माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label girimitra. Show all posts
Showing posts with label girimitra. Show all posts

Wednesday, February 9, 2022

एका अल्पावधीत ग्लॅमरस झालेल्या किल्ल्याची गोष्ट

दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नाशकातल्या अनेक अपरिचित किल्ल्यांवर किल्ल्यांची आम्ही भ्रमंती करायला लागलो होतो. त्यातच त्र्यंबकेश्वर जवळच्या हरिहर किल्ल्याबद्दल माहिती समजली.
त्यादिवशी तिथीनुसार येणारी शिवजयंती शनिवारी आली होती. शिवाय सुट्टीचा दिवस असल्याने आम्ही अर्थात मी आणि माझ्या भावाने हरिहर किल्ला सर करण्याची योजना आखली. पहाटे पाच वाजताच आम्ही नाशिक वरून प्रस्थान केले. थंडी संपून उन्हाळ्याची सुरुवात होऊ लागली होती. परंतु वातावरणात गारवा मात्र कायम होता. त्र्यंबकेश्वर परिसरातील दुगारवाडी हा नाशिक जिल्ह्यातला एक सुप्रसिद्ध धबधबा होय. यापूर्वीच्या वर्षाऋतू मध्ये दुगारवाडीला भेट दिली होती. याच रस्त्यावर ढगांमध्ये लपाछपी खेळणारा हरिहर किल्ला पहिल्यांदा पाहिला होता. त्यामुळे त्याचे भौगोलिक स्थान माहीत होते. दुगारवाडीच्या दिशेने जाणारा हाच मार्ग चालत आम्ही हरिहरच्या दिशेने निघालो होतो. सकाळी सातच्या दरम्यान किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या हर्षेवाडी गावामध्ये आम्ही पोहोचलो. रस्त्यामध्ये कुठेच किल्ल्याच्या नावाची पाटी नव्हती. तसेच रस्ते देखील फारसे चांगले नव्हते. परंतु जंगलातील वळणावळणाचे रस्ते असल्यामुळे प्रवासाचे काही वाटले नाही. तसं पाहिलं तर हर्षवाडी एक आदिवासी गाव होतं. या भागात मानवी वस्ती तशी फार कमीच जाणवली. समोर हरिहर किल्ल्याचे सर सरळसोट पाषाण दिसत होते. कदाचित याच बाजूने वर जाण्यासाठी रस्ता असावा, असे आम्हाला वाटले. सकाळच्या वेळेस या परिसरात कुणीच नसल्यामुळे एका उजाड माळरानावर आम्ही बाईक पार्क केली. हेल्मेट कुठे ठेवायचे? हा प्रश्न होताच. त्यामुळे ते आम्ही बरोबरच घेऊन निघालो. थोडीशी मळलेली पायवाट किल्ल्याच्या दिशेने जाताना दिसली. अजूनही कोणत्याही मनुष्याचे दर्शन आम्हाला झाले नव्हते. किल्ल्याच्या दिशेने जाणारी पायवाट चालतच आम्ही मार्गक्रमण करू लागलो. दोन ते तीन ठिकाणी दगडाचे अवघड पॅचेस होते. ते पार करताना कस लागला. अखेरीस बालेकिल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो. समोर पाहिले तर जवळपास ९० अंशामध्ये असणाऱ्या पायऱ्या दिसल्या आणि काळजामध्ये धस्स झाले. या पायर्‍या चढून जायच्या? असा प्रश्नवाचक उदगार मनात उमटला. त्या क्षणी त्या पायऱ्या अतिशय अवघड वाटत होत्या. इथपर्यंत आलो तेच खूप झाले...  आता परत मागे फिरू या, असाही विचार मनामध्ये आला. परंतु थोडे पुढे गेल्यानंतर समजले की, प्रत्येक पायरीला दोन्ही बाजूंना खोबणी केलेल्या आहेत. त्यांना पकडून वरती जाणार जाता येणे शक्य होते. मग आम्ही धाडस करून त्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. इथून खाली निसटलो तर आजूबाजूला बघायला देखील कोणी नाही, हा विचारच भीतीदायक होता. परंतु हा थ्रिलींग अनुभव घ्यायचा आहे, असे आम्ही मनोमन ठरवले व पायऱ्या चढायला सुरुवात केली. एक एक करत साधारणतः पन्नास एक पायऱ्या चढत आम्ही मुख्य दरवाजापाशी पोहोचलो. किल्ले भ्रमंतीमध्ये आलेला तो आजवरचा एक रोमांचकारी अनुभव होता. दरवाजातून पुढे गेल्यावर एका कोरलेल्या कपारीतून पुढे देखील अशाच प्रकारच्या पायऱ्या तयार केलेल्या दिसल्या. आम्ही त्यादेखील तितक्याच सावधतेने हळूहळू चढत वरच्या दिशेने मार्गक्रमण केले. थोड्याच वेळामध्ये शेवटचा दरवाजा देखील दृष्टीस पडला. तो पार केल्यानंतर किल्ला सर केल्याचे समाधान प्राप्त झाले होते. किल्ल्यावर काहीच वर्दळ नव्हती. काही उघडी मंदिरे, दोन-तीन तळी व एक सर्वोच्च टोक. शिवाय एका बाजूला धान्याचे भव्य कोठार...  इतकीच काय ती या किल्ल्याची संपत्ती होती! दूरवर दिसणाऱ्या धान्यकोठारांशी माकडांचा एक समूह उड्या मारताना दिसला. आमची चाहूल लागल्यामुळे त्यातली निम्मी माकडे तर निश्चित पळून गेली असावी. किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावरून खाली उतरताना एक परदेशी आणि एक भारतीय व्यक्ती किल्ला पाहायला आलेली दिसली. या दुर्गदर्शनामध्ये आम्हाला दिसलेले ते दोघेच मनुष्य प्राणी होते. त्यादिवशी एक अद्भुत आणि रोमांचकारी किल्ला बघण्याचे समाधान आम्हाला लाभले.

दहा वर्षानंतर...

