हर्णै बंदराच्या काठावर तीन किल्ले आहेत. अर्थात हे सर्व किल्ले आपण दोन ते
तीन तासांमध्ये सहज बघू शकतो. संध्याकाळच्या वेळेस आम्ही हर्णै बंदरावर
पोहोचलो होतो. सूर्य जवळपास मावळतीकडे झुकलेलाच होता. आधी कणकदुर्ग आणि
नंतर गोवादुर्ग किल्ला पाहून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. खरंतर इथे
येण्याचा येण्याचे उद्दिष्ट हे समुद्रातील सुवर्णदुर्ग किल्ला पाहण्याचेच
होते. परंतु संध्याकाळी जाऊन येण्यास उशीर लागत असल्याने आम्ही तो बेत रद्द
केला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच किल्ला पाहण्याचे ठरवले. या योजनेप्रमाणे
आम्ही सकाळी हर्णै बंदरावर पोहोचलो. कणकदुर्गाच्या पायथ्याशी
सुवर्णदुर्गाच्या दिशेने जाणाऱ्या बोटी लागतात. याची चौकशी आम्ही कालच करून
ठेवलेली होती. त्यामुळे आज गेल्यागेल्या लगेचच बोटीने सुवर्णदुर्गाच्या
दिशेने निघालो. कणकदुर्गाचा समुद्राच्या दिशेने गेलेला सुळका ओलांडून
जवळपास १५ ते २० मिनिटांमध्ये आम्ही सुवर्णदुर्गापाशी पोहोचलो.
किनार्यापासून हा किल्ला एक किलोमीटर देखील आतमध्ये नसावा. अजूनही बांधणी
उत्तम स्थितीमध्ये आहे.
किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी आम्ही पोहोचलो
होतो. समुद्रकिनाऱ्यावर असते तशीच वाळू या ठिकाणी पसरलेली दिसली.
महाद्वाराच्या पायरीवर एक कासवाची प्रतिमा कोरलेली होती. तर उजव्या
बाजूच्या तटबंदीवर हनुमानाची मूर्ती कोरलेली दिसून आली. ही मूर्ती
बऱ्यापैकी प्राचीन असावी, असे दिसले. किल्ल्याच्या नेहमीच्या रचनेप्रमाणे
प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर पहारेकऱ्यांच्या देवड्याही दिसून आल्या. आणि
त्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेल्या होत्या. अर्थात आजही त्या
भक्कम स्थितीमध्ये आहेत. किल्ल्याची पूर्ण तटबंदी अजूनही उत्तम स्थितीमध्ये
असल्याची दिसते. अर्थात समुद्रकिनाऱ्यापासून लांब असल्याने किल्ला अजूनही
पाहण्यालायक आहे, असे दिसते. डाव्या बाजूने पुढे गेल्यावर विहीर आणि काही
राजवाड्याचे अवशेष दिसून आले. तसेच धान्याचे कोठार देखील होते. बऱ्याच
ठिकाणी वाड्यांचे अवशेष दिसतात. आतली जमीन काही ठिकाणी उंच तर काही ठिकाणी
खोलगट असल्याची दिसली. पश्चिमेकडचा चोर दरवाजा अजूनही सुस्थितीत आहे.
त्याच्याजवळ जाऊन बघितले. कदाचित इथून समुद्राच्या दिशेने जाण्यासाठी रस्ता
असावा. एकंदरीत सहा ते सात विहिरी किल्ल्यावर होत्या. काही ठिकाणी
तोफेच्या नळ्या देखील दिसून आल्या.
असं म्हणतात की दर्यासारंग कान्होजी
आंग्रे यांची कुलदेवता असणारी कादंबिका देवी हिचे मंदिर त्यांनी कधीतरी
सुवर्णदुर्गावरून हलवून अलिबागच्या किल्ल्यामध्ये नेले होते. किल्ला
पाहण्यासाठी कमीत कमी दीड ते दोन तास तरी लागतात. शिवाय इथून इथल्या
तटबंदीवरून अरबी समुद्र दूरवर क्षितिजापर्यंत दिसून येतो. इसवी सन १६६०
मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतल्याचे समजते.
शिवाय ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये त्याच्यासाठी महाराजांनी दोन हजार रुपये
खर्च केल्याचे देखील लिहिलेलं आहे.
माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Sunday, September 1, 2024
सुवर्णदुर्ग
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment