माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label प्रवास. Show all posts
Showing posts with label प्रवास. Show all posts

Wednesday, July 15, 2026

होदिगेरे ते मानवंते एक विलक्षण प्रवास!

होदिगेरे येथील स्वराज्य संकल्पक शहाजीराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन, अवघ्या पाचच मिनिटांत आम्ही पुन्हा चित्रदुर्ग-शिवमोगा मुख्य मार्गाला लागलो. आता आमच्या या प्रवासाचा पुढचा थांबा थेट अरबी समुद्राच्या किनारपट्टीवरील निसर्गरम्य 'मानवंते' हा होता. प्रवासाची दिशा ठरवण्यासाठी जेव्हा गुगल मॅपचा आधार घेतला, तेव्हा त्याने किनारपट्टीवर जाण्यासाठी दोन वेगवेगळे रस्ते सुचवले. त्यापैकी सुप्रसिद्ध 'अगुंबे घाटा'तून खाली उतरणारा रस्ता वेळेच्या दृष्टीने कमी वेळेचा दाखविल्याने आम्ही त्याच मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. शिवमोगा शहराची हद्द पार केल्यानंतर आमच्या प्रवासाचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले. या परिसरातील विस्तीर्ण आणि भल्यामोठ्या सुपारीच्या बागांमधून जाणारा तो काळाकुट्ट आणि गुळगुळीत डांबरी रस्ता प्रवासाचा आनंद द्विगुणित करत होता. रस्त्यावर वाहनांची फारशी वर्दळ नसल्याने गाडी चालवणे अतिशय सुखद वाटत होते. दुपार टळून गेली होती आणि सूर्यदेव हळूहळू पश्चिमेच्या क्षितिजाकडे आपला प्रवास करत होते.

गाडीच्या खिडकीतून बाहेर नजर टाकावी तिथपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना केवळ आणि केवळ सुपारीच्याच गर्द बागा डोलताना दिसत होत्या. भारतातील सुपारीचे हे सर्वात मोठे कोठारच असावे, याची प्रकर्षाने जाणीव तिथली ती अथांग हिरवळ पाहून झाली. घनदाट झाडीच्या त्या नितांत सुंदर आणि निसर्गरम्य परिसरातून प्रवास करताना, खऱ्या अर्थाने निसर्गाशी एकरूप झाल्याचा आनंद आम्हाला घेता आला. प्रवासात अधूनमधून घाटमाथ्यावरील वळणदार रस्ते लागायचे, तर कधी रस्ता पूर्णपणे घनदाट झाडीच्या बोगद्यातून जायचा. उत्कृष्ट प्रतीच्या सुपारीच्या वाणासाठी संपूर्ण कर्नाटकात प्रसिद्ध असणारे 'तीर्थहळ्ळी' गाव मागे टाकल्यानंतर, आम्ही एका अधिकच घनदाट आणि गूढ जंगलामध्ये प्रवेशकर्ते झालो. उन्हाळ्यातही इथली झाडी इतकी गर्द होती की, पावसाळ्याच्या दिवसांत हा संपूर्ण परिसर किती सुखद, मनमोहक आणि हिरवागार असावा, याची मी केवळ कल्पनाच करत होतो.

संध्याकाळच्या सुमारास आम्ही अगुंबे घाट उतरायला सुरुवात केली. घाटाच्या अगदी सुरुवातीलाच एका ठिकाणी रस्ता इतका अरुंद होता की तिथून केवळ एकेरी वाहतूकच पुढे जाऊ शकत होती. याच ठिकाणी निसर्गाचे एक विलोभनीय रूप पाहण्यासाठी पर्यटकांची भलीमोठी गर्दी उसळली होती. डोंगरांच्या त्या उंच पट्ट्यावरून आणि घनदाट झाडीतून इथला अथांग पसरलेला विस्तीर्ण परिसर एकाच दृष्टिक्षेपात येत होता. मावळतीचा सूर्य आणि ते निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची तिथे मोठी झुंबड उडाली होती. जसजसे आम्ही पुढे गेलो, तसतसा या अगुंबे घाटाचा खरा आणि अक्राळविक्राळ आवाका आमच्या ध्यानात येऊ लागला. हा घाट भारतातील कठीण श्रेणीत मोडणाऱ्या घाटांपैकी एक आहे, याची प्रचिती पदोपदी येत होती. अनेक ठिकाणी अत्यंत अवघड 'हेअर पिन कर्व्ह' असणारे तीव्र उताराचे वळणदार रस्ते गर्द झाडीतून पार करत आम्ही अतिशय सावधपणे घाट उतरत होतो. माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात महाराष्ट्रामध्येही इतका अवघड आणि तीव्र उताराचा घाट मी पाहिला नव्हता. या रस्त्याने नेहमी प्रवास करणाऱ्या स्थानिकांच्या गाड्या अत्यंत सफाईदारपणे आणि वेगाने वर येत होत्या, परंतु रस्त्याची रुंदी बऱ्याच ठिकाणी खूपच कमी असल्याने मला अतिशय सावधपणे आणि गाडीवर पूर्ण नियंत्रण ठेवून गाडी चालवावी लागत होती. सुदैवाने त्या दिवशी अंधार पडलेला नव्हता, पाऊसही नव्हता आणि धुक्याची चादरही नव्हती. अशा अनुकूल हवामानात एका अज्ञात आणि अवघड घाटातून प्रवास करताना आम्ही नकळतपणे निसर्गाचे शतशः आभार मानले. तरीही हा घाट उतरताना मिळालेला अनुभव खऱ्या अर्थाने अंगावर काटा आणणारा आणि थरारक असाच होता.