मधल्या काळामध्ये पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले. या वाहून गेलेल्या पाण्यामध्ये सोशल मीडिया नावाचा घटक अतिशय वेगाने कार्यरत झाला होता. समाज माध्यमांद्वारे हळूहळू हरिहर किल्ल्याची माहिती सर्वदूर पोहोचली. अगदी हौशे, नवशे आणि गवशे ट्रेकर्स फिरण्यासाठी या किल्ल्यावर तुडुंब गर्दी करू लागले. आमच्या हरिश्चंद्रगडासारखी परिस्थिती या ठिकाणी तयार झाली. गुगलवर तुम्ही नुसते हरिहरगड जरी सर्च केले तरी शेकडो व्हिडीओ, लेख व ब्लॉग तुम्हाला दिसून येतील. इतकी लोकप्रियता या किल्ल्याने मधल्या काळात प्राप्त केली. खऱ्याखुऱ्या ट्रेकर्सपेक्षा निव्वळ हुल्लडबाजी करायला येणाऱ्या पर्यटकांची इथे अधिक गर्दी होऊ लागली. याची प्रचिती या वर्षी केलेल्या ट्रेकमध्ये आम्हाला आली.
हर्षवाडी गावामध्ये आता नव्याने टोलनाका सदृश फाटक उभारले गेले होते. तिथे पावत्या पाडण्याची देखील सुविधा करण्यात आली होती. शिवाय आम्ही सकाळी साडे सहाच्या दरम्यान या पोहोचलो. सुट्टीचा दिवस नसून देखील तोवर बऱ्याच गाड्या पार्किंगमध्ये आधीपासूनच उभ्या असलेल्या दिसल्या. त्यातील एक टेम्पो ट्रॅव्हलर दुरून कुठून तरी आलेली होती. तिच्यामध्ये असेच अतिउत्साही पर्यटक आल्याचे दिसत येत होते. किल्ल्याच्या मुख्य पायर्‍यांपर्यंत चढून गेलो तोवर फारशी गर्दी नव्हती. वातावरण आल्हाददायक झालेले होते. शिवाय सूर्यही बऱ्यापैकी वर आलेला होता. एकंदरितच फोटोग्राफीसाठी एक उत्तम वातावरण तयार झाले होते. तेव्हाच दहा वर्षांपूर्वीचा हरिहरगड आठवला. इथवर येईपर्यंत चार ते पाच ठिकाणी विविध खाद्यपदार्थांची दुकाने व उपहारगृहे देखील उघडलेली दिसली. शनिवार-रविवारी कदाचित इथे तुडूंब गर्दी होत असावी. आजूबाजूच्या गावकऱ्यांना रोजगाराचे नवे दालन उघडले असले तरी किल्ल्यावर प्लॅस्टिकच्या कचऱ्याची बरीच गर्दी देखील दिसून आली. आपल्या परिसरातील किल्ले आजही या प्लास्टिकच्या विळख्यात अजून वेगाने अडकत असल्याचे दिसतात. हरिहर याच दिशेने वेगाने प्रगती करताना वाटला. बालेकिल्ल्याच्या पायर्‍या चढायला सुरुवात केली व मध्यावर जाऊन थांबलो. तेवढ्यात किल्ल्यावरील माकडांचे आमच्यावर आक्रमण झाले. ही माकडे माणसाळल्यासारखी अतिशय जवळ येत होती. अगदी बॅगला हात लावून तिथे काही सापडते का, याची देखील चाचपणी करत होती! दहा वर्षांपूर्वी हीच माकडे आम्हाला पन्नास फुटावरून बघून पळून गेली होती. आज त्यांची बरीच उत्क्रांती झालेली दिसली! उत्साही पर्यटकांमुळे किल्ल्यांवरील माकडे माणसाळतात आणि त्याचा त्रास सर्वांनाच होतो. तशीच गत झाली होती. उतरताना देखील या माकडांनी इतर पर्यटक आणि ट्रेकर्सना बराच त्रास दिला. कोणत्या प्राण्यांना भूतदया दाखवायची? याचे प्रशिक्षण देखील मानवप्राण्याला द्यायला हवे, असे वाटून गेले. माकडांना माणसाने टाकलेल्या खाद्य पदार्थांची सवय झाल्यामुळे आता ते स्वतःचे खाद्य स्वतः शोधताना दिसत नाहीत. पायर्‍या चढून वर गेल्यावर मुख्य दरवाजाच्या समोरच अजून एक दुकान थाटलेले दिसले. येथून वर जाण्याचा रस्ता लवकर समजत नव्हता. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो तोवर खालून येणाऱ्यांची बरीच गर्दी झालेली होती. शिवाय बराच आरडाओरडा देखील ऐकू येत होता. यावरूनच सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर काय अवस्था असेल, याचा अंदाज बांधता आला. एकेकाळी अतिशय निर्जन व शांत असलेला किल्ला एक 'भयावह' पर्यटन स्थळ झालेला दिसून आला. किल्ल्याच्या माथ्यावर माकडे नसल्यामुळे यावेळेस किल्ला पूर्ण बघता आला, हे सौभाग्यच मानावे असे होते. किल्ला उतरताना विविध प्रकारच्या पर्यटकांची गर्दी दिसून आली. वर सांगितल्याप्रमाणे हौसे, नवसे आणि गवशे अशा सर्वच श्रेणीतील सो-कॉल्ड ट्रेकर्स किल्ल्यावर येत होते. हाफ चड्डी घातलेले, टाईट जीन्स घातलेले आणि थ्री-फोर्थ पॅन्ट घालून देखील ट्रेकिंग करणारे अनेक नवट्रेकर्स किल्ला चढताना दिसले. सोशल मीडिया एखाद्या किल्ल्याला किती ग्लॅमरस रुप देऊ शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण हरिहरच्या रूपाने दिसून आले. खाली येईपर्यंत हर्षेवाडी गावात देखील वाहनांची बरीच गर्दी झालेली दिसली.
यंदाच्या नाशिक दौऱ्यातील पहिल्याच किल्ल्याची भ्रमंती एका वेगळ्या दृष्टिकोनातून करता आली, त्यासाठीच हा लेखप्रपंच.
 
