माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Sunday, April 7, 2013

डुबेरे गड

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात डुबेरे गड वसलेला आहे. नाशिकपासून सुमारे ३५ किलोमीटर व सिन्नरपासून आठ किलोमीटर अंतरावर हा डोंगर आहे. गूगल मॅप्सवर याच्या मार्गाची माहिती मिळू शकेल. सिन्नर-घोटी मार्गावर सिन्नर पासून सुमारे पाऊण ते एक किमी अंतर गेल्यावर डावीकडे जाण्याकरिता एक रस्ता लागतो. हा रस्ता जिल्हामार्ग या प्रकारात येत असला तरी खूप चांगल्या स्थितीत आहे. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजुंना बऱ्यापैकी झाडी आहे. त्यामुळे प्रवास सुखद वाटतो. डुबेरे गांव चालू झाल्यावर सुरूवातीलाच उजवीकडे डुबेरे गड दिसून येतो. गांवातून तिथवर जाण्याचा रस्ता मात्र खडकाळलेला आहे. पावसाच्या पाण्याने कदाचित त्याची तशी अवस्था झाली असावी! गडाच्या पायथ्याशी एक महादेवाचे मोठे मंदिर आहे. आत मोठे शिवलिंग दिसून येते. मंदिराच्या उजव्या बाजुने एक पायऱ्यांची वाट डुबेरे गडाच्या दिशेने जाते. हा रस्ता अगदी अलिकडच्या काळात बांधला असावा. पावसाळ्यात डुबेरेचे वातावरण अगदी सुखद अनुभव देऊन जाते. गडाच्या माथ्यावर जाण्यास पंधरा मिनिटे पुरतात. बहुतांश ठिकाणी ऍल्युमिनियमचे रेलिंग्ज टाकल्याचे दिसून येतात. गडमाथा हा एक पठारच आहे. त्याच्या मध्यभागी एक सप्तशृंगी मातेचे मंदिर बांधलेले आहे. दोन ठिकाणी पाण्याची टाकी दिसून येतात. गडाच्या माथ्यावरून सिन्नर शहराचे तसे नाशिकचेही दर्शन घडते. नशिकच्या पांडवलेणी व विहितगांव या भागातून डुबेरे गड सहज दिसतो. इगतपुरी रांगेतील बहुतांश किल्ले डुबेरे वरून दिसतात. सह्याद्रीची ही पूर्ण रांग लांबपर्यंत दिसून येते. नाशिकहून दोन-तीन तासांचा छोटा ट्रेक करण्यासाठी डुबेरे हे एक चांगले ठिकाण आहे.

डुबेरे कडे जाण्याचा मार्ग (सिन्नर मधून)
छायाचित्र:

डुबेरे गड

डुबेरे गड

मंदिरातून दिसणारा डुबेरे

माथ्यावर फडकणारा भगवा.

सप्तशृङ्गि मंदिर.

डुबेरे गडावरील ध्यानस्थ कर्मयोगी- भूषण घोलप.

चढतॆच्या पायर्या

शिवलिंग 

दुबेरेचे कडे

गडावरील पाण्याची टाकी

Wednesday, April 3, 2013

त्र्यंबकगड : पुराणकाळाचा भक्कम साक्षीदार

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणा-या नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमधील दुर्ग म्हणजे त्र्यंबकगड होय. हा किल्ला त्र्यंबक या नावापेक्षा ‘ब्रह्मगिरी’ या नावाने अधिक सुपरिचित आहे. ऐतिहासिकतेपेक्षा पौराणिक महत्त्व या गडाला अधिक असल्याचे दिसते. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे सह्याद्रीची एक डोंगररांग गेली आहे. या रांगेस त्र्यंबकरांग असे म्हणतात. ब्रह्मगिरी, अंजनेरी, बसगड, उतवड यासारखे गडकोट या रांगेत उभे आहेत. यातील ब्रह्मगिरी हा सर्वात मोठा गड आहे. या गडाचे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व तर आहेच, शिवाय पर्यटकांच्या दृष्टीने ब्रह्मगिरी ही एक पर्वणीच मानली जाते.

