माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Sunday, June 22, 2025

संगमेश्वरहून गणपतीपुळेकडे रात्री

दुपारी उशिरा पुण्याहून प्रस्थान केल्याने गणपतीपुळेमध्ये पोहोचण्यासाठी आम्हाला निश्चितच रात्रीचे नऊ ते दहा वाजणार होते. तशीच तयारी आम्ही केली होती. यावेळी पहिल्यांदाच ताम्हिणी घाटातून कोकणात उतरून संगमेश्वरद्वारे गणपतीपुळेकडे पोहोचण्याची योजना होती. संगमेश्वरपर्यंत पोहतोवर रात्रीचे आठ वाजले होते. मुंबई-गोवा मार्गावर नेहमीसारखी रहदारी नव्हती. अधून मधून पावसाच्या धारा पडतच होत्या. त्यामुळे महामार्ग बऱ्याचदा या पाण्यामध्ये चमकून दिसत होता. संगमेश्वरच्या अलीकडे एका पुलाचे काम चालू होते आणि याच मुलाच्या जवळून पश्चिमेकडे जंगलात उतरणारा एक रस्ता गणपतीपुळेच्या दिशेने जात होता. प्रशासनाने नुकतीच तशी पाटी देखील तिथे लावली आहे. पाच-सहा तासांचा महामार्गावरील प्रवास संपवून आम्ही खऱ्याखुऱ्या कोकणातल्या रस्त्यांकडे वळालो होतो. मागील एका प्रवासामध्ये याच मार्गावरून पुण्याकडे परतल्याचे मला आठवते. परंतु त्यावेळी मी स्वतः गाडी चालवत नव्हतो. शिवाय यावेळी रात्रीचा प्रवास होता. रस्ता जवळपास एकेरीच. समोरून गाडी आली तर आपली गाडी डांबरी रस्त्याच्या खाली घ्यावी लागेल इतकी त्याची रुंदी. अशा रस्त्यांवरून आमचा प्रवास चालू झाला. ६०-७० किलोमीटर आधीच एका चार्जिंग स्टेशनला गाडी पूर्ण चार्ज केल्यामुळे आता बॅटरीची समस्या उरली नव्हती. म्हणून या प्रवासाचा आनंद घेण्याचे मी ठरवले. रस्त्याच्या दोनही बाजूंना घनदाट झाडे. शिवाय किर्रर्र अंधार. सरळ रस्ता कुठेच लागला नाही. अगदी थोड्याशा अंतरावर एकतर डावीकडे वळण किंवा उजवीकडे वळण घेत आम्ही त्या रस्त्यांवर चाललो होतो. शिवाय रस्त्याचे चढउतार देखील सोबतीला होतेच. चहूबाजूच्या वनराईचे ते निशासौंदर्य न्याहाळत मी गाडी चालवत होतो. अशावेळी इथे कोणी गाडी अडवेल, याची भीती नव्हती. परंतु एका वेगळ्या वेळी अनोळखी रस्त्यावर गाडी हाकण्याचा नवा अनुभव गाठीशी बांधत होतो. गुगलमॅपचा अंदाज घेतला तेव्हा लक्षात आले की आपण अजूनही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला समांतर प्रवास करत आहोत. दोन्हींच्या मध्ये फक्त एक नदी होती…बाव नदी. कदाचित नदीवर कुठेही पूल नसल्याने या रस्त्याने पुढे जाणे क्रमप्राप्तच होते. जवळपास ४० ते ५० किलोमीटरचा हा प्रवास होता. कुणालाही वाटेल अशा रस्त्यांवरचा प्रवास लवकरात लवकर संपावा. परंतु हा विचार देखील माझ्या मनात आला नाही. गणपतीपुळ्याच्या जवळ पोहोचलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजून गेले होते. निसर्गाच्या त्या वळणावळणाच्या घाटांमधून आता बिल्डिंगच्या जंगलांमध्ये पोहोचलेलो होतो.


