माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label खेड तालुका. Show all posts
Showing posts with label खेड तालुका. Show all posts

Wednesday, July 19, 2023

मोशी -> कुरुळी -> मोई -> चिखली वर्तुळ सायकलस्वारी

रात्रभर कोसळून दमलेल्या पावसाने सकाळी विश्रांती घेतली त्यामुळे जॉगिंग करताना पावसाची भेट झाली नाही. अगदीच पाच किलोमीटर पळल्यानंतर पावसाची रिमझिम चालू झाली होती. त्यामुळे लगेच सायकल काढली आणि मार्ग निश्चित केला. पावसाचा जोर तसा नव्हताच. अगदी कपडे ओले करेल, इतपत पाऊस चालू होता. नंतर त्याचा वेग कमी जास्त व्हायला लागला. पावसामुळे रस्त्यावरची रहदारी कमी होत असते. पण आजकाल तसेही काही होताना दिसत नाही.
पुणे नाशिक महामार्गावला लागलो त्यावेळेस या हायवेवरची गर्दी अजुनही तशीच होती. इंद्रायणीच्या पुलावरून जाताना नदीचा तो वेगवान प्रवाह अनुभवता आला. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच इतक्या वेगाने नदीतून पाणी वाहत होते. काल तर वरच्या दिशेने वाहत आलेल्या जलपर्णी देखील दिसून आल्या. म्हणजेच पावसाचा एकंदरीत जोर वाढतोय, असं दिसतं. नदी ओलांडल्यानंतर डावीकडे एक रस्ता मोई गावाच्या दिशेने जातो. इथे कुरळी गावाच्या हद्दीत अनेक कंपन्या आहेत. एमआयडीसीमधला हा रस्ता आता काँक्रीटचा बांधलेला आहे. सकाळी या रस्त्यावर फारशी गर्दी नव्हतीच. वरून कोसळणाऱ्या रिमझिम पावसामध्ये मी मोईच्या दिशेने सायकल चालवत निघालो. या रस्त्याने मी पहिल्यांदाच आलो होतो. मोई गाव अजूनही गावाच्या खुणा राखून आहे. गावाच्या मुख्य वेशीतूनच प्रवेश केला आणि मागच्या वेशीतून पुन्हा नदीच्या दिशेने निघालो. रस्त्यामध्ये भैरवनाथ मंदिराचे भले मोठे बांधकाम चालू आहे. हे मंदिर बऱ्याच लांब होऊन देखील नजरेस पडते. आज ते पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहिले. थोड्याच अंतरावर नदीवरील पूल लागला. या पुलाची उंची तशी फारशी नाही. पाण्याची पातळी आणखी वाढली तर कदाचित या पुलावरून देखील पाणी जाऊ शकते. नदीचा तर रौद्रप्रवाह इथून चांगलाच अनुभवता येत होता. पूल पार केल्यानंतर शहरीकरणाची चिन्हे पुन्हा दिसू लागली. खराब रस्ते, गटारातून नदीमध्ये वाहणारे पाणी आणि पाण्यामुळे ओला झालेला कचरा व त्यातून येणारा दुर्गंध हे सर्वच काही पाहायला मिळाले. लगेचच देहू-आळंदी रस्ता लागला आणि डावीकडे वळून परतीच्या मार्गाला लागलो. घरी येईपर्यंत पूर्ण भिजून गेलो होतो. आज-काल या भागात जास्त सायकलस्वार दिसून येत नाहीत. कदाचित पावसाचा परिणाम असावा.


 

Sunday, July 2, 2023

मान्सून मधली पहिली राईड

गेले कित्येक महिने इंद्रायणीच्या पाण्यावर जलपर्णी पसरलेल्या दिसत होत्या. परंतु मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे जलपर्णींचं ते जाळं हळूहळू कमी होत गेलं. नदी प्रवाही झाली. नदीचा तो खळाळता प्रवाह पहिल्यांदाच या पावसाळ्यामध्ये अनुभवता यावा म्हणून सायकलद्वारे इंद्रायणीची लघु परिक्रमा करायचे ठरवले.
आज सकाळचं वातावरण ढगाळ असलं तरी पावसाची शक्यता वाटत नव्हती. रविवारचा दिवस, त्यामुळे गर्दी देखील कमी. बऱ्याच महिन्यानंतर आज पहिल्यांदाच ऊन नसताना सायकल चालवत होतो! अलंकापुरीमध्ये प्रवेश केला आणि पावसाचे तुषार अंगावर यायला लागले. जोर फारसा नव्हता. इंद्रायणीच्या पुलावर पोहोचलो तेव्हा नदीचा तो खडाळता प्रवाह दिसून येत होता. नदी ओलांडून थेट मरकळच्या दिशेला लागलो. गावातून बाहेर पडल्यावर पावसाचा जोर कमी झाला होता. आता रस्ते ओले देखील दिसत नव्हते. पण आजूबाजूच्या खड्ड्यांमध्ये पाणी मात्र साठलेले दिसले. आळंदी-मरकळ रस्त्यावर असणाऱ्या धानोरे गावाच्या दिशेने उजवीकडे वळालो. आता शहर वस्ती संपली होती. सगळीकडे हिरवेगार झाडेझुडपे दिसायला लागली होती.
अगदी पाचच मिनिटांमध्ये धानोरे आणि निरगुडी गावाला जोडणाऱ्या इंद्रायणी नदीच्या पुलावर आलो. इथल्या बंधाऱ्या खालून इंद्रायणीचा प्रवाह वेगाने खालच्या दिशेने जात होता. शहरात कडून आलेल्या जलपर्णी ह्या बंधार्‍यापाशी अडकलेल्या दिसल्या. इथून निरगुडी गावामध्ये आलो आणि पश्चिमेच्या दिशेने चऱ्होली बुद्रुकचा रस्ता धरला. वातावरण आल्हाददायक बनलं होतं. डोंगर टेकड्या आता हिरव्या दिसायला लागल्या होत्या. ढगाळ वातावरण काहीसं विरळ होत होतं आणि अधून मधून सूर्याची किरणे डोकावत होती. एका छोटेखानी टेकडीवर आलो तेव्हा तिथून शहरीकरणाचे दृश्य व्यवस्थित दिसत होते. काँक्रीटची जंगले निसर्गाच्या जंगलातून वेगळीच दिसतात. चऱ्होली गावाच्या पूर्वेकडील भाग अजूनही गाव म्हणावा असाच आहे. इथून गावठाणात प्रवेश करताना अतिशय छोटा रस्ता दिसतो. कदाचित त्याला पर्याय म्हणूनच नदीच्या बाजूने बायपास रस्ता करण्यात आला असावा. गावातून जाताना गावाचं जुनं गावपण मात्र ठळकपणे जाणवतं. अजूनही गावात जुने लाकडी बांधाचे वाडे दिसून येतात. अनेक वाड्यांची व्यवस्थित डागडुजी देखील झालेली आहे. आपण पुणे शहरातीलच वाडे पाहत आहोत की काय असाही भास होतो. गावच्या वेशीतून बाहेर आलो तेव्हा पुन्हा काँक्रीटच्या जंगलाच्या दिशेने प्रवास चालू केला. रहदारी वाढली होती, वर्दळ देखील वाढत होती. आणि त्याच वर्दळीमध्ये मी देखील माझा प्रवास चालू ठेवला.











Thursday, November 21, 2019

मस्तानीची कबर, पाबळ

सन 2006 मध्ये सर्वप्रथम पाबळला जाण्याचा योग आला होता. त्याच वेळेस पहिल्यांदा पाबळ गावात मस्तानीची कबर आहे, असे समजले. परंतु, तेव्हा भेट दिली नव्हती. मागील आठवड्यात इतक्या वर्षांनी पाबळला जाताना हे ठिकाण पाहण्याची संधी मिळाली. पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरपासून पाबळ गाव वीस किलोमीटर अंतरावर आहे. या गावामधल्या लोणी रस्त्यावर डाव्या बाजूला बाजीराव पेशव्यांच्या मस्तानी बाईसाहेबांची समाधी बाहेर एकाकी पडल्याचे दिसते. त्या शेजारीच गावचे सुन्नी कब्रस्तान आहे. मस्तानीच्या कबरीभोवती सध्या सिमेंटचे बांधकाम करण्यात आले आहे व चबुतराही बांधलेला आहे. परंतु सध्याची त्याची अवस्था पाहता महाराष्ट्रातल्या एका दुर्लक्षित स्थळांपैकीच हे एक ठिकाण असल्याचे जाणवते.