तेराव्या शतकात त्र्यंबक किल्ला व परिसरात देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या भावाची राजवट होती. कालांतराने हा किल्ला बहामनी राजवटीकडे गेला. नंतर निझामशाही, शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व मुघल अशा राजवटींत या किल्ल्याचे हस्तांतरण झाले. मुघल इतिहासकारांनी या किल्ल्याचा ‘नासिक’ असाच उल्लेख केला आहे. सन 1670मध्ये शिवाजी महाराजांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला होता. छत्रपती संभाजी राजांच्या   काळात राधो खोपडे हा फितूर झाल्याने मुघलांनी त्र्यंबकगड मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. सन 1689 पर्यंत हा किल्ला छत्रपती संभाजी राजांच्याच ताब्यात होता. त्र्यंबकेश्वर हे त्र्यंबकगडाच्या पायथ्याचे ठिकाण होय. चहुबाजूंनी पर्वतांच्या वेढ्यात हे गाव वसलेले आहे. नाशिक शहरापासून त्र्यंबकेश्वर सुमारे 28 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिकच्या मेळा बसस्थानकावरून राज्य परिवहन मंडळाच्या गाड्यांची येथे सतत ये-जा चालूच असते.

शिवाय नाशिकहून पालघर, जव्हार, वाडा या ठिकाणी जाणा-या सर्व बसेस त्र्यंबकेश्वर मार्गे जातात. त्र्यंबकेश्वर
बसस्थानकापासून दहा मिनिटांत ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी पोहोचता येते. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने त्र्यंबकगडाच्या पायथ्याजवळ ‘संस्कृती रिसॉर्ट’ बांधलेले आहे. या रिसॉर्टपासून गडाच्या दिशेने दोन वाटा जातात. दोन्हीही वाटा या पाय-यांच्या आहेत. उजव्या बाजूच्या वाटेने गंगाद्वारापाशी पोहोचता येते, तर डावी वाट थेट गडाच्या दिशेने जाते.

गंगाद्वाराच्या वाटेने वर गेल्यावरही पुन्हा त्र्यंबकगडाकडे जाण्यासाठी पायवाट तयार केलेली आहे. प्रत्यक्ष गडाच्या दिशेने जाण्याकरता मात्र डाव्या बाजूच्या रस्त्यानेच जाणे योग्य ठरते. पावसाळ्यात येथील संपूर्ण परिसर हिरव्या वनराईने नटलेला असतो. त्र्यंबक गडावर येण्याचा रस्ता पाय-यांनी बनवलेला असल्याने फारसा अवघड भासत नाही. चालता चालता रस्त्यात ठिकठिकाणी छोटी मंदिरे दृष्टीस पडतात. सुमारे एक तास पाय-या चढत गेल्यावर किल्ल्याचे मुख्यद्वार लागते. यापुढील पाय-या या कातळात कोरलेल्या आहेत. अखंड दगडांत बनवलेल्या पाय-या पाहता सातवाहनांच्या गडरचनेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अतिशय कुशलतेने या पाय-यांची रचना दगडांमध्ये करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी पाय-या खोलवर असल्याने अंधार जास्त होतो. पाय-या संपल्यावर किल्ल्याचे प्रशस्त पठार नजरेस पडते. पूर्ण त्र्यंबकेश्वर गावाचे दर्शन या ठिकाणाहून व्यवस्थित करता येते. किल्ल्याचे कडे अतिशय भक्कम आहेत. येथूनच पाय-यांच्या बाजूने समोरच्या दिशेला अंजनेरी गड दृष्टीस पडतो. वातावरण स्वच्छ असताना रामशेज व देहेरच्या किल्ल्याचेही दर्शन होते. किल्ल्याचा माथा प्रशस्त असला तरी ‘किल्ला’ म्हणावा असे जास्त अवशेष येथे शिल्लक राहिलेले नाहीत. काही ठिकाणी सपाट प्रदेशावर राहत्या घरांचे प्राचीन अवशेष दिसून येतात. त्या ठिकाणी कोणी फिरकत नाही. हा किल्ला दोन्ही बाजूंनी प्रचंड विस्तारलेला आहे. उजव्या बाजूच्या टोकाला काही ठिकाणी पडलेली तटबंदी नजरेस पडते. या ठिकाणी जाण्याची वाट अवघड असल्याने इथे फिरकणा-यांची संख्या तशी कमीच आहे. सरळ उभे ठाकलेले कडे गडमाथ्यावरून न्याहाळता येतात. गडमाथ्याचा एक उंचवटा पार केल्यावर मागच्या बाजूला गडावरील गोदावरी उगमस्थान, गंगा-गोदावरी मंदिर व जटा मंदिर नजरेस पडते. समोरच्या पर्वतरांगांमध्ये हरिहर किल्ला डौलाने उभा असलेला दिसून येतो. अनेक ट्रेकर्स त्र्यंबक ते हरिहर असाही ट्रेक आयोजित करतात. ही वाट पर्वतांच्या एका खिंडीतून जाते. त्र्यंबक पठारावरील पाय-यांच्या वाटेने मध्येच एक नवी वाट डावीकडे ‘सिद्धगुंफा’ या ठिकाणी जाते. कड्यात कोरलेली गुहा या ठिकाणी पाहता येते. उजवीकडील रस्त्यावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. गंगा-गोदावरी मंदिरात गोदावरीचा प्रवाह पाहता येतो. या मंदिराच्या शेजारी एक बारमाही पाण्याचे टाके आहे. प्राचीन काळापासून या टाक्याचा वापर पाणी साठवण्याकरता होत असावा, असे दिसते.  जटा मंदिराच्या मागच्या बाजूला असणा-या टेकडीच्या पलीकडे त्र्यंबक किल्ल्याचा मुख्य बुरूज आहे. परंतु त्याचीही पडझड झाली आहे. त्र्यंबकवरून आजूबाजूचा मोठा परिसर दृष्टिक्षेपात येतो. पावसाळ्यात पर्यटकांची मोठी वर्दळ येथे दिसून येते, तर इतर वेळेस शिवभक्त या पर्वतावर गंगा-गोदावरीचे दर्शन घेण्यासाठी येतात. एका अर्थाने या गडामुळे नाशिक जिल्ह्याचे  ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व अधोरेखित होत जाते.
tushar@tusharkute.com

