलेणी व विहितगांव या भागातून डुबेरे गड सहज दिसतो. इगतपुरी रांगेतील बहुतांश किल्ले डुबेरे वरून दिसतात. सह्याद्रीची ही पूर्ण रांग लांबपर्यंत दिसून येते. नाशिकहून दोन-तीन तासांचा छोटा ट्रेक करण्यासाठी डुबेरे हे एक चांगले ठिकाण आहे.

डुबेरे कडे जाण्याचा मार्ग (सिन्नर मधून)
छायाचित्र:

डुबेरे गड

डुबेरे गड

मंदिरातून दिसणारा डुबेरे

माथ्यावर फडकणारा भगवा.

सप्तशृङ्गि मंदिर.

डुबेरे गडावरील ध्यानस्थ कर्मयोगी- भूषण घोलप.

चढतॆच्या पायर्या

शिवलिंग 

दुबेरेचे कडे

गडावरील पाण्याची टाकी

Wednesday, April 3, 2013

त्र्यंबकगड : पुराणकाळाचा भक्कम साक्षीदार

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणा-या नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमधील दुर्ग म्हणजे त्र्यंबकगड होय. हा किल्ला त्र्यंबक या नावापेक्षा ‘ब्रह्मगिरी’ या नावाने अधिक सुपरिचित आहे. ऐतिहासिकतेपेक्षा पौराणिक महत्त्व या गडाला अधिक असल्याचे दिसते. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे सह्याद्रीची एक डोंगररांग गेली आहे. या रांगेस त्र्यंबकरांग असे म्हणतात. ब्रह्मगिरी, अंजनेरी, बसगड, उतवड यासारखे गडकोट या रांगेत उभे आहेत. यातील ब्रह्मगिरी हा सर्वात मोठा गड आहे. या गडाचे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व तर आहेच, शिवाय पर्यटकांच्या दृष्टीने ब्रह्मगिरी ही एक पर्वणीच मानली जाते.

तेराव्या शतकात त्र्यंबक किल्ला व परिसरात देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या भावाची राजवट होती. कालांतराने हा किल्ला बहामनी राजवटीकडे गेला. नंतर निझामशाही, शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व मुघल अशा राजवटींत या किल्ल्याचे हस्तांतरण झाले. मुघल इतिहासकारांनी या किल्ल्याचा ‘नासिक’ असाच उल्लेख केला आहे. सन 1670मध्ये शिवाजी महाराजांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला होता. छत्रपती संभाजी राजांच्या   काळात राधो खोपडे हा फितूर झाल्याने मुघलांनी त्र्यंबकगड मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. सन 1689 पर्यंत हा किल्ला छत्रपती संभाजी राजांच्याच ताब्यात होता. त्र्यंबकेश्वर हे त्र्यंबकगडाच्या पायथ्याचे ठिकाण होय. चहुबाजूंनी पर्वतांच्या वेढ्यात हे गाव वसलेले आहे. नाशिक शहरापासून त्र्यंबकेश्वर सुमारे 28 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिकच्या मेळा बसस्थानकावरून राज्य परिवहन मंडळाच्या गाड्यांची येथे सतत ये-जा चालूच असते.

शिवाय नाशिकहून पालघर, जव्हार, वाडा या ठिकाणी जाणा-या सर्व बसेस त्र्यंबकेश्वर मार्गे जातात. त्र्यंबकेश्वर
बसस्थानकापासून दहा मिनिटांत ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी पोहोचता येते. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने त्र्यंबकगडाच्या पायथ्याजवळ ‘संस्कृती रिसॉर्ट’ बांधलेले आहे. या रिसॉर्टपासून गडाच्या दिशेने दोन वाटा जातात. दोन्हीही वाटा या पाय-यांच्या आहेत. उजव्या बाजूच्या वाटेने गंगाद्वारापाशी पोहोचता येते, तर डावी वाट थेट गडाच्या दिशेने जाते.

