माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label ठाणे जिल्हा. Show all posts
Showing posts with label ठाणे जिल्हा. Show all posts

Monday, June 16, 2025

माळशेज व्ह्यू पॉईंट, एमटीडीसी रिसॉर्ट

आळेफाट्याकडून माळशेजच्या दिशेने जाताना पिंपळगाव जोगा धरण लागलं की वातावरणामध्ये थंडावा तयार होताना जाणवतो. उजव्या बाजूला दिसणाऱ्या बालाघाटच्या डोंगररांगा आणि त्याच्या पायथ्याशी सातत्याने झुळझुळणारे पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी पाहिलं की मन प्रसन्न होतं. 
मढ गाव संपलं आणि वेळखिंडीतून खाली उतरलो की हरिश्चंद्रगडाच्या अजस्त्र डोंगररांगा दूरवर नजरेस पडतात. वाटत राहतं खिरेश्वर मार्गे टोलारखिंडीतून उतरावं आणि हरिश्चंद्रगडाच्या निसर्ग कुशीमध्ये स्वतःला सामावून घ्यावे. वर्षा ऋतूमध्ये हा परिसर हिरवाईने भरायला लागतो. यावर्षी तर कमालच झाली. अगदी मे महिन्याच्या मध्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. याच कारणास्तव माळशेज घाटाच्या अलीकडील हा सर्व परिसर हिरवं लेणं अंगावर घेऊन डोलू लागला होता. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली. मध्येच ढगांची सावली आणि ऊन यांचा खेळ चालू झाला होता. डोंगरमाथ्यावर असल्याकारणाने माळशेज घाटाचा हा परिसर सातत्याने ऊनपावसाचे लपंडाव अनुभवत असतो. त्या दिवशी देखील हीच परिस्थिती होती. डावीकडे सिंदोळा किल्ला मग उधळा डोंगर न्याहाळत आम्ही महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या रिसॉर्टपाशी पोहोचलो. या रिसॉर्टच्या मागच्याच बाजूला… खरंतर पुढच्या बाजूला बरीच मोकळी जागा आहे. इथून माळशेज घाटाचा अतिशय सुंदर आणि नयनरम्य परिसर न्याहाळता येतो. उंच उंच डोंगर आणि त्याच्या मध्याहून कोरलेला घाट, वळणावळणाचे रस्ते आणि या रस्त्यांवरून हळूहळू पुढे सरकत चाललेल्या गाड्या दूरपर्यंत पाहता येतात. माळशेज घाट चढून येणारे प्रवासी प्रामुख्याने घाटाचे ते दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी या ठिकाणी नेहमीच गर्दी करतात. पावसाळ्यात ही संधी सहसा कोणी सोडत नाही. त्यादिवशी देखील अशीच गर्दी येथे दिसून आली. पाऊस पडून गेला होता. अधून मधून ढगांच्या आडून ऊन डोकावत होतं. थोडं पुढे चालत गेलं की डोंगरकड्याच्या एका ठिकाणी वाऱ्याचा भयंकर झोत वरच्या दिशेने जात असतो.. दरवेळेस हा आम्ही अनुभव घेतोच. घाटाच्या जंगलांमधून वरच्या दिशेने वाहणारे वेगवान वारे या बिंदूपाशी एकवटतात आणि वेगाने ढगांच्या दिशेने जातात. या वाऱ्यांमध्ये टाकलेली कोणतीही वस्तू कड्यावरून खाली जात नाही. ती अतिशय वेगाने वरच्या दिशेने फेकली जाते. आणि तिला जर वजन नसेल तर अगदी रिसॉर्टपर्यंत देखील ती उडून जाऊ शकते! हा आमचा इथला नेहमीचा खेळ. त्यादिवशी देखील पुन्हा एकदा खेळून पाहिला. निसर्गात तयार होणाऱ्या अशा छोट्या छोट्या गमती अनुभवायला देखील एक वेगळीच मजा असते. घाटामध्ये एका ठिकाणी वनविभागातर्फे काही दृश्यबिंदू तयार केलेले आहेत. या ठिकाणावरून देखील माळशेज घाटातील हा परिसर इथली माणसं पाहता येतात. खालच्या त्या घनदाट जंगलामध्ये आपल्या दृष्टीद्वारे स्वतःला सामावता येते. 
समोरच्या हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांवर सातत्याने ढगांची गर्दी त्या दिवशी देखील दिसून येत होती. वाऱ्याच्या प्रवाहासोबतच ढग प्रवास करत होते. अचानक वाऱ्यांचे वेग वाढू लागले, ढगांची गर्दी देखील झाली आणि वर्षाधारा कोसळू लागल्या. यावर्षी माझ्या अंगावर अनुभवलेला तो पहिलाच पाऊस. अगदी चिंब भिजून गेलो. निसर्गाचा दरवर्षीचा अविष्कार पाहण्यासाठी मी सज्ज झालो होतो. यावर्षीचा हा पहिला अनुभव. कदाचित येथून पुढे देखील वर्षा ऋतूतील हा अनुभव पुन्हा शरीर सुखावून जाईल, हे निश्चित.









