नरसोबाच्या वाडीतून पंचगंगा आणि कृष्णाच्या संगमावर पोहोचलो तेव्हा समोर पंचगंगेच्या पलीकडे एक ऐतिहासिक स्थळ दिसून आले. लगेचच गुगल मॅपवर तपासून बघितले. हे स्थळ होते सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी. मराठ्यांच्या इतिहासात नावाजलेला हा मावळा सरसेनापती म्हणून मराठी जनतेला परिचित आहेच. त्यांची समाधी कृष्णा-पंचगंगेच्या या संगमावर आहे, याची त्यादिवशी माहिती झाली आणि लगोलग या दिशेने प्रयाण केले. पंचगंगा नदीचा पूल पार करून अगदी पाचच मिनिटांमध्ये मी या ठिकाणी पोहोचलो.
सकाळच्या प्रहरी येथे चिटपाखरू देखील नव्हते. समाधीच्या बाहेर एक गाडी लावलेली दिसली. मी देखील माझी गाडी तिथेच लावली आणि आतमध्ये प्रवेश केला. उजव्या बाजूला दगडामध्ये बांधलेले हे जुने मंदिर दिसून आले. खरंतर ही दोन मंदिर होती. पहिले हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती श्री संताजीराव घोरपडे (ममलकत मदार) यांचे श्री सुब्रमण्यम महादेव कुटुंब पंचायतन मंदिर आणि दुसरे कृष्णा व पंचगंगा संगम तीर्थावर असणारे पुरुष व स्त्री भक्तांना देखील बाराही महिने दर्शन घेता येणारे महाराष्ट्रातील एकमेव श्री कार्तिक स्वामी मंदिर होते. या मंदिरांच्या समोरच ऐतिहासिक वाड्याची रचना असणारी वास्तू होती. त्याच्या मधोमध एक सुंदर प्रवेशद्वार होते. त्यातून खाली नदीच्या दिशेने उतरत गेलो. आणि समोरच पंचगंगा नदीचे दर्शन झाले. डावीकडे नदीच्या पलीकडून नृसिंह मंदिर देखील दिसत होते. आणि समोर पंचगंगेच्या तीरावर सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी देखील दिसून आली. त्या दिवशी कोवळ्या उन्हाचा अभिषेक त्या समाधीवर होत होता. तिथेच पायऱ्यांवर बसून राहिलो. संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाची आठवण झाली. शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी हजारो मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली. त्यापैकीच एक संताजी होय. इतिहासात पराक्रम गाजवणाऱ्या व्यक्तींची जन्मस्थळे आणि स्मारके आपल्याला सातत्याने प्रेरणा देतच राहतात.
स्वराज्याच्या या पराक्रमी मावळ्याला वंदन केले आणि येथील परिसर नजरेस साठवून परतीच्या मार्गाला लागलो.
--- तुषार भ. कुटे
Saturday, December 28, 2024
सरसेनापती संताजी घोरपडे समाधी
Monday, December 9, 2024
नरसोबाची वाडी
सांगली शहर सांगली जिल्ह्याच्या एका टोकाला आहे. अगदी थोड्याच अंतरावर कोल्हापूर जिल्ह्याची हद्द लागते, हे मला त्यादिवशी प्रवासात पहिल्यांदा समजले. एके दिवशी सकाळीच नृसिंहवाडी अर्थात नरसोबाच्या वाडीला जाऊन यायचे होते. गुगल मॅपवर अंतर बघितले तर केवळ २३ किलोमीटर. अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर हे पवित्र स्थळ स्थित असल्याचे दिसून आले. बरोबर सकाळी सहा वाजता सांगलीहून निघालो. एव्हाना सूर्योदय देखील झालेला नव्हता. मिरज पार झाले आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १०६ ओलांडून मी पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस पट्ट्यामध्ये प्रवेश केला. रस्ता अतिशय सुंदर होता. वळणावळणाचा आणि कुठेही खड्डा नसलेला. थोड्याच अंतरावर सांगली जिल्हा संपला आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी प्रवेश केला. मुबलक पाण्याचा प्रदेश असल्याने चहूबाजूंना हिरवीगार शेतं दिसून येत होती. बहुतांश ठिकाणी सकाळच्या गुलाबी थंडीमध्ये धुक्याची चादर तयार झाल्याची येथील दिसून आली. एके ठिकाणी कृष्णा नदीचा पूल ओलांडला. शिरोळ गाव मागे पडले आणि थोड्याच वेळात मी नरसोबाच्या