माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label रोहिडा. Show all posts
Showing posts with label रोहिडा. Show all posts

Friday, March 20, 2020

विचित्रगड भ्रमंती

भोर तालुक्याची आमची भटकंती ही केवळ भोर राजवाडा पुरती मर्यादित होती. आता त्या पलीकडे मजल मारायची होती. यावेळेस मग किल्ले रोहिडा सर करण्याचे ठरवले. घरापासून किल्ल्याचे अंतर होते ८० किलोमीटर आणि सर करणारे आम्ही तिघेजण. दोन बाईक वरून मग आमचा प्रवास सुरू झाला. मुंबई-बेंगलोर महामार्गावरील कापूरहोळ गावातून उजवीकडे एक रस्ता भोर गावाकडे जातो. येथून भोरचे अंतर सुमारे १५ किलोमीटर आहे. हायवे नसला तरी रस्त्याची स्थिती तशी चांगली आहे. याच रस्त्यावर जवळपास आठ-नऊ किलोमीटरवर भोरचा प्रसिद्ध नेकलेस पॉईंट दृष्टीस पडतो. सदर घाटातून खाली उतरून गेले की, भाटघर धरणाचे दरवाजे दिसू लागतात. इथून भोर गाव साधारणत: दोन तीन किलोमीटर अंतरावर आहे. भोर पार केल्यावर एक शिवाजी महाराजांचा पुतळा दृष्टीस पडतो. येथून समोर जाणारा रस्ता रोहिड्याकडे तर डावीकडचा रस्ता हा केंजळगड व रायरेश्वराकडे जातो. रोहिडाकडे जाणारा रस्ता देखील फारसा वाईट नाही. भोर-मांढरदेवी रस्त्यावर उजव्या बाजूला रोहिडा कडे जाण्यासाठी एक फाटा फुटतो. या रस्त्याने आम्ही सरळ गेलो आणि काही वेळातच रोहिडा किल्ल्याचे दर्शन झाले. एका छोट्याशा टेकडीला वळसा घालून आम्ही बाजारवाडी गावात पोहोचलो. गावातून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत बर्‍यापैकी रस्ता चांगला केला आहे. तिथवर आपण सहज बाईक घेऊन जाऊ शकतो. परंतु, आम्ही आमच्या गाड्या या बऱ्याच मागे लावल्या व पदभ्रमंती चालू केली. त्यादिवशी वातावरण हे अतिशय स्वच्छ होते. त्याचा फायदा चांगल्या फोटोग्राफीसाठी निश्चितच झाला. शिवकार्य प्रतिष्ठानने नुकतेच नवे रस्ते व पायवाटा दुरुस्त केल्या होत्या. त्यामुळे त्या शोधण्यास फारसे कष्ट पडले नाहीत. पहिला टप्पा पार केल्यावर एक छोटेसे पठार लागते. याठिकाणी सह्याद्रीचा थंडगार वारा इथवर अंगात आलेला सर्व शीण घालवून टाकत होता. या ठिकाणाहून दूरवर केवळ सह्याद्रीच्या डोंगररांगात पाहता येत होत्या. शिवाय दुपारची वेळ झाल्याने कुठेही चिटपाखरूही दिसत नव्हते. किल्ल्याच्या आजूबाजूला फारशी झाडी नाहीये. त्यामुळे उंच कडे हे हेच एकमेव नैसर्गिक संरक्षण किल्ल्याला लाभले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं नाव विचित्रगड असं ठेवलं होतं. त्यांनी स्वतः चढाई करून या किल्ल्यावर विजय मिळवला होता. याच लढाईत बाजीप्रभू देशपांडे यांची शिवरायांशी पहिली ओळख झाल्याचे इतिहास सांगतो.
साधारणतः पाऊण-एक तासात आम्ही किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी पोहोचलो. दरवाजा आणि बुरुज हे अजूनही ब-यापैकी भक्कम आहेत. किल्ल्याच्या माथ्यावर रोहिडेश्वराचे मंदिर नजरेस पडते. त्याच्या शेजारील मुख्य ध्वजस्तंभ उभा केलाय, जो दूरवरूनही अगदी स्पष्ट नजरेस पडतो. याच रस्त्याने पुढे मार्गक्रमण केल्यावर किल्ल्याचे अन्य बुरुज दिसतात. तटबंदी ही तशी भक्कम आहे. एका बाजूने मांढरदेवीचा डोंगर, महाबळेश्वरच्या पर्वतरांगा, केंजळगड किल्ला नजरेस पडतो तर दुसऱ्या बाजूने किल्ले पुरंदर, सिंहगड, तोरणा व राजगड एका रांगेत एकाच दृष्टीस नजरेत पडतात. त्यादिवशी वातावरण अगदी स्वच्छ असल्याने पुणे जिल्ह्यातल्या विविध तालुक्यात येणारे हे सर्व किल्ले आम्ही उघड्या डोळ्यांनी सहजपणे पाहू शकलो. किल्ल्याच्या इतरत्र ठिकाणी पाण्याची तळी तसेच चुन्याचा घाणा नजरेस पडतो.
सह्याद्रीच्या अशा मोक्याच्या ठिकाणी उभा असलेला किल्ला सर केल्याचे समाधान आम्हाला त्या दिवशी मात्र मिळाले.