रायगडच्या अलिबाग पासून तर सिंधुदुर्गातील शिरोड्यापर्यंत बहुतांश कोकण आम्ही फिरलो होतो. परंतु एकाही ठिकाणी फेरीबोटने जाण्याचा अनुभव घेतला नाही. अखेरीस त्या दिवशी तो योग आला. वेळणेश्वरमध्ये मनासारखे हॉटेल न मिळाल्याने आम्ही येथून जवळच असणाऱ्या गणपतीपुळेला जाण्याचा विचार केला. अंतर होते ३७ किलोमीटर.
समुद्रकिनाऱ्यावरच्या रस्त्याने मार्गक्रमण करत आम्ही गणपतीपुळेच्या दिशेने निघालो. तवसाळ या किनाऱ्यावरील गावापाशी आल्यावर येथून जयगडच्या दिशेने फेरीबोट घेण्याचे योजिले. त्यादिवशी हा आमचा पहिलाच अनुभव होता. जलप्रवाहाला मोठा वळसा घालून जाण्याऐवजी फेरीबोटीचा प्रवास सोयीस्कर होता. आमची गाडी बोटीवर चढवली आणि आम्ही देखील प्रवासाला सज्ज झालो. तवसाळच्या किनाऱ्यावरून समोरच जयगड किल्ला दिसतो. इथे जेएसडब्ल्यू कंपनीचे बंदर आहे, तसेच समोरच जयगडचे दीपगृह देखील नजरेस पडले. आमचा प्रवास सुरू झाला तेव्हा वातावरण ढगांनी भरून आलेले होते. वारा देखील काहीसा वाहत होता. म्हणूनच अधूनमधून लाटा उसळत होत्या. समुद्रात बोटींची गर्दी दिसून आली. रंगीबेरंगी झेंडे लावलेल्या बोटी चहुदिशांनी फिरत होत्या. समुद्रातल्या त्या प्रवासाचा आनंद घेत आम्ही निघालो. अगदी अर्ध्याच तासाच्या अंतराने आम्ही जयगडच्या किनाऱ्यावर लागलो. जयगड किल्ल्यावर पाच ते सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा आलो
होतो. त्याच्या जवळच्या रस्त्याने वळसा घालून गणपतीपुळेच्या दिशेने
मार्गक्रमण चालू केले.
No comments:
Post a Comment