माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Sunday, June 22, 2025

संगमेश्वरहून गणपतीपुळेकडे रात्री

दुपारी उशिरा पुण्याहून प्रस्थान केल्याने गणपतीपुळेमध्ये पोहोचण्यासाठी आम्हाला निश्चितच रात्रीचे नऊ ते दहा वाजणार होते. तशीच तयारी आम्ही केली होती. यावेळी पहिल्यांदाच ताम्हिणी घाटातून कोकणात उतरून संगमेश्वरद्वारे गणपतीपुळेकडे पोहोचण्याची योजना होती. संगमेश्वरपर्यंत पोहतोवर रात्रीचे आठ वाजले होते. मुंबई-गोवा मार्गावर नेहमीसारखी रहदारी नव्हती. अधून मधून पावसाच्या धारा पडतच होत्या. त्यामुळे महामार्ग बऱ्याचदा या पाण्यामध्ये चमकून दिसत होता. संगमेश्वरच्या अलीकडे एका पुलाचे काम चालू होते आणि याच मुलाच्या जवळून पश्चिमेकडे जंगलात उतरणारा एक रस्ता गणपतीपुळेच्या दिशेने जात होता. प्रशासनाने नुकतीच तशी पाटी देखील तिथे लावली आहे. पाच-सहा तासांचा महामार्गावरील प्रवास संपवून आम्ही खऱ्याखुऱ्या कोकणातल्या रस्त्यांकडे वळालो होतो. मागील एका प्रवासामध्ये याच मार्गावरून पुण्याकडे परतल्याचे मला आठवते. परंतु त्यावेळी मी स्वतः गाडी चालवत नव्हतो. शिवाय यावेळी रात्रीचा प्रवास होता. रस्ता जवळपास एकेरीच. समोरून गाडी आली तर आपली गाडी डांबरी रस्त्याच्या खाली घ्यावी लागेल इतकी त्याची रुंदी. अशा रस्त्यांवरून आमचा प्रवास चालू झाला. ६०-७० किलोमीटर आधीच एका चार्जिंग स्टेशनला गाडी पूर्ण चार्ज केल्यामुळे आता बॅटरीची समस्या उरली नव्हती. म्हणून या प्रवासाचा आनंद घेण्याचे मी ठरवले. रस्त्याच्या दोनही बाजूंना घनदाट झाडे. शिवाय किर्रर्र अंधार. सरळ रस्ता कुठेच लागला नाही. अगदी थोड्याशा अंतरावर एकतर डावीकडे वळण किंवा उजवीकडे वळण घेत आम्ही त्या रस्त्यांवर चाललो होतो. शिवाय रस्त्याचे चढउतार देखील सोबतीला होतेच. चहूबाजूच्या वनराईचे ते निशासौंदर्य न्याहाळत मी गाडी चालवत होतो. अशावेळी इथे कोणी गाडी अडवेल, याची भीती नव्हती. परंतु एका वेगळ्या वेळी अनोळखी रस्त्यावर गाडी हाकण्याचा नवा अनुभव गाठीशी बांधत होतो. गुगलमॅपचा अंदाज घेतला तेव्हा लक्षात आले की आपण अजूनही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला समांतर प्रवास करत आहोत. दोन्हींच्या मध्ये फक्त एक नदी होती…बाव नदी. कदाचित नदीवर कुठेही पूल नसल्याने या रस्त्याने पुढे जाणे क्रमप्राप्तच होते. जवळपास ४० ते ५० किलोमीटरचा हा प्रवास होता. कुणालाही वाटेल अशा रस्त्यांवरचा प्रवास लवकरात लवकर संपावा. परंतु हा विचार देखील माझ्या मनात आला नाही. गणपतीपुळ्याच्या जवळ पोहोचलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजून गेले होते. निसर्गाच्या त्या वळणावळणाच्या घाटांमधून आता बिल्डिंगच्या जंगलांमध्ये पोहोचलेलो होतो.


No comments:

Post a Comment