माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label स्मारक. Show all posts
Showing posts with label स्मारक. Show all posts

Tuesday, July 14, 2026

होदिगेरे येथील शहाजीराजांची समाधी!

चित्रदुर्ग किल्ल्याची ऐतिहासिक सफर आटोपून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो. गावाबाहेर पडताना एका बायपास रस्त्यावरील चार्जिंग स्टेशनवर आम्ही गाडी चार्ज केली आणि एका अत्यंत महत्त्वाच्या व तितक्याच भावनिक स्थळाकडे रवाना झालो. चित्रदुर्गापासून साधारणपणे ५५ किलोमीटर अंतरावर असणारी स्वराज्य संकल्पक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील, शहाजीराजे भोसले यांची समाधी आम्हाला पाहायची होती. दुपारचे जवळपास दोन वाजत आले होते आणि सूर्य माथ्यावर आला होता. चित्रदुर्ग-शिवमोगा या मुख्य महामार्गावरून प्रवास करताना, होळळकेरे गावात पोहोचल्यावर आम्ही उजव्या बाजूच्या रस्त्याकडे प्रस्थान केले. हा रस्ता अतिशय नयनरम्य होता. आजूबाजूला पसरलेल्या सुपारीच्या बागांमधून जाणारा तो छोटेखानी रस्ता अगदी सुस्थितीत आणि खड्डेमुक्त होता. निसर्गाची ती हिरवीगार शांतता अनुभवत आम्ही होदिगेरे गावातल्या शहाजीराजांच्या समाधीपाशी पोहोचलो.

या गावाच्या थोड्याशा बाहेरील आणि एकांत असलेल्या भागात शहाजीराजांची ही समाधी स्थित आहे. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा त्या दिवशी तिथे आमच्याव्यतिरिक्त इतर कोणीही नव्हते. आजूबाजूचे वातावरण उष्ण असले तरी आकाशात ढगांची गर्दी असल्यामुळे उन्हाचा थेट कडाका जाणवत नव्हता. समाधीच्या परिसराला चारही बाजूंनी एखाद्या सार्वजनिक बागेप्रमाणे भक्कम कुंपण घालून अत्यंत सुरक्षित केल्याचे आम्हाला दिसले. जेव्हा आम्ही मुख्य दरवाजापाशी गेलो, तेव्हा तो दरवाजा बंद होता. दुरून पाहिल्यावर तिथे कुलूप लावल्यासारखे वाटत होते. परंतु, अगदी जवळ जाऊन पाहिल्यावर समजले की, कुलूप जरी असले तरी ते केवळ अडकवलेले आहे आणि मुख्य कडी फक्त बाहेरून लावलेली आहे. त्यामुळे, कोणाच्याही मदतीशिवाय आम्हाला आत जाण्याचा मार्ग अतिशय सुकर झाला आणि आम्ही त्या पवित्र वास्तूमध्ये प्रवेश केला.

आत प्रवेश करताच एक विस्तीर्ण आणि चौरसाकृती चौथरा दिसला. या चौथऱ्याच्या अगदी मध्यभागी एक अत्यंत सुंदर आणि भव्य अशी मेघडंबरी उभारलेली दिसली, आणि तिथेच स्वराज्य संकल्पक शहाजीराजांची समाधी आमच्या दृष्टीस पडली. या प्रवासात यापूर्वी जेव्हा आम्ही कणकगिरी येथे शहाजीराजांचे ज्येष्ठ पुत्र आणि शिवरायांचे थोरले बंधू, संभाजीराजे यांच्या समाधीची अत्यंत दयनीय आणि उपेक्षित अवस्था पाहिली होती, तेव्हा मन व्यथित झाले होते. परंतु, त्या तुलनेत शहाजीराजांची समाधी बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये आणि नीटनेटकी ठेवलेली पाहून मनाला समाधान वाटले. प्रवासाला निघण्यापूर्वी जेव्हा आम्ही गुगल मॅपवर या समाधीची जुनी छायाचित्रे पाहिली होती, तेव्हा या समाधीवर कोणत्याही प्रकारचे छत किंवा मेघडंबरी नव्हती. ती कित्येक वर्षे उघड्यावरच ऊन-पाऊस झेलत होती. परंतु, प्रत्यक्ष तिथे गेल्यावर अलीकडच्याच काळात या समाधीला अत्यंत सन्मानाने सुरक्षित केल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.