Sunday, January 3, 2021

खंड्या

सकाळी आठ वाजता किल्ल्याच्या पायथ्याच्या मंदिरापाशी पोहोचलो. तोच समोरच्या कमानीतून 'तो' शेपटी हलवत आमच्यापाशी आला. त्याला कदाचित खायला हवे होते असे वाटले. आम्ही सुरुवातीला त्याच्याकडे काहीसे दुर्लक्ष केले आणि किल्ल्याच्या दिशेने चालू लागलो. मग तोही आमच्या बरोबरच चालायला लागला. पायवाट पूर्णपणे जंगलातून जाणारी होती. बऱ्याच ठिकाणी दोन वाटा जाताना दिसायच्या. अर्थात हा सर्व भुलभुलैयात वाटायला लागला. पण तो त्या वाटेने सराईतपणे आमच्या बरोबर चालला होता. त्याला रस्ता व्यवस्थित माहीत होता. इतक्या घनदाट जंगलातून पुढे सरकायला आम्हाला काहीशी भीती वाटत होती. कारण आमच्या तिघांना व्यतिरिक्त त्या जंगलात कोणीही नव्हते. कदाचित आमच्या आधीही कुणी गेले नसावे. जंगलातल्या त्या पायवाटेवरून चालताना हीच वाट योग्य आहे का? अशी शंका मनात उभी राहायची. पण तो मात्र त्या पायवाटेने सहजपणे पुढे चालला होता. त्यामुळे आम्हीही निर्धास्तपणे त्याच्या सोबत चालू लागलो. कधी कधी तो मध्येच जंगलातल्या चिंचोळ्या वाटेत घुसायचा व परत मळलेल्या वाटेकडे धाव घ्यायचा. रानावनात झाडांच्या टोकावरून उड्या मारणाऱ्या माकडांना आणि वानरांना आमची चाहूल लागली की ते त्यांच्या त्याची खबर आपल्या भाऊबंदांना विशिष्ट आवाज करून देत होते. त्या निबिड जंगलामध्ये तो आवाज भेसूर आणि भीतीदायक वाटत होता. पण आमचा सोबती आणि मार्गदर्शक कधीकधी धावत जाऊन माकडांना हुसकून लावायचा. आम्ही थांबलो की तोही स्वतःसाठी एखाद्या झाडीमध्ये जमीन उकरून थंडावा शोधायचा व तिथे अंग टाकून द्यायचा. तो आमची साथ सोडत नव्हता. कदाचित त्याला आमच्या सोबत किल्ल्यावर यायचे होते. एक तास झाला तरीही किल्ल्याच्या पायर्‍या लागल्या नव्हत्या. पण मळलेली पायवाटही अजून संपत नव्हती. जंगलातला प्रदीर्घ रस्ता संपला आणि समोर सह्याद्रीचा कोकणकडा दिसू लागला. लवकरच एक मंदिरही दिसायला लागले. विश्रांती घेण्यासाठी ती एक उत्तम आणि प्रशस्त जागा होती. आम्ही थांबल्यावर तोही मंदिराच्या बाहेर पहुडला. इथून पुढचा टप्पा मात्र पायर्‍यांच्या वाटेचा होता. आता किल्ल्याच्या मुख्य पायऱ्या व्यवस्थित दिसायला लागल्या होत्या. आधीच आमची दमछाक झालेली होती. त्यात ह्या खड्या पायऱ्या चढून जायचे होते. 
 


 
 
ऊन डोक्यावर आलं तरी झाडांचा थंडावा शरीराला अल्हाददायक शीतलता प्रदान करत होता. त्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती. कातळटप्पा सुरु झाला तिथून मात्र ऊन थेट अंगावर येत होतं. तोही आमच्या सोबतीने तिथवर आला. उभा कातळटप्पा हातांचाही वापर करत आम्ही सर करू लागलो. काही ठिकाणी अवघड पायऱ्यांचा मार्ग होता. पण तो अगदी सराईतपणे त्याने पार केला. त्याच्या चढाईमध्ये अगदीच सहजता जाणवत होती. जणूकाही तो रोजच या किल्ल्यावर येत असावा मुख्य दरवाजा पार केल्यानंतर मात्र त्याने आपले अंग टाकून दिले. कदाचित आमची फोटोग्राफीची गडबड लक्षात घेता अजून पंधरा-वीस मिनीटे तरी आम्ही इथून हालणार नाही, असे त्याला वाटले असावे. आणखी दोन पायऱ्यांचे मार्ग सर केल्यानंतर आम्ही एका भव्य गुहेपाशी येऊन पोहोचलो. ते एक मानवनिर्मित लेणंच होतं. हजारो वर्षांचा इतिहास त्यात सामावलेला होता. कमीत कमी ६० ते ७० लोक मावतील इतकी मोठी ती जागा होती. आल्या आल्या त्याने आपली नेहमीची जागा हेरली आणि अंग टाकून दिले. एव्हाना किल्ल्याच्या पायथ्यापासून दोन तास होऊन गेले होते. आम्हालाही भूक लागली होती. त्यामुळे पाठीवरच्या सॅक काढून ठेवल्या व पोट पूजेची सोय करू लागलो. त्यांने आम्हाला इतपर्यंत सोबत दिली होती. कदाचित त्याला काहीतरी खायला हवे असावे, असे आम्हाला वाटले. पण आम्ही दिलेल्या कोणत्याही पदार्थाकडे त्याने ढुंकूनही पाहिले नाही. आपले मार्गदर्शनाचे कर्तव्य त्याने पूर्ण केले होते. शेवटच्या कातळ टप्प्यासाठी तो आमच्या सोबत नव्हता. येतानाही तो त्या गुहेमध्ये परत दिसला नाही. किंबहुना रस्त्यातही तो आम्हाला परत दिसलाच नाही.
कदाचित केवळ आम्हाला किल्ल्याचा मार्ग दाखवण्यासाठी तो आमच्यासोबत आला असावा. त्याला आम्ही लाडाने "खंड्या" असे नाव ठेवले होते!