Friday, June 20, 2025

ताम्हिणी घाट

आत्तापर्यंत मागच्या ४० वर्षांमध्ये मी कधीही मे महिन्यामध्ये इतका पाऊस पडलेला पाहिलेला नाही. त्यामुळे जुनच्या सुरुवातीलाच सगळीकडे हिरवाई पसरलेली होती. परंतु पाऊस मात्र थांबला होता. मागच्या वर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये ताम्हिणी घाटातील धबधबे प्रवाहित झाले होते. यावेळेसची परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळे होते. कोकणात उतरण्यासाठी यावेळी ताम्हिणी घाटाने निघालो होतो. मागच्या तीन-चार दिवसांपासून पाऊस पूर्णपणे थांबलेला होता. आणि म्हणूनच हळूहळू उन्हाच्या झळादेखील बसू लागल्या होत्या. असं असलं तरी घाटमाथ्यावर बऱ्यापैकी ढगांची रेलचेल दिसून येते. शिवाय अधूनमधून पावसाचा शिडकावा देखील होत असतो. 
ताम्हिणी घाट चढायला सुरुवात केली तेव्हा देखील या परिसरात सर्वत्र ऊन पडलेलं होतं. मुळशी धरणातील पाण्याने बऱ्यापैकी तळ गाठलेला होता. त्या वळणावळणांच्या रस्त्यांवरून प्रवास करताना आजूबाजूची वनराई छानपैकी हिरवाईने नटलेली दिसत होती. अगदी पावसाळ्याच्या मध्यावर दिसते तशीच. पुणे जिल्ह्याची हद्द ओलांडून रायगड जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. याच परिसरामध्ये डावीकडच्या उंच कड्यांवरून पावसाळी जलधारा सातत्याने कोसळत असतात. मागच्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने इथले जलप्रपात दिसतील की नाही, याबाबत साशंकता होती. परंतु निसर्गाने आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला. अगदी कडक उन्हामध्ये ताम्हिणी घाटाच्या त्या उंच कड्यांवरून कोसळणारे धबधबे त्या दिवशी पांढऱ्या शुभ्र पाण्याचा वर्षाव करताना दिसून आले. उन्हामध्ये इतके स्वच्छ धबधबे पाहण्याचा योग त्या दिवशी आला. खर तर हा एक दुर्मिळ असा प्रसंग होता! अर्थात मी स्वतः गाडी चालवत असल्याने कॅमेऱ्यामध्ये हा क्षण टिपू शकलो नाही. केवळ एकाच ठिकाणी नाही तर ज्या ज्या ठिकाणी धबधब्यांचे बिंदू आहेत तिथे सर्वच शुभ्र पाण्याचे जलप्रपात कोसळताना दिसून आले. आणि अर्थातच पावसाळी पर्यटकांची गर्दी देखील तितकीच होती. आकाशात ढगांची गर्दी नसताना, पाऊसही पडत नसताना काळ्या पाषाणांवरून जमिनीकडे झेपणाऱ्या त्या जलधारा म्हणजे निसर्गाचा एक सुंदर अविष्कारच होता.


 

