कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर बरेच किल्ले बांधलेले आहेत. त्यातीलच हा एक किल्ला होय. तो पोर्तुगीजांच्या काळात बांधला गेला आहे. आमच्या अलिबागच्या सफरीत या किल्ल्याला आम्ही भेट दिली. आदल्या दिवशी अलिबाग फिरून झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळीच रेवदंड्याला पोहोचलो. अलिबागमध्ये न जाणवणारी कोकणी संस्कृती रेवदंड्याला अनुभवयास मिळाली. गाव ओलांडून बाहेर आल्यावर लगेचच किल्ल्याची हद्द चालू होते. अलिबागपासून दहा-बारा किलोमीटरवर हा किल्ला स्थित आहे. ज्यावेळी हा किल्ला बांधला तेव्हा त्याच्या भोवती पूर्ण तटबंदीचे आवरण असावे. आजही तटबंदी पूर्णपणे ढासळली आहे. आज इथे केवळ मध्यवर्ती ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर किल्ल्याचे उरलेले व भग्न अवशेष दिसतात. इथला परिसर मात्र पूर्णपणे नारळाच्या बागांनी व्यापलेला दिसतो. बाहेरून आत किल्ला असावा, हे लवकर ध्यानात येत नाही. एका चिंचोळ्या वाटेने किल्ल्याकडे ज्याला आपण मुख्य किल्ला अर्थात बालेकिल्ला म्हणू शकतो, त्या कडे जाता येते. कितीही उन असलं तरी इथे जमिनीवर ते अतिशय मेहनतीने पोहोचतं इतकी झाडी याठिकाणी आहे. किल्ल्यावर सध्या फक्त पोर्तुगीजकालीन वास्तुरचनेचे अवशेष पाहायला मिळतात. दीपगृहासारखी केलेली रचना सध्या टिकून आहे. व त्याभोवतीची तटबंदी शाबूत असल्याचे दिसते. किल्ला म्हणावा असं येथे सध्या तरी काहीच उरलेलं नाही.
No comments:
Post a Comment