दुपारी उशिरा पुण्याहून प्रस्थान केल्याने गणपतीपुळेमध्ये पोहोचण्यासाठी आम्हाला निश्चितच रात्रीचे नऊ ते दहा वाजणार होते. तशीच तयारी आम्ही केली होती. यावेळी पहिल्यांदाच ताम्हिणी घाटातून कोकणात उतरून संगमेश्वरद्वारे गणपतीपुळेकडे पोहोचण्याची योजना होती. संगमेश्वरपर्यंत पोहतोवर रात्रीचे आठ वाजले होते. मुंबई-गोवा मार्गावर नेहमीसारखी रहदारी नव्हती. अधून मधून पावसाच्या धारा पडतच होत्या. त्यामुळे महामार्ग बऱ्याचदा या पाण्यामध्ये चमकून दिसत होता. संगमेश्वरच्या अलीकडे एका पुलाचे काम चालू होते आणि याच मुलाच्या जवळून पश्चिमेकडे जंगलात उतरणारा एक रस्ता गणपतीपुळेच्या दिशेने जात होता. प्रशासनाने नुकतीच तशी पाटी देखील तिथे लावली आहे. पाच-सहा तासांचा महामार्गावरील प्रवास संपवून आम्ही खऱ्याखुऱ्या कोकणातल्या रस्त्यांकडे वळालो होतो. मागील एका प्रवासामध्ये याच मार्गावरून पुण्याकडे परतल्याचे मला आठवते. परंतु त्यावेळी मी स्वतः गाडी चालवत नव्हतो. शिवाय यावेळी रात्रीचा प्रवास होता. रस्ता जवळपास एकेरीच. समोरून गाडी आली तर आपली गाडी डांबरी रस्त्याच्या खाली घ्यावी लागेल इतकी त्याची रुंदी. अशा रस्त्यांवरून आमचा प्रवास चालू झाला. ६०-७० किलोमीटर आधीच एका चार्जिंग स्टेशनला गाडी पूर्ण चार्ज केल्यामुळे आता बॅटरीची समस्या उरली नव्हती. म्हणून या प्रवासाचा आनंद घेण्याचे मी ठरवले. रस्त्याच्या दोनही बाजूंना घनदाट झाडे. शिवाय किर्रर्र अंधार. सरळ रस्ता कुठेच लागला नाही. अगदी थोड्याशा अंतरावर एकतर डावीकडे वळण किंवा उजवीकडे वळण घेत आम्ही त्या रस्त्यांवर चाललो होतो. शिवाय रस्त्याचे चढउतार देखील सोबतीला होतेच. चहूबाजूच्या वनराईचे ते निशासौंदर्य न्याहाळत मी गाडी चालवत होतो. अशावेळी इथे कोणी गाडी अडवेल, याची भीती नव्हती. परंतु एका वेगळ्या वेळी अनोळखी रस्त्यावर गाडी हाकण्याचा नवा अनुभव गाठीशी बांधत होतो. गुगलमॅपचा अंदाज घेतला तेव्हा लक्षात आले की आपण अजूनही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला समांतर प्रवास करत आहोत. दोन्हींच्या मध्ये फक्त एक नदी होती…बाव नदी. कदाचित नदीवर कुठेही पूल नसल्याने या रस्त्याने पुढे जाणे क्रमप्राप्तच होते. जवळपास ४० ते ५० किलोमीटरचा हा प्रवास होता. कुणालाही वाटेल अशा रस्त्यांवरचा प्रवास लवकरात लवकर संपावा. परंतु हा विचार देखील माझ्या मनात आला नाही. गणपतीपुळ्याच्या जवळ पोहोचलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजून गेले होते. निसर्गाच्या त्या वळणावळणाच्या घाटांमधून आता बिल्डिंगच्या जंगलांमध्ये पोहोचलेलो होतो.
Sunday, June 22, 2025
संगमेश्वरहून गणपतीपुळेकडे रात्री
Friday, June 20, 2025
ताम्हिणी घाट
आत्तापर्यंत मागच्या ४० वर्षांमध्ये मी कधीही मे महिन्यामध्ये इतका पाऊस पडलेला पाहिलेला नाही. त्यामुळे जुनच्या सुरुवातीलाच सगळीकडे हिरवाई पसरलेली होती. परंतु पाऊस मात्र थांबला होता. मागच्या वर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये ताम्हिणी घाटातील धबधबे प्रवाहित झाले होते. यावेळेसची परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळे होते. कोकणात उतरण्यासाठी यावेळी ताम्हिणी घाटाने निघालो होतो. मागच्या तीन-चार दिवसांपासून पाऊस पूर्णपणे थांबलेला होता. आणि म्हणूनच हळूहळू उन्हाच्या झळादेखील बसू लागल्या होत्या. असं असलं तरी घाटमाथ्यावर बऱ्यापैकी ढगांची रेलचेल दिसून येते. शिवाय अधूनमधून पावसाचा शिडकावा देखील होत असतो.
