माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label गड. Show all posts
Showing posts with label गड. Show all posts

Wednesday, February 9, 2022

एका अल्पावधीत ग्लॅमरस झालेल्या किल्ल्याची गोष्ट

दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नाशकातल्या अनेक अपरिचित किल्ल्यांवर किल्ल्यांची आम्ही भ्रमंती करायला लागलो होतो. त्यातच त्र्यंबकेश्वर जवळच्या हरिहर किल्ल्याबद्दल माहिती समजली.
त्यादिवशी तिथीनुसार येणारी शिवजयंती शनिवारी आली होती. शिवाय सुट्टीचा दिवस असल्याने आम्ही अर्थात मी आणि माझ्या भावाने हरिहर किल्ला सर करण्याची योजना आखली. पहाटे पाच वाजताच आम्ही नाशिक वरून प्रस्थान केले. थंडी संपून उन्हाळ्याची सुरुवात होऊ लागली होती. परंतु वातावरणात गारवा मात्र कायम होता. त्र्यंबकेश्वर परिसरातील दुगारवाडी हा नाशिक जिल्ह्यातला एक सुप्रसिद्ध धबधबा होय. यापूर्वीच्या वर्षाऋतू मध्ये दुगारवाडीला भेट दिली होती. याच रस्त्यावर ढगांमध्ये लपाछपी खेळणारा हरिहर किल्ला पहिल्यांदा पाहिला होता. त्यामुळे त्याचे भौगोलिक स्थान माहीत होते. दुगारवाडीच्या दिशेने जाणारा हाच मार्ग चालत आम्ही हरिहरच्या दिशेने निघालो होतो. सकाळी सातच्या दरम्यान किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या हर्षेवाडी गावामध्ये आम्ही पोहोचलो. रस्त्यामध्ये कुठेच किल्ल्याच्या नावाची पाटी नव्हती. तसेच रस्ते देखील फारसे चांगले नव्हते. परंतु जंगलातील वळणावळणाचे रस्ते असल्यामुळे प्रवासाचे काही वाटले नाही. तसं पाहिलं तर हर्षवाडी एक आदिवासी गाव होतं. या भागात मानवी वस्ती तशी फार कमीच जाणवली. समोर हरिहर किल्ल्याचे सर सरळसोट पाषाण दिसत होते. कदाचित याच बाजूने वर जाण्यासाठी रस्ता असावा, असे आम्हाला वाटले. सकाळच्या वेळेस या परिसरात कुणीच नसल्यामुळे एका उजाड माळरानावर आम्ही बाईक पार्क केली. हेल्मेट कुठे ठेवायचे? हा प्रश्न होताच. त्यामुळे ते आम्ही बरोबरच घेऊन निघालो. थोडीशी मळलेली पायवाट किल्ल्याच्या दिशेने जाताना दिसली. अजूनही कोणत्याही मनुष्याचे दर्शन आम्हाला झाले नव्हते. किल्ल्याच्या दिशेने जाणारी पायवाट चालतच आम्ही मार्गक्रमण करू लागलो. दोन ते तीन ठिकाणी दगडाचे अवघड पॅचेस होते. ते पार करताना कस लागला. अखेरीस बालेकिल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो. समोर पाहिले तर जवळपास ९० अंशामध्ये असणाऱ्या पायऱ्या दिसल्या आणि काळजामध्ये धस्स झाले. या पायर्‍या चढून जायच्या? असा प्रश्नवाचक उदगार मनात उमटला. त्या क्षणी त्या पायऱ्या अतिशय अवघड वाटत होत्या. इथपर्यंत आलो तेच खूप झाले...  आता परत मागे फिरू या, असाही विचार मनामध्ये आला. परंतु थोडे पुढे गेल्यानंतर समजले की, प्रत्येक पायरीला दोन्ही बाजूंना खोबणी केलेल्या आहेत. त्यांना पकडून वरती जाणार जाता येणे शक्य होते. मग आम्ही धाडस करून त्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. इथून खाली निसटलो तर आजूबाजूला बघायला देखील कोणी नाही, हा विचारच भीतीदायक होता. परंतु हा थ्रिलींग अनुभव घ्यायचा आहे, असे आम्ही मनोमन ठरवले व पायऱ्या चढायला सुरुवात केली. एक एक करत साधारणतः पन्नास एक पायऱ्या चढत आम्ही मुख्य दरवाजापाशी पोहोचलो. किल्ले भ्रमंतीमध्ये आलेला तो आजवरचा एक रोमांचकारी अनुभव होता. दरवाजातून पुढे गेल्यावर एका कोरलेल्या कपारीतून पुढे देखील अशाच प्रकारच्या पायऱ्या तयार केलेल्या दिसल्या. आम्ही त्यादेखील तितक्याच सावधतेने हळूहळू चढत वरच्या दिशेने मार्गक्रमण केले. थोड्याच वेळामध्ये शेवटचा दरवाजा देखील दृष्टीस पडला. तो पार केल्यानंतर किल्ला सर केल्याचे समाधान प्राप्त झाले होते. किल्ल्यावर काहीच वर्दळ नव्हती. काही उघडी मंदिरे, दोन-तीन तळी व एक सर्वोच्च टोक. शिवाय एका बाजूला धान्याचे भव्य कोठार...  इतकीच काय ती या किल्ल्याची संपत्ती होती! दूरवर दिसणाऱ्या धान्यकोठारांशी माकडांचा एक समूह उड्या मारताना दिसला. आमची चाहूल लागल्यामुळे त्यातली निम्मी माकडे तर निश्चित पळून गेली असावी. किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावरून खाली उतरताना एक परदेशी आणि एक भारतीय व्यक्ती किल्ला पाहायला आलेली दिसली. या दुर्गदर्शनामध्ये आम्हाला दिसलेले ते दोघेच मनुष्य प्राणी होते. त्यादिवशी एक अद्भुत आणि रोमांचकारी किल्ला बघण्याचे समाधान आम्हाला लाभले.

