माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label खानदेश. Show all posts
Showing posts with label खानदेश. Show all posts

Tuesday, April 30, 2013

लालमभूत ठरलेल्या लळिंग !

Fort Laling
बागलाण व खानदेशाच्या सीमारेषेवर लळिंग हा किल्ला उभा ठाकलेला आहे. आमेर हा खानदेशातील सर्वात उंच किल्ला आहे. त्यानंतर लळिंगच्या किल्ल्याचा क्रम लागतो. उत्तर महाराष्ट्रातील सुंदर किल्ल्यांपैकी हा एक किल्ला. केवळ मुघल वा पेशवाईचाच नव्हे तर भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अनेक घटनांचा साक्षीदार होण्याचे भाग्य लळिंग किल्ल्याला लाभले आहे.

मध्ययुगीन कालखंडात लळिंग ही खानदेशाची राजधानी होती. मुघल साम्राज्याचा विस्तार बागलाण व खानदेशात झाल्यावर लळिंग हे त्यांचे मुख्य लष्करी केंद्र म्हणून उदयास आले. इ.स. 1370 ते 1399 या कालखंडात फारुखी घराण्यातील राजा मलिक याच्याकडे लळिंगचा ताबा होता. त्याच्या पश्चात त्याचा मुलगा मलिक नसीरखान याच्या अधिपत्याखाली लळिंगचा परिसर आल्यावर हा भाग फारुखी राजवटीचे सत्ताकेंद्र बनला. नसीरखानने असिरगड जिंकून तेथे बु-हाणपूर नावाचे शहर वसवले व इ. स. 1400मध्ये त्याला राजधानीचा दर्जा दिला. परंतु, सन 1435मध्ये बहामनी सुलतानाने नसीरखानाचा पराभव केला. बु-हाणपुरात दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. पराभवामुळे नसीरखान पुन्हा लळिंगला परतला. बहामनी सुलतानाने मात्र नसीरखानाचा पाठलाग करून लळिंग गाठले. बहामनी सुलतानाला लळिंगमध्ये मोठी संपत्ती मिळाल्याने तो ती घेऊन बिदरला निघून गेला. तशातच लळिंग किल्ल्यावर नसीरखानाचा 1437मध्ये मृत्यू झाला. इ.स. 1601मध्ये फारुखी घराण्याचे राज्य संपवून मुघलांनी या किल्ल्याचा ताबा घेतला. इ.स. 1632मध्ये मालेगावजवळील गाळणा किल्ला मुघलांच्या अधिपत्याखाली येताना झालेली शिष्टाई याच लळिंग किल्ल्याच्या साक्षीने झाली!

इ. स. 1752मध्ये मराठा सैन्याने निजामाचा पराभव केला. त्यामुळे मराठी साम्राज्यात मल्हारराव होळकरांच्या अधिपत्याखाली लळिंगचा कारभार चालत असे. इ.स. 1818मध्ये मराठी सैन्याचा इंग्रजांकडून पराभव झाल्याने लळिंग इंग्रजांच्या ताब्यात गेला व संपत्तीच्या प्राप्तीसाठी त्याची इंग्रजांनी नासधूस केली होती. सन 1930मध्ये गांधीजींनी देशभर सविनय कायदेभंगाची चळवळ चालू केली होती. त्याला पाठिंबा म्हणून लळिंगच्या पायथ्याशी हजारो भिल्ल व आदिवासी भूमिपुत्रांनी जंगल सत्याग्रहाची घोषणा केली. जंगलातील लाकूड व गवत कापून विकायचे नाही, हे इंग्रज सरकारचे धोरण त्यांनी मातीस मिळवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच लळिंग किल्ल्याच्या पायथ्याला 31 जुलै 1937रोजी स्त्रियांची सभा घेऊन ‘अंधश्रद्धा मोडा व आपल्या मुलांना शिकवा’ हा संदेश दिला होता. अशा विविध घटनांचा साक्षीदार लळिंगचा किल्ला आहे.