गंगाद्वाराच्या वाटेने वर गेल्यावरही पुन्हा त्र्यंबकगडाकडे जाण्यासाठी पायवाट तयार केलेली आहे. प्रत्यक्ष गडाच्या दिशेने जाण्याकरता मात्र डाव्या बाजूच्या रस्त्यानेच जाणे योग्य ठरते. पावसाळ्यात येथील संपूर्ण परिसर हिरव्या वनराईने नटलेला असतो. त्र्यंबक गडावर येण्याचा रस्ता पाय-यांनी बनवलेला असल्याने फारसा अवघड भासत नाही. चालता चालता रस्त्यात ठिकठिकाणी छोटी मंदिरे दृष्टीस पडतात. सुमारे एक तास पाय-या चढत गेल्यावर किल्ल्याचे मुख्यद्वार लागते. यापुढील पाय-या या कातळात कोरलेल्या आहेत. अखंड दगडांत बनवलेल्या पाय-या पाहता सातवाहनांच्या गडरचनेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अतिशय कुशलतेने या पाय-यांची रचना दगडांमध्ये करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी पाय-या खोलवर असल्याने अंधार जास्त होतो. पाय-या संपल्यावर किल्ल्याचे प्रशस्त पठार नजरेस पडते. पूर्ण त्र्यंबकेश्वर गावाचे दर्शन या ठिकाणाहून व्यवस्थित करता येते. किल्ल्याचे कडे अतिशय भक्कम आहेत. येथूनच पाय-यांच्या बाजूने समोरच्या दिशेला अंजनेरी गड दृष्टीस पडतो. वातावरण स्वच्छ असताना रामशेज व देहेरच्या किल्ल्याचेही दर्शन होते. किल्ल्याचा माथा प्रशस्त असला तरी ‘किल्ला’ म्हणावा असे जास्त अवशेष येथे शिल्लक राहिलेले नाहीत. काही ठिकाणी सपाट प्रदेशावर राहत्या घरांचे प्राचीन अवशेष दिसून येतात. त्या ठिकाणी कोणी फिरकत नाही. हा किल्ला दोन्ही बाजूंनी प्रचंड विस्तारलेला आहे. उजव्या बाजूच्या टोकाला काही ठिकाणी पडलेली तटबंदी नजरेस पडते. या ठिकाणी जाण्याची वाट अवघड असल्याने इथे फिरकणा-यांची संख्या तशी कमीच आहे. सरळ उभे ठाकलेले कडे गडमाथ्यावरून न्याहाळता येतात. गडमाथ्याचा एक उंचवटा पार केल्यावर मागच्या बाजूला गडावरील गोदावरी उगमस्थान, गंगा-गोदावरी मंदिर व जटा मंदिर नजरेस पडते. समोरच्या पर्वतरांगांमध्ये हरिहर किल्ला डौलाने उभा असलेला दिसून येतो. अनेक ट्रेकर्स त्र्यंबक ते हरिहर असाही ट्रेक आयोजित करतात. ही वाट पर्वतांच्या एका खिंडीतून जाते. त्र्यंबक पठारावरील पाय-यांच्या वाटेने मध्येच एक नवी वाट डावीकडे ‘सिद्धगुंफा’ या ठिकाणी जाते. कड्यात कोरलेली गुहा या ठिकाणी पाहता येते. उजवीकडील रस्त्यावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. गंगा-गोदावरी मंदिरात गोदावरीचा प्रवाह पाहता येतो. या मंदिराच्या शेजारी एक बारमाही पाण्याचे टाके आहे. प्राचीन काळापासून या टाक्याचा वापर पाणी साठवण्याकरता होत असावा, असे दिसते.  जटा मंदिराच्या मागच्या बाजूला असणा-या टेकडीच्या पलीकडे त्र्यंबक किल्ल्याचा मुख्य बुरूज आहे. परंतु त्याचीही पडझड झाली आहे. त्र्यंबकवरून आजूबाजूचा मोठा परिसर दृष्टिक्षेपात येतो. पावसाळ्यात पर्यटकांची मोठी वर्दळ येथे दिसून येते, तर इतर वेळेस शिवभक्त या पर्वतावर गंगा-गोदावरीचे दर्शन घेण्यासाठी येतात. एका अर्थाने या गडामुळे नाशिक जिल्ह्याचे  ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व अधोरेखित होत जाते.
tushar@tusharkute.com

प्रसिद्धी: दै. दिव्य मराठी (दि. ०३ फेब्रुवारी २०१३).
मूळ लेख: लिंक.

