माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label कोंकण. Show all posts
Showing posts with label कोंकण. Show all posts

Thursday, August 15, 2024

सिंधुदुर्ग रत्नागिरी जंगल

गोव्यातून परतीच्या मार्गाने पुण्याकडे निघालो. सिंधुदुर्गातलं बांदा गाव लागलं की आपल्या मराठी मातीमध्ये प्रवेश केल्याचा अनुभव मिळतो. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना पावसाची रिमझिम काही कमीच होत नव्हती. कुडाळ, ओरोस, कणकवली करत खारेपाटणपर्यंत पोहोचलो. वाघोटण नदी ओलांडली,राष्ट्रीय महामार्ग सोडून उजवीकडे वळण घेतले आणि थेट अणुस्कुरा घाटाच्या दिशेने प्रवास चालू झाला. या वळणापासूनच सह्याद्रीची यंदाच्या मान्सूनमध्ये फुललेली घनदाट वनराई रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसून येत होती. चारपदरी रस्ता जवळपास एक पदरी झाला होता. मागच्या पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने सह्याद्रीतील ही जंगले आता भरायला सुरुवात झाली होती आणि त्यावरील फुललेली हिरवी-पोपटी पालवी मन प्रसन्न करून जात होती. या रस्त्याने रहदारी जवळपास नव्हतीच. अधूनमधून एखाद दुसरे वाहन समोरून यायचे. घनदाट जंगलांमुळे गावांची आणि वस्त्यांची संख्याही कमीच होती. परंतु अधूनमधून पाऊस आणि कधीमधी ऊन अश्या रम्य वातावरणात आम्ही अनुस्कुरा घाटाच्या दिशेने निघालो होतो. बहुतांश ठिकाणी शेतांची कामे चालू झालेली होती. अर्थात इथल्या पावसाचा अंदाज गावकऱ्यांना असल्याने त्यांची लगबग निश्चितच सकारात्मक दिसून येत होती. वातावरण स्वच्छ झाले की कॅनव्हासवर रेखाटण्यात आलेल्या निसर्गचित्रांची अनुभूती या वातावरणात अधूनमधून येत होती. दोन्ही बाजूंना हिरवी-पोपटी दाट झाडी आणि त्यामधून वळणावळणाचे काळेशार रस्ते पाहण्याचा तो दुर्दम्य आनंद होता. राष्ट्रीय महामार्गावरून आत वळण्याच्या आधी वाघोटण नदी पार केली होती. यापुढील प्रवासात देखील ही नदी तीन ते चार वेळा पुन्हा पार केली. अर्थात जंगलातल्या वळणावळणाने ही नदी आपला मार्ग शोधत पुढे चालली होती. नदीचा प्रवाह पावसाच्या पाण्यामुळे शितलतेची आणखी एक पायरी पुढे टाकून वेगाने वाहत असलेला दिसला. नदीच्या दोन्ही काठांवर फक्त झाडेच झाडे. अगदी विरळ मनुष्यवस्ती या भागामध्ये दिसून येत होती. काही ठराविक अंतरावर छोट्या छोट्या गाववस्त्या दिसून यायच्या. कोकणातले ग्रामीण लोकजीवन येथे पाहायला मिळाले. गर्द झाडीतील कोकण रेल्वेचा मार्गदेखील आम्हाला दिसला.   आणि सुदैवाने या मार्गावरून वेगाने धावणारी आगगाडी देखील दिसून आली. लहान मुलांची शाळा सुटल्याने देखील त्यांची ठिकठिकाणी आपल्या घरी जाण्यासाठी चाललेली लगबग दिसत होती. काही ठिकाणी उंच तर काही सखल घाटरस्ते पार करत आम्ही अणुस्कुरा घाटाच्या दिशेने चाललो होतो. कधी रत्नागिरी तर कधी सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या पाट्या या ठिकाणी दिसायच्या. म्हणजेच आम्ही दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरून प्रवास करत होतो! वर्षांनी वर्षे मनुष्याला प्राणवायू देणारी ही जंगले भरलेली बघून मनाला एक सुखद अनुभूती प्राप्त होत होती. एकंदरीत प्रवासात असंच वाटत राहिलं की, याच जंगलातून या रस्त्यांवरून तासनतास असाच प्रवास करत बसावे.
पाऊण-एकतासानंतर आम्ही मुख्य रस्त्यावरील पाचाळ या गावी पोहोचलो आणि थोड्याच अंतरावर अणुस्कुरा घाटाची सुरुवात झाली होती…