 









Saturday, May 22, 2021

अणे घाट

जुन्नर मधल्या अनेक घाटवाटा यांपैकी बहुतेक हा सर्वात सोपा घाट आहे. घाट चढून वरती गेलं की, जुन्नर मधलं आणि पर्यायाने पुणे जिल्ह्यातलं सर्वात शेवटचं गाव अर्थात अणे गाव लागतं. याच गावावरून या घाटाला नाव मिळालं आहे. या घाटाचे वैशिष्ट्य म्हणजे याच परिसरामध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा नैसर्गिक पूल आहे. डोंगरावरून सातत्याने कोसळणाऱ्या पाण्याने हा नैसर्गिक पूल अनेक वर्षांपूर्वी तयार झालेला आहे. शिवाय या परिसरामध्ये बरीच मोठी निसर्गराजी दिसून येते. तसेच इथे मळगंगा मातेचे एक छोटेखानी मंदिर देखील आहे. घाटातील डोंगररांगा तशा फारशा विस्तीर्ण नाहीत. घाटा खालच्या एका गावातून वरील माथ्यावर एक छोटे मंदिर दिसून येते. खरं तर त्याचा पाठलाग करायचा होता. परंतु असे समजले की, डोंगराच्या खालच्या बाजूने मंदिरात जाण्यासाठी कुठली ही पायवाट अस्तित्वात नाही. त्या करिता घाट चढून वरच्या दिशेने जावे लागते. अर्थात मीही हाच मार्ग अवलंबिला.
घाट चढून वरती गेल्यावर उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता घाटाच्या डोंगर माथ्याच्या दिशेने जातो. त्याच दिशेने मीही मार्गक्रमण सुरु केले. बराच अंतर गेल्यावर रस्ता अधिक कठीण होत असल्याचे जाणवले आणि मी बर्‍यापैकी घाटाच्या डोंगरांवर आलो आहे, असेही जाणवले. इथून पुढे पायी चालावे म्हणून गाडी रस्त्याच्या कडेला लावली व पदभ्रमंती चालू केली. तसा हा परिसर निर्जन होता. अगदी दूरवर एखादं घर दिसून यायचं. बाकी सर्व परिसर हा शेतीचा होता. घाट महामार्गावर असल्यामुळे व इथल्या शांततेमुळे घाटातील गाड्यांचे आवाज व्यवस्थित ऐकू येत होते. शिवाय संध्याकाळच्या प्रसंगी आपल्या घरट्याकडे जाण्यासाठी चाललेली पक्ष्यांची किलबिलही व्यवस्थित ऐकून येत होती. पंधरा-वीस मिनिटांच्या भ्रमंतीनंतर काही घरे दिसून आली आणि तिथूनच दूरवर ते छोटेखानी मंदिर दिसून येत होते. तिथे जाण्याचा रस्ता फार बिकट नव्हता. एका छोट्याशा टेकडीच्या कडेकडेने मार्ग काढत मी मंदिराच्या दिशेने निघालो. थोड्याच अंतरावर टेकडी संपली आणि पुन्हा पश्चिमेकडे जाणारा सूर्य व्यवस्थित दिसायला लागला. एव्हाना मी पूर्णपणे घाटमाथ्यावर आलेलो होतो. खालचा रस्ता आता व्यवस्थित दिसत होता. वाहतुकीची हालचालही लक्षात येत होती. या ठिकाणी एक विस्तीर्ण माळरान दिसून आले. अनेक गुरे इथे चरत होती. पावसाळा संपून केवळ एकच महिना झाला होता. त्यामुळे गवत बऱ्यापैकी ओले व दाट होते. त्यातली पायवाट मात्र व्यवस्थित दिसत होती. कदाचित या रस्त्यावरून सातत्याने ये-जा होत असावी, असे वाटले. मंदिर आता खूपच जवळ आले होते. दोनच मिनिटाच्या प्रवासानंतर मी मंदिराच्या जवळ पोहोचलो. अतिशय छोटा उंचवटा व त्यावर बांधलेले ते मंदिर खूप सुंदर भासत होते. थोड्याच अंतरावर काहीशी झाडी दिसू लागली. शिवाय अजूनही परिसर निर्जन होता. मंदिराच्या प्रवेशद्वारी एक श्वान कदाचित त्याचे रक्षण करत असताना दिसत होता. दूरदूरवर केवर माळरान दिसत होते. मी घाटाच्या डोंगरांच्या बरोबर मागच्या बाजूला आलेलो होतो. एक नितांत शांतता या ठिकाणी अनुभवायला मिळाली. तिचा आनंद घेत पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो. परत फिरताना घाटाचा व्यवस्थित अंदाज येत होता. डोंगराच्या दिशेने जाऊन रस्त्यांची पाहणी केली. झाडी फारशी नव्हतीच. त्यामुळे डोंगरमाथ्यावरून घाटातील वळणदार रस्ते व्यवस्थित दिसत होते. माळशेज घाटापुढे या घाटाची उंची तशी काहीच जाणवली नाही. पण एका आगळ्या वेगळ्या वाटेने डोंगरमाथ्यावर फिरण्याचा आनंद मात्र घेता आला.
 