Sunday, March 3, 2013

भीम प्रराक्रमी: रामशेज किल्ला

छत्रपती संभाजी महाराजांशी जोडले गेलेले इतिहासातील एक सुवर्णपान किल्ले रामशेजच्या लढाईला वाहिलेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी तब्बल 65 महिने हा किल्ला झुंजत ठेवला होता. संभाजीराजांच्या जीवनावर आधारित कादंबर्‍यांमध्ये व पुस्तकांत या लढाईचे वर्णन वाचायला मिळते.
मराठा साम्राज्यातील बरेचसे किल्ले सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांत व घनदाट झाडींमध्ये होते. रामशेज किल्ला मात्र यास अपवाद ठरतो. नाशिकच्या जवळ असलेला हा किल्ला मैदानी प्रदेशात आहे. संपूर्ण नाशिकमधून या किल्ल्याचे दर्शन करता येते. ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ही उक्ती सार्थ ठरवणारा किल्ला म्हणजे रामशेज. रामशेजच्या लढाईचे वर्णन सर्वप्रथम मुघलांच्या कागदपत्रांत वाचायला मिळाले व खरा इतिहास उजेडात आला. ‘रामशेज’ या शब्दाचा अर्थ ‘रामाची शय्या’ असा होतो. वनवासात असताना भगवान श्रीराम यांनी याच डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता. त्यामुळे प्राचीन काळापासूनच या डोंगराला व किल्ल्यालाही ‘रामशेज’ हे नाव मिळाले आहे. शिवछत्रपतींच्या निधनानंतर मराठेशाहीला सहज नामोहरम करता येईल, या उद्देशाने औरंगजेबाने शहाबुद्दीन फिरोजजंग या सरदाराला महाराष्टÑाच्या मोहिमेवर पाठवले होते. त्या काळात नाशिक व आसपासचा प्रांत मुघलांच्या ताब्यात होता. औरंगजेबाच्या या आक्रमणाची कुणकुण लागताच संभाजीराजांनी रक्षणार्थ साल्हेरचा किल्लेदार रामशेजवर रवाना केला. ऐतिहासिक कागदपत्रांत रामशेजच्या किल्लेदाराचे स्पष्ट नाव सापडत नाही, परंतु बहुतांश इतिहासकारांच्या मते, सूर्याजी जेधे हे रामशेजचे किल्लेदार होते. रामशेजच्या लढाईने किल्ल्याच्या किल्लेदाराचे कार्यही इतिहासात अजरामर केले आहे.
औरंगजेबाचा सरदार फिरोजजंग रामशेजवर चाल करून आला, तेव्हा किल्ल्यावर केवळ 600 मावळे होते. चार-पाच तासांत किल्ला ताब्यात घेऊ, असा फिरोजजंगचा उद्देश होता. त्यासाठी त्याने नाना तºहेने हल्ला चढवला. वेढा कडक केला, सुरुंग लावले, मोर्चे बांधले, तसेच लाकडी दमदमे तयार करून त्यावर तोफा चढवल्या. तरीही रामशेज हाती येत नव्हता. गडावरच्या मावळ्यांनी गोफणीच्या दगडांच्या साहाय्याने प्रतिकार चालू ठेवला होता. किल्लेदाराने चहुबाजूंनी मुघली सैन्यावर हल्ले चढवले. मुघलांचे मनसुबे धुळीस मिळवले गेले. मग वेढा फोडण्यासाठी संभाजीराजांनी 5 ते 7 हजारांची फौज पाठवली. युद्ध झाल्यावर मात्र मुघलांना माघार घ्यावी लागली. फिरोजजंग किल्ल्याचा वेढा सोडून जुन्नरला निघून गेला. नंतर औरंगजेबाने बहादूरखानाला रामशेजला पाठवले. किल्ला जिंकण्यासाठी त्याने मांत्रिकाचा अवलंब केला. परंतु त्यास अपयश आले. मुघली सैन्याचा धीर मात्र सतत चार वर्षांच्या अपयशाने खचून गेला होता. बहादूरशहाने संतापून रामशेजच्या पायथ्याशी बरीच जाळपोळ केली. औरंगजेबाने कासिमखान किरमानी या सरदाराला अखेरीस रामशेजच्या मोहिमेवर पाठवले. परंतु तोही अपयशाचा धनी ठरला. एवढा छोटासा गड मराठा, सैन्याने तब्बल 65 महिने अजिंक्य ठेवला होता!
नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून रामशेज किल्ला 15 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक-पेठ रस्त्यालगत हा किल्ला उभा ठाकलेला दिसतो. पेठकडे जाणार्‍या बसेस या किल्ल्याला वळसा घालून जातात. नाशिकच्या निमाणीजवळील पेठनाका येथूनही खासगी वाहनांची सोय आहे. आशेवाडी हे रामशेजच्या पायथ्याचे गाव आहे. पेठ रस्त्यापासून आशेवाडी सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्यावर उतरल्यावरच रामशेजच्या टुमदार किल्ल्याचे दर्शन होते. समुद्रसपाटीपासून हा किल्ला 3270 मीटर उंचीवर आहे. परंतु प्रत्यक्ष पायथ्यापासून त्याची उंची अधिक नसल्याने कोणत्याही ऋतूत हा किल्ला नजरेस पडतो. पावसाळ्यात तो ढगांमध्ये लपाछपी खेळत असला तरी ही लपाछपी फार काळ चालत नाही. त्यामुळे ढगांच्या थंड वातावरणात किल्ला पाहता येतो. रामशेजला भेट देण्यासाठी हिवाळाही तसा उत्तमच. वातावरण साफ असल्याने आजूबाजूचा मोठा परिसर न्याहाळता येतो.
आशेवाडी गावातून किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्यास 45 मिनिटे पुरतात. गावाबाहेर पडताना किल्ल्याच्या मुख्य कड्याचे दर्शन होते. इथे ध्वजस्तंभ उभारलेला आहे. त्यावरचा जरीपटका डौलाने फडकताना दिसून येतो. पायथ्याला वळसा घालून थोडे पुढे गेल्यास पायर्‍या लागतात. आजच्या काळातील सिमेंटने या पायर्‍या बांधल्या आहेत. पायर्‍या चढत असताना रामशेज किल्ल्याचा आवाका ध्यानात येतो. किल्ल्याच्या दोन्ही टोकांमधील कड्यांचा परिसर दृष्टीस पडतो. गडावर जाताना वाटेत एक गुहा लागते. या गुहेमध्ये रामाचे मंदिर आहे. तसेच एका बाजूला शिलालेख कोरलेला दिसून येतो. सध्या रामशेजवर काही साधूंचे वास्तव्य आहे. गुहेच्या खालच्या बाजूस एक पाण्याचे टाके दृष्टीस पडते. पावसाळ्यात ते पूर्ण भरून जाते. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.