प्रसिद्धी: दै. दिव्य मराठी (दि. ०३ फेब्रुवारी २०१३).
मूळ लेख: लिंक.

Sunday, March 31, 2013

खान्देशाचे वैभव: सोनगीर


दगडांचा देश असणा-या महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या काही रांगा या खान्देशापर्यंत जातात. परंतु या तुरळक रांगांना कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील किल्ल्यांइतकी उंची नाही. तरीही या भागात अनेक गडकोट वसलेले आहेत. यात गिरीदुर्गांची संख्या कमी व भुईकोट किल्ल्यांची अधिक आहे.

असे म्हटले जाते की, विंध्य पर्वत पार करून दक्षिणगंगेच्या तीरावर वास्तव्य करणारे अगस्ती ऋषी हे पहिले आर्य होय. त्यांच्या काळात या प्रदेशाचे नाव ‘ऋषिक’ वा ‘रसिक’ असे होते. सम्राट अशोकाच्या अधिपत्याखालील हा प्रदेश कालांतराने सातवाहनांकडे गेला व इ.स. 250मध्ये अहिर राजांनी तो जिंकून घेतला. त्यानंतर वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट व देवगिरीच्या यादवांनी या प्रदेशावर राज्य केले. अल्लाउद्दीन खिलजीने सन 1294मध्ये हा प्रदेश स्वत:च्या ताब्यात घेतला. गुजरातचा सुलतान पहिला अहमद याने या प्रदेशात दुसरा फारुकी राजा मलिक याला खान ही पदवी प्रदान केली होती. त्यावरून या प्रदेशाचे नाव ‘खानदेश’ पडले. याच काळात अनेक किल्ल्यांची निर्मिती धुळे व जळगाव या भागांत झाली. यातीलच एक वैभवशाली किल्ला म्हणजे ‘सोनगीर’ होय.

