माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Tuesday, August 26, 2025

आरे बीच

सुमारे सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा गणपतीपुळ्याला आलो तेव्हा पहिल्यांदा रत्नागिरी आणि मग गणपतीपुळे प्रवास केला होता. या दोन्ही गावांमधला सुमारे २० किमीचा हा प्रवास. यामध्ये साखरतर आणि आरे-वारे सारखी गावे लागतात. आरे-वारेचा समुद्रकिनारा कोकणातील लोकप्रिय किनाऱ्यांपैकी एक. यानंतर देखील आम्ही बऱ्याचदा या रस्त्याने गेलो. परंतु या समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचा योग आला नाही. त्या दिवशी मात्र ठरवून आरेच्या किनाऱ्यावर भटकंती केली. शनिवार असल्याने पर्यटकांची बऱ्यापैकी वर्दळ होती. शिवाय आता या ठिकाणी झिपलाईन पर्यटनाचा देखील आनंद घेता येतो. म्हणून बऱ्यापैकी पर्यटक जमा झालेले होते. किनाऱ्यावरील एका घनदाट झाडीच्या मागे पांढऱ्या वाळूचा हा सपाट प्रदेश आहे. परंतु नेहमीप्रमाणे पर्यटकांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्या मधूनच तो ओलांडावा लागतो. वेळ कमी असल्याने यावेळी पाण्याच्या प्रवाहापर्यंत पोहोचता आले नाही. परंतु  झिपलाईनवरून खाली येणाऱ्या उत्साही पर्यटकांकडे बघत आम्ही किनाऱ्याच्या दिशेने चालू लागलो. या बाजूला बऱ्यापैकी सुंदर शिंपल्यांची आरास दिसून आली. अशी शिंपल्यांची नैसर्गिक आरास त्या दिवशी मी पहिल्यांदाच पाहिली. थोड्याच वेळात पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली होती. अर्थात त्यांचा वेग वाढण्यापूर्वीच आम्ही तेथून काढता पाय घेतला.






 
 

Monday, July 14, 2025

गणपतीपुळे सकाळ

मागच्या वेळी ज्या हॉटेलमध्ये थांबलो त्याच ठिकाणी याही वेळी आम्ही मुक्काम केला. पावसाळी दिवस असले तरी मुलांच्या सुट्ट्या संपत आल्याने त्यांचा पुरेपूर उपभोग घेण्यासाठी आलेली बरीचशी मंडळी गणपतीपुळ्यामध्ये वावरताना दिसली. अर्थात याही वेळी गर्दी आमचा पिच्छा सोडत नव्हती. सकाळी साडेसहाच्या दरम्यान जाग आली. बाहेर वातावरण ढगाळ झाले होते. कदाचित रात्री पाऊस पडून गेला असावा. नेहमीप्रमाणे सकाळचा फेरफटका मारण्यासाठी गणपतीपुळ्याच्या रस्त्यांवर चालू लागलो. गावाच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारापर्यंत चालल्यानंतर पुन्हा मंदिराच्या दिशेने जाणारा रस्ता घेतला. याच्या डाव्या बाजूला मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग आहे. हे त्यादिवशी पहिल्यांदाच समजले! म्हणजे यापूर्वी गणपतीपुळे नीट निरखून पाहिले नव्हते, हे निश्चित. या मार्गाला समांतर चालत मंदिरापर्यंत आलो. मागच्या वेळेपेक्षा यावेळी बऱ्यापैकी गर्दी होती. हा किनारा असा एक किनारा आहे जिथे बीच फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांपेक्षा जास्त भाविकांची संख्या असते. आणि ते देखील समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याचा आणि तिथल्या पाण्यात डुंबण्याचा आनंद घेतात. यावेळी मात्र त्यांची संख्या जास्त होती. विशेष म्हणजे ऊन काहीच नव्हते, वातावरण पूर्णतः ढगाळ. हवेमध्ये गारवा तयार झालेला. त्यातही कोकणातील दमट वातावरण लगेच प्रभाव पडत होते.
किनाऱ्यावर मंदिराच्या दिशेने चालत चालत मी मंदिराच्याच पायऱ्यांवर जाऊन बसलो. अर्थात या बाजूने कुलूप लावलेले असल्याने मंदिरातून कोणालाही बाहेर पडता येत नाही. फक्त ते तिला समुद्र पाहू शकतात. म्हणूनच माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हते. ही अशी जागा होती जिथे समुद्राकडे बघत तंद्री लावून सातत्याने बसू शकतो. शिवाय किनाऱ्यावरची पर्यटकांची वर्दळ बऱ्यापैकी दूरवर होती. त्यांचे वेडे चाळे तिथून मात्र स्पष्ट दिसत होते. समुद्र आपल्या भरतीच्या मूडमध्ये जाणवला. त्याच्याकडे बघितल्यावर नेहमीप्रमाणे ज्या भावना मनामध्ये येतात त्या त्यादिवशी देखील  पुनश्च जागृत झाल्या. मागच्या बाजूला मंदिरातील घंटेचे आवाज भाविकांचा गजबजाट आणि समोर सौम्य पण काही काळ रौद्ररूप धारण केलेल्या समुद्र लाटा. त्यांच्या सहवासात बराच काळ तिथेच बसून होतो.