लळिंग हे गाव धुळ्यातून जाणा-या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर वसलेले आहे. त्याचे धुळ्यापासून अंतर नऊ कि.मी., जळगावपासून 100 कि.मी., मालेगावपासून 40 कि.मी. व नाशिकपासून 146 कि.मी. आहे.  लळिंग गावामध्ये काळ्या पाषाणात बांधलेले महादेवाचे एक छोटे मंदिर आहे व त्यामागे एक पाण्याची टाकी आहे. या टाकीच्या खालूनच किल्ल्याकडे जाण्याची वाट चालू होते. स्थानिकांची व विशेषत: मेंढपाळांची येथे नियमित ये-जा असल्याने गडावर जाणारी वाट ही मळलेली आहे. थोडे अंतर चालून गेल्यावर किल्ल्याच्या पाय-यांचे भग्न अवशेष दिसून येतात. पावसाच्या पाण्याच्या रेट्याने ते अस्ताव्यस्त पडले असावेत, असे लक्षात येते. साधारणत: अर्ध्या तासाच्या चढाईनंतर दगडात बनवलेल्या काही पाय-या लागतात. त्या चढून गेले की, समोरच एक थडगे व शेवाळलेले टाके दिसते. येथून डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूंना जाण्यासाठी रस्ते आहेत. डाव्या बाजूचा रस्ता हा फसवा आहे. तो पडझडीमुळे चुकीचा मार्ग दर्शवतो. हा रस्ता तटबंदीच्या बाहेरच्या बाजूने जातो. उजव्या बाजूचा रस्ता खालच्या तटबंदीकडून थेट मुख्य दरवाजाकडे जातो. याच वाटेमध्ये चार-पाच कातळात कोरलेली दालने दिसून येतात. पाणी साठवण्यासाठी वा राहण्यासाठी या गुहांचा वापर होत असावा. सध्या ती पूर्णपणे कोरडी पडली आहेत. मात्र पावसाळी मोसमात त्यात ब-यापैकी पाणी भरले जात असावे.

ही टाकीसदृश गुंफा मागे पडल्यावर आपण चालत या किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचतो. सध्या तो पूर्णपणे भग्न अवस्थेत आहे. दरवाजाच्या उजव्या बाजूला एक व्याघ्रशिल्प कोरलेले दिसते. येथून वर गेल्यावर उजव्या बाजूला गडाची तटबंदी दिसून येते .आपण गडाच्या माथ्यावर पोहोचलेलो असतो. गड पायथ्यापासून चढताना सतत एक सज्जाची कमानीयुक्त भिंत दिसत राहते. ही भिंत याच ठिकाणी दृष्टीस पडते. विटांचा व चुन्याचा वापर करून ती उभी केलेली आहे. समोरच नव्याने ध्वजस्तंभ उभारलेला आहे. त्याच्या पलीकडून मुंबई-आग्रा महामार्ग व धुळे शहराचे दर्शन होते. वातावरण स्वच्छ असताना सोनगीरचा किल्लाही येथून दिसतो.

तटबंदी पाहून पुन्हा प्रवेशद्वारापाशी आल्यावर डाव्या बाजूच्या वाटेने किल्ल्याच्या दुस-या भागाकडे जाता येते. रस्त्यात कातळात तयार केलेली एक पाण्याची टाकी आहे. त्यात उन्हाळ्याच्या ब-याच काळापर्यंत पाणी साठलेले असते. परंतु हे पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. पुढच्या भागात व किल्ल्याच्या मुख्य पठारावर आणखी काही पाण्याची टाकी कातळात तयार केल्याची दिसतात. पठारावर मध्येच काहीसा उंचवटा आहे. काही ठिकाणी राहत्या घरांचे पडीक अवशेष नजरेस पडतात. या पठाराच्या चहुबाजूंनी तटबंदी बांधलेली आहे. मध्य टेकाडाच्या पोटात काही गुहा खोदलेल्या आहेत. अशा गुहांची संख्या मात्र या किल्ल्यावर बरीच दिसून येते. समोरच एक दारू कोठाराची इमारत दृष्टीस पडते. त्याच्या मागच्या बाजूला   पाण्याचा मोठा खंदक व तीन-चार टाकी आहेत. समोरच दुर्गा मातेचे एक छोटेखानी मंदिर आहे. लळिंगच्या किल्ल्यावर कधी राहण्याची वेळ आली तर या मंदिराचा वापर करता येतो. परंतु, येथे केवळ दोनच जण राहू शकतात. समोरील पाण्याच्या टाक्यांना लागून एक कुंड आहे. त्यातही पाणी साठलेले असते. किल्ल्यावर येणारे मेंढपाळ जनावरांना पाणी पाजण्यासाठी या कुंडाचा वापर करतात.