Friday, May 7, 2021

कानिफनाथाच्या डोंगरावर

हायवेवरून दुरच्या डोंगरावर असणारं ते मंदिर बऱ्याचदा मी पाहिलं होतं. पण तिथे जाण्याचा निश्चित रस्ता माहीत नव्हता. अशावेळी गुगल मॅप पुन्हा मदतीला धावला. आळे गावाच्या बरोबर मागच्या डोंगरांमध्ये असणारं ते मंदिर गुगल मॅपवर शोधून काढलं. हे मंदिर होतं कानिफनाथाचं आणि गाव होतं कोळवाडी. दुपारचं ऊन ओसरल्यानंतर आळे गावात प्रवेश केला. इथून एक रस्ता संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी मंदिराकडे अर्थात संतवाडीच्या दिशेने जातो. याच रस्त्यावर थोड्या अंतरावर एक फाटा उजवीकडे कोळवाडीच्या दिशेने जातो. हे वळण घेतलं आणि समोरच्या डोंगरावर कानिफनाथाचे ते मंदिर दिसून यायला लागलं. मुख्य फाट्यापासून सुमारे दोन किलोमीटरवर कोळवाडी गाव असावं. गावात पोहोचल्यावर पुनश्च एक रस्ता उजवीकडे डोंगराच्या दिशेने जाताना दिसला. हा डांबरी रस्ता नसला तरी त्याची स्थिती बर्‍यापैकी चांगली होती. आजूबाजूला फक्त शेतीच शेती नजरेत येत होती. दहा मिनिटांमध्ये मी डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या एका जंगलामध्ये पोहोचलो. इथे पुर्णतः शांतता होती. फक्त झाडांवर फिरणाऱ्या पक्ष्यांचे आवाज येत होते. मानवी अस्तित्वाचा कोणताच आवाज ऐकू आला नाही. जंगलाच्या सुरुवातीलाच गाडी पार्क केली आणि पदभ्रमंतीला सुरुवात केली. वारा नसल्यामुळे जंगलातील सर्व झाडे स्तब्ध होती. थोड्याच वेळामध्ये जंगल संपले आणि डोंगरावर जाणाऱ्या पायवाटेला सुरुवात झाली. सुरुवातीलाच सिमेंटच्या पायऱ्या याठिकाणी बनवलेल्या दिसून आल्या. कदाचित या मार्गाने नियमितपणे गावकरी डोंगरावर कानिफनाथांच्या दर्शनाला जात असावेत. थोडं चढुन गेल्यावर पायवाट आणखीन मळलेली दिसून आली. पायऱ्या संपल्या होत्या. पण दगडांच्या साहाय्याने अनेक ठिकाणी पायऱ्या निर्मिल्याच्या दिसून येत होत्या. झाडांची गर्दी कमी झाली होती. पण डोंगरावरून आलेले मोठमोठाले दगड रस्त्यामध्ये दिसून येत होते. पावसाळ्यात याच मार्गाने पाणी खाली येत असावे, असेही भासत होते. वाट उत्तम आणि वळणावळणाची होती. सूर्य मावळतीकडे झुकत होता आणि मी सूर्याच्या विरुद्ध दिशेने डोंगरावर चढत चाललो होतो. उन्हाची तीव्रता कमी झाली असल्याने दमछाक होत नव्हती. अगदी पंधरा मिनिटांमध्येच डोंगराच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचलो. येथून आजूबाजूचा विस्तीर्ण परिसर नजरेच्या टप्प्यात आला होता. शिवाय दूरवर सूर्यकिरणांचा अभिषेक होत असलेला नारायणगड किल्लाही व्यवस्थित दिसत होता. सूर्यकिरणांच्या वर्षावामुळे आजूबाजूचा परिसर प्रकाशमय झाला होता. त्यामुळे मध्यभागी असलेला नारायणगड अधिक उठून दिसत होता. पहिला डोंगर संपल्यानंतर थोडीशी सपाटी लागली आणि पुढच्या चढाकडे मार्गक्रमण चालू केले. इथपर्यंत पायवाट अतिशय चांगली होती. पुढची पायवाट काही शांत जंगलातल्या रस्त्याने पुढे जात होती. चढण सुरु झाली नि पायर्‍यांची रचना केलेला रस्ता दिसू लागला. डोंगराच्या वरच्या भागात असलेले हे जंगल पायथ्यापासूनही व्यवस्थित दिसत होते. इथे पोहोचल्यावर मात्र त्याची शीतलता मन प्रसन्न करून गेली. आता चढाईचा रस्ता सुरू झाला होता. ही चढण आधीच्या सर्व चढणीपेक्षा अधिक तीव्र होती. परंतु पायर्‍यांचा मार्ग असल्याने ती अवघड जाणवत नव्हती. आजूबाजूला उगवलेले गवत अजूनही आपला हिरवा रंग ठेवूनच होते. वळणावळणाची ती वाट हळूहळू डोंगरमाथ्याकडे जाऊ लागली. अतिउच्च माथ्यावर पोहोचल्यावर वरील मंदिराचे अस्तित्व झाडीतून दिसायला लागले होते. डोंगराच्या पूर्ण माथ्यावर आलो तेव्हा पुन्हा सूर्यकिरणे अंगावर पडायला लागली व समोरच पूर्ण मंदिर स्पष्ट दिसायला लागलं. अलीकडच्या काळातच त्या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार झाला असावा, असे दिसले. शेजारीच रहाण्यासाठी एक छोटेसे झोपडीवजा घर दिसून आले. मी मंदिरापाशी पोहोचलो तेव्हा आजूबाजूला कोणीही नव्हते. एव्हाना मागच्या बाजूचा परिसरही दिसायला लागला होता. मागील बाजूस बऱ्याच अंतरापर्यंत झाडीच झाडी दिसून आली. जंगलाची घनता मात्र अधिक नव्हती. शिवाय त्या बाजूने डोंगरावर उतरण्यासाठी एक पायवाट जाताना दिसली. समोरच्या डोंगरावर दूरवर एक छोटेखानी दर्गा दिसत होता. डोंगराच्या पायथ्यापासून हे दोन्ही डोंगर सलग वाटत होते. परंतु इथे आल्यावर ते एकमेकांपासून वेगळे असल्याचे दिसले. समोरच्या डोंगरावरील दर्ग्याकडे जाण्यासाठी कानिफनाथांचा हा डोंगर पूर्ण उतरून समोरचा डोंगर चढावे लागत होते. पायवाटेने थोडे खाली उतरलो आणि उजव्या बाजूला एका भव्य पाषाण नजरेस पडला. तिथे बसून समोरचा विस्तीर्ण परिसर न्याहाळता येऊ शकत होता. मनन, चिंतन आणि ध्यान करण्यासाठी ही एक सर्वोत्तम अशी जागा होती. सूर्य बऱ्यापैकी पश्चिम क्षितिजाकडे झुकलेला होता. त्यामुळे सूर्याची कोवळी किरणे अंगावर तीव्रतेने पडत नव्हती. या ठिकाणी बसून समोरचा परिसर तासनतास न्याहाळत बसावा, असे वाटत होते. पण दहा मिनिटांमध्ये मी घरी लवकर जायचे म्हणून तेथून काढता पाय घेतला. पुन्हा मंदिरापाशी आलो तोवर कोणीतरी वाटसरू मंदिरात आल्याचा दिसला. मंदिराच्या मागच्या बाजूने पुन्हा परतीच्या वाटेला लागलो. उतरताना मात्र फारसे कष्ट पडले नाहीत. परंतु एक सुंदरश्या ट्रेकचा आनंद घेतल्याचे समाधान मात्र लाभले.
#ऑक्टोबर #२०२०

 












 