 

Sunday, June 22, 2025

संगमेश्वरहून गणपतीपुळेकडे रात्री

दुपारी उशिरा पुण्याहून प्रस्थान केल्याने गणपतीपुळेमध्ये पोहोचण्यासाठी आम्हाला निश्चितच रात्रीचे नऊ ते दहा वाजणार होते. तशीच तयारी आम्ही केली होती. यावेळी पहिल्यांदाच ताम्हिणी घाटातून कोकणात उतरून संगमेश्वरद्वारे गणपतीपुळेकडे पोहोचण्याची योजना होती. संगमेश्वरपर्यंत पोहतोवर रात्रीचे आठ वाजले होते. मुंबई-गोवा मार्गावर नेहमीसारखी रहदारी नव्हती. अधून मधून पावसाच्या धारा पडतच होत्या. त्यामुळे महामार्ग बऱ्याचदा या पाण्यामध्ये चमकून दिसत होता. संगमेश्वरच्या अलीकडे एका पुलाचे काम चालू होते आणि याच मुलाच्या जवळून पश्चिमेकडे जंगलात उतरणारा एक रस्ता गणपतीपुळेच्या दिशेने जात होता. प्रशासनाने नुकतीच तशी पाटी देखील तिथे लावली आहे. पाच-सहा तासांचा महामार्गावरील प्रवास संपवून आम्ही खऱ्याखुऱ्या कोकणातल्या रस्त्यांकडे वळालो होतो. मागील एका प्रवासामध्ये याच मार्गावरून पुण्याकडे परतल्याचे मला आठवते. परंतु त्यावेळी मी स्वतः गाडी चालवत नव्हतो. शिवाय यावेळी रात्रीचा प्रवास होता. रस्ता जवळपास एकेरीच. समोरून गाडी आली तर आपली गाडी डांबरी रस्त्याच्या खाली घ्यावी लागेल इतकी त्याची रुंदी. अशा रस्त्यांवरून आमचा प्रवास चालू झाला. ६०-७० किलोमीटर आधीच एका चार्जिंग स्टेशनला गाडी पूर्ण चार्ज केल्यामुळे आता बॅटरीची समस्या उरली नव्हती. म्हणून या प्रवासाचा आनंद घेण्याचे मी ठरवले. रस्त्याच्या दोनही बाजूंना घनदाट झाडे. शिवाय किर्रर्र अंधार. सरळ रस्ता कुठेच लागला नाही. अगदी थोड्याशा अंतरावर एकतर डावीकडे वळण किंवा उजवीकडे वळण घेत आम्ही त्या रस्त्यांवर चाललो होतो. शिवाय रस्त्याचे चढउतार देखील सोबतीला होतेच. चहूबाजूच्या वनराईचे ते निशासौंदर्य न्याहाळत मी गाडी चालवत होतो. अशावेळी इथे कोणी गाडी अडवेल, याची भीती नव्हती. परंतु एका वेगळ्या वेळी अनोळखी रस्त्यावर गाडी हाकण्याचा नवा अनुभव गाठीशी बांधत होतो. गुगलमॅपचा अंदाज घेतला तेव्हा लक्षात आले की आपण अजूनही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला समांतर प्रवास करत आहोत. दोन्हींच्या मध्ये फक्त एक नदी होती…बाव नदी. कदाचित नदीवर कुठेही पूल नसल्याने या रस्त्याने पुढे जाणे क्रमप्राप्तच होते. जवळपास ४० ते ५० किलोमीटरचा हा प्रवास होता. कुणालाही वाटेल अशा रस्त्यांवरचा प्रवास लवकरात लवकर संपावा. परंतु हा विचार देखील माझ्या मनात आला नाही. गणपतीपुळ्याच्या जवळ पोहोचलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजून गेले होते. निसर्गाच्या त्या वळणावळणाच्या घाटांमधून आता बिल्डिंगच्या जंगलांमध्ये पोहोचलेलो होतो.