Monday, June 16, 2025

माळशेज व्ह्यू पॉईंट, एमटीडीसी रिसॉर्ट

आळेफाट्याकडून माळशेजच्या दिशेने जाताना पिंपळगाव जोगा धरण लागलं की वातावरणामध्ये थंडावा तयार होताना जाणवतो. उजव्या बाजूला दिसणाऱ्या बालाघाटच्या डोंगररांगा आणि त्याच्या पायथ्याशी सातत्याने झुळझुळणारे पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी पाहिलं की मन प्रसन्न होतं. 
मढ गाव संपलं आणि वेळखिंडीतून खाली उतरलो की हरिश्चंद्रगडाच्या अजस्त्र डोंगररांगा दूरवर नजरेस पडतात. वाटत राहतं खिरेश्वर मार्गे टोलारखिंडीतून उतरावं आणि हरिश्चंद्रगडाच्या निसर्ग कुशीमध्ये स्वतःला सामावून घ्यावे. वर्षा ऋतूमध्ये हा परिसर हिरवाईने भरायला लागतो. यावर्षी तर कमालच झाली. अगदी मे महिन्याच्या मध्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. याच कारणास्तव माळशेज घाटाच्या अलीकडील हा सर्व परिसर हिरवं लेणं अंगावर घेऊन डोलू लागला होता. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली. मध्येच ढगांची सावली आणि ऊन यांचा खेळ चालू झाला होता. डोंगरमाथ्यावर असल्याकारणाने माळशेज घाटाचा हा परिसर सातत्याने ऊनपावसाचे लपंडाव अनुभवत असतो. त्या दिवशी देखील हीच परिस्थिती होती. डावीकडे सिंदोळा किल्ला मग उधळा डोंगर न्याहाळत आम्ही महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या रिसॉर्टपाशी पोहोचलो. या रिसॉर्टच्या मागच्याच बाजूला… खरंतर पुढच्या बाजूला बरीच मोकळी जागा आहे. इथून माळशेज घाटाचा अतिशय सुंदर आणि नयनरम्य परिसर न्याहाळता येतो. उंच उंच डोंगर आणि त्याच्या मध्याहून कोरलेला घाट, वळणावळणाचे रस्ते आणि या रस्त्यांवरून हळूहळू पुढे सरकत चाललेल्या गाड्या दूरपर्यंत पाहता येतात. माळशेज घाट चढून येणारे प्रवासी प्रामुख्याने घाटाचे ते दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी या ठिकाणी नेहमीच गर्दी करतात. पावसाळ्यात ही संधी सहसा कोणी सोडत नाही. त्यादिवशी देखील अशीच गर्दी येथे दिसून आली. पाऊस पडून गेला होता. अधून मधून ढगांच्या आडून ऊन डोकावत होतं. थोडं पुढे चालत गेलं की डोंगरकड्याच्या एका ठिकाणी वाऱ्याचा भयंकर झोत वरच्या दिशेने जात असतो.. दरवेळेस हा आम्ही अनुभव घेतोच. घाटाच्या जंगलांमधून वरच्या दिशेने वाहणारे वेगवान वारे या बिंदूपाशी एकवटतात आणि वेगाने ढगांच्या दिशेने जातात. या वाऱ्यांमध्ये टाकलेली कोणतीही वस्तू कड्यावरून खाली जात नाही. ती अतिशय वेगाने वरच्या दिशेने फेकली जाते. आणि तिला जर वजन नसेल तर अगदी रिसॉर्टपर्यंत देखील ती उडून जाऊ शकते! हा आमचा इथला नेहमीचा खेळ. त्यादिवशी देखील पुन्हा एकदा खेळून पाहिला. निसर्गात तयार होणाऱ्या अशा छोट्या छोट्या गमती अनुभवायला देखील एक वेगळीच मजा असते. घाटामध्ये एका ठिकाणी वनविभागातर्फे काही दृश्यबिंदू तयार केलेले आहेत. या ठिकाणावरून देखील माळशेज घाटातील हा परिसर इथली माणसं पाहता येतात. खालच्या त्या घनदाट जंगलामध्ये आपल्या दृष्टीद्वारे स्वतःला सामावता येते. 
समोरच्या हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांवर सातत्याने ढगांची गर्दी त्या दिवशी देखील दिसून येत होती. वाऱ्याच्या प्रवाहासोबतच ढग प्रवास करत होते. अचानक वाऱ्यांचे वेग वाढू लागले, ढगांची गर्दी देखील झाली आणि वर्षाधारा कोसळू लागल्या. यावर्षी माझ्या अंगावर अनुभवलेला तो पहिलाच पाऊस. अगदी चिंब भिजून गेलो. निसर्गाचा दरवर्षीचा अविष्कार पाहण्यासाठी मी सज्ज झालो होतो. यावर्षीचा हा पहिला अनुभव. कदाचित येथून पुढे देखील वर्षा ऋतूतील हा अनुभव पुन्हा शरीर सुखावून जाईल, हे निश्चित.









Saturday, June 14, 2025

ओझर आणि येडगाव धरण

अष्टविनायकांपैकी विघ्नहर गणेशाचे स्थान म्हणजे जुन्नर जवळील ओझर होय. या मंदिरामध्ये आमचे सातत्याने येणे जाणे असतेच. परंतु ओझर गाव ज्या कुकडी नदीच्या आणि येडगाव धरणाच्या काठावर वसलेले आहे, तिथले निसर्ग सौंदर्य पाहत राहणे म्हणजे पर्वणीच असते. येडगाव धरणाच्या बॅकवॉटर परिसरात अजूनही पावसाळ्याच्या सुरुवातीला बऱ्यापैकी पाणी साठलेले दिसते. नेहमीच पक्षांची रेलचेल दिसते. त्या दिवशी संध्याकाळी आकाशामध्ये अंधार होण्यापूर्वी घरट्याकडे परतणाऱ्या पक्षांचे थवे सातत्याने दिसत होते. पश्चिमेकडे शिवजन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या बाजूलाच सूर्य हळूहळू क्षितिजाकडे झुकत चालला होता. शिवनेरी किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोनेरी किरणांची उधळण दिसून येत होती. त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेला अर्थात पूर्वेकडे दूरवर नारायणगड किल्ला देखील हळूहळू अंधारामध्ये गुडूप होताना दिसत होता. धरणातील पाणी मात्र शांत होते. टक लावून ऐकलं की आजूबाजूच्या परिसरातील पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता. मागच्या बाजूला गणपती मंदिराततील गजबजाट ऐकू येत असला तरी नैसर्गिक आवाजांची साथ मात्र कानावर सातत्याने पडतच राहत होती. संध्याकाळ आणि सकाळ या दोन्ही प्रसंगी निसर्गामध्ये जो ताजेपणा असतो तो अनुभवताना मनाला एक वेगळीच उभारी येते. असं वाटत राहतं की, हा काळ संपूच नये. संध्याकाळ अंधाराकडे जरी नेत असली तरी ती आपल्या शरीराला सकारात्मकतेची ऊर्जा प्रदान करत असते. या ऊर्जेच्या आधारावरच आपण अंधार स्वीकारू लागतो आणि प्रतीक्षा करत असतो उद्या पुन्हा उजाडण्याची. हे निसर्गचक्र अनुभवने म्हणजे एक वेगळीच अनुभूती असते, हे निश्चित.




