गोकर्णविषयी दोन-एक वर्षांपूर्वी ऐकले होते. कर्नाटकातील हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे यावेळेसचा प्रवास गोकर्णपर्यंत करायचा असे आम्ही आधीच ठरवले होते. म्हणूनच यावेळेस गोकर्ण हेच मुख्य आकर्षण होते. तिसऱ्या दिवशी गोकर्णला जाऊन यायचे ठरवले. याच दिवशी सकाळी अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश हा T20 विश्वचषकाचा सामना होता. रिसॉर्टवरच आम्ही या सामन्याच्या थराराचा मनमुराद आनंद घेतला. आणि जवळपास ११ च्या सुमारास रिसॉर्टवरून थेट गोकर्णच्या दिशेने निघालो. दोन दिवसांपूर्वी आम्ही महाराष्ट्रातून गोव्यामध्ये प्रवेश केला होता. आज गोव्यामधून कर्नाटकामध्ये जाणार होतो. १५ ते २० मिनिटांच्या गोव्याच्या त्या गर्द झाडीतील प्रवासानंतर आम्ही पनवेल-कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ ला लागलो. आणि गाडी सुसाट वेगाने दक्षिणेला निघाली. आज महामार्गावर काहीच गर्दी नव्हती. पाऊस मात्र येत जात होता. कधी कधी त्याचा जोर बराच असायचा तर कधी तो संथगतीने पडत होता. ३० ते ४० किलोमीटर अंतरानंतर आम्ही गोवा-कर्नाटक सीमारेषेवर पोहोचलो. गोव्यातून बाहेर जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर पोलिसांची नाकेबंदी असते. तशीच या ठिकाणी देखील होती. अर्थात या राज्यातून दारूच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्यांची तपासणी या ठिकाणी प्रामुख्याने होत असते. अर्थात ती आमची देखील झाली. कर्नाटकात प्रवेश केल्यानंतर आम्ही सुसाट वेगाने गोकर्णच्या दिशेने निघालो. रस्त्यात कारवार हे कर्नाटकातील एक मोठे गाव देखील लागले. इतक्या वर्षांमध्ये या राष्ट्रीय महामार्गाची अजूनही बरीच कामे चालू असल्याचे दिसून आले. या भागात बऱ्यापैकी चांगला पाऊस झालेला होता. नद्या देखील दुधडी वाहून चाललेल्या होत्या. त्या सुंदर निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आम्ही गोकर्णच्या फाट्यापाशी पोहोचलो आणि उजवीकडे समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने निघालो. चार पदरी रस्ता आता दोन पदरी झाला होता. आणि पावसाचा वेग देखील वाढीस लागला होता. गर्द हिरवाईने मनमोहक वातावरणात रंग भरल्याचे दिसत होते. आणि आम्हाला गोकर्णला पोहोचण्याची ओढ लागलेली होती. इच्छित स्थळी पोहोचण्यापूर्वी गाडीमध्ये संपलेला सीएनजी गॅस भरून घेतला पुन्हा मार्गस्थ झालो. गोकर्णमध्ये पोहोचलो तेव्हा दुपार झालेली होती. म्हणून दुपारचे जेवण करण्यासाठी एका छोट्याशा हॉटेलमध्ये थांबलो. महाराष्ट्रापासून इतक्या दूर असून देखील या ठिकाणी असलेल्या वेटरला मराठी भाषा अवगत होती याचे विशेष वाटले. तसं पाहिलं तर पूर्ण गोव्यामध्ये आम्ही सर्वांशी मराठी भाषेमध्येच बोलत होतो. अर्थात भाषेची अडचण जाणवली नाही.
जेवण संपवून गोकर्णच्या दिशेने निघालो. खरंतर या ठिकाणाने आमचा अपेक्षाभंग करायला सुरुवात केली होती. कारण याविषयी बरंच ऐकलं आणि वाचलं देखील होते, परंतु तशा प्रकारचं हे ठिकाण नव्हतं. छोट्या छोट्या गल्ल्यांमधून मार्ग काढत आम्ही समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो. वातावरण पूर्ण ढगाळलेलं होतं. समुद्र खवळलेलाच होता. किनाऱ्यावर बऱ्यापैकी गर्दी होती, परंतु अतिशय अस्वच्छ समुद्रकिनारा या ठिकाणी दिसून आला. आजूबाजूच्या काही डोंगरांवर मंदिरे दिसून येत होती. या व्यतिरिक्त देखील अनेक मंदिरे या परिसरात होती. परंतु इथली अस्वच्छता विशेष करून दिसून येत होती. गुगल मॅपवर देखील अनेक ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी जावेसे वाटले नाही. आणि पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो. सुमारे दोन तासांचा प्रवास करून या ठिकाणी पोहोचलो होतो. पण काहीच साध्य झाले नाही. त्यामुळे कर्नाटकामध्ये आलोच आहोत तर कोणत्यातरी ठिकाण बघून जाऊ, असा विचार आम्ही केला. तेव्हा जवळच मिरजान किल्ला दृष्टीस पडला. मग काय… त्या दिशेने मोर्चा वळवला.
माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Wednesday, August 7, 2024
गोकर्ण
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment