माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label वाळवा तालुका. Show all posts
Showing posts with label वाळवा तालुका. Show all posts

Monday, September 9, 2024

विलासगड दुर्ग

सांगली शहरापासून सर्वात जवळ असलेला डोंगरी किल्ला म्हणजे विलासगड होय. निघण्याच्या आदल्या दिवशी गुगल मॅपवर त्याचे स्थान शोधले. माझ्या सध्याच्या स्थानापासून त्यांचे अंतर होते जवळपास ४० किलोमीटर. सकाळच्या वेळी जरी निघालो तरी किमान पाऊण तास तरी लागणार होता. म्हणून आदल्या दिवशी लवकरच झोपलो. सकाळी साडेपाच वाजता जाग आली आणि सहा वाजेपर्यंत मी किल्ल्याची चढाई करण्यासाठी तयार झालो होतो. हिवाळा असल्यामुळे दिवस लहान होता आणि सूर्यही उशिरा उगवणार होता. त्यामुळे अजूनही बऱ्यापैकी अंधार पडलेला होता. सांगलीहून निघालो तेव्हा सूर्य उगवण्याची काहीच चिन्हे नव्हती. रस्त्यावर देखील तुरळक गर्दी होती. गाडी आष्टाच्या दिशेने लागली तोवर रस्त्यांवरील पथदीप देखील बंद झालेले होते. सांगलीच्या बाहेर इस्लामपूरच्या दिशेने जाणारा रस्ता बऱ्यापैकी खराब झालेला होता. शिवाय बऱ्याच ठिकाणी खड्डे देखील पडलेले होते. त्यातूनच वेगाने वाट काढत मी आष्टाच्या दिशेने निघालो. आष्टामध्ये पोहोचलो तेव्हा काहीसा सकाळचा संधी प्रकाश दिसायला लागला होता. तसेच आजूबाजूची उसाची शेती देखील हिरवीगार दिसत होती. आष्टा गावातून डावीकडे एका फाट्याने येडेनिपाणीच्या दिशेने निघालो. रस्ता वळणावळणाचा आणि हिरव्यागार उसाच्या शेतातून जाणारा होता. सकाळच्या त्या प्रहरी या रस्त्यावर प्रवास करणारा कदाचित मीच एकटा होतो. रस्त्यात लागलेल्या एका गावापाशी परिवहन मंडळाची बस दिसून आली. तेव्हा हायसे वाटले. सुमारे पावणे सात ते सातच्या सुमारास मी येडेनिपाणी गावच्या अलीकडेच डाव्या बाजूला वळण घेतले. एव्हाना त्या डोंगरावरील मल्लिकार्जुनाचे मंदिर व्यवस्थित दिसत होते. निघण्यापूर्वी या किल्ल्याचे तसेच किल्ल्यावरील मल्लिकार्जुनाच्या मंदिराची छायाचित्रे आंतरजालावर पाहिली होतीच. म्हणून सदर किल्ला ओळखण्यासाठी फारसे कष्ट पडले नाहीत. किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी लावली. त्यावेळी येथे येणारा कदाचित मी एकटाच असेल. या किल्ल्यावर मल्लिकार्जुनाचे देवस्थान आहे म्हणूनच पायथ्यापासूनच भाविकांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी अतिशय व्यवस्थित पायऱ्या बांधलेल्या दिसल्या. आजूबाजूला बऱ्यापैकी सुंदरसं जंगल होतं. परंतु बहुतांश झाडाची पानगळ झालेली दिसली. किल्ला चढायला सुरुवात केली आणि झपाझप पायऱ्या चढत थेट मल्लिकार्जुनाच्या मंदिरापाशीच थांबा घेतला. जास्तीत जास्त दहा ते बारा मिनिटे इथे पोहोचायला लागली असती. एव्हाना सूर्यदेवाने पूर्व क्षितिजावरून दर्शन दिले होते. सूर्याचा आता कोवळा प्रकाश आसमंतात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरलेला दिसला. ऊस पट्ट्यातली ती हिरवीगार शेती आता व्यवस्थित दिसायला लागली होती. दूरवरुन या डोंगरावर दिसून आलेले मल्लिकार्जुनाचे देवस्थान आता जवळू लागलं होतं. डोंगरात खोदलेल्या एका लेण्यांमध्ये मल्लिकार्जुन देवस्थान स्थित असल्याचे दिसले. आतमध्ये शंकराची एक पिंडी देखील होती. मानवी कारागिरांनी खोदलेलं ते एक सुंदर लेणं होतं. मंदिराच्या आत जाऊन आलो आणि पुन्हा मुख्य दरवाज्यापाशी पोहोचलो. येथूनच वरच्या बाजूला जाण्यासाठी एक पायवाट देखील दिसून आली. विलासगड दुर्गाच्या पाऊलखुणा याच भागात दिसून येतात. पाचच मिनिटांनी किल्ल्याच्या सर्वात उंच टोकावर पोहोचलो. इथे खऱ्याखुऱ्या दुर्ग पाऊलखुणा दिसून आल्या. मंदिर आणि दर्गा यांच्या भिंती एकमेकांना लागलेल्या होत्या. समोरच एक भग्न अवस्थेतील कृष्णमंदिर होते. तर दर्ग्याला लागून विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर देखील दिसून आले. त्याच्या मागच्या बाजूला चुन्याचा घाणा अखेरच्या घटका मोजत असलेला दिसला. दर्ग्याला वळसा घालून पूर्वेकडे आलो तर तिथे देखील किल्ल्यावरील वाड्यांचे भग्नावशेष आढळून आले. समोरच्या बाजूला बऱ्यापैकी मोकळे मैदान होते. किल्ल्यावरील एकमेव टाके पाण्याअभावी सुकलेले दिसले. काही वेळ आजूबाजूचा परिसर न्याहाळून मी परतीच्या मार्गाला लागलो. अधूनमधून तुटलेल्या तटबंदी देखील दिसून होत्या. आणि शिवरायांच्या स्वराज्यातील किल्ल्यांवर असलेला जरीपटका इथे मनाने डोलताना दिसून आला.


















Tuesday, May 28, 2024

बहादुरवाडी

येडेनिपाणीचा विलासगड दुर्ग उतरून खाली आलो तेव्हा सव्वा आठ वाजत आले होते. म्हणजे परत जाण्यासाठी माझ्याकडे अजून बराच वेळ होता. त्यामुळे बहादुरवाडीला जाण्याचे नक्की केले. येडेनिपाणी मधून एक रस्ता मुंबई-बंगळूर महामार्गाच्या दिशेने जातो. अगदी दहा मिनिटांमध्येच मी महामार्गाला पोहोचलो. मग काय गाडी सुसाट वेगाने निघाली. थोड्याच अंतरावर पुन्हा डाव्या बाजूला बहादुरवाडीच्या दिशेने प्रवास चालू केला.
महाराष्ट्रातल्या अन्य गावांप्रमाणेच हे एक गाव. त्याच्या मधोमध बहादूरवाडी भुईकोट दुर्ग दिसून येतो. रस्त्याचे काम चालू असल्याने अलीकडेच गाडी लावली आणि चालतच या दुर्गाच्या दिशेने निघालो. भुईकोट म्हटलं की जी परिस्थिती आठवते तशाच स्थितीमध्ये हा दुर्ग सध्या दिसून येतो. प्रवेशद्वार बऱ्यापैकी उत्तम. परंतु आतमध्ये प्रवेश केल्यानंतर दुर्गाची दुरावस्था दृष्टीस पडते. काही ठिकाणी डागडूजी केल्याचे दिसते. पण बहुतांश दुर्ग एका पडक्या वाड्यासारखा आहे. दुर्ग म्हणावा अशा खानाखुणा मात्र स्पष्टपणे दिसतात. प्रवेशद्वाराच्या बुरुजावर जाणारा रस्ता व्यवस्थित होता. तिथून बहादुरवाडी गाव बऱ्यापैकी दिसून येतं.
तटबंदी आणि बुरुजामध्ये जंग्या आणि झरोके आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मोकळी जागा दिसते. त्यासमोरील तटबंदीत चार दरवाजे आहेत. कदाचित या ठिकाणी जुन्या काळात घोड्यांच्या पागा असाव्यात. आतल्या तटबंदीतून बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर सगळीकडे प्रचंड झाडी माजलेली आढळते, त्यात दुर्गाचे सगळे अवशेष हरवून गेलेले आहेत!