 

Wednesday, June 11, 2025

आंबेनळी घाट

जवळपास अडीच ते तीन तासांचा गोवा-मुंबई महामार्गावरचा प्रवास करत आम्ही पोलादपूरला पोहोचलो. यावेळी पुण्यामध्ये परतण्यासाठी आंबेनळी घाटाचा पर्याय निवडला. यापूर्वी देखील मी स्वतः या घाटातून कधीच उतरलो अथवा चढलो नव्हतो. त्या दिवशी माझा हा पहिलाच अनुभव होता. कोकणातील दमट वातावरण आणि प्रखर सूर्यकिरणांना मागे टाकत आमची गाडी घाटाच्या दिशेने निघाली. अगदी थोड्याच अंतरावर घाट रस्त्याचा प्रवास देखील चालू झाला. आजूबाजूची हिरवीगार झाडी नागमोडी वळणांनी पार करत हळूहळू चढाच्या दिशेने आम्ही चाललो होतो. 20 ते 25 मिनिटांमध्येच मानवी वस्ती बऱ्यापैकी मागे पडली आणि सह्याद्रीच्या जंगलांमध्ये आमचा प्रवेश झाला. त्या दिवशी घाटामध्ये फारशी वाहतूक नव्हती. अगदीच महाबळेश्वर पाचगणी किंवा वाईला जाणारी वाहने अथवा येणारी वाहने अधून मधून दिसून यायची. परिसरातील वनराजी बऱ्यापैकी दाट होती. कोकणात उतरणाऱ्या अन्य घाटांपेक्षा ती निश्चितच घनदाट वाटत होती. सह्याद्रीच्या अशा जंगलांमधून प्रवास करताना तेथील नैसर्गिक हवा अंगावर घेताना जी शीतलता अनुभवता येते ती निश्चितच मन सुखावणारी असते. त्यादिवशी देखील माझी काही वेगळी भावना नव्हती. जवळपास मध्यापर्यंत घाट चढून आल्यावर एका वळणावरती उंच गगनाला भिडलेला शिवरायांचा प्रतापगड नजरेस पडला. या किल्ल्याच्या बऱ्यापैकी वरपर्यंत गाडी मार्ग झालेला आहे. त्यामुळे त्याची उंची इतकी जाणवत नाही. परंतु आंबेनळी घाटाच्या या बाजूने प्रतापगडाचे रौद्ररूप मात्र मनात भरले. साडेतीनशे वर्षांपूर्वी याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 32 दातांचा बोकड कापला होता याची वारंवार आठवण येत राहिली. शिवाजी महाराजांनी त्याकाळी या किल्ल्याची का निवड केली असावी? याचे उत्तर मात्र मला मिळाले. किल्ल्याभोवती असणार जावळीचं घनदाट जंगल म्हणजे या परिसराचं नैसर्गिक संरक्षणच होतं.
घाट चढून जवळपास सपाटीला आल्यावर आम्ही बऱ्यापैकी उंची गाठलेली आहे याची जाणीव झाली. ठीक ठिकाणी वळणावर उंच कडा वाहने सावकाश चालवा अशा पाट्या लावलेल्या दिसल्या. कोकणात उतरणाऱ्या अन्य कुठल्याही घाटात अशा प्रकारची पाटी दिसली नाही. शिवाय वरून पाहिल्यावरती खालच्या बाजूला खोल खोल दर्या दिसत होत्या. कदाचित हा सर्वात उंचीवरचा घाट असावा. अनेकदा  अरुंद रस्त्यांवर गाडी चालवताना येथे धडकी देखील भरते. जिथवर नजर जाईल तिथपर्यंत केवळ जंगलच जंगल नजरेस पडत होतं. रायगड जिल्ह्याची हद्द संपून आम्ही सातारा जिल्ह्यात अर्थात महाबळेश्वर मध्ये प्रवेश केला. आणि लगेचच थंडगार वाऱ्यांनी आमचे सहर्ष स्वागत केले. महाबळेश्वरला पोहोचलो तोवर वातावरणात बऱ्यापैकी थंडी जाणवत होती. आजूबाजूच्या घनदाट वनराईमुळे थंडगार वाऱ्याचे झोप अंगावर घेत आम्ही वाईच्या दिशेने प्रस्थान केले.