Wednesday, January 20, 2021

अविस्मरणीय दौंड्या

कोरोना विलगीकरणाचे ते १४ दिवस संपता संपत नव्हते. एक-एक दिवस मोजत पूर्ण केला आणि हा कालावधी संपल्यानंतर पाचव्या दिवशी आठ महिने घरी बसून काढलेला दुष्काळ संपवण्याची वेळ आली. जुन्नर मधला नवीन पर्वत सर करण्याचे ध्येय होते. त्यातच माळशेजच्या रांगेमध्ये असलेला दौंड्या डोंगर सापडला.
फेसबुकवर वाचलेली जुजबी माहिती ज्ञात होती. तिच्या आधारावर ट्रेकिंगच्या नव्या मोसमाची सुरुवात आम्ही करणार होतो. ऑक्टोबर महिना आणि गारवा यांचं फार असं नातं नसतं पण पहाटे पहाटे थोडी का होईना थंडी जाणवत असते. याच थंडीमध्ये सकाळी सहा वाजता मार्गक्रमण सुरू केले. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी याच डोंगरावर एक आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे विमान कोसळले होते. त्यामुळे हा डोंगर इथल्या लोकांना विशेष परिचित आहे. सकाळी सातच्या सुमारास आम्ही तळमाची गावामध्ये पोहोचलो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ मधून आत गावाकडे जाणारा वळणावळणाचा व काहीसा घाट मार्ग असलेला रस्ता मात्र अतिशय सुंदर आहे. पावसाळ्यात बहरलेली झाडी वातावरणात गारवा निर्माण करत होती. गावामध्ये पोहोचलो तोवर सुर्योदय झालेला होता. तळमाचीच्या तीनही बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या दिसल्या. बऱ्याच ठिकाणी सरळसोट कडे आहेत आणि या कड्यांच्याच मागच्या बाजूला माळशेज घाट आहे. डोंगराकडे बघितल्यावर वाटत नाही की इथून वर माथ्यावर जायला रस्ता असावा. तो शोधून काढण्याचे पहिले आव्हान आमच्यासमोर होते. गावांमध्ये एकाला रस्ता विचारला. त्यांने माहिती सांगितली. पण प्रत्यक्ष चालायला सुरुवात केल्यावर आपण जंगलातील न मळलेल्या वाटेवर चालत आहोत, हे ध्यानात आले. वाट चुकली तर होतीच. पण त्यातूनही मार्ग काढत काढत आम्ही जंगलातल्या एका मळलेल्या वाटेला लागलो. जंगल बर्‍यापैकी घनदाट होतं पण पायवाट देखील तितकीच सहज व सुंदर होती. ती पाहता या वाटेने सातत्याने लोकांची ये-जा असावी असे वाटले. कदाचित जंगलांमध्ये लाकडे तोडण्यासाठी लोक येत असावेत. आता वाट रस्त्याच्या दिशेने जात होती. वातावरण तसं स्तब्ध होतं होतं. अधून-मधून रस्त्याच्या कडेला डोंगरावरून तुटून आलेले मोठमोठाले दगड दिसून यायचे. त्याला वळसा घालून पुन्हा मळलेल्या वाटेला लागायचो. अगदी थोड्याच वेळात चढण सुरू झाली. काही ठिकाणी दगड व्यवस्थित रचून रस्ता तयार केलेला होता. चढण फारशी खडी नव्हती. अगदी लहान मुलेही व्यवस्थित या रस्त्याने चालू शकतील, असे वाटून गेले. थोडेच वरती गेल्यावर जंगलाच्या वरच्या भागात आम्ही पोहोचलो. इथून तळमाची गाव व्यवस्थित दिसत होतं. सूर्याची ढगांबरोबर लपाछपी चाललेली होती. रस्ता योग्य आहे, याची खात्री करून आम्ही पुन्हा मार्गक्रमण चालू केले. अनेक ठिकाणी रस्ता खोदून तयार केल्याचे दिसत होते. काही ठिकाणी तर माथ्यावरुन येणारे झुळझुळ पाणी रस्ता पार करताना दिसत होते. डोंगर चढाई सुरू झाल्यानंतर मात्र आजूबाजूला फारशी झाडे दिसली नाहीत. एव्हाना दुरवर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही व्यवस्थित दिसत होती. डोंगर चढणीच्या मध्यावर गेल्यावर माथ्याच्या दिशेने काही लोक रस्ता उतरताना दिसले. आता मात्र आमची वाट योग्य आहे, याची खात्री झाली. ते झपाझप पावले टाकत खाली उतरत होते. आम्ही मात्र अनेक महिन्यांचा वनवास संपवून अतिशय आनंदाने रमत-गमत डोंगर चढत चाललो होतो. दूरवरून या उंच डोंगराला कुठून रस्ता असेल, याची खात्री नव्हती. पण रस्ता मात्र अतिशय सुंदर तयार झालेला दिसला. डोंगर बऱ्यापैकी चढून आल्यावर एक मोठी घळ दिसून आली. आजूबाजूला अजस्त्र दगड चक्क लोंबकळताना दिसत होते. कदाचित ते कधीही पडतील, अशी परिस्थिती होती. त्याच्याच कडेकडेने आमची चढाई चालू राहिली. घळी मधून अजूनही झुळझुळ वाहणारे पाणी व त्याचा खळखळाट जाणवत होता. याठिकाणी भर पावसाळ्यामध्ये चांगला मोठा धबधबा असावा, असे जाणवले. थोडं आणखी चढून आल्यावर आम्ही लवकरच माथ्यावर पोहोचलो. माळशेजच्या सर्व डोंगररांगा तसे सिंदोळा आणि निमगिरी किल्ला आता व्यवस्थित दिसत होता. सूर्याची कोवळी किरणं अंगावर येत होती. अशा वातावरणात फोटोग्राफीचा मोह मात्र आवरला नाही. इथून पुढचा रस्ता शोधायला लागणार होता. समोरच काही कच्ची घर दिसून आली. जवळ जाउन पाहिले तर तिथे कुणीही राहत नव्हते. पाळीव प्राण्यांना विशेषतः गाई-म्हशींना बांधण्यासाठी त्या घरांचा वापर होत असावा, असे दिसले. आम्हाला