वाडीमध्ये प्रवेश केला. त्या दिवशी सकाळी तिथे बऱ्यापैकी शांतता होती. एकंदरीत वातावरणाचा अंदाज घेतला तेव्हा लक्षात आले की हळूहळू इथली वर्दळ वाढत जात असावी. मी पोहोचलो त्यावेळेस अतिशय तुरळक गर्दी त्या ठिकाणी दिसून आली. दोनच मिनिटांमध्ये मी कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या मंदिरामध्ये पोहोचलो. पाण्याचा प्रवाह स्थिर होता. आजवर दर पावसाळ्यामध्ये कृष्णा नदीच्या पुराच्या बातम्या बघत आलो होतो. शिवाय हीच नदी या मंदिराच्या पायथ्यापर्यंत जलाभिषेक करते असे देखील व्हिडिओ पाहिले होते. आज पहिल्यांदा नदी आणि मंदिर दोघांचेही दर्शन झाले. इथून समोरच कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम आहे. त्या ठिकाणी तर कोणीच नव्हते. दोन्ही नद्या शांत आणि संथपणे वाहत होत्या. संगमाच्या ठिकाणी दलदलीच्या भागामध्ये बरेच पक्षी विहार करताना दिसून आले. त्यांची चलबिचल न्याहाळत काही काळ मी तिथेच थांबलो. सात वाजून गेल्यानंतर हळूहळू कृष्णेच्या पलीकडून सूर्यदेव दर्शन देताना दिसले. पंचगंगेच्या पलीकडे एक जुन्या काळातील वास्तू देखील दिसून येत होती. मंदिराचे दर्शन झाल्यानंतर नदीला वळसा घालून ती वास्तू देखील पाहूया असे ठरवून मी येथून निघालो.
Saturday, September 14, 2024
दाजीपूरच्या अभयारण्यातून
कोल्हापुरातून निघालो तेव्हा वातावरण पूर्णपणे ढगाळ होते. अधून मधून पावसाची एखादी सर यायची. ती सुद्धा फक्त रस्ता ओला करण्यापुरतीच. यंदाच्या दमदार पावसाने राधानगरीचा रस्ता हिरव्यागार वनराईने फुललेला होता. पाऊण-एक तासानंतर आम्ही खिंडी वरवडे गावामध्ये पोहोचलो. आणि उजवीकडे राधानगरी धरणाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला लागलो. पावसाळ्यातल्या अन्य रस्त्यांप्रमाणेच बऱ्याच ठिकाणी याही रस्त्याची स्थिती दिसत होती. पण ती देखील सुरुवातीलाच. पुढे गेल्यानंतर रस्ता बऱ्यापैकी ठीकठाक होता. सह्याद्रीच्या जंगलांमध्ये, डोंगरदर्यांमध्ये जाणाऱ्या रस्त्याने आम्ही मार्गक्रमण करत चाललो होतो. डोंगरमाथ्यावरील ढगांची गर्दी वाढत चाललेली होती. आणि वातावरण देखील ढगांमुळे अधिक गडद झाल्याचं भासत होतं.
वळणावळणाचे ते रस्ते पार करत आम्ही दाजीपूर अभयारण्यामध्ये शिरलो. गव्यांसाठी हे अभयारण्य सुप्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणी तशा पाट्या देखील लावलेल्या दिसल्या. धुके आणि पावसाचा खेळ पूर्ण रस्त्याने चालूच होता. अधेमध्ये एखादं गाव लागायचं. त्यातील वस्ती देखील फार मोठी नव्हती. गावाकडच्या जीवनाचे प्रतिबिंब अनुभवत आम्ही फोंडा घाटाच्या दिशेने निघालो. अगदी थोड्याच वेळामध्ये राधानगरी धरणाचा जलाशय दिसून आला. दोन-तीन दिवसांपूर्वीच हे धरण १००% भरले होते. शिवाय त्याचे स्वयंचलित दरवाजे देखील उघडले होते. परंतु पाण्याची एकंदरीत आवक पाहता धरण १००% च्या पातळीवरच स्थिर असावे असे वाटून गेले. धरणाच्या उत्तरेकडून जंगलामधून जाणाऱ्या रस्त्याने आम्ही हळूहळू चढत्या दिशेला चाललो आहोत, असे वाटत होते. डाव्या बाजूला निसर्ग झाडीतून राधानगरीचा जलाशय सातत्याने नजरेस पडत होता तर उजवीकडे डोंगरांवरून खळाळते झरे आणि धबधबे देखील दृष्टीस पडत होते. याच रस्त्यावर राऊतवाडीचा सुप्रसिद्ध धबधबा देखील दिसून आला. लाल मातीच्या पाण्यामुळे त्याचा रंग लालसर दिसून येत होता. येथूनच वळसा घालून आम्ही डोंगर झाडीमध्ये प्रवेशकर्ते झालो. एव्हाना रस्त्याची गर्दी पूर्णपणे नाहीशी झाली होती. मंद धुक्याच्या वातावरणात प्रवास करत आणि पावसाचे तुषार अंगावर झेलत त्या हिरव्या झाडीतून आम्ही पुढे निघालो होतो.