या समाधीचा इतिहास आणि इथली शांतता आपल्याला थेट सतराव्या शतकात घेऊन जाते. २३ जानेवारी १६६४ रोजी याच होदिगेरे जवळील घनदाट जंगलात शिकारीसाठी गेले असताना, घोड्यावरून पडून शहाजीराजांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे धाकटे पुत्र व्यंकोजी (एकोजी) राजे भोसले यांनी या ठिकाणी त्यांची समाधी बांधली होती. इंटरनेटवरील माहिती आणि जुन्या नोंदींनुसार, अनेक शतके ही समाधी केवळ एका चौथऱ्याच्या रूपात उघड्यावरच होती. परंतु, याच वर्षी म्हणजे मे २०२६ मध्ये, पुण्यातील काही ध्येयवेड्या इतिहासप्रेमींनी एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला. डॉ. गौरव घोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून व लोकवर्गणीतून या समाधीवर तब्बल ४५० किलो वजनाची आणि अत्यंत भव्य अशी तांब्याची मेघडंबरी बसवण्यात आली आहे, हे समजल्यावर आमचा ऊर अभिमानाने भरून आला. महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या मनात शिवरायांच्या आणि त्यांच्या पूर्वजांच्या स्मारक स्थळांविषयी जी अथांग आपुलकी आणि कृतज्ञता आहे, ती पाहून खऱ्या अर्थाने खूप समाधान वाटले.

शहाजीराजांच्या त्या पवित्र समाधीसमोर नतमस्तक होऊन आम्ही स्वराज्याच्या त्या महान संकल्पकाला मानाचा मुजरा केला. एका महान साम्राज्याचे बीज रोवणाऱ्या या महापुरुषाचा तो जाज्वल्य इतिहास आणि तिथली ती अथांग शांतता डोळ्यांत व मनात साठवून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी, म्हणजेच शिवमोगामार्गे किनारपट्टीकडे उतरण्यासाठी मार्गस्थ झालो.

--- तुषार भ. कुटे 

#कर्नाटक #मराठी #कर्नाटक_प्रवास_वृत्तांत #स्मारक #समाधी


 






Saturday, December 28, 2024

सरसेनापती संताजी घोरपडे समाधी

नरसोबाच्या वाडीतून पंचगंगा आणि कृष्णाच्या संगमावर पोहोचलो तेव्हा समोर पंचगंगेच्या पलीकडे एक ऐतिहासिक स्थळ दिसून आले. लगेचच गुगल मॅपवर तपासून बघितले. हे स्थळ होते सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी. मराठ्यांच्या इतिहासात नावाजलेला हा मावळा सरसेनापती म्हणून मराठी जनतेला परिचित आहेच. त्यांची समाधी कृष्णा-पंचगंगेच्या या संगमावर आहे, याची त्यादिवशी माहिती झाली आणि लगोलग या दिशेने प्रयाण केले. पंचगंगा नदीचा पूल पार करून अगदी पाचच मिनिटांमध्ये मी या ठिकाणी पोहोचलो.
सकाळच्या प्रहरी येथे चिटपाखरू देखील नव्हते. समाधीच्या बाहेर एक गाडी लावलेली दिसली. मी देखील माझी गाडी तिथेच लावली आणि आतमध्ये प्रवेश केला. उजव्या बाजूला दगडामध्ये बांधलेले हे जुने मंदिर दिसून आले. खरंतर ही दोन मंदिर होती. पहिले हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती श्री संताजीराव घोरपडे (ममलकत मदार) यांचे श्री सुब्रमण्यम महादेव कुटुंब पंचायतन मंदिर आणि दुसरे कृष्णा व पंचगंगा संगम तीर्थावर असणारे पुरुष व स्त्री भक्तांना देखील बाराही महिने दर्शन घेता येणारे महाराष्ट्रातील एकमेव श्री कार्तिक स्वामी मंदिर होते. या मंदिरांच्या समोरच ऐतिहासिक वाड्याची रचना असणारी वास्तू होती. त्याच्या मधोमध एक सुंदर प्रवेशद्वार होते. त्यातून खाली नदीच्या दिशेने उतरत गेलो. आणि समोरच पंचगंगा नदीचे दर्शन झाले. डावीकडे नदीच्या पलीकडून नृसिंह मंदिर देखील दिसत होते. आणि समोर पंचगंगेच्या तीरावर सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी देखील दिसून आली. त्या दिवशी कोवळ्या उन्हाचा अभिषेक त्या समाधीवर होत होता. तिथेच पायऱ्यांवर बसून राहिलो. संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाची आठवण झाली. शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी हजारो मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली. त्यापैकीच एक संताजी होय. इतिहासात पराक्रम गाजवणाऱ्या व्यक्तींची जन्मस्थळे आणि स्मारके आपल्याला सातत्याने प्रेरणा देतच राहतात.
स्वराज्याच्या या पराक्रमी मावळ्याला वंदन केले आणि येथील परिसर नजरेस साठवून परतीच्या मार्गाला लागलो.

