अष्टविनायकांपैकी विघ्नहर गणेशाचे स्थान म्हणजे जुन्नर जवळील ओझर होय. या मंदिरामध्ये आमचे सातत्याने येणे जाणे असतेच. परंतु ओझर गाव ज्या कुकडी नदीच्या आणि येडगाव धरणाच्या काठावर वसलेले आहे, तिथले निसर्ग सौंदर्य पाहत राहणे म्हणजे पर्वणीच असते. येडगाव धरणाच्या बॅकवॉटर परिसरात अजूनही पावसाळ्याच्या सुरुवातीला बऱ्यापैकी पाणी साठलेले दिसते. नेहमीच पक्षांची रेलचेल दिसते. त्या दिवशी संध्याकाळी आकाशामध्ये अंधार होण्यापूर्वी घरट्याकडे परतणाऱ्या पक्षांचे थवे सातत्याने दिसत होते. पश्चिमेकडे शिवजन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या बाजूलाच सूर्य हळूहळू क्षितिजाकडे झुकत चालला होता. शिवनेरी किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोनेरी किरणांची उधळण दिसून येत होती. त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेला अर्थात पूर्वेकडे दूरवर नारायणगड किल्ला देखील हळूहळू अंधारामध्ये गुडूप होताना दिसत होता. धरणातील पाणी मात्र शांत होते. टक लावून ऐकलं की आजूबाजूच्या परिसरातील पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता. मागच्या बाजूला गणपती मंदिराततील गजबजाट ऐकू येत असला तरी नैसर्गिक आवाजांची साथ मात्र कानावर सातत्याने पडतच राहत होती. संध्याकाळ आणि सकाळ या दोन्ही प्रसंगी निसर्गामध्ये जो ताजेपणा असतो तो अनुभवताना मनाला एक वेगळीच उभारी येते. असं वाटत राहतं की, हा काळ संपूच नये. संध्याकाळ अंधाराकडे जरी नेत असली तरी ती आपल्या शरीराला सकारात्मकतेची ऊर्जा प्रदान करत असते. या ऊर्जेच्या आधारावरच आपण अंधार स्वीकारू लागतो आणि प्रतीक्षा करत असतो उद्या पुन्हा उजाडण्याची. हे निसर्गचक्र अनुभवने म्हणजे एक वेगळीच अनुभूती असते, हे निश्चित.
No comments:
Post a Comment