मंदिराच्या मागील बाजूस पुन्हा काही कोरलेल्या गुहा दिसून येतात. या गुहांनी बरीच मोठी जागा व्यापलेली आहे. एका गुहेपाशी एक भुयार आहे. हे भुयार थेट गडाच्या गुप्त दरवाजापाशी येऊन मिळते. या दरवाजापासून खाली कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. खाली उतरल्यावर उजव्या बाजूला एक वाट जाते. वाटेत देवीचे एक पडके मंदिर दिसते. येथूनच लळिंगच्या मुख्य माचीकडे वाट जाते. किल्ल्याच्या मुख्य बुरुजावरूनही ही माची स्पष्ट दिसून येते. माचीवर एक पाण्याचा भव्य तलाव आहे. समोरच एका घुमटीच्या खाली पाण्याची दोन टाकी आहेत. माचीचा परिसर पाहून झाल्यावर दुस-या बाजूची वाट पुन्हा किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जाते. येथून पुन्हा खाली मार्गस्थ होता येते. लळिंगचा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 1500 मी. उंच असल्यामुळे तो सर करताना वा उतरताना थकवा कधी जाणवत नाही.

Original Article: http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-atractive-fort-4248653-NOR.html

Sunday, March 31, 2013

खान्देशाचे वैभव: सोनगीर


दगडांचा देश असणा-या महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या काही रांगा या खान्देशापर्यंत जातात. परंतु या तुरळक रांगांना कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील किल्ल्यांइतकी उंची नाही. तरीही या भागात अनेक गडकोट वसलेले आहेत. यात गिरीदुर्गांची संख्या कमी व भुईकोट किल्ल्यांची अधिक आहे.

असे म्हटले जाते की, विंध्य पर्वत पार करून दक्षिणगंगेच्या तीरावर वास्तव्य करणारे अगस्ती ऋषी हे पहिले आर्य होय. त्यांच्या काळात या प्रदेशाचे नाव ‘ऋषिक’ वा ‘रसिक’ असे होते. सम्राट अशोकाच्या अधिपत्याखालील हा प्रदेश कालांतराने सातवाहनांकडे गेला व इ.स. 250मध्ये अहिर राजांनी तो जिंकून घेतला. त्यानंतर वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट व देवगिरीच्या यादवांनी या प्रदेशावर राज्य केले. अल्लाउद्दीन खिलजीने सन 1294मध्ये हा प्रदेश स्वत:च्या ताब्यात घेतला. गुजरातचा सुलतान पहिला अहमद याने या प्रदेशात दुसरा फारुकी राजा मलिक याला खान ही पदवी प्रदान केली होती. त्यावरून या प्रदेशाचे नाव ‘खानदेश’ पडले. याच काळात अनेक किल्ल्यांची निर्मिती धुळे व जळगाव या भागांत झाली. यातीलच एक वैभवशाली किल्ला म्हणजे ‘सोनगीर’ होय.

