जवळपास अडीच ते तीन तासांचा गोवा-मुंबई महामार्गावरचा प्रवास करत आम्ही पोलादपूरला पोहोचलो. यावेळी पुण्यामध्ये परतण्यासाठी आंबेनळी घाटाचा पर्याय निवडला. यापूर्वी देखील मी स्वतः या घाटातून कधीच उतरलो अथवा चढलो नव्हतो. त्या दिवशी माझा हा पहिलाच अनुभव होता. कोकणातील दमट वातावरण आणि प्रखर सूर्यकिरणांना मागे टाकत आमची गाडी घाटाच्या दिशेने निघाली. अगदी थोड्याच अंतरावर घाट रस्त्याचा प्रवास देखील चालू झाला. आजूबाजूची हिरवीगार झाडी नागमोडी वळणांनी पार करत हळूहळू चढाच्या दिशेने आम्ही चाललो होतो. 20 ते 25 मिनिटांमध्येच मानवी वस्ती बऱ्यापैकी मागे पडली आणि सह्याद्रीच्या जंगलांमध्ये आमचा प्रवेश झाला. त्या दिवशी घाटामध्ये फारशी वाहतूक नव्हती. अगदीच महाबळेश्वर पाचगणी किंवा वाईला जाणारी वाहने अथवा येणारी वाहने अधून मधून दिसून यायची. परिसरातील वनराजी बऱ्यापैकी दाट होती. कोकणात उतरणाऱ्या अन्य घाटांपेक्षा ती निश्चितच घनदाट वाटत होती. सह्याद्रीच्या अशा जंगलांमधून प्रवास करताना तेथील नैसर्गिक हवा अंगावर घेताना जी शीतलता अनुभवता येते ती निश्चितच मन सुखावणारी असते. त्यादिवशी देखील माझी काही वेगळी भावना नव्हती. जवळपास मध्यापर्यंत घाट चढून आल्यावर एका वळणावरती उंच गगनाला भिडलेला शिवरायांचा प्रतापगड नजरेस पडला. या किल्ल्याच्या बऱ्यापैकी वरपर्यंत गाडी मार्ग झालेला आहे. त्यामुळे त्याची उंची इतकी जाणवत नाही. परंतु आंबेनळी घाटाच्या या बाजूने प्रतापगडाचे रौद्ररूप मात्र मनात भरले. साडेतीनशे वर्षांपूर्वी याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 32 दातांचा बोकड कापला होता याची वारंवार आठवण येत राहिली. शिवाजी महाराजांनी त्याकाळी या किल्ल्याची का निवड केली असावी? याचे उत्तर मात्र मला मिळाले. किल्ल्याभोवती असणार जावळीचं घनदाट जंगल म्हणजे या परिसराचं नैसर्गिक संरक्षणच होतं.
घाट चढून जवळपास सपाटीला आल्यावर आम्ही बऱ्यापैकी उंची गाठलेली आहे याची जाणीव झाली. ठीक ठिकाणी वळणावर उंच कडा वाहने सावकाश चालवा अशा पाट्या लावलेल्या दिसल्या. कोकणात उतरणाऱ्या अन्य कुठल्याही घाटात अशा प्रकारची पाटी दिसली नाही. शिवाय वरून पाहिल्यावरती खालच्या बाजूला खोल खोल दर्या दिसत होत्या. कदाचित हा सर्वात उंचीवरचा घाट असावा. अनेकदा अरुंद रस्त्यांवर गाडी चालवताना येथे धडकी देखील भरते. जिथवर नजर जाईल तिथपर्यंत केवळ जंगलच जंगल नजरेस पडत होतं. रायगड जिल्ह्याची हद्द संपून आम्ही सातारा जिल्ह्यात अर्थात महाबळेश्वर मध्ये प्रवेश केला. आणि लगेचच थंडगार वाऱ्यांनी आमचे सहर्ष स्वागत केले. महाबळेश्वरला पोहोचलो तोवर वातावरणात बऱ्यापैकी थंडी जाणवत होती. आजूबाजूच्या घनदाट वनराईमुळे थंडगार वाऱ्याचे झोप अंगावर घेत आम्ही वाईच्या दिशेने प्रस्थान केले.