--- तुषार भ. कुटे 











Thursday, May 22, 2025

खवणे पॅराडाईज

सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ला तालुक्यातील खवणे समुद्रकिनाऱ्यावरचा हा आमचा पहिलाच प्रवास. रविवार असल्याने बऱ्यापैकी गर्दी दिसून येत होती. तरीही सिंधुदुर्ग जिल्हा पुणे-मुंबईपासून दूर असल्याने रायगड, रत्नागिरीच्या तुलनेत या ठिकाणी गर्दी बरीच कमी असते. सावंतवाडी वरून निघालो ते थेट खवण्याच्या समुद्रकिनाऱ्याकडेच. किनाऱ्याच्या अलीकडेच उजव्या बाजूला समुद्राच्या बॅकवॉटरच्या दिशेने एक रस्ता खाली उतरतो. या बॅकवॉटरच्या काठावर खवणे पॅराडाईज या होमस्टे मध्ये आम्ही थांबलो होतो. समोर समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये पसरलेली कांदळीवने दिसून येत होती. त्याच्या काठावरच आमचा निवास होता. मागच्या वर्षीपासून इथे कयाकिंग सुरू झालेले आहे. रविवार असल्याकारणाने या तलावसदृश जलवनामध्ये रंगीबेरंगी होड्यांची गर्दी झालेली दिसली. वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले पर्यटक अतिशय उत्साहाने वल्हे मारत होड्या चालवत होते. आजूबाजूने कांदळी वनाने वेढलेल्या त्या जलसांभारामध्ये या रंगीबेरंगी होड्या विशेष भासत होत्या.
अजून दोन दिवस तरी आमचा या ठिकाणी मुक्काम असणार होता. विशेष म्हणजे मोबाईलला रेंज नव्हती! त्यामुळे बाहेरच्या जगाशी संपर्क जणू तुटल्यातच जमा होता. इंटरनेटसुद्धा बंदच. म्हणून समोरच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत राहणं हा एकच उद्योग उरला होता.











Saturday, April 5, 2025

मांगणी देवी मंदिर

जवळपास दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा हडसर किल्ल्यावर गिर्यारोहण करण्याची संधी मिळाली. वातावरण पावसाळी होते. त्यामुळे आजूबाजूचा पूर्ण परिसर हिरवाईने नटलेला होता. किल्ल्याच्या शेवटच्या बुरुजावरून समोरच्या हिरव्यागार डोंगररांगा ढगांच्या गर्दीमध्ये न्याहाळताना एका टोकावर एक मंदिर दृष्टीस पडले. हे मांगणी देवी मंदिर. तेव्हापासूनच या डोंगराच्या टोकावरील मंदिरात जाऊन यावे, असे वाटत होते. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये योग आला नाही. एक दिवस मी एकट्यानेच या डोंगराच्या टोकावर जाण्याचे ठरवले. मांगणेवाडी हे या डोंगराच्या पायथ्याचे गाव. जुन्नरचा गणेशखिंड घाट याच डोंगरामध्ये आहे. गणेश खिंडीच्या पश्चिमेला असणाऱ्या डोंगराच्या टोकावर मांगणी देवीचे हे मंदिर स्थित आहे.
सकाळच्या प्रहरी साडेसहाच्या दरम्यान गावातून वाट काढत मी डोंगर सर करायला सुरुवात केली. उन्हाळा असल्याकारणाने रस्त्याच्या आजूबाजूला केवळ वाळलेले गवत होते. त्यामुळे वाट देखील व्यवस्थित दिसत होती. परंतु आजूबाजूला चिटपाखरू देखील नव्हते. वळणावळणाच्या त्या रस्त्याने मार्ग काढत मी पहिल्या टप्प्यावर येऊन पोहोचलो. त्या ठिकाणावरून नाणेघाटापर्यंतच्या डोंगररांगा दृष्टीस येत होत्या. आणि समोरच आणखी एका उंचवट्यावर मांगणी देवीचे मंदिर देखील दिसून आले. अगदी काही मिनिटांमध्येच मी डोंगराच्या सर्वोच्च माथ्यावर अर्थात मंदिरापाशी पोहोचलो. तिथून दिसणारा नयनरम्य परिसर कदाचित शब्दांमध्ये मांडणे निश्चितच अवघड होते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला जवळजवळ पूर्ण जुन्नर तालुका, इथले किल्ले, डोंगररांगा, पाणीसाठे तसेच छोटी छोटी गावे स्पष्ट दिसत होती. त्यामुळे इथला व्हिडिओ काढण्याचा मोह मला आवरला नाही.