गुहेच्या समोरून जाणार्‍या पायर्‍या थेट गडमाथ्यावर जातात. गडाच्या दोन्ही टोकांमधील भागात आपण येऊन पोहोचतो. हा भाग बराचसा अरुंद आहे. समोरच बुजलेल्या अवस्थेत गुप्त दरवाजा आहे. या वाटेने खाली गेल्यास समोर देहेरच्या किल्ल्याचे दर्शन होते. पेठ रोडने चालणारी दूरवरची वाहतूक येथून न्याहाळता येते. गुप्त दरवाजाच्या वर जाणारी वाट रामशेजच्या दुसर्‍या टोकाकडे जाते व डावीकडची वाट थेट गडाच्या माचीकडे अर्थात, मुख्य बुरुजाकडे जाते. उजवीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यास काही पायर्‍या दिसून येतात. एका कड्यावर या पायर्‍यांची रचना केलेली आहे. येथे समोरच किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसून येतो. आज या दरवाजाची अवस्था खराब झालेली आहे व बाहेर पडण्याच्या वाटाही बंद झाल्या आहेत. येथून खाली जाण्यासाठी केवळ एका मनुष्याचा रस्ता दिसून येतो. दरवाजा पाहून मुख्य वाटेला आल्यावर समोर मोठा ध्वजस्तंभ नजरेस पडतो. शंभू छत्रपतींच्या जन्मदिनी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. ध्वजस्तंभ हा किल्ल्याच्या मुख्य बुरुजावर उभारलेला आहे. या ठिकाणी उंच कडा आहे. खाली आशेवाडी गाव दिसते. सुमारे चार-पाच कि.मी. अंतरावर चामर लेणींचा डोंगर दृष्टीस पडतो. त्याहीपलीकडे दूरदूर पांडवलेणींचा डोंगर दिसतो. वातावरण स्वच्छ असेल, तर उजव्या बाजूला दूरवर अंजनेरी व ब्रह्मगिरीचे   पर्वत न्याहाळता येतात. बरेच हौशी ट्रेकर्स रामशेज व चामर लेणींचा ट्रेक एका दिवसात पूर्ण करतात.