--- तुषार भ. कुटे
Wednesday, June 11, 2025
आंबेनळी घाट
Thursday, August 15, 2024
सिंधुदुर्ग रत्नागिरी जंगल
गोव्यातून परतीच्या मार्गाने पुण्याकडे निघालो. सिंधुदुर्गातलं बांदा गाव लागलं की आपल्या मराठी मातीमध्ये प्रवेश केल्याचा अनुभव मिळतो. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना पावसाची रिमझिम काही कमीच होत नव्हती. कुडाळ, ओरोस, कणकवली करत खारेपाटणपर्यंत पोहोचलो. वाघोटण नदी ओलांडली,राष्ट्रीय महामार्ग सोडून उजवीकडे वळण घेतले आणि थेट अणुस्कुरा घाटाच्या दिशेने प्रवास चालू झाला. या वळणापासूनच सह्याद्रीची यंदाच्या मान्सूनमध्ये फुललेली घनदाट वनराई रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसून येत होती. चारपदरी रस्ता जवळपास एक पदरी झाला होता. मागच्या पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने सह्याद्रीतील ही जंगले आता भरायला सुरुवात झाली होती आणि त्यावरील फुललेली हिरवी-पोपटी पालवी मन प्रसन्न करून जात होती. या रस्त्याने रहदारी जवळपास नव्हतीच. अधूनमधून एखाद दुसरे वाहन समोरून यायचे. घनदाट जंगलांमुळे गावांची आणि वस्त्यांची संख्याही कमीच होती. परंतु अधूनमधून पाऊस आणि कधीमधी ऊन अश्या रम्य वातावरणात आम्ही अनुस्कुरा घाटाच्या दिशेने निघालो होतो. बहुतांश ठिकाणी शेतांची कामे चालू झालेली होती. अर्थात इथल्या पावसाचा अंदाज गावकऱ्यांना असल्याने त्यांची लगबग निश्चितच सकारात्मक दिसून येत होती. वातावरण स्वच्छ झाले की कॅनव्हासवर रेखाटण्यात आलेल्या निसर्गचित्रांची अनुभूती या वातावरणात अधूनमधून येत होती. दोन्ही बाजूंना हिरवी-पोपटी दाट झाडी आणि त्यामधून वळणावळणाचे काळेशार रस्ते पाहण्याचा तो दुर्दम्य आनंद होता. राष्ट्रीय महामार्गावरून आत वळण्याच्या आधी वाघोटण नदी पार केली होती. यापुढील प्रवासात देखील ही नदी तीन ते चार वेळा पुन्हा पार केली. अर्थात जंगलातल्या वळणावळणाने ही नदी आपला मार्ग शोधत पुढे चालली होती. नदीचा प्रवाह पावसाच्या पाण्यामुळे शितलतेची आणखी एक पायरी पुढे टाकून वेगाने वाहत असलेला दिसला. नदीच्या दोन्ही काठांवर फक्त झाडेच झाडे. अगदी विरळ मनुष्यवस्ती या भागामध्ये दिसून येत होती. काही ठराविक अंतरावर छोट्या छोट्या गाववस्त्या दिसून यायच्या. कोकणातले ग्रामीण लोकजीवन येथे पाहायला मिळाले. गर्द झाडीतील कोकण रेल्वेचा मार्गदेखील आम्हाला दिसला. आणि सुदैवाने या मार्गावरून वेगाने धावणारी आगगाडी देखील दिसून आली. लहान मुलांची शाळा सुटल्याने देखील त्यांची ठिकठिकाणी आपल्या घरी जाण्यासाठी चाललेली लगबग दिसत होती. काही ठिकाणी उंच तर काही सखल घाटरस्ते पार करत आम्ही अणुस्कुरा घाटाच्या दिशेने चाललो होतो. कधी रत्नागिरी तर कधी सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या पाट्या या ठिकाणी दिसायच्या. म्हणजेच आम्ही दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरून प्रवास करत होतो! वर्षांनी वर्षे मनुष्याला प्राणवायू देणारी ही जंगले भरलेली बघून मनाला एक सुखद अनुभूती प्राप्त होत होती. एकंदरीत प्रवासात असंच वाटत राहिलं की, याच जंगलातून या रस्त्यांवरून तासनतास असाच प्रवास करत बसावे.