दहा वर्षानंतर...

मधल्या काळामध्ये पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले. या वाहून गेलेल्या पाण्यामध्ये सोशल मीडिया नावाचा घटक अतिशय वेगाने कार्यरत झाला होता. समाज माध्यमांद्वारे हळूहळू हरिहर किल्ल्याची माहिती सर्वदूर पोहोचली. अगदी हौशे, नवशे आणि गवशे ट्रेकर्स फिरण्यासाठी या किल्ल्यावर तुडुंब गर्दी करू लागले. आमच्या हरिश्चंद्रगडासारखी परिस्थिती या ठिकाणी तयार झाली. गुगलवर तुम्ही नुसते हरिहरगड जरी सर्च केले तरी शेकडो व्हिडीओ, लेख व ब्लॉग तुम्हाला दिसून येतील. इतकी लोकप्रियता या किल्ल्याने मधल्या काळात प्राप्त केली. खऱ्याखुऱ्या ट्रेकर्सपेक्षा निव्वळ हुल्लडबाजी करायला येणाऱ्या पर्यटकांची इथे अधिक गर्दी होऊ लागली. याची प्रचिती या वर्षी केलेल्या ट्रेकमध्ये आम्हाला आली.
हर्षवाडी गावामध्ये आता नव्याने टोलनाका सदृश फाटक उभारले गेले होते. तिथे पावत्या पाडण्याची देखील सुविधा करण्यात आली होती. शिवाय आम्ही सकाळी साडे सहाच्या दरम्यान या पोहोचलो. सुट्टीचा दिवस नसून देखील तोवर बऱ्याच गाड्या पार्किंगमध्ये आधीपासूनच उभ्या असलेल्या दिसल्या. त्यातील एक टेम्पो ट्रॅव्हलर दुरून कुठून तरी आलेली होती. तिच्यामध्ये असेच अतिउत्साही पर्यटक आल्याचे दिसत येत होते. किल्ल्याच्या मुख्य पायर्‍यांपर्यंत चढून गेलो तोवर फारशी गर्दी नव्हती. वातावरण आल्हाददायक झालेले होते. शिवाय सूर्यही बऱ्यापैकी वर आलेला होता. एकंदरितच फोटोग्राफीसाठी एक उत्तम वातावरण तयार झाले होते. तेव्हाच दहा वर्षांपूर्वीचा हरिहरगड आठवला. इथवर येईपर्यंत चार ते पाच ठिकाणी विविध खाद्यपदार्थांची दुकाने व उपहारगृहे देखील उघडलेली दिसली. शनिवार-रविवारी कदाचित इथे तुडूंब गर्दी होत असावी. आजूबाजूच्या गावकऱ्यांना रोजगाराचे नवे दालन उघडले असले तरी किल्ल्यावर प्लॅस्टिकच्या कचऱ्याची बरीच गर्दी देखील दिसून आली. आपल्या परिसरातील किल्ले आजही या प्लास्टिकच्या विळख्यात अजून वेगाने अडकत असल्याचे दिसतात. हरिहर याच दिशेने वेगाने प्रगती करताना वाटला. बालेकिल्ल्याच्या पायर्‍या चढायला सुरुवात केली व मध्यावर जाऊन थांबलो. तेवढ्यात किल्ल्यावरील माकडांचे आमच्यावर आक्रमण झाले. ही माकडे माणसाळल्यासारखी अतिशय जवळ येत होती. अगदी बॅगला हात लावून तिथे काही सापडते का, याची देखील चाचपणी करत होती! दहा वर्षांपूर्वी हीच माकडे आम्हाला पन्नास फुटावरून बघून पळून गेली होती. आज त्यांची बरीच उत्क्रांती झालेली दिसली! उत्साही पर्यटकांमुळे किल्ल्यांवरील माकडे माणसाळतात आणि त्याचा त्रास सर्वांनाच होतो. तशीच गत झाली होती. उतरताना देखील या माकडांनी इतर पर्यटक आणि ट्रेकर्सना बराच त्रास दिला. कोणत्या प्राण्यांना भूतदया दाखवायची? याचे प्रशिक्षण देखील मानवप्राण्याला द्यायला हवे, असे वाटून गेले. माकडांना माणसाने टाकलेल्या खाद्य पदार्थांची सवय झाल्यामुळे आता ते स्वतःचे खाद्य स्वतः शोधताना दिसत नाहीत. पायर्‍या चढून वर गेल्यावर मुख्य दरवाजाच्या समोरच अजून एक दुकान थाटलेले दिसले. येथून वर जाण्याचा रस्ता लवकर समजत नव्हता. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो तोवर खालून येणाऱ्यांची बरीच गर्दी झालेली होती. शिवाय बराच आरडाओरडा देखील ऐकू येत होता. यावरूनच सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर काय अवस्था असेल, याचा अंदाज बांधता आला. एकेकाळी अतिशय निर्जन व शांत असलेला किल्ला एक 'भयावह' पर्यटन स्थळ झालेला दिसून आला. किल्ल्याच्या माथ्यावर माकडे नसल्यामुळे यावेळेस किल्ला पूर्ण बघता आला, हे सौभाग्यच मानावे असे होते. किल्ला उतरताना विविध प्रकारच्या पर्यटकांची गर्दी दिसून आली. वर सांगितल्याप्रमाणे हौसे, नवसे आणि गवशे अशा सर्वच श्रेणीतील सो-कॉल्ड ट्रेकर्स किल्ल्यावर येत होते. हाफ चड्डी घातलेले, टाईट जीन्स घातलेले आणि थ्री-फोर्थ पॅन्ट घालून देखील ट्रेकिंग करणारे अनेक नवट्रेकर्स किल्ला चढताना दिसले. सोशल मीडिया एखाद्या किल्ल्याला किती ग्लॅमरस रुप देऊ शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण हरिहरच्या रूपाने दिसून आले. खाली येईपर्यंत हर्षेवाडी गावात देखील वाहनांची बरीच गर्दी झालेली दिसली.
यंदाच्या नाशिक दौऱ्यातील पहिल्याच किल्ल्याची भ्रमंती एका वेगळ्या दृष्टिकोनातून करता आली, त्यासाठीच हा लेखप्रपंच.
 
 