Friday, June 20, 2025

ताम्हिणी घाट

आत्तापर्यंत मागच्या ४० वर्षांमध्ये मी कधीही मे महिन्यामध्ये इतका पाऊस पडलेला पाहिलेला नाही. त्यामुळे जुनच्या सुरुवातीलाच सगळीकडे हिरवाई पसरलेली होती. परंतु पाऊस मात्र थांबला होता. मागच्या वर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये ताम्हिणी घाटातील धबधबे प्रवाहित झाले होते. यावेळेसची परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळे होते. कोकणात उतरण्यासाठी यावेळी ताम्हिणी घाटाने निघालो होतो. मागच्या तीन-चार दिवसांपासून पाऊस पूर्णपणे थांबलेला होता. आणि म्हणूनच हळूहळू उन्हाच्या झळादेखील बसू लागल्या होत्या. असं असलं तरी घाटमाथ्यावर बऱ्यापैकी ढगांची रेलचेल दिसून येते. शिवाय अधूनमधून पावसाचा शिडकावा देखील होत असतो. 
ताम्हिणी घाट चढायला सुरुवात केली तेव्हा देखील या परिसरात सर्वत्र ऊन पडलेलं होतं. मुळशी धरणातील पाण्याने बऱ्यापैकी तळ गाठलेला होता. त्या वळणावळणांच्या रस्त्यांवरून प्रवास करताना आजूबाजूची वनराई छानपैकी हिरवाईने नटलेली दिसत होती. अगदी पावसाळ्याच्या मध्यावर दिसते तशीच. पुणे जिल्ह्याची हद्द ओलांडून रायगड जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. याच परिसरामध्ये डावीकडच्या उंच कड्यांवरून पावसाळी जलधारा सातत्याने कोसळत असतात. मागच्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने इथले जलप्रपात दिसतील की नाही, याबाबत साशंकता होती. परंतु निसर्गाने आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला. अगदी कडक उन्हामध्ये ताम्हिणी घाटाच्या त्या उंच कड्यांवरून कोसळणारे धबधबे त्या दिवशी पांढऱ्या शुभ्र पाण्याचा वर्षाव करताना दिसून आले. उन्हामध्ये इतके स्वच्छ धबधबे पाहण्याचा योग त्या दिवशी आला. खर तर हा एक दुर्मिळ असा प्रसंग होता! अर्थात मी स्वतः गाडी चालवत असल्याने कॅमेऱ्यामध्ये हा क्षण टिपू शकलो नाही. केवळ एकाच ठिकाणी नाही तर ज्या ज्या ठिकाणी धबधब्यांचे बिंदू आहेत तिथे सर्वच शुभ्र पाण्याचे जलप्रपात कोसळताना दिसून आले. आणि अर्थातच पावसाळी पर्यटकांची गर्दी देखील तितकीच होती. आकाशात ढगांची गर्दी नसताना, पाऊसही पडत नसताना काळ्या पाषाणांवरून जमिनीकडे झेपणाऱ्या त्या जलधारा म्हणजे निसर्गाचा एक सुंदर अविष्कारच होता.


 