पाऊण-एकतासानंतर आम्ही मुख्य रस्त्यावरील पाचाळ या गावी पोहोचलो आणि थोड्याच अंतरावर अणुस्कुरा घाटाची सुरुवात झाली होती…
Wednesday, July 3, 2024
महादेवगड दृश्यबिंदू
कोल्हापुरातल्या आजरा तालुक्याची हद्द संपली की सिंधुदुर्गातलं निसर्गरम्य आंबोली गाव लागतं. घाटातल्या जगप्रसिद्ध धबधब्यासाठी हे गाव सर्वज्ञात आहे. गाव संपलं की लगेचच उजव्या बाजूला महादेवगड दृश्यबिंदूकडे जाणारा रस्ता आहे. चहूबाजूंनी घनदाट झाडी आणि त्यातल्या त्यात पावसाळ्यात ते अधिक दाट भासायला लागते. सुमारे अडीच किलोमीटरचा रस्ता जंगलातील त्या घनदाट वाटेने पार केल्यानंतर आपण महादेवगडाच्या दृश्यबिंदूपाशी येऊन पोहोचतो. वनविभागाने या ठिकाणी पर्यटकांसाठी काही सुविधा देखील निर्माण केलेल्या दिसतात. या दुर्गाचा इतिहासात कुठेही उल्लेख झालेला मला तरी वाचनात आलेला नाही. दुर्ग असला तरी त्याचे अवशेष पूर्णपणे गळून गेलेले दिसले. परंतु इथलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे महादेवगडाच्या या दृश्यबिंदूवरून आंबोली परिसरातील सह्याद्रीची घनदाट जंगले दूर दूरवर दिसून येतात. महाराष्ट्रातील ऑक्सिजनचे हे कोठार मान्सूनच्या जलवर्षावाने अधिक मनमोहक भासते. आंबोलीचा धबधबा देखील इथून पाहता येतो. तसेच समोरच मनोहर आणि मनसंतोषगडाचे देखील ढगांच्या लपाछपीमध्ये दर्शन होते.
निसर्ग भटकंती करणाऱ्यांसाठी हा परिसर म्हणजे मेजवानीच.
Friday, May 24, 2024
सह्याद्रीतील एक जंगल
आंबा घाट चढून वर आलं की अगदी काहीच अंतरावर उजव्या बाजूला एक रस्ता विशाळगड आणि पावनखिंडीच्या दिशेने जातो. सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून जाणारा वळणावळण्याचा रस्ता म्हणजे उन्हाळ्यात सुखद क्षणांची एक अनुभूतीच असते. जवळपास दहा किलोमीटरचा रस्ता हा सह्याद्रीच्या पूर्णपणे घनदाट जंगलातून जातो. अनेक ठिकाणी तर दिवसभरात सूर्याची किरणे देखील जमिनीवर पडत नसावीत, अशी परिस्थिती दिसते. ही जंगले निसर्गाचा समतोल टिकवून आहेत. शिवकाळात कदाचित याहीपेक्षा दाट झाडी या ठिकाणी असावी.
Thursday, December 24, 2020
छान किती दिसते फुलपाखरू
डोंगराच्या माथ्यावर पोहोचलो तेव्हा अनेक रंगीबेरंगी फुलपाखरे निसर्ग संचार करताना दिसत होती. दोन सारख्या रंगाची फुलपाखरे शोधणे, म्हणजे दिव्यच होते. कदाचित त्यांचे सौंदर्य जपण्यासाठी निसर्गाने त्यांना दिलेले हे वरदान असावे. अनेकदा त्यांना पकडण्याचा मोह आवरत नाही. पण ही गोष्ट इतकी साधी ही सोपी नाही. शेवटी त्याला केवळ कॅमेऱ्यातच बंदिस्त करावे लागते. तेही स्लो-मोशनमध्ये! तरच त्यांच्या एकंदरीत हालचाली व्यवस्थित पाहता येतात. जंगलातल्या झाडाझुडपांना सौंदर्य प्रदान करणारी व त्यांचा वंश एक प्रकारे वाढवणारी ही एक जमात होय. कोण जाणे कुठल्याश्या नैसर्गिक अल्गोरिदम नुसार त्यांचा वावर दिसत असतो. अजूनही हा अल्गोरिदम आम्हाला सापडलेला नाही. कदाचित आमचा अभ्यास कमी पडत असावा.