--- तुषार भ. कुटे







Monday, November 11, 2024

केशवसुत स्मारक

मराठी भाषेच्या सारस्वतांपैकी कोकणामध्ये जन्मलेले कवी म्हणजे केशवसुत अर्थात कृष्णाजी केशव दामले होय. गणपतीपुळ्याजवळचे मालगुंड हे त्यांचे जन्मगाव. यंदा दुसऱ्यांदा गणपतीपुळ्याला आलो. आणि मागच्या वेळेप्रमाणे याही वेळी मालगुंडमधील केशवसुतांच्या स्मारकाला भेट दिल्याशिवाय राहवले नाही. साहित्यिकाचे गाव, घर, परिसर कसा असतो? त्याची उत्सुकता सर्वांनाच असते. अर्थात ती आम्हाला देखील होती. या गावात आल्यानंतर केशवसुतांवर इथल्या नयनरम्य परिसरामध्ये नक्कीच निसर्ग संस्कार झाले असावेत, याची अनुभूती आली.
गणपतीपुळ्यापासून दोनच किलोमीटर अंतरावर मालगुंड वसलेले आहे. गावात प्रवेश केल्यानंतर मध्यवर्ती ठिकाणी डावीकडे समुद्राच्या दिशेने जाणारा एक रस्ता लागतो. इथून अगदीच काही शे मीटर अंतरावर केशवसुतांचे दुमदार घर दिसून येते. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुढाकारातून त्याचे संवर्धन आणि जतन केले आहे. कोकणातील अन्य वैशिष्ट्यपूर्ण घराप्रमाणेच या घराची रचना दिसून येते. आपण या स्मारकात प्रवेश करतो तिथे समोरच मोठ्या अक्षरांमध्ये केशवसुतांचे नाव लिहिलेले आहे. याच खोलीमध्ये केशवसुतांचा जन्म झाला होता. आजही या घराची रचना तत्कालीन परिस्थितीनुरूप जतन करून ठेवल्याचे दिसते. याच्या मागच्याच बाजूला केशवसुतांच्या अनेक कवितांच्या कोनशीला बसविलेल्या आहेत. कोणीही मराठी भाषाप्रेमी या कविता वाचताना दंग होऊन जाईल. या कोनशीला संग्रहालयाच्या समोरच केशवसुतांच्या ‘तुतारी’ या कवितेचे शिल्प सुबक पद्धतीने तयार केल्याचे दिसते. एक अर्थाने त्यांच्या या रचनेला केलेला हा मानाचा मुजराच आहे. स्मारकाच्या शेवटी एका छोट्याखानी इमारतीमध्ये डावीकडे मराठी ग्रंथालय आहे, तर उजवीकडे मराठी कवींचे एक दालन तयार केलेले आहे. या दालनामध्ये आपल्या इतिहासात नोंद घ्यावी अशा मराठी कवींची रेखाचित्रे व त्यांच्या प्रमुख रचना लिहिलेल्या दिसतात. आपली भाषा ज्यांनी समृद्ध केली, त्यांचे आठवण म्हणून हे दालन आपण निश्चित पाहू शकतो.
एकंदरीत साहित्याशी निगडित हा परिसर असल्याने या ठिकाणी पर्यटकांची कधीच गर्दी नसते! अतिशय निवांतपणे आपण हा परिसर न्याहाळू शकतो, इथे फिरण्याचा अनुभव घेऊ शकतो, इथल्या कविता वाचू शकतो आणि इथल्या ग्रंथालयामध्ये पुस्तक वाचन देखील करू शकतो. कोणत्याही मराठी भाषाप्रेमीने किमान एकदा तरी भेट द्यावी असा हा परिसर आहे.


