ताम्हिणी घाट चढायला सुरुवात केली तेव्हा देखील या परिसरात सर्वत्र ऊन पडलेलं होतं. मुळशी धरणातील पाण्याने बऱ्यापैकी तळ गाठलेला होता. त्या वळणावळणांच्या रस्त्यांवरून प्रवास करताना आजूबाजूची वनराई छानपैकी हिरवाईने नटलेली दिसत होती. अगदी पावसाळ्याच्या मध्यावर दिसते तशीच. पुणे जिल्ह्याची हद्द ओलांडून रायगड जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. याच परिसरामध्ये डावीकडच्या उंच कड्यांवरून पावसाळी जलधारा सातत्याने कोसळत असतात. मागच्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने इथले जलप्रपात दिसतील की नाही, याबाबत साशंकता होती. परंतु निसर्गाने आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला. अगदी कडक उन्हामध्ये ताम्हिणी घाटाच्या त्या उंच कड्यांवरून कोसळणारे धबधबे त्या दिवशी पांढऱ्या शुभ्र पाण्याचा वर्षाव करताना दिसून आले. उन्हामध्ये इतके स्वच्छ धबधबे पाहण्याचा योग त्या दिवशी आला. खर तर हा एक दुर्मिळ असा प्रसंग होता! अर्थात मी स्वतः गाडी चालवत असल्याने कॅमेऱ्यामध्ये हा क्षण टिपू शकलो नाही. केवळ एकाच ठिकाणी नाही तर ज्या ज्या ठिकाणी धबधब्यांचे बिंदू आहेत तिथे सर्वच शुभ्र पाण्याचे जलप्रपात कोसळताना दिसून आले. आणि अर्थातच पावसाळी पर्यटकांची गर्दी देखील तितकीच होती. आकाशात ढगांची गर्दी नसताना, पाऊसही पडत नसताना काळ्या पाषाणांवरून जमिनीकडे झेपणाऱ्या त्या जलधारा म्हणजे निसर्गाचा एक सुंदर अविष्कारच होता.
Monday, June 16, 2025
माळशेज व्ह्यू पॉईंट, एमटीडीसी रिसॉर्ट
आळेफाट्याकडून माळशेजच्या दिशेने जाताना पिंपळगाव जोगा धरण लागलं की वातावरणामध्ये थंडावा तयार होताना जाणवतो. उजव्या बाजूला दिसणाऱ्या बालाघाटच्या डोंगररांगा आणि त्याच्या पायथ्याशी सातत्याने झुळझुळणारे पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी पाहिलं की मन प्रसन्न होतं.
मढ गाव संपलं आणि वेळखिंडीतून खाली उतरलो की हरिश्चंद्रगडाच्या अजस्त्र डोंगररांगा दूरवर नजरेस पडतात. वाटत राहतं खिरेश्वर मार्गे टोलारखिंडीतून उतरावं आणि हरिश्चंद्रगडाच्या निसर्ग कुशीमध्ये स्वतःला सामावून घ्यावे. वर्षा ऋतूमध्ये हा परिसर हिरवाईने भरायला लागतो. यावर्षी तर कमालच झाली. अगदी मे महिन्याच्या मध्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. याच कारणास्तव माळशेज घाटाच्या अलीकडील हा सर्व परिसर हिरवं लेणं अंगावर घेऊन डोलू लागला होता. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली. मध्येच ढगांची सावली आणि ऊन यांचा खेळ चालू झाला होता. डोंगरमाथ्यावर असल्याकारणाने माळशेज घाटाचा हा परिसर सातत्याने ऊनपावसाचे लपंडाव अनुभवत असतो. त्या दिवशी देखील हीच परिस्थिती होती. डावीकडे सिंदोळा किल्ला मग उधळा डोंगर न्याहाळत आम्ही महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या रिसॉर्टपाशी पोहोचलो. या रिसॉर्टच्या मागच्याच बाजूला… खरंतर पुढच्या बाजूला बरीच मोकळी जागा आहे. इथून माळशेज घाटाचा अतिशय सुंदर आणि नयनरम्य परिसर न्याहाळता येतो. उंच उंच डोंगर आणि त्याच्या मध्याहून कोरलेला घाट, वळणावळणाचे रस्ते आणि या रस्त्यांवरून हळूहळू पुढे सरकत चाललेल्या गाड्या दूरपर्यंत पाहता येतात. माळशेज घाट चढून येणारे प्रवासी प्रामुख्याने घाटाचे ते दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी या ठिकाणी नेहमीच गर्दी करतात. पावसाळ्यात ही संधी सहसा कोणी सोडत नाही. त्यादिवशी देखील अशीच गर्दी येथे दिसून आली. पाऊस पडून गेला होता. अधून मधून ढगांच्या आडून ऊन डोकावत होतं. थोडं पुढे चालत गेलं की डोंगरकड्याच्या एका ठिकाणी वाऱ्याचा भयंकर झोत वरच्या दिशेने जात असतो.. दरवेळेस हा आम्ही अनुभव घेतोच. घाटाच्या जंगलांमधून वरच्या दिशेने वाहणारे वेगवान वारे या बिंदूपाशी एकवटतात आणि वेगाने ढगांच्या दिशेने जातात. या वाऱ्यांमध्ये टाकलेली कोणतीही वस्तू कड्यावरून खाली जात नाही. ती अतिशय वेगाने वरच्या दिशेने फेकली जाते. आणि तिला जर वजन नसेल तर अगदी रिसॉर्टपर्यंत देखील ती उडून जाऊ शकते! हा आमचा इथला नेहमीचा खेळ. त्यादिवशी देखील पुन्हा एकदा खेळून पाहिला. निसर्गात तयार होणाऱ्या अशा छोट्या छोट्या गमती अनुभवायला देखील एक वेगळीच मजा असते. घाटामध्ये एका ठिकाणी वनविभागातर्फे काही दृश्यबिंदू तयार केलेले आहेत. या ठिकाणावरून देखील माळशेज घाटातील हा परिसर इथली माणसं पाहता येतात. खालच्या त्या घनदाट जंगलामध्ये आपल्या दृष्टीद्वारे स्वतःला सामावता येते.
समोरच्या हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांवर सातत्याने ढगांची गर्दी त्या दिवशी देखील दिसून येत होती. वाऱ्याच्या प्रवाहासोबतच ढग प्रवास करत होते. अचानक वाऱ्यांचे वेग वाढू लागले, ढगांची गर्दी देखील झाली आणि वर्षाधारा कोसळू लागल्या. यावर्षी माझ्या अंगावर अनुभवलेला तो पहिलाच पाऊस. अगदी चिंब भिजून गेलो. निसर्गाचा दरवर्षीचा अविष्कार पाहण्यासाठी मी सज्ज झालो होतो. यावर्षीचा हा पहिला अनुभव. कदाचित येथून पुढे देखील वर्षा ऋतूतील हा अनुभव पुन्हा शरीर सुखावून जाईल, हे निश्चित.
Saturday, June 14, 2025
ओझर आणि येडगाव धरण
अष्टविनायकांपैकी विघ्नहर गणेशाचे स्थान म्हणजे जुन्नर जवळील ओझर होय. या मंदिरामध्ये आमचे सातत्याने येणे जाणे असतेच. परंतु ओझर गाव ज्या कुकडी नदीच्या आणि येडगाव धरणाच्या काठावर वसलेले आहे, तिथले निसर्ग सौंदर्य पाहत राहणे म्हणजे पर्वणीच असते. येडगाव धरणाच्या बॅकवॉटर परिसरात अजूनही पावसाळ्याच्या सुरुवातीला बऱ्यापैकी पाणी साठलेले दिसते. नेहमीच पक्षांची रेलचेल दिसते. त्या दिवशी संध्याकाळी आकाशामध्ये अंधार होण्यापूर्वी घरट्याकडे परतणाऱ्या पक्षांचे थवे सातत्याने दिसत होते. पश्चिमेकडे शिवजन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या बाजूलाच सूर्य हळूहळू क्षितिजाकडे झुकत चालला होता. शिवनेरी किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोनेरी किरणांची उधळण दिसून येत होती. त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेला अर्थात पूर्वेकडे दूरवर नारायणगड किल्ला देखील हळूहळू अंधारामध्ये गुडूप होताना दिसत होता. धरणातील पाणी मात्र शांत होते. टक लावून ऐकलं की आजूबाजूच्या परिसरातील पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता. मागच्या बाजूला गणपती मंदिराततील गजबजाट ऐकू येत असला तरी नैसर्गिक आवाजांची साथ मात्र कानावर सातत्याने पडतच राहत होती. संध्याकाळ आणि सकाळ या दोन्ही प्रसंगी निसर्गामध्ये जो ताजेपणा असतो तो अनुभवताना मनाला एक वेगळीच उभारी येते. असं वाटत राहतं की, हा काळ संपूच नये. संध्याकाळ अंधाराकडे जरी नेत असली तरी ती आपल्या शरीराला सकारात्मकतेची ऊर्जा प्रदान करत असते. या ऊर्जेच्या आधारावरच आपण अंधार स्वीकारू लागतो आणि प्रतीक्षा करत असतो उद्या पुन्हा उजाडण्याची. हे निसर्गचक्र अनुभवने म्हणजे एक वेगळीच अनुभूती असते, हे निश्चित.