Thursday, April 2, 2020

रामशेज भ्रमंती

रामशेज किल्ल्यावर केलेला पहिला ट्रेक पावसाळी होता तो आजही मला आठवतोय. आशेवाडीपर्यंत रिक्षाने प्रवास व तिथून पायपीट करत पूर्ण किल्ला पालथा घातला होता. तिथून परत माघारी येताना चांभारलेणी पायी फिरून आलो होतो. कमीत कमी दहा किलोमीटर तरी तो पायी प्रवास होता. त्यानंतर बरेचदा रामसेजवर जाणे झाले. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये व सकाळ-दुपार-संध्याकाळ या तीनही वेळेस हा किल्ला मी सर केला आहे. नाशिक पासून सर्वात जवळचा किल्ला होय. तेथे रस्त्यावर आशेवाडी गावात तो स्थित आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील लढवय्या असा देदीप्यमान इतिहास या किल्ल्याला लाभलाय. रामशेज हा इतर कोणत्याही डोंगराशी जोडलेला नाही. स्वतंत्र असा मैदानी किल्ला आहे. शिवाय चढनही सोपी आहे. जास्तीत-जास्त पाऊण तासात हा किल्ला सर करता येऊ शकतो.
नाशिक जिल्ह्यात सर केलेला ज्ञानेश्वरीचा हा पहिलाच किल्ला होय. जानेवारी महिन्यात माझं आरवायके महाविद्यालयात ट्रेनिंग सेशन असल्याने नाशिकला पाच-सहा दिवसांचा आमचा मुक्काम ठरलेला होता. जानेवारी महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत आमचं आगमन नाशिकमध्ये झालं. तारीख होती एक जानेवारी २०२०. पुण्याहून नाशिकला पोहोचता पोहोचता संध्याकाळचे साडेचार वाजले होते. त्यानंतर आमचा प्रवास किल्ले सर करण्याच्या दिशेने चालू झाला. सव्वापाच वाजता पायथ्यापासून आमची सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे ज्ञानेश्वरी उत्साहीत होती. यावेळी तिने एकटीने चालत हा किल्ला सर केला. विशेष म्हणजे यावेळी ती पूर्णपणे माझ्याच सोबत होती! जवळपास अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आम्ही किल्ल्यावरच्या राम मंदिरापाशी आलो. सूर्य किल्ल्याच्या पलीकडच्या बाजूने असल्याने इथपर्यंत सावलीच पडलेली होती. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यावर सूर्यनारायणाचे दर्शन झाले. रामशेजचा सूर्यास्त यावेळी दुसऱ्यांदा अनुभवला होता. ते भाग्य या वेळी लाभले यातच सर्वात मोठे समाधान होते. ज्ञानेश्वरीने नेहमीसारखी मस्ती याही किल्ल्यावर केली. परंतु खचलेला मुख्य दरवाजा व इतर किल्ला पूर्णपणे पाहता आला नाही. खाली येईपर्यंत पूर्णपणे अंधार झाला होता. पार्किंगच्या जागेत शेवटपर्यंत फक्त आमचीच गाडी उभी असलेली दिसली.