 

Wednesday, May 29, 2024

लाल महाल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अन्य कोणत्याही किल्ल्यापेक्षा मला राजगड किल्ला हा अतिशय खास वाटतो. कारण शिवरायांच्या एकंदरीत कालखंडातील सर्व प्रमुख घटनांचा तो साक्षीदार राहिलेला आहे. तसेच महाराजांचा सर्वाधिक सहवास या किल्ल्याला लाभलेला आहे.
बालपणी राजमाता जिजाऊंसोबत पुण्यात आले असता शिवाजी महाराज ज्या ठिकाणी राहत होते तो म्हणजे लाल महाल. या वास्तुविषयी देखील असंच काहीतरी आहे. छत्रपती शिवाजी रस्ता आणि जिजामाता चौक या ठिकाणी सिग्नलला जेव्हा जेव्हा गाडी थांबते तेव्हा डावीकडे लाल महाल नजरेस पडतो. सततच्या कामाच्या व्यापामुळे इथे इतक्या वर्षांमध्ये जाण्याची कधीच संधी मिळाली नाही. परंतु त्या दिवशी आवर्जून आम्ही या वास्तूला भेट दिली. शिवरायांचे बालपण या वास्तूमध्ये गेलं होतं. तसेच याच ठिकाणी त्यांनी औरंगजेबाचा मामा असणाऱ्या शाहिस्तेखानाची फजिती करून त्याची तीन बोटे छाटली होती. मुघलशाहीवर जबरदस्त प्रहार करणारा हा प्रसंग आणि त्याचा साक्षीदार म्हणजे लाल महाल होय. शनिवारवाड्याच्या कडेलाच लागून ही वास्तू दिमाखात उभी आहे. आज सुशोभीकरणाद्वारे तसेच विविध प्रकारच्या मूर्तींचा वापर करून ही वास्तू स्थानिक प्रशासनाद्वारे दिमाखात उभी असल्याचे दिसते. जिजाऊंची प्रसन्न मूर्ती महालाच्या मध्यवर्ती भागामध्ये आहे. तसेच शिवरायांच्या बालपणातील अनेक प्रसंग इथल्या भिंतीवर रेखाचित्रित केल्याचे देखील दिसतात. 







 

Monday, April 8, 2024

चांदबिबी महल

बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्याला पहिल्यांदा भेट दिली होती तेव्हाच या शहरातील चांदबिबी महल बद्दल इंटरनेटवर वाचले होते. त्यावेळेस वेळेअभावी येथे जाता आले नाही. परंतु आज तो योग जुळून आला. शहरापासून याची अंतर होते सुमारे १५ किलोमीटर.
अहमदनगर-पाथर्डी रस्त्याने प्रवास सुरू केला. सूर्य हळूहळू पूर्वेकडून वर येत होता. त्यामुळे अजूनही उन्हाची तीव्रता तितकी नव्हती. प्रत्यक्ष या स्थळापाशी पोहोचलो तेव्हा समजले की हा महल एका टेकडीवर बांधलेला आहे. गुगल मॅपवर अगदी वर पर्यंत रस्ता जातो असे दिसले. त्यामुळे पायथ्यापासून वरच्या दिशेने जाणाऱ्या डांबरी रस्त्याने गाडी घेऊन निघालो. मागच्या काही वर्षांपासून कदाचित डागडुजी न केल्याने रस्त्याची अवस्था तितकीशी चांगली नव्हती. परंतु आजूबाजूच्या झाडांमुळे काहीसे आल्हाददायक वातावरण निश्चित वाटत होते. जास्तीत जास्त दहा मिनिटांमध्ये मी त्या टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो. नियमितपणे सकाळी टेकडी चढण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या लोकांचीच रेलचेल या ठिकाणी होती. इंटरनेटवर बघितलेल्या फोटोंप्रमाणेच हा महल मला दिसून आला. त्याच्या आतमध्ये विशेष सांगावं असं काही नाही. परंतु प्राचीनत्व असलं की स्थळाला निश्चितच एक वेगळे महत्त्व प्राप्त होत असतं. तसंच काहीसं या स्थळाच्या बाबतीत देखील असावं. पर्शियन वास्तुकालेप्रमाणे याची रचना अष्टकोनी प्रकारची आहे. त्यावर तीन मजले दिसून येतात. असं म्हणतात की, ही रचना आठ मजल्यांमध्ये करण्यात येणार होती. परंतु केवळ तीनच मजले तयार झाले.
या ठिकाणाला चांदबिबी महल का म्हणतात? हे मला अजूनही समजलेले नाही. कारण हे स्थळ मुर्तजा निजामाचा प्रधान दुसरा सलाबतखान याची कबर आहे!
आजूबाजूला बऱ्यापैकी सुशोभीकरण केल्यामुळे अहमदनगर मधील हे एक पर्यटन स्थळ आहे, असे निश्चित म्हणता येईल. 