 

Wednesday, October 30, 2019

इस्लामपूरची दत्त टेकडी

पुण्याच्या बाहेर कधी जाणे झाले की, आमचा बरेचदा ट्रेकिंगचा शोध घेण्याचाही प्रवास सुरू होतो. इस्लामपूरला आजवर तीन वेळा निरनिराळ्या ट्रेनिंगसाठी जाण्याचा योग आला. त्यातल्या एका भेटीत मी जवळच्या बहेगाव, सागरेश्वर अभयारण्य व मच्छिंद्रगड किल्ला यांना भेट देऊन आलो होतो. त्यावेळेस एक बाईक मला इस्लामपुरात मिळाली होती. पण यावेळेस मात्र काही केल्या बाईक मिळेनात. ट्रेनिंग मधून आलो की, होस्टेलवर स्वस्त बसून राहावे लागायचे. सोलो ट्रेकिंगची सवय बऱ्याच वर्षापासून होती. पण दोन दिवस झाले तरी बाईकची व्यवस्था झाली नाही. म्हणून आता पायीच फिरायचं ठरवलं होतं. त्यासाठी गुगल मॅप प्रथम स्कॅन केला व इस्लामपूरच्या बाहेर एक छोटेखानी टेकडी सापडली. तिचं नाव गुगलवर दत्त टेकडी असं होतं. गुगल मॅप वर तिचं अंतर चार किलोमीटर होतं. म्हणजे जाऊन-येऊन आठ किलोमीटर पडणार! जून महिना चालू असला तरी पावसाचं नामोनिशानही नव्हतं. या वर्षी दुष्काळ वाढल्याची व पाऊस लांबण्याची चिन्हे दिसत होती. बातम्यांमध्ये इतकच ऐकू येत होतं की, पाऊस कर्नाटकापर्यंत आलेला आहे. बाकी इथे सर्व ऊनच पडत होतं. या वेळेच्या इस्लामपूर भेटीत बरेच प्लान्स केले होते. पण बाईक न मिळाल्याने सर्व घोडं अडकलं. शेवटी दत्तमंदिराच्या टेकडीचा पायीच प्रवास करायचं ठरवलं. सकाळी सात वाजता होस्टेलवर निघालो. ऊन फारसं नव्हतं. रस्त्यावर सकाळचे जॉगिंग करणाऱ्यांची मात्र गर्दी होती. त्या दिवशी बऱ्याच दिवसांनी असं ट्रेकिंगला बाहेर पडणार होतो. पुन्हा एकदा गुगल मॅप च्या साह्याने पायी चालत रस्ता पार करायला लागलो. खरं सांगायचं तर पायी चालताना गुगल मॅप्स वापर बऱ्याच कमी वेळा मी केलाय. त्यातलीच ही एक घटना. जवळपास पंचेचाळीस ते पन्नास मिनिटात मी टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलो. वर जाण्याचा रस्ता दाखवायला मात्र गुगल मॅपच्या बाईने चुकी केली. वर चढताना मलाच माझा रस्ता तयार करावा लागला होता. उन्हाळ्यामुळे झाडांची नेहमीची वाताहत झाली होती. शुष्कपर्ण सर्वत्र भुईवर पडलेले दिसले. टेकडीच्या टोकावर पोहोचलो तर इथे मी केवळ एकटाच होतो, असं दिसलं. सर्व इस्लामपूर शहर एका नजरेत पाहता येत होते. माझ्या मोबाईलचा कॅमेरा फुटला असल्याने फ्रंट कॅमेराने फोटो काढावे लागले. तसे ते चांगले आलेत. ध्येयावर पोहोचल्याचे समाधान तर वाटत होतेच. पण बऱ्याच दिवसांनी अशी पायपीट केल्याने पाय दुखायला सुरुवात झाली होती. परत चार किलोमीटर अंतर मी किती जड पावलांनी पार केलं, ते माझं मलाच माहित!
या छोटेखानी ट्रेकने मात्र थोडंसं का होईना समाधान प्राप्त झालं होतं.





Wednesday, January 16, 2019

छोटेखानी दुर्ग : मच्छिन्द्रगड, जि. सांगली

सांगली जिल्ह्यातील एक सुंदर किल्ला म्हणजे मच्छिन्द्रगड! शिवरायांनी स्वतः जातीने बांधून घेतलेला किल्ला म्हणून हा दुर्ग परिचित आहे. इस्लामपूर पासून पंधरा किलोमीटरवर हा किल्ला स्थित आहे. बेरडमाची आणि येडेमच्छिन्द्र या दोन्ही गावांतून किल्ल्यावर जायला भक्कम पायरीवाटा आहेत. शिवाय येडेमच्छिन्द्र मधून काँक्रीट चा गाडीरस्ताही तयार झालेला आहे. किल्ल्याचे अवशेष अजूनही बऱ्यापैकी शिल्लक दिसतात.