Friday, March 20, 2020

विचित्रगड भ्रमंती

भोर तालुक्याची आमची भटकंती ही केवळ भोर राजवाडा पुरती मर्यादित होती. आता त्या पलीकडे मजल मारायची होती. यावेळेस मग किल्ले रोहिडा सर करण्याचे ठरवले. घरापासून किल्ल्याचे अंतर होते ८० किलोमीटर आणि सर करणारे आम्ही तिघेजण. दोन बाईक वरून मग आमचा प्रवास सुरू झाला. मुंबई-बेंगलोर महामार्गावरील कापूरहोळ गावातून उजवीकडे एक रस्ता भोर गावाकडे जातो. येथून भोरचे अंतर सुमारे १५ किलोमीटर आहे. हायवे नसला तरी रस्त्याची स्थिती तशी चांगली आहे. याच रस्त्यावर जवळपास आठ-नऊ किलोमीटरवर भोरचा प्रसिद्ध नेकलेस पॉईंट दृष्टीस पडतो. सदर घाटातून खाली उतरून गेले की, भाटघर धरणाचे दरवाजे दिसू लागतात. इथून भोर गाव साधारणत: दोन तीन किलोमीटर अंतरावर आहे. भोर पार केल्यावर एक शिवाजी महाराजांचा पुतळा दृष्टीस पडतो. येथून समोर जाणारा रस्ता रोहिड्याकडे तर डावीकडचा रस्ता हा केंजळगड व रायरेश्वराकडे जातो. रोहिडाकडे जाणारा रस्ता देखील फारसा वाईट नाही. भोर-मांढरदेवी रस्त्यावर उजव्या बाजूला रोहिडा कडे जाण्यासाठी एक फाटा फुटतो. या रस्त्याने आम्ही सरळ गेलो आणि काही वेळातच रोहिडा किल्ल्याचे दर्शन झाले. एका छोट्याशा टेकडीला वळसा घालून आम्ही बाजारवाडी गावात पोहोचलो. गावातून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत बर्‍यापैकी रस्ता चांगला केला आहे. तिथवर आपण सहज बाईक घेऊन जाऊ शकतो. परंतु, आम्ही आमच्या गाड्या या बऱ्याच मागे लावल्या व पदभ्रमंती चालू केली. त्यादिवशी वातावरण हे अतिशय स्वच्छ होते. त्याचा फायदा चांगल्या फोटोग्राफीसाठी निश्चितच झाला. शिवकार्य प्रतिष्ठानने नुकतेच नवे रस्ते व पायवाटा दुरुस्त केल्या होत्या. त्यामुळे त्या शोधण्यास फारसे कष्ट पडले नाहीत. पहिला टप्पा पार केल्यावर एक छोटेसे पठार लागते. याठिकाणी सह्याद्रीचा थंडगार वारा इथवर अंगात आलेला सर्व शीण घालवून टाकत होता. या ठिकाणाहून दूरवर केवळ सह्याद्रीच्या डोंगररांगात पाहता येत होत्या. शिवाय दुपारची वेळ झाल्याने कुठेही चिटपाखरूही दिसत नव्हते. किल्ल्याच्या आजूबाजूला फारशी झाडी नाहीये. त्यामुळे उंच कडे हे हेच एकमेव नैसर्गिक संरक्षण किल्ल्याला लाभले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं नाव विचित्रगड असं ठेवलं होतं. त्यांनी स्वतः चढाई करून या किल्ल्यावर विजय मिळवला होता. याच लढाईत बाजीप्रभू देशपांडे यांची शिवरायांशी पहिली ओळख झाल्याचे इतिहास सांगतो.
साधारणतः पाऊण-एक तासात आम्ही किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी पोहोचलो. दरवाजा आणि बुरुज हे अजूनही ब-यापैकी भक्कम आहेत. किल्ल्याच्या माथ्यावर रोहिडेश्वराचे मंदिर नजरेस पडते. त्याच्या शेजारील मुख्य ध्वजस्तंभ उभा केलाय, जो दूरवरूनही अगदी स्पष्ट नजरेस पडतो. याच रस्त्याने पुढे मार्गक्रमण केल्यावर किल्ल्याचे अन्य बुरुज दिसतात. तटबंदी ही तशी भक्कम आहे. एका बाजूने मांढरदेवीचा डोंगर, महाबळेश्वरच्या पर्वतरांगा, केंजळगड किल्ला नजरेस पडतो तर दुसऱ्या बाजूने किल्ले पुरंदर, सिंहगड, तोरणा व राजगड एका रांगेत एकाच दृष्टीस नजरेत पडतात. त्यादिवशी वातावरण अगदी स्वच्छ असल्याने पुणे जिल्ह्यातल्या विविध तालुक्यात येणारे हे सर्व किल्ले आम्ही उघड्या डोळ्यांनी सहजपणे पाहू शकलो. किल्ल्याच्या इतरत्र ठिकाणी पाण्याची तळी तसेच चुन्याचा घाणा नजरेस पडतो.
सह्याद्रीच्या अशा मोक्याच्या ठिकाणी उभा असलेला किल्ला सर केल्याचे समाधान आम्हाला त्या दिवशी मात्र मिळाले.













 