--- तुषार भ. कुटे 


 








Wednesday, March 19, 2025

किल्ले निवती

कोकणातल्या प्रत्येक प्रवासामध्ये किमान एक तरी किल्ला पाहता येतो. यावेळी आम्ही वेंगुर्ले तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या किल्ले निवतीला भेट दिली. खवणे गावापासून अर्ध्याच तासाच्या अंतरावर कोकणातील वळणावळणाचे रस्ते पार करत आम्ही पोहोचलो. दुपारचे ऊन बऱ्यापैकी होते. किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या निवती गावातून एक डांबरी रस्ता किल्ल्याच्या दिशेने जात होता. त्याच रस्त्याने आम्ही थेट किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो. सोमवार असल्याकारणाने येथे फारशी गर्दी नव्हतीच. गाडी ज्या ठिकाणी लावली तेथून समुद्रकिनारा व्यवस्थित दिसत होता. समोरच भोगवे किनारा दिसून आला. आणि दूरवर खोल समुद्रामध्ये डोंगर देखील दिसून येत होते. यापैकीच एका खडकावर निवतीचा दीपस्तंभ अर्थात ‘लाईट हाऊस’ बांधलेले आहे.
निवतीचा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे काम झाल्यानंतर लगेचच या किल्ल्याची बांधणी झाली, असे इतिहास सांगतो. करली नदीचे खोरे आणि वेंगुर्ला यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची बांधणी केली असावी. आज तो पूर्णपणे भंगलेल्या स्थितीत असल्याचे दिसते. क्रांती रेडकरच्या ‘काकण’ या चित्रपटामध्ये हा किल्ला दाखवलेला आहे. तेव्हापासूनच तो पाहण्याची माझी उत्सुकता होती.
आज किल्ल्याचे बुरुज पावसामुळे माजलेल्या दाट झाडीमध्ये भग्नावस्थेत लपल्याचे दिसून येत होते. किल्ल्याकडे जाणारी पायवाट देखील एकावेळी केवळ एकच जण जाऊ शकेल, इतकी रुंद होती. जाताना आजूबाजूला पडलेले पाषाणाचे अवशेष दृष्टीस येत होते. मध्यवर्ती भागात देखील पहारेकर्‍यांची देवडी, बुरुज आणि तटबंदी या वास्तू हा किल्ल्याचा भाग आहे, असं आपल्याला वारंवार सांगताना दिसत होत्या. या दुर्गाच्या शेवटच्या टोकावर एक ध्वजस्तंभ दिसून आला. येथून खालच्या बाजूला जाण्यासाठी रस्ता असावा असे वाटले. समोरच समुद्रकिनाऱ्यावर सोनेरी रंगाचे खडक दिसून आले. एखाद्या विशिष्ट रासायनिक प्रक्रियेतून त्यांचा रंग असा झाला असावा असे वाटते. किल्ल्याचा घेर हा अंदाजाने बांधता आला नाही. कदाचित इंग्रजांच्या काळामध्ये त्यांच्या ताब्यात हा किल्ला आल्यानंतर त्याची बहुतांश पडझड झाली असावी असं वाटलं. परतीच्या मार्गावर जाताना निवतीच्या छोटेखानी समुद्रकिनाऱ्याची देखील दर्शन झाले.

--- तुषार भ. कुटे.

#दुर्ग #किल्ला #कोकण #भटकंती #समुद्र #किनारा #महाराष्ट्र #मराठी #शिवाजी_महाराज









 