Wednesday, June 11, 2025
आंबेनळी घाट
जवळपास अडीच ते तीन तासांचा गोवा-मुंबई महामार्गावरचा प्रवास करत आम्ही पोलादपूरला पोहोचलो. यावेळी पुण्यामध्ये परतण्यासाठी आंबेनळी घाटाचा पर्याय निवडला. यापूर्वी देखील मी स्वतः या घाटातून कधीच उतरलो अथवा चढलो नव्हतो. त्या दिवशी माझा हा पहिलाच अनुभव होता. कोकणातील दमट वातावरण आणि प्रखर सूर्यकिरणांना मागे टाकत आमची गाडी घाटाच्या दिशेने निघाली. अगदी थोड्याच अंतरावर घाट रस्त्याचा प्रवास देखील चालू झाला. आजूबाजूची हिरवीगार झाडी नागमोडी वळणांनी पार करत हळूहळू चढाच्या दिशेने आम्ही चाललो होतो. 20 ते 25 मिनिटांमध्येच मानवी वस्ती बऱ्यापैकी मागे पडली आणि सह्याद्रीच्या जंगलांमध्ये आमचा प्रवेश झाला. त्या दिवशी घाटामध्ये फारशी वाहतूक नव्हती. अगदीच महाबळेश्वर पाचगणी किंवा वाईला जाणारी वाहने अथवा येणारी वाहने अधून मधून दिसून यायची. परिसरातील वनराजी बऱ्यापैकी दाट होती. कोकणात उतरणाऱ्या अन्य घाटांपेक्षा ती निश्चितच घनदाट वाटत होती. सह्याद्रीच्या अशा जंगलांमधून प्रवास करताना तेथील नैसर्गिक हवा अंगावर घेताना जी शीतलता अनुभवता येते ती निश्चितच मन सुखावणारी असते. त्यादिवशी देखील माझी काही वेगळी भावना नव्हती. जवळपास मध्यापर्यंत घाट चढून आल्यावर एका वळणावरती उंच गगनाला भिडलेला शिवरायांचा प्रतापगड नजरेस पडला. या किल्ल्याच्या बऱ्यापैकी वरपर्यंत गाडी मार्ग झालेला आहे. त्यामुळे त्याची उंची इतकी जाणवत नाही. परंतु आंबेनळी घाटाच्या या बाजूने प्रतापगडाचे रौद्ररूप मात्र मनात भरले. साडेतीनशे वर्षांपूर्वी याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 32 दातांचा बोकड कापला होता याची वारंवार आठवण येत राहिली. शिवाजी महाराजांनी त्याकाळी या किल्ल्याची का निवड केली असावी? याचे उत्तर मात्र मला मिळाले. किल्ल्याभोवती असणार जावळीचं घनदाट जंगल म्हणजे या परिसराचं नैसर्गिक संरक्षणच होतं.
घाट चढून जवळपास सपाटीला आल्यावर आम्ही बऱ्यापैकी उंची गाठलेली आहे याची जाणीव झाली. ठीक ठिकाणी वळणावर उंच कडा वाहने सावकाश चालवा अशा पाट्या लावलेल्या दिसल्या. कोकणात उतरणाऱ्या अन्य कुठल्याही घाटात अशा प्रकारची पाटी दिसली नाही. शिवाय वरून पाहिल्यावरती खालच्या बाजूला खोल खोल दर्या दिसत होत्या. कदाचित हा सर्वात उंचीवरचा घाट असावा. अनेकदा अरुंद रस्त्यांवर गाडी चालवताना येथे धडकी देखील भरते. जिथवर नजर जाईल तिथपर्यंत केवळ जंगलच जंगल नजरेस पडत होतं. रायगड जिल्ह्याची हद्द संपून आम्ही सातारा जिल्ह्यात अर्थात महाबळेश्वर मध्ये प्रवेश केला. आणि लगेचच थंडगार वाऱ्यांनी आमचे सहर्ष स्वागत केले. महाबळेश्वरला पोहोचलो तोवर वातावरणात बऱ्यापैकी थंडी जाणवत होती. आजूबाजूच्या घनदाट वनराईमुळे थंडगार वाऱ्याचे झोप अंगावर घेत आम्ही वाईच्या दिशेने प्रस्थान केले.
--- तुषार भ. कुटे