माळशेजच्या डोंगरांवर जायचे होते म्हणून घरांच्या उजव्या बाजूने मार्गक्रमण चालू केले. माथ्यावर जंगल फारसे घनदाट नव्हते. अजूनही बऱ्याच ठिकाणी पावसाचा ओलावा जाणवत होता. इथे फुलपाखरांची काही कमी नव्हती. वातावरणात बऱ्यापैकी शांतता होती. त्यामुळे पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ऐकू यायचे. डोंगरमाथ्यावर उजव्या बाजूने कडेकडेने आम्ही मार्ग शोधायला सुरुवात केली. पुढे गेल्यावर जंगलाच्या आत जाणारा रस्ता होता. तो आम्ही पकडला पण दुरून कोणीतरी आम्हाला पाहिले होते. त्याने ओरडूनच उजव्या बाजूचा रस्ता पकडा असे आम्हाला सांगितले. इतक्या लांबून कोणीतरी आम्हाला पाहत आहे, याचे जरा आश्चर्य वाटले. रस्ता दाखवणारा मार्गदर्शक मिळाल्याने आमचे काम सोपे झाले होते. थोडं अंतर चालून गेल्यावर दोन डोंगरांना जोडणारा एक अतिशय रुंद रस्ता होता. या जागेला वानरदरा असे म्हटले जाते. तो ओलांडून पुढे आलो तर दूरवर अस्वलदरा दिसून आला. अतिशय छोट्या प्रवाहासह जमिनीवर कोसळणारे धबधब्यांचे आवाज ऐकू यायला लागले होते. डोंगराच्या मागच्या बाजूला आलो तर जुन्नर मावळातला सर्व परिसर दिसून आला आणि समोर दिसत होता नाणेघाटातील जीवधन किल्ला! जीवधन किल्ल्याची इतक्या लांबून एका वेगळ्याच डोंगरावरची छटा आम्ही पहिल्यांदाच पाहिली. नाणेघाट जवळ असला तरी नानाचा अंगठा काही दिसला नाही मावळातला खूप मोठा परिसर मात्र नजरेत आला होता. अगदी अंजनावळे गावातली वऱ्हाडी रांगही स्पष्ट दिसत होती. या डोंगराचा माथा पहिल्यांदाच पाहायला मिळाला. सहसा तो कोणत्याही इतर डोंगरावरून दिसत नाही. अगदी जीवधन किल्ल्यावरूनही नाही. दौंड्याच्या मागच्या बाजूला देखील तितकीच मोठी झाडी आहे आणि आणि दूरवर वसलेली छोटी आदिवासी गावेही आहेत. त्यांचं निरीक्षण करत या टोकावर आम्ही बसलो. वातावरणातील गारवा मनाला प्रसन्न करत होता. दौंड्याचा पहिला टप्पा आम्ही समर्थपणे पार केला होता व त्याचा आनंद घेत होतो. इथून पुढे पुन्हा वाटचाल सुरू केली. जायला पुन्हा दोन वाटा होत्या त्यापैकी डावी वाट निवडली. माथ्यावर गाईंचे सर्वत्र पडलेले शेण पाहून इथे जनावरांचा सातत्याने वावर असावा, असे दिसले. मनुष्य प्राण्याचा वावर मात्र कुठेच नव्हता! दहा मिनिटांच्या वाटचालीनंतर आम्ही एका मोठ्या पठारापाशी पोहोचलो. समोर आणखी एक टेकडी होती. ती खालूनही आम्हाला दिसली होती. याच टेकडीवर एक छोटेखानी मंदिर बांधलेले आहे. तिथे जाणारी पायवाट सापडत नव्हती. कदाचित ती दुसऱ्या बाजूने असावी, असे वाटून गेले. म्हणून उगलेल्या गवतातूनच आम्ही आमची पाय वाट तयार केली व त्या माथ्याच्या दिशेने जाऊ लागलो. एव्हाना पोटात कावळे ओरडायला लागले होते. म्हणून पुढे जाण्याआधी एखादी रिकामी जागा शोधली व पेटपूजा उरकून घेतली. त्यामुळे तरतरी आली होती. आता आम्ही त्या माथ्याच्या अगदी समोर होतो. त्याच्या उजव्या बाजूने एक रस्ता पुढे जात होता. तिथून मार्गक्रमण चालू केले. परंतु टेकडीवर जाण्याचा रस्ता मात्र सापडला नाही. तिच्या कडेकडेने जंगलातून जाणारी वाट आम्ही धरली. हीसुद्धा बऱ्यापैकी मळलेली होती. डोंगर पायथ्याचा बराच मोठा परिसर जंगलांनी व्यापलेला दिसत होता. पहिली टेकडी मागे पडली तर पुढे आणखी तशीच टेकडी दिसून आली. ती मात्र सरळसोट होती. तिच्यावर कोणत्याही प्रकारचे मंदिर दिसून आले नाही. किंबहुना तिच्यावर जाण्यासाठी रस्ताही नसावा. काही अंतरावर अनेक प्रयत्न करून देखील पुढचा रस्ता सापडला नाही. कदाचित पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा वाटा नष्ट झाल्या असाव्यात. तिथे आम्ही डोंगराच्या तिसऱ्या टप्प्यावर होतो. येथून दुसर्‍या टप्प्यावर दूरवर एका पानवठ्यापाशी सांबराचे दर्शन झाले. तसे पाहिले तर सांबर एकटी फिरत नाहीत. पण ते एकटेच दुडूदुडू फिरताना दिसले. त्याला आमची चाहूल लागली असावी, म्हणून त्याने लगेच जवळच्या झाडीमध्ये झेप घेतली व ते गायब झाले. आमच्या प्रवासाचा हा अंतिम बिंदू होता. येथून पुन्हा माघारी फिरायचे आम्ही ठरवले. जंगलातली आणखी कोणती वाट सापडते का, ते पाहिले. पण त्यात यशस्वी झालो नाही. परतीच्या वाटेने अतिशय कमी वेळात आम्ही पुन्हा पायथ्याशी पोहोचलो. येताना चुकलेली वाट पुन्हा समजली. गावांमध्ये पोहोचलो तेव्हा वर जाण्याची योग्य वाट कोणती, हे ध्यानात आले.
तीन ते चार तासांचा कित्येक महिन्यांपासून रखडलेला ट्रेक सफल झाला होता. परतीच्या वाटेत गाडीमध्ये बसलो आणि पुढच्या प्रवासाची अर्थात ट्रेकची मनोमनी तयारी सुरू केली.



