Wednesday, December 23, 2020
स्पायडरमॅन
जाळ्यांच्या निर्माणकर्त्याला आम्ही लाडाने "स्पायडरमॅन" म्हणतो! शहरातला कोळी आणि जंगलातला कोळी यात कित्येक पटीचा फरक आहे. जंगलात त्याने लावलेली जाळी अगदी मोठमोठाले कीटकही तोडू शकत नाहीत, इतकी भक्कम होती. अनेकदा त्याची कलाकुसर आणि सुबकता पाहता निसर्गाने दिलेल्या वरदानाचाही हेवा वाटतो. किती मन लावून एकाग्रतेने तो आपले काम करत असतो. एका अर्थाने आपल्याला मार्गदर्शन करण्याचेही कार्य त्याच्याकडून घडत असते.
इवलासा असला तरी त्याच्या जाळ्याची ताकत मात्र जबरदस्त होती. जंगलातल्या वाटांवर त्याचे साथीदार आणि अनेक सगेसोयरे अशीच सुंदर जाळी टाकून भक्ष्याची वाट बघत होते. निसर्गाने प्रत्येकाला काहीतरी कौशल्य प्रदान केलेले आहे. त्याचे कौशल्य त्याला पूर्णपणे माहित आहे. माणसाच्या बाबतीत मात्र असे नाही. वर्षानुवर्षे आपण आपली मूळ कौशल्ये विसरत चाललो आहोत. कदाचित हाच संदेश देत तो मानवासाठी जंगलात जागोजागी जाळी लावत बसला असावा.
Wednesday, November 25, 2020
गुगलभाऊ मॅपवाले यांची किमया
जुन्नरमधले किल्ले संपले तेव्हा आजूबाजूंच्या किल्ल्यांवर आम्ही नजर टाकायला सुरुवात केली होती. या सर्व किल्ल्यांना जुन्नरमधून अशा प्रकारे जाता येईल, याचा शोध घेण्याचा आम्ही गुगल मॅपद्वारे प्रयत्न केला. त्यातच आम्हाला अकोले तालुक्यातील भैरोबा दुर्ग सापडला. हरिश्चंद्रगडाच्या अभयारण्यामध्ये कोथळे गावानजीक हा किल्ला स्थित आहे.... तो अगदी जुन्नरच्या सीमेला लागूनच!
खिरेश्वरातल्या टोलार खिंडीपासून काहीच अंतरावर हा किल्ला दिसून येत होता. गुगल मॅपद्वारे मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याने वेगळीच वाट दाखवली. नकाशात दाखवल्याप्रमाणे हरिश्चंद्रगडावर चढून पाचनईमार्गे लव्हाळी, कोथळे मग भैरव दुर्ग... असा भलामोठा १८ किलोमीटरचा मार्ग दाखवण्यात आला. त्यामुळे आम्ही गोंधळून गेलो. टोलार खिंडीतून अगदी जवळ असणारा किल्ला गाडी मार्गानेही ९० किलोमीटर इतक्या अंतरावर होता! वाटेत जंगल असल्यामुळे आतील वाट कदाचित गुगलला माहित नसावी. अखेरीस बरेच सर्वेक्षण करून आम्ही टोलार खिंडीतूनच कोथळेच्या भैरवगडाला जायचे ठरवले. प्रत्यक्ष गेल्यावर समजले की, इथून जंगलातली एक उत्तम वाट कोथळे गावामध्ये जाते. जी गुगलला माहीतच नाहीये! विविध ट्रेकर व ब्लॉगर यांनीही त्यांच्या या किल्ल्यावरील ट्रेकचे वर्णन केले आहे. परंतु, कोणीही टोलार खिंडीतून हा किल्ला सर केलेला नाही!
खिंड ते किल्ल्याचा पायथा हे अंतर साधारणत: तीन किलोमीटरचे असावे. हा रस्ता पूर्णतः जंगलातून जातो. कृपया गूगलभाऊ मॅपवाले यांनी याची नोंद घ्यावी! खरंतर जंगलातील आमचे स्थान शोधण्यासाठी त्यांची फार मोठी मदत झाली होती. त्याबद्दल त्यांचे आभारच.
या प्रवासाचा सविस्तर लेख लवकरच तुमच्या समोर येईल.
Tuesday, July 7, 2020
रानहळद
Sunday, July 5, 2020
हरणटोळ
पहिल्या फोटोमध्ये झाडात तो बिलकुल दिसून येत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा साप बिनविषारी आहे!

