Wednesday, March 4, 2020

थरारक केंजळगड

दिनांक १९ फेब्रुवारी २०२०, शिवजयंती

यंदाच्या शिवजयंतीला थोडा हटके किल्ला करावा असा बेत होता. त्यातूनच आमची किल्ले केंजळगड व रायरेश्वराची गडभ्रमंती निश्चित झाली. ज्ञानेश्वरीला सोबत घेऊन केलेला हा सतरावा किल्ला होय.
मागे रोहीड्याच्या भ्रमंतीमध्ये किल्ल्यावरून केंजळगडाचे भौगोलिक स्थान लक्षात आले होते. त्यामुळे रस्त्याची बर्‍यापैकी माहीती होती. शिवाय गुगल मॅपची सोबत तर नेहमीच असते. आम्ही तिघे, प्रतीक व सुमेध असे पाच जण यावेळी किल्ला सर करणार होतो. केंजळगड तसा पुणे जिल्ह्याच्या टोकावर असणारा किल्ला होय. परंतु, प्रत्यक्ष पायथ्याच्या गावात पोहोचल्यावर समजले की, तो सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यात येतो! तीन चार किलोमीटरचा घाट चढल्यावर घाटातच ओवरी वस्ती नावाचे बहुतेकांनी आदिवासी गाव आहे. तिथून किल्ल्याची खरी चढण चालू होते. डोंगरावरील डांबरी रस्त्याच्या घाटामुळे ६० ते ७० टक्के चढण कमी झालीये. तदनंतर जवळपास अर्ध्या तासाचा रस्ता उरतो. आम्हाला इथवर पोहोचता-पोहोचता साडेनऊ वाजले होते. ऊन पडू लागलं होतं. परंतु, किल्ल्यावर जाणारी वाट ही जंगलातील असल्याने उन्हापासून संरक्षण होण्याची शक्यता होती. दहा-पंधरा घरांची वस्ती असलेल्या या गावातही सातारा जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेपासूनच समोर जाणारा रस्ता पुढे गावात व उजवीकडून किल्ल्याच्या दिशेने जातो. या हमरस्त्याने आमची पदभ्रमंती चालू झाली. गावातील एका ग्रामस्थांना वाट विचारली होती. परंतु, प्रत्यक्ष चालून गेल्याशिवाय तिचा अंदाज येत नाही, हेही तितकेच खरे! याचा अनुभव याहीवेळी आम्हाला आला. निम्म्या रस्त्यापर्यंत छान पायवाट होती त्यानंतर पुढे जाण्यासाठी दोन रस्ते फुटलेले होते. उजव्या बाजूच्या मळलेल्या पायवाटेने पायर्‍या तयार केलेल्या दिसल्या. डाव्या बाजूची मात्र फारशी प्रचलित नव्हती, असे दिसले. परंतु मळलेली पायवाट किती आव्हानात्मक असते, याची प्रचिती यावेळी मात्र आम्हाला आली. खडी चढण व त्यात मातीची पायवाट ही आमच्या किल्लेरोहनाच्या कौशल्याची परीक्षा पाहणारी