Monday, June 16, 2025

माळशेज व्ह्यू पॉईंट, एमटीडीसी रिसॉर्ट

आळेफाट्याकडून माळशेजच्या दिशेने जाताना पिंपळगाव जोगा धरण लागलं की वातावरणामध्ये थंडावा तयार होताना जाणवतो. उजव्या बाजूला दिसणाऱ्या बालाघाटच्या डोंगररांगा आणि त्याच्या पायथ्याशी सातत्याने झुळझुळणारे पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी पाहिलं की मन प्रसन्न होतं. 
मढ गाव संपलं आणि वेळखिंडीतून खाली उतरलो की हरिश्चंद्रगडाच्या अजस्त्र डोंगररांगा दूरवर नजरेस पडतात. वाटत राहतं खिरेश्वर मार्गे टोलारखिंडीतून उतरावं आणि हरिश्चंद्रगडाच्या निसर्ग कुशीमध्ये स्वतःला सामावून घ्यावे. वर्षा ऋतूमध्ये हा परिसर हिरवाईने भरायला लागतो. यावर्षी तर कमालच झाली. अगदी मे महिन्याच्या मध्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. याच कारणास्तव माळशेज घाटाच्या अलीकडील हा सर्व परिसर हिरवं लेणं अंगावर घेऊन डोलू लागला होता. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली. मध्येच ढगांची सावली आणि ऊन यांचा खेळ चालू झाला होता. डोंगरमाथ्यावर असल्याकारणाने माळशेज घाटाचा हा परिसर सातत्याने ऊनपावसाचे लपंडाव अनुभवत असतो. त्या दिवशी देखील हीच परिस्थिती होती. डावीकडे सिंदोळा किल्ला मग उधळा डोंगर न्याहाळत आम्ही महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या रिसॉर्टपाशी पोहोचलो. या रिसॉर्टच्या मागच्याच बाजूला… खरंतर पुढच्या बाजूला बरीच मोकळी जागा आहे. इथून माळशेज घाटाचा अतिशय सुंदर आणि नयनरम्य परिसर न्याहाळता येतो. उंच उंच डोंगर आणि त्याच्या मध्याहून कोरलेला घाट, वळणावळणाचे रस्ते आणि या रस्त्यांवरून हळूहळू पुढे सरकत चाललेल्या गाड्या दूरपर्यंत पाहता येतात. माळशेज घाट चढून येणारे प्रवासी प्रामुख्याने घाटाचे ते दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी या ठिकाणी नेहमीच गर्दी करतात. पावसाळ्यात ही संधी सहसा कोणी सोडत नाही. त्यादिवशी देखील अशीच गर्दी येथे दिसून आली. पाऊस पडून गेला होता. अधून मधून ढगांच्या आडून ऊन डोकावत होतं. थोडं पुढे चालत गेलं की डोंगरकड्याच्या एका ठिकाणी वाऱ्याचा भयंकर झोत वरच्या दिशेने जात असतो.. दरवेळेस हा आम्ही अनुभव घेतोच. घाटाच्या जंगलांमधून वरच्या दिशेने वाहणारे वेगवान वारे या बिंदूपाशी एकवटतात आणि वेगाने ढगांच्या दिशेने जातात. या वाऱ्यांमध्ये टाकलेली कोणतीही वस्तू कड्यावरून खाली जात नाही. ती अतिशय वेगाने वरच्या दिशेने फेकली जाते. आणि तिला जर वजन नसेल तर अगदी रिसॉर्टपर्यंत देखील ती उडून जाऊ शकते! हा आमचा इथला नेहमीचा खेळ. त्यादिवशी देखील पुन्हा एकदा खेळून पाहिला. निसर्गात तयार होणाऱ्या अशा छोट्या छोट्या गमती अनुभवायला देखील एक वेगळीच मजा असते. घाटामध्ये एका ठिकाणी वनविभागातर्फे काही दृश्यबिंदू तयार केलेले आहेत. या ठिकाणावरून देखील माळशेज घाटातील हा परिसर इथली माणसं पाहता येतात. खालच्या त्या घनदाट जंगलामध्ये आपल्या दृष्टीद्वारे स्वतःला सामावता येते. 
समोरच्या हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांवर सातत्याने ढगांची गर्दी त्या दिवशी देखील दिसून येत होती. वाऱ्याच्या प्रवाहासोबतच ढग प्रवास करत होते. अचानक वाऱ्यांचे वेग वाढू लागले, ढगांची गर्दी देखील झाली आणि वर्षाधारा कोसळू लागल्या. यावर्षी माझ्या अंगावर अनुभवलेला तो पहिलाच पाऊस. अगदी चिंब भिजून गेलो. निसर्गाचा दरवर्षीचा अविष्कार पाहण्यासाठी मी सज्ज झालो होतो. यावर्षीचा हा पहिला अनुभव. कदाचित येथून पुढे देखील वर्षा ऋतूतील हा अनुभव पुन्हा शरीर सुखावून जाईल, हे निश्चित.