किल्ल्याच्या दुसर्‍या टोकाकडे जाण्यासाठी माचीवरून परत मागे फिरावे लागते. या टोकाचा परिसर पहिल्यापेक्षा अधिक उंचवट्याचा आहे. थोडे वर चढून आल्यावर आपण एका सपाटीवर येऊन पोहोचतो. येथे पाण्याची दोन टाकी व एक तलाव आहे. तलावापासून थोडे पुढे चालत गेल्यास एक देवीचे मंदिर दृष्टीस पडते. देवीभक्तांचे येथे सतत येणे-जाणे असावे, असे तेथील पाऊलखुणांवरून दिसून येते. नवरात्रात येथे मोठा उत्सवही होत असतो. मंदिराच्या मागच्या बाजूस पुन्हा उतार चालू होतो. गडाचा दुसरा गुप्त दरवाजा याच ठिकाणी आहे. दुसर्‍या टोकाशीही दोन पाण्याची टाकी दिसून येतात. या माथ्यावर अनेक पडक्या घरांचे अवशेष विखुरलेले आहेत. मागील बाजूला मोठे उतरते पठार आहे. त्यास वळसा घातल्यास किल्ल्याच्या या टोकाचा घेर ध्यानात येतो. समोरच टेहळणीसाठी वापरण्यात येणारा भोरगड नजरेस पडतो. नाशिक-पेठ रस्त्याचे पूर्ण दर्शन या भागातून होते. या टोकाच्या उजव्या बाजूला काही भग्न मूर्ती व पिंडीचे अवशेष दिसून येतात. त्याचा संदर्भ मात्र इतिहासात सापडत नाही.

रामशेज पाहताना एक गोष्ट मात्र ध्यानात येते की, या किल्ल्याची रचना ही साधीच आहे. परंतु तरीही मराठ्यांनी साडेपाच वर्षे हा किल्ला झुंजत ठेवला होता, यावरूनच त्यांच्या पराक्रमाची प्रचिती येते. किल्ल्यावरील अवशेष मात्र पडझडीत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्टÑाच्या पराक्रमाची माहिती पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी या किल्ल्याचे जतन-संवर्धन ही अत्यावश्यक बाब आहे.

Original Article: (Daily Divya Marathi- 03/03/2013)
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-ramshej-fort-at-nashik-4196061-NOR.html