Sunday, January 10, 2021

एका अतिदुर्गम किल्ल्याची भ्रमंती

स्वातंत्र्यपूर्व काळातील गोष्ट आहे. हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांमध्ये विश्रांती घेण्यासाठी एक ब्रिटिश अधिकारी नियमितपणे येत असे. तो या परिसरात निवासास असायचा. स्थानिक लोक या अधिकाऱ्याला पोप असे म्हणायचे व तो दर रविवारी अर्थात संडेच्यादिवशी या ठिकाणी मुक्कामास असायचा. याच कारणास्तव या भागातील गावाला अपभ्रंशित असे "फोफसंडी" नाव पडले.
नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भागात हे निसर्गरम्य गाव वसलेले आहे. पुणे आणि नगर जिल्ह्याची सीमा व डोंगरदऱ्यात वसलेल्या परिसर ही या गावाची मुख्य ओळख होय. या गावामध्ये शिवकालीन कुंजरगड किल्ला आहे. गावात जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्यामुळे या गडावर भ्रमंती करण्यासाठी फारशी वर्दळ नसते. परंतु शिवस्पर्श लाभलेला हा किल्ला एकदा तरी सर करायचा, असे आम्ही मनोमन ठरवले होते. त्यानिमित्ताने फोफसंडी मधील अद्भुत निसर्गही पाहता येईल, अशी आमची मनीषा होती.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर वसलेले जुन्नर मधील उदापूर हे गाव होय. या गावातून उत्तरेकडे एक डांबरी रस्ता जातो. या मधल्या डोंगररांगांमध्ये मांदारने घाट आहे. तो ओलांडला की मांडवी नदीचं खोरं सुरू होतं. मुथाळणे, मांडवे व कोपरे ही गावे संपली की जुन्नर तालुका व पर्यायाने पुणे जिल्हाही समाप्त होतो.
इथवर रस्त्याची स्थिती अत्यंत चांगली होती. परंतु, कोपरे गाव संपले आणि रस्त्याचा खळखळाट चालू झाला. डोंगर-दर्‍यांमधे वेढलेला निसर्ग मात्र मन प्रफुल्लित करणारा होता. डाव्या बाजूला उंचच उंच कड्यांनी सजलेले हिरवेगार डोंगर आणि उजव्या बाजूला दरीमधून वाहणारी मांडवी नदी. अशा वातावरणात आमचा प्रवास चालू झाला. या दुर्गम भागामध्ये अनेक मोठाले धबधबे दिसून येतात. ऑक्टोबरचा काळ असल्यामुळे त्यांच्यातील प्रवाह बराच कमी झाला होता. हे सर्व पाणी मांडवी नदीच्या पात्रात जात असावे. मांडवी नदीपात्र दोन्ही बाजूंनी डोंगरदऱ्यांनी वेढलेले आहे. तिचा असा प्रवाह पाहिला की, काश्मीरच्या खोऱ्यामधून वाहणार्‍या सिंधू नदीची आठवण होते. ही नदी फोफसंडी गावातच उगम पावते. तिथपासून चिल्हेवाडी धरणापर्यंत ती केवळ डोंगरदऱ्यातूनच वाहत येते.
फोफसंडीला जोडणारा हा रस्ता चार चाकी गाडीसाठी मात्र निश्चितच योग्य नव्हता. त्यामुळे चांगला रस्ता कधी लागेल याची वाट बघतच आम्ही त्या हिरव्यागार परिसरातून भ्रमंती सुरू ठेवली होती. पंधरा ते वीस मिनिटातच दूरवर डोंगरातच्या पायथ्याशी फोफसंडी गाव नजरेस पडले. एव्हाना सूर्योदय झाला होता. सूर्यकिरणे गावातील घरे उजळवून टाकत होती. अशा वातावरणातच आम्ही गावात प्रवेश केला. गावच्या मुख्य वेशीसमोरून एक रस्ता उत्तरेकडील डोंगराकडे जात होता. त्याची स्थितीही फारशी चांगली नव्हती. परंतु स्थानिक गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तिथून किमान दोन चाकी गाडी तरी वरील जांभळे वस्ती पर्यंत जाते. त्यामुळे त्या अवघड वाटेने आमचा खडतर प्रवास सुरू झाला. जसजसे आम्ही वर जाऊ लागलो तसतसा आजूबाजूचा परिसर दृष्टीच्या टप्प्यात येऊ लागला होता. परंतु, वाट ही बिकट होती. उत्तरेच्या वाटेवर आम्हाला कुंजरगड किल्ला दृष्टीस पडला. स्थानिक लोक त्यास कोंबड किल्ला असेही म्हणतात. त्याचे कारण माहीत नाही. परंतु किल्ल्याची रचना हत्तीच्या सोंडेप्रमाणे असल्याने त्यास कुंजरगड म्हणत असावेत, असे वाटते. कारण 'कुंज' या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती असा होतो.
साधारणत: दीड ते दोन किलोमीटर अंतर पार केल्यावर डोंगरावर एक छोटी वस्ती लागली. हीच ती जांभळे वस्ती होती. तिथे गेल्यावर पहिल्यांदाच आम्ही मागे वळून पाहिले. दूरदूरवर आम्ही पार केलेल्या डोंगररांगा दिसत होत्या. जुन्नरमध्ये असणारी हटकेश्वर डोंगररांग व तिच्यावरील नैसर्गिक पूल अगदी स्पष्ट दिसत होता. म्हणजे इतकी पायपीट करूनही आम्ही फार लांब आलो नव्हतो, हे ध्यानात आले! पुणे आणि नगर जिल्ह्याची सिमा असणारा रांजना डोंगर आकाशाकडे टोक दाखवत उभा असलेला दिसला. या ठिकाणावरून आमची खरी चढाई चालू झाली. जुन्नरपेक्षा दाट रानवाटा याठिकाणी दिसून येत होत्या. पावसामुळे वरून घसरत आलेले दगड रस्त्यांवर चहुकडे पडलेले होते. त्यातूनच मार्ग काढत आम्ही चढाई चालू ठेवली. दहा मिनिटांमध्ये पहिला टप्पा पार केला. इथे एक छोटेखानी आदिवासी घर बांधलेले होते. आता मात्र किल्ल्याचा मुख्य बुरुज व्यवस्थित दिसायला लागला. शिवाय उत्तरेपर्यंत किल्ला व त्यातील ढासळलेले बुरुज नजरेस पडत होते. बहुतांश किल्ल्यांवर शिवकाळात बांधलेल्या बुरुजांचे अवशेष दिसून येत नाहीत. परंतु, इतक्या दुर्गम भागात असूनही या किल्ल्यावरील दोन्ही बाजूंचे बुरुज बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत दिसून येत होते.