सह्याद्रीच्या अशा छत्रसावलीमध्ये निसर्गाचे वर्षा ऋतूतील अप्रतिम सौंदर्य दृष्टीस पडते. ते किती साठवू आणि किती नको, या प्रश्नाचे उत्तर देखील आपण सातत्याने शोधत राहतो. असेच काहीसे त्या दिवशी आमच्या बाबतीत देखील घडले.
Friday, September 13, 2024
रंकाळा
आजवर जितक्या वेळा कोल्हापुरामध्ये आलो त्या प्रत्येक वेळेस रंकाळा तलाव मी पाहिलेला आहे. यंदा पहिल्यांदाच वर्षा ऋतूमध्ये हा तलाव अनुभवयास मिळाला. यंदा देखील कोल्हापुरात वर्षावृष्टी चांगली झाल्याने तलावात बऱ्यापैकी पाणी जमा झाले होते. इथे नियमित दिसणारी बदके पाण्यावर पोहण्याचा मनमुराद आनंद घेताना दिसली. शिवाय काहीसे मंद वारे चालू असल्याने समुद्रासारख्या लाटा देखील तयार होताना दिसत होत्या. शहरातल्या लोकांना समुद्राचा अनुभव असेच शहरी तलाव देत असतात. रंकाळा देखील त्याला अपवाद नव्हता.
Saturday, August 24, 2024
अणुस्कुरा घाट
कोकणातल्या प्रत्येक घाटातून पहिल्यांदा प्रवास करताना त्याबद्दल एक वेगळाच उत्साह असतो. मागील काही वर्षांमध्ये या वेगवेगळ्या घाटातून मी प्रवास केला आणि प्रत्येक वेळी घाटांनी माझ्या डोळ्याचे पारणे फेडले. अणुस्कुरा घाटाबद्दल देखील काहीसं असंच झालं होतं. गोव्याहून परतताना सह्याद्रीच्या जंगलांमधून प्रवास करत आम्ही पाचाळ या गावी पोहोचलो. इथून सहा ते सात किलोमीटर प्रवास केल्यानंतर लगेचच अणुस्कुरा घाटाची सुरुवात झाली.
त्या दिवशी रस्त्यावर रहदारी फारशी नव्हती. परंतु पावसाळी वातावरण होते. अशा वातावरणात सह्याद्रीतले घाटरस्ते अजूनच सुंदर दिसू लागतात. ढगांच्या वातावरणात पसरलेल्या धुक्यामुळे पुढची वाहने दिसत नाहीत. म्हणूनच गाड्या हळूहळू चालवाव्या लागतात. कदाचित यामुळेच इथल्या वातावरणाचा आणखी जास्त आनंदही घेता येतो. त्यादिवशी अणुस्कुरा घाटामध्ये देखील धुके आणि पाऊस पडत होता. आम्ही निसर्गाच्या या आनंदाचा उपभोग घेत घाटमाथ्यावर पोहोचलो. एके ठिकाणी गाडी लावली आणि धुक्याच्या त्या वातावरणामध्ये चिंब होऊन गेलो. अधून मधून अंगावर पडणारा पावसाचा शिडकावा आणि चहूबाजूच्या डोंगरावर वाहणारे धुके त्यामध्ये दिसणारी हिरवी गर्दझाडी, असं अचंबित करणारं वातावरण या घाटामध्ये अनुभवायला मिळालं. अगदी काही मिनिटांमध्येच आम्ही घाटातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पोहोचलो. कदाचित कोकणाला जोडणाऱ्या घाटांपैकी हा सर्वात कमी लांबीचा घाट असावा. परंतु इतक्या कमी कालावधीतील प्रवासामध्ये देखील पावसाळी वातावरणाचा आनंद या घाटाने आम्हाला दिला.