Wednesday, March 12, 2025

किल्लेनिवती दीपस्तंभ

खवणेवरून सकाळीच सुनामी आयलँड बघण्यासाठी निघालो. कोकणातल्या त्या वळणावळणाच्या रस्त्यावरून प्रवास करत आम्ही समुद्राच्या दिशेने चाललो होतो. परंतु एका ठिकाणी या सुनामी बेटाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण चालू असल्याने रस्ता बंद केलेला होता. म्हणूनच पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला. हा रस्ता अगदीच कच्चा होता. परंतु आंब्यांच्या बागांमधून समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने जात होता. गुगल मॅपचा आधार घेत आम्ही या रस्त्याने चालू लागलो. थोड्याच अंतरावर असलेल्या किनाऱ्यावरील झाडीपाशी पोहोचलो. इथेच गाडी पार्क केली. गुगल मॅपवर इथून सुनामी बेट अगदीच जवळ दिसत होते. आणि त्याच्या पलीकडे देवबागचा समुद्रात आलेला पट्टादेखील दिसून येत होता. गाडी पार्क केल्यानंतर चालतच झाडींमधून रस्ता काढत आम्ही समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो. समोरच देवबाग किनारा दिसून येत होता. याच ठिकाणी आम्हाला विश्वेश भेटला. त्याची स्वतःची बोट होती. आलेल्या पर्यटकांना देवबाग, भोगवे, निवती या परिसरातील पर्यटन स्थळांवर फिरवून आणायचे आणण्याचे काम तो करत होता. त्यादिवशी त्याने आम्हाला इथल्या परिसराची तसेच तो करत असलेल्या सफरीची माहिती दिली. सुट्टीचा दिवस नसल्याने त्या दिवशी काहीच गर्दी नव्हती. आणि विशेष म्हणजे समुद्र देखील शांत होता.
समुद्रात सुमारे १५ किलोमीटर आतमध्ये काही छोटी छोटी बेटे आहेत. यापैकीच एका बेटावर दीपस्तंभ उभारलेला आहे. याची माहिती विश्वेशने आम्हाला दिली. तिथल्या समुद्राच्या राईडविषयी तो आम्हाला सांगू लागला. आम्ही देखील विचार मंथन करून अखेरीस दोन अडीच तासांच्या या समुद्र प्रवासासाठी तयार झालो. त्याने लगेचच आपली बोट समोर किनाऱ्याला लावली. आणि आमचा प्रवास सुरू झाला. सर्वप्रथम आमची बोट निघाली सुनामी बेटाकडे. सुनामीने वाहून आलेल्या वाळूमुळे तयार झालेले हे बेट. करली नदी देवबागच्या समुद्राला जिथे मिळते त्याच ठिकाणी हे बेट तयार झालेले आहे. बहुतांश वेळा ते पाण्याखालीच असते. इथे अनेक छोटी छोटी दुकाने आहेत. आणि समुद्रातील खेळ देखील येथे खेळता येतात. अशा प्रकारचं बेट कोकणामध्ये मी पहिल्यांदाच अनुभवले!
सुनामी बेटावरून आम्ही आमच्या मुख्य वाटेला लागलो. बोट थेट निवतीच्या दीपस्तंभाकडे निघाली. समुद्राच्या दोन्ही बाजूंना दाट नारळाची झाडे दृष्टीस पडत होती. म्हणूनच की काय देवबागच्या या भागाला महाराष्ट्राचे केरळ देखील म्हणतात. देवबागचा समुद्रामध्ये आलेला भाग जिथे संपतो त्या ठिकाणी सीगल पक्षांवरून नाव दिलेले ‘सीगल बेट’ देखील त्याने आम्हाला दाखवले. त्यादिवशी ते पूर्णपणे पाण्यामध्ये होते. सुनामी येण्यापूर्वी देवबाग या बेटापर्यंत होते, असे त्याने आम्हाला सांगितले. परंतु आता किनारा बऱ्यापैकी मागे सरकलेला दिसतो.
सीगल बेट मागे पडल्यानंतर आम्ही समुद्रसफरीच्या मार्गाला लागलो. यापूर्वी पद्मदुर्ग, जंजिरा, सुवर्णदुर्ग अशा जलदुर्गांना भेट देताना समुद्रात बोटींद्वारे प्रवास केला होता. परंतु आजचा हा प्रवास सर्वात लांबचा ठरणार होता, हे मात्र नक्की. अगदी थोड्याच अंतरावर डॉल्फिन माशांची देखील गर्दी आम्हाला पाहायला मिळाली. या माशांचे भक्ष असणारे अन्य मासे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याने येथे डॉल्फिन नियमित पाहता येतात. परंतु चित्रपटांमध्ये जसे पाहतो तसे डॉल्फिन फार उंच उडत नव्हते. कदाचित त्यांच्या वजनामुळे त्यांना ते जमत नसावे!