Monday, March 25, 2024

बागरौझा

गुगल मॅपवर बागरौझा हे ऐतिहासिक स्थळ दिसून आले. नावावरून हे नक्की काय असावे, याची उत्सुकता मला होतीच. शहराच्या बऱ्यापैकी मध्यवर्ती भागामध्ये हे ठिकाण स्थित होते. प्रत्यक्ष जेव्हा या परिसरामध्ये पोहोचलो तेव्हा आतमध्ये जाण्याचा रस्ता सापडायला मला बरेच कष्ट घ्यावे लागले. कारण या भागाच्या आजूबाजूला बऱ्यापैकी अतिक्रमित जागा दिसून येते. गाडी जाण्याचे रस्ते अतिशय चिंचोळे होते. म्हणून मी गाडी बाहेरच एका ठिकाणी पार्क केली आणि चालत चालत आत गेलो. काहीशा चिंचोळ्या भागातून आत मध्ये गेल्यानंतर समोरच मुस्लिम वास्तुकलेसारखी रचना असणारा हा भाग दिसून आला. पुरातत्व खात्याने त्याच्या बाहेर माहिती देणारा फलक लावलेला आहे. यावरून असे समजले की, अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक असणारा अहमद निजामशाह याची ही कबर आहे. अहमदनगर शहराला नाव देणारा शासक व त्याची कबर म्हणजेच बागरौझा होय. अहमदनगरमध्ये असणाऱ्या दुर्लक्ष स्थळांपैकी हे एक स्थळ होय. अहमदशहाच्या कबरीला संरक्षक म्हणून इस्लामी वास्तुकलेनुसार स्मारक तयार करण्यात आलेले आहे. आजही या स्मारकाच्या आतमध्ये देखील शेती केली जाते हे विशेष. शिवाय या परिसराच्या आजूबाजूला देखील अशा अनेक वास्तू रचना दिसून येतात. त्याबद्दलची अधिक माहिती इथल्या कोणत्याही नागरिकांना नाही. अहमदनगर पर्यटन विकास होण्याच्या दृष्टीने या भागाची डागडुजी करण्याची आवश्यकता वाटते.
#अहमदनगरचा_इतिहास











Friday, June 9, 2023

महर्षी कर्वे जन्मस्थळ

सकाळी रत्नागिरीच्या मुरुड गावामध्ये पोहोचलो, त्यादिवशी सुट्टीचा दिवस नसल्यामुळे गावात पर्यटकांची फारशी रेलचेल नव्हती. गावातील जिल्हा परिषद शाळा महर्षी कर्वे यांच्या नावाने उभारलेली आहे. या शाळेच्या जवळच त्यांचा अर्धाकृती पुतळा आहे. त्या दिवशी या पुतळ्याभोवती फुलांची आरास केलेली होती. तेव्हा समजले की आज महर्षी कर्वे यांची जयंती आहे. भारतरत्न मिळालेल्या या महान व्यक्तीच्या गावात त्यादिवशी आम्ही पहिल्यांदाच आलो. कोकणाने या देशाला अनेक मोठी व्यक्तिमत्वे दिलेली आहेत. त्यातीलच एक महर्षी कर्वे होय. स्त्री शिक्षणच्या प्रणेत्यांपैकी एक असणाऱ्या कर्वे यांच्या मुरुड गावात काही विसाव्याचे क्षण घालवले.