किल्ल्याची इथून पुढची चढण मात्र गवताळ वाटेने जाणारी होती. ऊन लागलं होतं. पण आम्ही बऱ्याचशा उंचीवर आल्याने त्याची तीव्रता जाणवत नव्हती. थंड हवेचे झोत अंगावर येत होते. त्या गवताळ पायवाटेने समोरचा भग्न बुरुज समोर ठेवून आम्ही भ्रमंती चालू ठेवली. ही पायवाट वगळता अन्य ठिकाणी बऱ्यापैकी झाडी होती. पायवाट संपली तिथून पुढे काही अंतरावर ढासळलेला बुरुज दिसून आला. हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा नव्हता. त्यामुळे त्या तुटलेल्या अवशेषांवरून किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी थोडीशी कसरत करावी लागली. ती फारशी अवघड नव्हती. बुरुज चढून आल्यावर आम्ही किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो. किल्ल्याचे दक्षिण-उत्तर टोक व्यवस्थित दिसत होते. अगदी हत्तीच्या सोंडेप्रमाणे उत्तरेकडचे टोक लांब असल्याचे दिसले. किल्ल्याचा पूर्ण परिसर रानगवताने आच्छादित झाल्याचा दिसत होता. येथून उजव्या बाजूने एक पायवाट उत्तरेकडे जाताना दिसली.
थोड्याच अंतरावर थंड व शुद्ध पाण्याचे मानवनिर्मित टाके दिसून आले. तसं पाहिलं तर अशी नऊ ते दहा टाकी या किल्ल्यावर बांधलेली आहेत. त्यामधील पाणीही बऱ्यापैकी शुद्ध आहे. या भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे जवळपास सर्वच टाकी काठोकाठ भरल्याची दिसत होती. किल्ल्याच्या मध्यभागी एका उघड्या जागेत महादेवाची पिंडी स्थापन केलेली होती व त्यासमोरच एक पाषाणातून निर्मित नंदी महादेवाला नमन करत होता. या उघड्या मंदिराच्या मागे किल्ल्यावरील वाड्यांचे अवशेष दिसून आले. इतिहासातील नोंदींनुसार सन १६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर मुक्काम केला होता. कदाचित ते याच वाड्यामध्ये थांबले असावे. शिवस्पर्श लाभलेला असा किल्ला पाहणे म्हणजे एक ऐतिहासिक रोमांच असतो, याची जाणीव त्या क्षणी झाली. किल्ल्याच्या उत्तर टोकाकडे जाताना त्याची रचना लोहगडाच्या विंचूकड्यासारखी भासत होती. मागचा भाग आता अधिक स्पष्ट दिसत होता. हरिश्चंद्रगडाच्या रांगा व्यवस्थित दिसू लागल्या होत्या. या डोंगररांगांमधील अनेक खेडी असे विहीर, कोठाळे, शिंदे, कोहणे ही गावे किल्ल्यावरून दृष्टीस पडत होती. किल्ल्याची प्रत्यक्ष उंची या बाजूने खऱ्या अर्थाने ध्यानात येत होती. विहीर गावातून येणारा रस्ता हा पूर्णपणे पायवाटेचा असावा असे दिसले. पुढे थोड्याच अंतरावर एक मानवनिर्मित गुहा होती. परंतु, ती पाण्याने पूर्ण भरलेली दिसून आली व त्या भोवती मोठ्या प्रमाणात गवत उगलेले होते. किल्ल्याचे उत्तरेकडील टोक गाठले तेव्हा अकोले तालुक्यातील बहुतांशी भाग नजरेच्या टप्प्यात आला होता. दूरदूरची खेडी व त्यांना जोडणारे छोटेखानी रस्ते असा हा सारा नजारा या ठिकाणावरून दिसत होता. फोफसंडी गावातून मागच्या बाजूला यायचे म्हणजे समोरील डोंगररांगेला कमीत कमी पस्तीस ते चाळीस किलोमीटरचा वळसा घालावा लागत असावा, असे दिसले. पूर्वेकडील दरीमध्ये मांडवी नदीचे उगमस्थान होते. येथूनच दरीच्या वाटेने अनेक वळणे घेत मांडवी नदी प्रवास करत असताना दिसली. सह्याद्रीचे उंच उंच डोंगर व त्यामध्ये वसलेल्या कुंजरगड किल्ला असा अद्भुत संगम या ठिकाणावरून दिसत होता.
किल्ल्याची शेवटचे टोक गाठल्याने आम्ही दुसऱ्या बाजूने मागे जाण्यास सुरुवात केली. पुन्हा किल्ल्याच्या मधोमध आल्यानंतर डावीकडे बर्‍यापैकी चांगली वाट खाली जाताना दिसली. ही किल्ल्यावर येण्या-जाण्याची मुख्य वाट होती. कोहणे तसेच फोफसंडी गावातून येणारी किल्ल्यावरील वाट या ठिकाणी एकत्र येते. शिवकालामध्ये या ठिकाणी कदाचित किल्ल्याचा महादरवाजा असावा. त्याचे अवशेष मात्र तिथे दिसत नाहीत. या वाटेने आम्ही खाली उतरलो. अगदी थोड्याच अंतरावर डावीकडे एक मोठी निसर्गनिर्मित गुहा होती. वीस पंचवीस लोक इथे सहज उभे राहू शकतील इतकी भव्य जागा होती. शिवाय समोरील डोंगररांगा व जंगलं या जागेवरून स्पष्ट दिसत होती. इथून पुढची पायवाट जंगलातून जाणारी दिसली. अगदी दोनच मिनिटांच्या अंतरावर पुन्हा डावीकडे एक मानव निर्मित गुहा दिसून आली. एखाद्या लेण्यासारखी रचना येथे करण्यात आली होती. त्यावर कोणीतरी "भुयार" असे पेन्ट केल्याचे दिसले.  कुंजरगडावरील हे सर्वोत्कृष्ट प्रेक्षणीय स्थळ होय. कारण ही मानवनिर्मित गुहा म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण भुयार आहे. या भुयारातून आत गेल्यानंतर किल्ल्याच्या दुसर्‍या बाजूचा पूर्ण परिसर पाहता येतो. याचा अर्थ या भुयारातून किल्ल्याच्या दोन्ही बाजूंना व्यवस्थित टेहाळणी करता येऊ शकते. कदाचित याच उद्देशाने त्याची निर्मिती असावी. किल्ल्याच्या सोंडेला भोक पाडून या भुयाराची रचना झाली असल्याचे दिसते. त्यात बऱ्यापैकी पाणी साठलेले होते.
भुयाराची अनुभूती घेतल्यानंतर आम्ही परतीच्या वाटेला लागलो. डावीकडील रस्ता कोहणे व विहीर गावाकडे जातो तर उजवीकडील पुन्हा फोफसंडीमध्ये उतरतो. दोन्ही रस्ते दाट झाडीमध्ये स्थित आहेत. आम्ही फोफसंडीच्या रस्त्याला लागलो तेव्हा किल्ला उजव्या बाजूला दिसून येत होता. वरील पूर्ण तटबंदी पुन्हा न्याहाळता येत होती. १५ ते २० मिनिटांच्या पायपिटीनंतर आम्ही पुन्हा जांभळे वस्तीमध्ये येऊन पोहोचलो.
एकंदरीत दोन तासांचा हा प्रवास होता. एक अनवट वाटेवरील अपरिचित किल्ला पाहण्याचा प्रसंग त्यादिवशी आम्ही अनुभवला. इथून अकोले तालुक्यातील कोतुळ गाव ४० किलोमीटर अंतरावर आहे. त्या बाजूनेही किल्ल्याला भेट देता येते. शांत आणि निसर्गरम्य वातावरणातील तसेच शहरी वर्दळीपासून दूर असलेल्या एखाद्या किल्ल्याला भेट द्यायची असल्यास कुंजरगड नक्की अनुभवावा असाच आहे.