Monday, December 3, 2012

त्र्यंबक गड



गोदावरीचे उगमस्थान म्हणून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ओळखले जाते. इथेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग वसलेले आहे. त्र्यंबकेश्वर जवळच्या ब्रम्हगिरी पर्वतावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. या विषयी माझ्या या ब्लॉगवर मी आधीच एक पोस्ट केलेली आहेच. परंतु, ब्रम्हगिरीचे इतिहासात गड-किल्ला म्हणून स्थान अधोरेखित केले नव्हते. म्हणूनच ही पोस्ट करत आहे.
इ.स. १२७१ - १३०८ त्र्यंबकेश्वर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरावर देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या भावाची राजवट होती. मोगल इतिहासकार किल्ल्याचा उल्लेख नासिक असा करतात. पुढे किल्ला बहमनी राजवटीकडे गेला. तिथून पुढे तो अहमदनगरच्या निजामशहाकडे गेला. इ.स. १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड करून हा किल्ला व आजूबाजूचा परिसर जिंकला. मोगल राजा शाहजान याने ८ हजाराचे घोडदळ हा परिसर जिंकण्यासाठी पाठवले. इ.स. १६३३ मध्ये त्रिंबक किल्ल्याचा किल्लेदार मोगलांकडे गेला. इ.स. १६३६ मध्ये शहाजी राजांचा माहुली येथे पराभव झाल्यावर त्रिंबकगड मोगलांचा सेनापती खानजमान ह्याच्या हवाली केला. इ.स. १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने त्रिंबक किल्ला जिंकून घेतला.
इ.स. १६८७ मध्ये मोगलांच्या अनेक ठिकाणी आक्रमक हालचाली चालू होत्या. याच सुमारास मोगलांचा अधिकारी मातबर खान याची नासिक येथे नेमणूक झाली. १६८२ च्या सुमारास सुमारास मराठ्यांची फौज गडाच्या भागात गेल्याने खानजहान बहाद्दरचा मुलगा मुझ्झफरखान याला मोगली फौजेत नेमण्यात आले. याने गडाच्या पायथ्याच्या तीन वाड्या जाळून टाकल्या. १६८३ च्या फेब्रुवारी महिन्यात राधो खोपडा हा मराठा अनामतखानाकडे जाऊन मराठयांना फितुर झाला. त्याच्यावर बादशाही कृपा झाली, तर तो मोगलांना त्रिंबकगड मिळवून देणार होता. या राधो खोपड्याने त्रिंबक किल्ल्याच्या किल्लेदाराला फितुर करण्याचा प्रयत्न केला, पण किल्लेदार त्याला वश झाला नाही. तो संभाजी महाराजांशी एकनिष्ठ राहिला. राधो खोपड्याचे कारस्थान अयशस्वी झाल्यामुळे त्याला मोघलांनी कैद केले. पुढे १६८४ मध्ये नोव्हेंबर महिन्यात अकरमतखान आणि महमतखान यांनी त्रिंबकगडाच्या पायथ्याच्या काही वाडया पुन्हा जाळल्या व तेथील जनावरे हस्तगत केली. १६८२ आणि १६८४ मध्ये मोगलांनी किल्ला घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला, पण तो फसला. इ.स. १६८८ मध्ये मोगल सरदार मातबरखानाने ऑगस्ट महिन्यात किल्ल्याला वेढा घातला. त्याने औरंगजेबाला पत्र पाठविले आणि त्यात तो म्हणतो, ’‘त्र्यंबकच्या किल्ल्याला मी सहा महिन्यांपासून वेढा घातला होता किल्ल्याभोवती मी चौक्या वसविल्या आहेत. सहा महिन्यांपासून किल्ल्यामध्ये लोकांचे येणे जाणे बंद आहे. किल्ल्यामध्ये रसदेचा एकही दाणा पोहोचणार नाही याची व्यवस्था मी केली आहे. त्यामुळे किल्ल्यातील लोक हवालदील होतील आणि शरण येतील’’.  [संदर्भ: ट्रेक क्षितीज़.कॉम]
किल्ला म्हणावा असे या ठिकाणी फारसे अवशेष दिसून येत नाहीत. गोदावरी त्र्यंबकेश्वराच्या भाविकांच्या गर्दीमुळे या ठिकाणी बऱ्यापैकी वर्दळ दिसून येते. प्राचीन किल्ला म्हणून या ठिकाणी फार भेटी दिल्या जात नाहीत. तसं पाहिलं तर त्र्यंबक पर्वतांची ही रांग अत्यंत भक्कम कड्यांनी बनलेली आहे. किल्ल्यावरील परिसरही विस्तीर्ण आहे. गडमाथ्यावरून पूर्वेकडे नाशिकचा रामशेज, भोरगड तर पश्चिमेकडे हरिहर किल्ला स्पष्ट दिसून येतो. हरिहर व भास्करगडांची रांग त्र्यंबक उतरून पार करता येते, असे कुठेतरी वाचलं होतं. पण वाट मात्र सापडली नाही. किल्ल्याच्या पायऱ्या ह्या कातळात कोरलेल्या आहेत. येथुन पावसाळ्यात गड चढत जाणं म्हणजे एक प्रकारचे थ्रीलच असते! गडमाथ्यावरील पठारावर किल्ल्यातील सैनिकांना राहण्यासाठी ज्या जागा बनविल्या गेल्या होत्या, त्यांचे केवळ अवशेषच पाहायला मिळतात...

छायाचित्रे:
त्र्यंबक गडाचे कडे

त्र्यंबक वरील गडाचे अवशेष

समोर दिसणारा हरिहर किल्ला

किल्ल्याच्या मागच्या बाजूस गंगा-गोदावरी मंदिर

कातळांत कोरलेल्या गडवाटा

Sunday, August 26, 2012

मोहदरी घाट (छायाचित्रे)

नाशिक व सिन्नर यांना जोडणाऱ्या ’नाशिक-पुणे’ राष्ट्रीय महामार्गावर हा छोटा घाट आहे. नाशिकपासून २२ तर सिन्नरपासून हा ६ किमी अंतरावर आहे.

मोहदरी घाट

मोहदरी घाट

मोहदरी घाट

मोहदरी घाट

मोहदरी घाट

मोहदरी घाट

मोहदरी घाट