Wednesday, July 3, 2024
महादेवगड दृश्यबिंदू
कोल्हापुरातल्या आजरा तालुक्याची हद्द संपली की सिंधुदुर्गातलं निसर्गरम्य आंबोली गाव लागतं. घाटातल्या जगप्रसिद्ध धबधब्यासाठी हे गाव सर्वज्ञात आहे. गाव संपलं की लगेचच उजव्या बाजूला महादेवगड दृश्यबिंदूकडे जाणारा रस्ता आहे. चहूबाजूंनी घनदाट झाडी आणि त्यातल्या त्यात पावसाळ्यात ते अधिक दाट भासायला लागते. सुमारे अडीच किलोमीटरचा रस्ता जंगलातील त्या घनदाट वाटेने पार केल्यानंतर आपण महादेवगडाच्या दृश्यबिंदूपाशी येऊन पोहोचतो. वनविभागाने या ठिकाणी पर्यटकांसाठी काही सुविधा देखील निर्माण केलेल्या दिसतात. या दुर्गाचा इतिहासात कुठेही उल्लेख झालेला मला तरी वाचनात आलेला नाही. दुर्ग असला तरी त्याचे अवशेष पूर्णपणे गळून गेलेले दिसले. परंतु इथलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे महादेवगडाच्या या दृश्यबिंदूवरून आंबोली परिसरातील सह्याद्रीची घनदाट जंगले दूर दूरवर दिसून येतात. महाराष्ट्रातील ऑक्सिजनचे हे कोठार मान्सूनच्या जलवर्षावाने अधिक मनमोहक भासते. आंबोलीचा धबधबा देखील इथून पाहता येतो. तसेच समोरच मनोहर आणि मनसंतोषगडाचे देखील ढगांच्या लपाछपीमध्ये दर्शन होते.
निसर्ग भटकंती करणाऱ्यांसाठी हा परिसर म्हणजे मेजवानीच.
Monday, July 1, 2024
अनुस्कुरा
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातल्या सह्याद्रीतील जंगलांचा प्रवास करून आम्ही अनुस्कुरा घाटाच्या वाटेला लागलो. पायथ्यापर्यंतचे वातावरण स्वच्छ होतं. पाऊस पडून गेलेला आणि सगळीकडे हिरवाई पसरली होती. परंतु जसजसा घाट चढू लागलो तसतसे पाण्याची तुषार देखील कोसळायला लागले होते. घाटातील मंद धुके दृष्टीस पडायला लागले. ते कालांतराने अधिक गडद होत गेले. रस्त्यावर तशी फारशी गर्दी नव्हती. पावसाची रिमझिम अधून मधून परिसर ओलाचिंब करून जायची. धुक्यात हरवलेल्या या पहाडी रस्त्यांवरून प्रवास करताना निसर्गाच्या शांत आणि शीतल अनुभूतीचा आनंद घेता आला.
Friday, May 24, 2024
सह्याद्रीतील एक जंगल
आंबा घाट चढून वर आलं की अगदी काहीच अंतरावर उजव्या बाजूला एक रस्ता विशाळगड आणि पावनखिंडीच्या दिशेने जातो. सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून जाणारा वळणावळण्याचा रस्ता म्हणजे उन्हाळ्यात सुखद क्षणांची एक अनुभूतीच असते. जवळपास दहा किलोमीटरचा रस्ता हा सह्याद्रीच्या पूर्णपणे घनदाट जंगलातून जातो. अनेक ठिकाणी तर दिवसभरात सूर्याची किरणे देखील जमिनीवर पडत नसावीत, अशी परिस्थिती दिसते. ही जंगले निसर्गाचा समतोल टिकवून आहेत. शिवकाळात कदाचित याहीपेक्षा दाट झाडी या ठिकाणी असावी.


























