जवळपास अडीच ते तीन तासांचा गोवा-मुंबई महामार्गावरचा प्रवास करत आम्ही पोलादपूरला पोहोचलो. यावेळी पुण्यामध्ये परतण्यासाठी आंबेनळी घाटाचा पर्याय निवडला. यापूर्वी देखील मी स्वतः या घाटातून कधीच उतरलो अथवा चढलो नव्हतो. त्या दिवशी माझा हा पहिलाच अनुभव होता. कोकणातील दमट वातावरण आणि प्रखर सूर्यकिरणांना मागे टाकत आमची गाडी घाटाच्या दिशेने निघाली. अगदी थोड्याच अंतरावर घाट रस्त्याचा प्रवास देखील चालू झाला. आजूबाजूची हिरवीगार झाडी नागमोडी वळणांनी पार करत हळूहळू चढाच्या दिशेने आम्ही चाललो होतो. 20 ते 25 मिनिटांमध्येच मानवी वस्ती बऱ्यापैकी मागे पडली आणि सह्याद्रीच्या जंगलांमध्ये आमचा प्रवेश झाला. त्या दिवशी घाटामध्ये फारशी वाहतूक नव्हती. अगदीच महाबळेश्वर पाचगणी किंवा वाईला जाणारी वाहने अथवा येणारी वाहने अधून मधून दिसून यायची. परिसरातील वनराजी बऱ्यापैकी दाट होती. कोकणात उतरणाऱ्या अन्य घाटांपेक्षा ती निश्चितच घनदाट वाटत होती. सह्याद्रीच्या अशा जंगलांमधून प्रवास करताना तेथील नैसर्गिक हवा अंगावर घेताना जी शीतलता अनुभवता येते ती निश्चितच मन सुखावणारी असते. त्यादिवशी देखील माझी काही वेगळी भावना नव्हती. जवळपास मध्यापर्यंत घाट चढून आल्यावर एका वळणावरती उंच गगनाला भिडलेला शिवरायांचा प्रतापगड नजरेस पडला. या किल्ल्याच्या बऱ्यापैकी वरपर्यंत गाडी मार्ग झालेला आहे. त्यामुळे त्याची उंची इतकी जाणवत नाही. परंतु आंबेनळी घाटाच्या या बाजूने प्रतापगडाचे रौद्ररूप मात्र मनात भरले. साडेतीनशे वर्षांपूर्वी याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 32 दातांचा बोकड कापला होता याची वारंवार आठवण येत राहिली. शिवाजी महाराजांनी त्याकाळी या किल्ल्याची का निवड केली असावी? याचे उत्तर मात्र मला मिळाले. किल्ल्याभोवती असणार जावळीचं घनदाट जंगल म्हणजे या परिसराचं नैसर्गिक संरक्षणच होतं.
घाट चढून जवळपास सपाटीला आल्यावर आम्ही बऱ्यापैकी उंची गाठलेली आहे याची जाणीव झाली. ठीक ठिकाणी वळणावर उंच कडा वाहने सावकाश चालवा अशा पाट्या लावलेल्या दिसल्या. कोकणात उतरणाऱ्या अन्य कुठल्याही घाटात अशा प्रकारची पाटी दिसली नाही. शिवाय वरून पाहिल्यावरती खालच्या बाजूला खोल खोल दर्या दिसत होत्या. कदाचित हा सर्वात उंचीवरचा घाट असावा. अनेकदा अरुंद रस्त्यांवर गाडी चालवताना येथे धडकी देखील भरते. जिथवर नजर जाईल तिथपर्यंत केवळ जंगलच जंगल नजरेस पडत होतं. रायगड जिल्ह्याची हद्द संपून आम्ही सातारा जिल्ह्यात अर्थात महाबळेश्वर मध्ये प्रवेश केला. आणि लगेचच थंडगार वाऱ्यांनी आमचे सहर्ष स्वागत केले. महाबळेश्वरला पोहोचलो तोवर वातावरणात बऱ्यापैकी थंडी जाणवत होती. आजूबाजूच्या घनदाट वनराईमुळे थंडगार वाऱ्याचे झोप अंगावर घेत आम्ही वाईच्या दिशेने प्रस्थान केले.
--- तुषार भ. कुटे
माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Wednesday, June 11, 2025
आंबेनळी घाट
लेबल्स
कोकण,
घाट,
जंगल,
पोलादपूर तालुका,
रायगड जिल्हा,
सातारा जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
अप्रतिम.. ❤️👍🏻
ReplyDeleteधन्यवाद...
Delete