महाराष्ट्रात सोनगीर या नावाचे तीन किल्ले आहेत. त्यातील एक रायगड जिल्ह्यात नागोठणेजवळ, तर दुसरा पुणे जिल्ह्यात कर्जतजवळ आहे. त्यामुळे धुळ्याजवळील या सोनगीरला ‘खान्देशचा सोनगीर’ म्हणतात! धुळे शहरापासून 21 कि.मी. अंतरावर हा किल्ला अगदी मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. त्याची निर्मिती कोणी व केव्हा केली, याची माहिती आज दुर्दैवाने उपलब्ध नाही. इ.स. 1370मध्ये फारुकी सुलतानांनी हा किल्ला स्वत:च्या अधिपत्याखाली आणला. लळिंग किल्ल्यापासून केवळ 30 किलोमीटरवर असल्याने सोनगीरला महत्त्व प्राप्त झाले. मुघल बादशहा अकबराने आपला साम्राज्य विस्तार खान्देशापर्यंत आणल्याने सोनगीरही त्याच्या ताब्यात गेला. औरंगजेब हा सोनगीरवर सत्ता प्रस्थापित करणारा शेवटचा मुघल सम्राट होता. मराठेशाहीत पेशव्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. इ.स. 1818मध्ये पेशव्यांचा पराभव करून ब्रिटिशांनी त्याच्यावर सत्ता स्थापन केली. धुळे या शहरापासून सोनगीर किल्ला केवळ 21 किमी अंतरावर आहे. शिवाय तो मुंबई, आग्रा या राष्ट्रीय महामार्ग क्र. तीनवर वसलेला असल्याने या मार्गावरून जाणा-या गाड्या सोनगीरवरूनच जातात. सोनगीर हे या किल्ल्याच्या पायथ्यालगतच वसलेले गाव होय. धुळ्याहून शिरपूरला जाणा-या सर्व गाड्या सोनगीरला थांबतात. या मार्गावर धुळे आगाराची ‘यशवंती’ ही मिनी बस दर अर्ध्या तासाने उपलब्ध होते. शिवाय शहादा, दोंडाईचा या गावांना जाणा-या बसही सोनगीरवरूनच जातात. बसशिवाय खासगी वाहनांचीही सोनगीरला जाण्यासाठी सोय आहे. धुळ्याहून शिरपूरला जाणा-या खासगी वाहनांनी सोनगीरला उतरता येते. महामार्गावर सोनगीर गावात उतरल्यावर गावाच्या पलीकडेच किल्ला दृष्टीस पडतो. तसे हे गाव दाट लोकवस्तीचे आहे. सोनगीरचा किल्ला तयार झाल्यानंतरच पायथ्याला गाव विकसित झाले असावे, असे दिसते. हा किल्ला एका लहानशा टेकडीवर वसलेला आहे. त्यामुळे त्याला भुईकोट म्हणणेही योग्य ठरणार नाही. भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला सह्याद्रीच्या गाळणा शृंखलेमध्ये येतो. सोनगीर गावातून किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्याकरता दहा-पंधरा मिनिटे पुरतात. परंतु, दाट लोकवस्तीमुळे स्थानिकांना विचारत मार्ग शोधावा लागतो.

किल्ल्याच्या पाय-यांची सुरुवात एका नव्यानेच बांधलेल्या कमानीने होते. पर्यटन विकासाच्या नावाखाली या कमानीचे बांधकाम झाले आहे. सुरुवातीच्या काही पाय-याही नजीकच्या काळातच सिमेंटने बांधलेल्या दिसून येतात. परंतु त्यांची सध्याची अवस्था पाहता स्थानिकांना किल्ल्याच्या महत्त्वाचे सोयरसुतक नसल्याचे दिसते. थोडे पायी चालत जाईपर्यंत येथील दुर्गंधी आपली पाठ सोडत नाही. चालत असतानाच किल्ल्याची नक्की ठेवण ध्यानात येते. एखाद्या राजस्थानी वास्तुपद्धतीचा हा किल्ला भासतो. किल्ल्याची खरी सुरुवात त्याच्या उद््ध्वस्त प्रवेशद्वाराने होते. सध्या हा दरवाजा कसाबसा तग धरून उभा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्याची बरीचशी मोडतोड झाली असल्याचे दिसते. पायथ्यापासून दरवाजापर्यंत येण्यास दहा मिनिटे पुरतात. अन्य किल्ल्यांप्रमाणे याच्या दरवाज्यावर कोरीव काम वा नक्षीकाम दिसून येत नाही. कदाचित, कालानुरूप तेही नष्ट झाले असावे. काही वर्षांपूर्वी या दरवाजावर एक संस्कृत शिलालेख लावलेला होता. परंतु तो प्रवेशद्वारावरून खाली निखळून पडला. 27*5 इंचांचा हा शिलालेख आज धुळ्याच्या वि. का. राजवाडे संशोधन मंडळात नेऊन ठेवलेला आहे. त्यावर देवनागरी लिपीत काही श्लोक कोरलेले आहेत.

मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर कातळात कोरलेल्या पाय-या दिसून येतात. कातळात कोरलेल्या असल्याने त्यांची फारशी मोडतोड झालेली नाही. परंतु आजूबाजूला अनेक खांबांचे अवशेष पडल्याचे दिसून येतात. एकेकाळी या प्रवेशद्वाराची अतिशय सुंदर रचना केलेली असावी. पाय-यांच्या सुरुवातीला दरवाजाच्या शेजारी एक कबर आहे. त्याचा संदर्भ मात्र कुठे सापडत नाही. कातळातील पंधरा-वीस पाय-या चढून गेले की, आपण थेट गडाच्या माथ्यावर पोहोचतो. येथून संपूर्ण सोनगीर गावाचे एकाच दृष्टिक्षेपात दर्शन घेता येते. शिवाय धुळे, आग्रा मार्गावरील वाहतूक ब-याच अंतरापर्यंत न्याहाळताही येते. गडमाथ्यावर जाण्याकरता येथून दोन मार्ग आहेत. डाव्या बाजूने चालत जाऊन सोनगीरची माची पाहता येते. तर उजव्या बाजूने गडाचा मुख बुरूज पाहता येतो. किल्ल्याचा गडमाथा समुद्रसपाटीपासून   सुमारे तीनशे मीटर उंचीवर आहे. तो रुंदीला कमी असून लांबीला जास्त असल्याचे दिसते. सद्यस्थितीत पठार हे सपाट आहे. परंतु या गडमाथ्यावरील काही गोष्टींचे निरीक्षण केल्यास या किल्ल्याच्या एकेकाळच्या वैभवाची जाणीव होते. सोनगीरच्या डावीकडील माचीकडे जाताना ती निमुळती होत गेल्याचे दिसते. तिच्या टोकावरून खाली फारसे अंतर नाही. परंतु तिथून कोणी सहज वरती येऊही शकत नाही. गडमाथ्यावरील तटबंदी ही पूर्णपणे ढासळून गेली आहे. परंतु गडाच्या बाजूंची तटबंदी ही लाल रेखीव दगडांची असल्याचे दिसते. तीही अधूनमधून ढासळलेली आहे. माचीच्या दोन्ही कडांनी चालत गेल्यास येथील ढासळलेले अवशेष दृष्टीस पडतात. किल्ल्याचा मध्यभाग तसा प्रशस्त आहे. त्याच्या उजवीकडील बाजूस किल्ल्याचा मुख्य बुरूज पाहता येतो.
मुख्य बुरुजाकडे जाताना दोन, तीन ठिकाणी हौदासारख्या वास्तू नजरेस पडतात. त्यात तेल व तूप साठवत असल्याचे दिसून येते. त्यांची मोडतोड आज झालेली आहे. या वास्तूला तेलटाके व तूपटाके असेही म्हटले जाते. थोडे पुढे गेल्यावर एक मोठी विहीर लागते. गडावरील ही चौकोनी विहीर खूप खोल आहे. वरून पाहता तिचा तळ ध्यानात येत नाही. पाण्याचा साठा मात्र या विहिरीत सदैव असतो. त्यात दगड टाकून पाण्याच्या सद्य:स्थितीचा अंदाज घेता येतो. या विहिरीची खोली दहामजली इमारतीएवढी असावी, असे म्हटले जाते. तिच्याभोवती सध्या झाडाझुडपांचे साम्राज्य झाले आहे. विहिरीच्या समोरच पुष्करणीचा हौद लागतो. त्याचेही अवशेषच पाहायला मिळतात. सध्या त्याचे चौदा कोनाडे राहिल्याचे दिसतात. याच्याच वर नव्यानेच काही शिवप्रेमी संस्थांनी हवनस्तंभ उभारला आहे. मोक्याच्या ठिकाणी असल्याने तिथून किल्ला दिसतो. तिथून हा ध्वजस्तंभही नजरेस पडतो. मुख्य बुरुजाकडे जाताना पडीक घरांचे अवशेष दिसून येतात. या बुरुजावरील तटबंदीही ढासळलेली आहे. येथून ब-याच लांबपर्यंतचा प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. बुरुजावरील भग्न अवशेष मात्र खान्देशच्या या किल्ल्याच्या एकेकाळच्या वैभवाची कल्पना देऊन जातात. अगदी मोक्याच्या ठिकाणी असणा-या सोनगीरच्या या किल्ल्याची रचना फार भव्यदिव्य नाही. तरीही गतइतिहासात हरवलेल्या वैभवाची साक्ष देत तो अस्तित्वाशी झुंजत उभा आहे.