अखेर घाट पूर्णपणे उतरून खाली आलो, तेव्हा आम्हा सर्वांनी एक मोठा सुटकेचा निश्वास सोडला. परंतु आमचा थरार इथेच संपला नव्हता, कारण जंगल अजूनही संपलेले नव्हते. त्या घनदाट जंगलातून आणि विरळ वस्ती असलेल्या, रहदारी नसलेल्या सामसूम डांबरी रस्त्यांवरून आम्ही किनारपट्टीच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करत होतो. सूर्य अजून पूर्णपणे मावळलेला नव्हता, तरीदेखील जंगलाच्या त्या घनदाट छत्रीमुळे वातावरणामध्ये बऱ्यापैकी काळोख दाटून आला होता. प्रत्यक्ष त्या जंगलाच्या हद्दीतून बाहेर आलो, तेव्हा घड्याळात संध्याकाळचे साडेसात वाजून गेले होते. त्यानंतर साधारणतः आठ वाजण्याच्या सुमारास आम्ही पनवेल-कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्गाला लागलो. बऱ्याच कालावधीनंतर आणि शांततेनंतर रस्त्यावर इतकी मोठी रहदारी आणि वाहनांचे दिवे दिसून आले. अखेर रात्रीचे नऊ वाजले, तेव्हा आम्ही मानवंते किनाऱ्यावर असणाऱ्या आमच्या नियोजित रिसॉर्टमध्ये पोहोचलो आणि एका अत्यंत थरारक प्रवासाची सांगता झाली.

(चित्रे: इंटरनेट माध्यम)

--- तुषार भ. कुटे 

#कर्नाटक #मराठी #कर्नाटक_प्रवास_वृत्तांत #घाट #प्रवास



 

Sunday, June 22, 2025

संगमेश्वरहून गणपतीपुळेकडे रात्री

दुपारी उशिरा पुण्याहून प्रस्थान केल्याने गणपतीपुळेमध्ये पोहोचण्यासाठी आम्हाला निश्चितच रात्रीचे नऊ ते दहा वाजणार होते. तशीच तयारी आम्ही केली होती. यावेळी पहिल्यांदाच ताम्हिणी घाटातून कोकणात उतरून संगमेश्वरद्वारे गणपतीपुळेकडे पोहोचण्याची योजना होती. संगमेश्वरपर्यंत पोहतोवर रात्रीचे आठ वाजले होते. मुंबई-गोवा मार्गावर नेहमीसारखी रहदारी नव्हती. अधून मधून पावसाच्या धारा पडतच होत्या. त्यामुळे महामार्ग बऱ्याचदा या पाण्यामध्ये चमकून दिसत होता. संगमेश्वरच्या अलीकडे एका पुलाचे काम चालू होते आणि याच मुलाच्या जवळून पश्चिमेकडे जंगलात उतरणारा एक रस्ता गणपतीपुळेच्या दिशेने जात होता. प्रशासनाने नुकतीच तशी पाटी देखील तिथे लावली आहे. पाच-सहा तासांचा महामार्गावरील प्रवास संपवून आम्ही खऱ्याखुऱ्या कोकणातल्या रस्त्यांकडे वळालो होतो. मागील एका प्रवासामध्ये याच मार्गावरून पुण्याकडे परतल्याचे मला आठवते. परंतु त्यावेळी मी स्वतः गाडी चालवत नव्हतो. शिवाय यावेळी रात्रीचा प्रवास होता. रस्ता जवळपास एकेरीच. समोरून गाडी आली तर आपली गाडी डांबरी रस्त्याच्या खाली घ्यावी लागेल इतकी त्याची रुंदी. अशा रस्त्यांवरून आमचा प्रवास चालू झाला. ६०-७० किलोमीटर आधीच एका चार्जिंग स्टेशनला गाडी पूर्ण चार्ज केल्यामुळे आता बॅटरीची समस्या उरली नव्हती. म्हणून या प्रवासाचा आनंद घेण्याचे मी ठरवले. रस्त्याच्या दोनही बाजूंना घनदाट झाडे. शिवाय किर्रर्र अंधार. सरळ रस्ता कुठेच लागला नाही. अगदी थोड्याशा अंतरावर एकतर डावीकडे वळण किंवा उजवीकडे वळण घेत आम्ही त्या रस्त्यांवर चाललो होतो. शिवाय रस्त्याचे चढउतार देखील सोबतीला होतेच. चहूबाजूच्या वनराईचे ते निशासौंदर्य न्याहाळत मी गाडी चालवत होतो. अशावेळी इथे कोणी गाडी अडवेल, याची भीती नव्हती. परंतु एका वेगळ्या वेळी अनोळखी रस्त्यावर गाडी हाकण्याचा नवा अनुभव गाठीशी बांधत होतो. गुगलमॅपचा अंदाज घेतला तेव्हा लक्षात आले की आपण अजूनही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला समांतर प्रवास करत आहोत. दोन्हींच्या मध्ये फक्त एक नदी होती…बाव नदी. कदाचित नदीवर कुठेही पूल नसल्याने या रस्त्याने पुढे जाणे क्रमप्राप्तच होते. जवळपास ४० ते ५० किलोमीटरचा हा प्रवास होता. कुणालाही वाटेल अशा रस्त्यांवरचा प्रवास लवकरात लवकर संपावा. परंतु हा विचार देखील माझ्या मनात आला नाही. गणपतीपुळ्याच्या जवळ पोहोचलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजून गेले होते. निसर्गाच्या त्या वळणावळणाच्या घाटांमधून आता बिल्डिंगच्या जंगलांमध्ये पोहोचलेलो होतो.