सुमारे पाऊण तासाच्या प्रवासानंतर समुद्रातली ती छोटी छोटी बेटे दिसायला लागली. मागे समुद्रकिनारा आता पूर्णपणे हरवून गेला होता. चहूबाजूंनी केवळ समुद्रच समुद्र दृष्टीस पडत होता. इतक्या खोल समुद्रामध्ये आम्ही त्या दिवशी पहिल्यांदाच प्रवास करत होतो. आतली ही छोटी छोटी बेटे वैशिष्ट्यपूर्ण अशी होती. पूर्णपणे दगडाची आणि टोकदार. कदाचित समुद्रातील ज्वालामुखी मुळे तयार झाली असावीत, असं वाटून गेलं. रस्त्यामध्ये समुद्राच्या पाण्यावर तरंगणारं एक कासव देखील दृष्टीस पडलं. अर्थात समुद्रामध्ये होणार ते पहिलं कासव मला त्यादिवशी दिसलं. समुद्र-डोंगरांच्या मधून प्रवास करत आम्ही सर्वात पहिल्या आणि वैशिष्ट्यपूर्ण बेटापाशी आलो. या बेटाला मध्यभागी एक गुहा असल्यासारखी दिसत होती. त्याबद्दल विश्वेशने आम्हाला सविस्तर माहिती सांगितली. या गुहेमध्ये पाकोळी पक्ष्यांची अगणित घरटी आहेत. त्यांची एकेकाळी येथे तस्करी व्हायची. केरळहून आलेले तस्कर या पाकोळ्यांना पकडण्यासाठी जाळे लावत असत. परंतु आज असं काहीही संभवत नाही. या बेटाला गोल फेरी मारून आम्ही मागच्या बेटाच्या दिशेने निघालो. या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे स्कुबा डायव्हिंग देखील केले जाते. अर्थात इथले पाणी देखील तशाच प्रकारचे आहे.
आता समोर दिसणारे बेट या द्वीप समूहातील सर्वात मोठे बेट होते. आणि याच बेटावर समोर दीपस्तंभ दिसून आला. त्याला किल्लेनिवती चे नाव दिलेले आहे. हा दीपस्तंभ इंग्रजांनी बांधलेला आहे. आणि या ठिकाणी लक्ष ठेवण्याकरता एका व्यक्तीची देखील नियुक्ती केलेली आहे. चहूबाजूंनी समुद्राने वेढलेल्या या भागात एकट्याने राहणे किती अवघड असेल, याची प्रचिती तो भाग पाहिल्यानंतर येते. या बेटावर अजूनही बरीच बांधकामे दिसून आली. त्याच्या खालच्या भागात समुद्राच्या वेगवान प्रवाहानंतर एका कपारीतून उडत असलेल्या पाण्याचे दृश्य देखील आम्हाला दिसले. याला ‘म्हातारीची चूळ’ असे म्हणतात. परंतु त्या दिवशी समुद्र बऱ्यापैकी शांत असल्याने म्हतारीच्या या चूळीमध्ये फारशी ऊर्जा नव्हती. आमची बोट बराच वेळ इथे थांबून होती पण पाण्याचा प्रवाह स्तब्ध असल्याने त्यातील त्यातील ऊर्जा या कपारीतून अनुभवता आली नाही.
बेटाला गोल फेरी मारत आम्ही पुढच्या बेटाकडे आलो. ही बेटे जरी असली तरी यांना किनारा नाही. वैशिष्ट्यपूर्ण खडक समुद्रातून थेट सरळ वर आलेले आहेत, असं दिसतं. शेजारच्या एका बेटामध्ये समुद्राचा प्रवाह आतमध्ये जात होता आणि दुसऱ्या बाजूने बाहेर येत होता. निसर्गाचा हा जलखेळ पाहण्याची मजा काहीतरी वेगळीच होती. त्या दोन बेटांच्या मधून आमची बोट पुढे गेली. दुसऱ्या एका बेटाच्या आतमध्ये समुद्र प्रवाहातून जाऊन आम्ही परत मागे आलो. एव्हाना आणखी दोन बोटीदेखील या प्रवासामध्ये आम्हाला दृष्टीस पडल्या. शेजारच्या दुसऱ्या बेटावर ब्रिटिशांपूर्वी पोर्तुगीजांनी बांधलेला आणखी एक दीपस्तंभ दृष्टीस पडला. हा बऱ्यापैकी जीर्ण झालेला होता. या ठिकाणी मात्र कोणीही राहत नव्हते. याची उंची ब्रिटिशकालीन दीपस्तंभापेक्षा कमी होती. समुद्र खवळलेला असताना पोर्तुगीजांच्या या दीपस्तंभापर्यंत पाण्याच्या लाटा सहज पोहोचत असतील, इतपत त्याची उंची होती. या दीपस्तंभाला मागे टाकत आम्ही सर्वांच्या मध्यभागी आलो. अर्थात या ठिकाणी आमचा प्रवास खऱ्या अर्थाने समाप्तीकडे चाललेला होता. एक अविस्मरणीय अनुभव गाठीशी बांधून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. विशेष म्हणजे संपूर्ण प्रवासामध्ये या ठिकाणची इत्यंभूत माहिती विश्वेशने आम्हाला सांगितली. आम्ही भोगवे समुद्रकिनाऱ्यावरून निघालो होतो. परंतु जेवणासाठी त्याने आम्हाला पलीकडे देवबागला सोडले. जेवण झाल्यानंतर तो न्यायला देखील आला. आणि परत आमच्या गंतव्यस्थानी त्याने आम्हाला सोडले. एका अविस्मरणीय प्रवासाचा जवळपास तीन साडेतीन तासानंतर विराम झाला.
यात एक महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते. आमचा सारथी विश्वेश याने अतिशय नम्रपणे सगळ्या गोष्टींची आम्हाला माहिती दिली. प्रवासासाठी पाणी विकत घेण्यासाठी देखील त्यानेच मदत केली. जेवणासाठी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्याने आम्हाला देवबागला सोडले होते. आणि पुन्हा तिथून शेवटच्या स्थळी देखील सोडले. यानंतरच त्याने आमच्याकडून ठरलेले पैसे घेतले. त्याने आमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला होता. खरंतर आजच्या व्यावसायिक युगामध्ये अशी माणसं क्वचितच सापडतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कोकणातली अशी साधी भोळी माणसं आपल्याला नजरेस पडतात. त्यातीलच तोही एक.

— तुषार भ. कुटे

#कोकण #सिंधुदुर्ग #दीपस्तंभ #निवती #समुद्र #देवबाग #भोगवे