ठरली. ती कित्येक ठिकाणी निसरडी झाली होती. त्यातही ज्ञानेश्वरी सोबत असल्याने अतिशय सावधगिरीने हा टप्पा एकमेकांच्या साथीने पार करावा लागला. इथल्या पंधरा ते वीस मिनिटांचा रस्ता खरोखर थरारक असाच होता! तो झाडीतून जात असल्याने उन्हाची तीव्रता जाणवली नाही. तो पार करत आम्ही कातळकोरीव पायर्‍यांच्या समोर येऊन ठेपलो. मुख्य दरवाजा पूर्ण उद्ध्वस्त झालेला होता. त्याच्या समोरच एक मोठी गुहा होती. पावसाळा संपून इतके महिने झाले तरी पाण्याचा ओलावा अजूनही या गुहेत जाणवत होता. किल्ल्याचा शेवटचा टप्पा सहज व पूर्णपणे कातळकोरीव पायऱ्यांचा होता. शिवाय तो सावलीत असल्याने इथे बसून समोरील सह्याद्रीचे रूप न्याहाळत बसायला एक वेगळाच आनंद मिळाला. डाव्या बाजूला रायरेश्वराचे पठार तर उजवीकडे रोहिड्याच्या डोंगररांगा नजरेस पडल्या. किल्ल्याच्या माथ्यावर मात्र किल्लेपणाचे फारसे अवशेष दिसले नाहीत. थंडगार पाण्याचे एक टाके, दोन-तीन पडीक मंदिरे, वाड्याचे भग्न अवशेष, चुन्याचा घाणा व धान्यकोठार यापलीकडे किल्ल्यावर पूर्ण वाढलेले व वाळलेले गवत पसरलेले दिसले. पलीकडच्या बाजूने महाबळेश्वरच्या महाकाय डोंगर रांगा व धोम धरणाचे विहंगम दृश्य डोळ्यात साठवता आले. किल्ल्यावरून परतताना मात्र डाव्या बाजूची वाट आम्ही चुकवली होती ती शोधत शोधत खाली उतरलो. त्यामुळे गडउतार सहज सोपा झाला होता. एक छोटेखानी टुमदार किल्ल्याची भ्रमंती पार पडली होती व ज्ञानेश्वरीच्या यादीत एका थरारक किल्लेरोहनाची भर पडली होती. किल्ल्याच्या पूर्वेकडे एकवार नजर टाकून आम्ही रायरेश्वराच्या दिशेने प्रस्थान चालू केले.



Wednesday, January 16, 2019

छोटेखानी दुर्ग : मच्छिन्द्रगड, जि. सांगली

सांगली जिल्ह्यातील एक सुंदर किल्ला म्हणजे मच्छिन्द्रगड! शिवरायांनी स्वतः जातीने बांधून घेतलेला किल्ला म्हणून हा दुर्ग परिचित आहे. इस्लामपूर पासून पंधरा किलोमीटरवर हा किल्ला स्थित आहे. बेरडमाची आणि येडेमच्छिन्द्र या दोन्ही गावांतून किल्ल्यावर जायला भक्कम पायरीवाटा आहेत. शिवाय येडेमच्छिन्द्र मधून काँक्रीट चा गाडीरस्ताही तयार झालेला आहे. किल्ल्याचे अवशेष अजूनही बऱ्यापैकी शिल्लक दिसतात.