Tuesday, November 19, 2019

चौरंगा दत्त मंदिर टेकडी, पेठ

पुणे-नाशिक महामार्गावरचा सर्वात पहिला बायपास रस्ता तयार झाला होता आंबेगाव तालुक्यातल्या पेठ या गावी! याच गावाच्या मागे दूरवर एक डोंगर दिसतो व त्यावर एक भव्य मंदिरही बांधल्याचे दिसते. हाच चौरंगा डोंगर होय. या डोंगरावर एक दत्तमंदिर आहे. पेठ गावातून एक रस्ता घोडेगाव कडे जातो. या रस्त्यावर उजवीकडे एक पाण्याची टाकी आहे. तिथून डाव्या बाजूला एक फाटा फुटून एक रस्ता भावडी गावात जातो. सदर रस्त्याने पुढे गेल्यावर आपला सौरंगा डोंगराच्या दिशेने प्रवास चालू होतो. हा परिसर बऱ्यापैकी चढाचा परंतु बिनाझाडीचा आहे. सौरंगा डोंगरावर दत्ताचे मंदिर झाल्याने आता थेट वरपर्यंत गाडी जाण्याचा रस्ता तयार केला आहे. पायथ्यापासून डांबरी रस्त्याने थोडे वर गेल्यास एक आश्रम दृष्टीस पडतो. तेथून पुढचा रस्ता कॉंक्रिटचा बांधलेला आहे. मी या डोंगरावर गेलो तेव्हा घाट रस्ता चालू होण्यापूर्वीच गाडी पायथ्याला पार्किंग केली व पायी रस्ता पार करायला सुरुवात केली. रस्त्याची चढण तशी बर्‍यापैकी आहे. परंतु, रस्ता सपाटच असल्याने फारशी दमछाक होत नाही. केवळ तीन वळणांमध्ये कॉंक्रिटचा रस्ता थेट माथ्यावर जातो. पावसाळ्यात येथुन नयनरम्य नजारा पाहायला मिळतो. माथ्यावर दत्ताचे बऱ्यापैकी मोठे मंदिर बांधले आहे. मंदिरात काळ्या पाषाणातली मूर्ती आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर खेड तालुक्यात तर पायथा आंबेगाव तालुक्यात मोडतो. भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराचेही असेच आहे. अवसरी घाटापासून खेड घाटात पर्यंतचा व बहुतांश आंबेगाव तालुक्याचा परिसर येथून न्याहाळता येऊ शकतो. डोंगरावर फारशी झाडे नसल्याने उन्हाळ्यात वैराण अवस्था पाहायला मिळते.











Friday, November 15, 2019

इंदिरा पाझर तलाव, खेड घाट

पुणे-नाशिक रस्त्याची सध्याची परिस्थिती पाहता राजगुरुनगर चा खेड घाट हाच सगळ्यात अवघड घाट उरल्याचे दिसते! या घाटाच्या झाडीतुन खाली पाहिल्यास एक सुंदर जलाशय तुडुंब भरलेला दिसतो. या तलावाच्या सर्व बाजूंनी डोंगररांगा असल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होतो. सदर तलावाचे नाव आहे इंदिरा पाझर तलाव.
तलावाच्या मुख्य बांधाकडे जायचे असल्यास राजगुरुनगर कडून घाट सुरू होण्यापूर्वी डाव्या बाजूला एक रस्ता खालच्या दिशेने जाताना दिसतो. या रस्त्याने साधारणतः अर्धा किलोमीटर पुढे गेल्यात इंदिरा पाझर तलावाचा दृष्टीस पडतो. तिथून तलावाचे पूर्ण दृश्य तुम्ही डोळ्यात साठवू शकता.