महाराष्ट्रात सोनगीर या नावाचे तीन किल्ले आहेत. त्यातील एक रायगड जिल्ह्यात नागोठणेजवळ, तर दुसरा पुणे जिल्ह्यात कर्जतजवळ आहे. त्यामुळे धुळ्याजवळील या सोनगीरला ‘खान्देशचा सोनगीर’ म्हणतात! धुळे शहरापासून 21 कि.मी. अंतरावर हा किल्ला अगदी मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. त्याची निर्मिती कोणी व केव्हा केली, याची माहिती आज दुर्दैवाने उपलब्ध नाही. इ.स. 1370मध्ये फारुकी सुलतानांनी हा किल्ला स्वत:च्या अधिपत्याखाली आणला. लळिंग किल्ल्यापासून केवळ 30 किलोमीटरवर असल्याने सोनगीरला महत्त्व प्राप्त झाले. मुघल बादशहा अकबराने आपला साम्राज्य विस्तार खान्देशापर्यंत आणल्याने सोनगीरही त्याच्या ताब्यात गेला. औरंगजेब हा सोनगीरवर सत्ता प्रस्थापित करणारा शेवटचा मुघल सम्राट होता. मराठेशाहीत पेशव्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. इ.स. 1818मध्ये पेशव्यांचा पराभव करून ब्रिटिशांनी त्याच्यावर सत्ता स्थापन केली. धुळे या शहरापासून सोनगीर किल्ला केवळ 21 किमी अंतरावर आहे. शिवाय तो मुंबई, आग्रा या राष्ट्रीय महामार्ग क्र. तीनवर वसलेला असल्याने या मार्गावरून जाणा-या गाड्या सोनगीरवरूनच जातात. सोनगीर हे या किल्ल्याच्या पायथ्यालगतच वसलेले गाव होय. धुळ्याहून शिरपूरला जाणा-या सर्व गाड्या सोनगीरला थांबतात. या मार्गावर धुळे आगाराची ‘यशवंती’ ही मिनी बस दर अर्ध्या तासाने उपलब्ध होते. शिवाय शहादा, दोंडाईचा या गावांना जाणा-या बसही सोनगीरवरूनच जातात. बसशिवाय खासगी वाहनांचीही सोनगीरला जाण्यासाठी सोय आहे. धुळ्याहून शिरपूरला जाणा-या खासगी वाहनांनी सोनगीरला उतरता येते. महामार्गावर सोनगीर गावात उतरल्यावर गावाच्या पलीकडेच किल्ला दृष्टीस पडतो. तसे हे गाव दाट लोकवस्तीचे आहे. सोनगीरचा किल्ला तयार झाल्यानंतरच पायथ्याला गाव विकसित झाले असावे, असे दिसते. हा किल्ला एका लहानशा टेकडीवर वसलेला आहे. त्यामुळे त्याला भुईकोट म्हणणेही योग्य ठरणार नाही. भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला सह्याद्रीच्या गाळणा शृंखलेमध्ये येतो. सोनगीर गावातून किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्याकरता दहा-पंधरा मिनिटे पुरतात. परंतु, दाट लोकवस्तीमुळे स्थानिकांना विचारत मार्ग शोधावा लागतो.

किल्ल्याच्या पाय-यांची सुरुवात एका नव्यानेच बांधलेल्या कमानीने होते. पर्यटन विकासाच्या नावाखाली या कमानीचे बांधकाम झाले आहे. सुरुवातीच्या काही पाय-याही नजीकच्या काळातच सिमेंटने बांधलेल्या दिसून येतात. परंतु त्यांची सध्याची अवस्था पाहता स्थानिकांना किल्ल्याच्या महत्त्वाचे सोयरसुतक नसल्याचे दिसते. थोडे पायी चालत जाईपर्यंत येथील दुर्गंधी आपली पाठ सोडत नाही. चालत असतानाच किल्ल्याची नक्की ठेवण ध्यानात येते. एखाद्या राजस्थानी वास्तुपद्धतीचा हा किल्ला भासतो. किल्ल्याची खरी सुरुवात त्याच्या उद््ध्वस्त प्रवेशद्वाराने होते. सध्या हा दरवाजा कसाबसा तग धरून उभा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्याची बरीचशी मोडतोड झाली असल्याचे दिसते. पायथ्यापासून दरवाजापर्यंत येण्यास दहा मिनिटे पुरतात. अन्य किल्ल्यांप्रमाणे याच्या दरवाज्यावर कोरीव काम वा नक्षीकाम दिसून येत नाही. कदाचित, कालानुरूप तेही नष्ट झाले असावे. काही वर्षांपूर्वी या दरवाजावर एक संस्कृत शिलालेख लावलेला होता. परंतु तो प्रवेशद्वारावरून खाली निखळून पडला. 27*5 इंचांचा हा शिलालेख आज धुळ्याच्या वि. का. राजवाडे संशोधन मंडळात नेऊन ठेवलेला आहे. त्यावर देवनागरी लिपीत काही श्लोक कोरलेले आहेत.

मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर कातळात कोरलेल्या पाय-या दिसून येतात. कातळात कोरलेल्या असल्याने त्यांची फारशी मोडतोड झालेली नाही. परंतु आजूबाजूला अनेक खांबांचे अवशेष पडल्याचे दिसून येतात. एकेकाळी या प्रवेशद्वाराची अतिशय सुंदर रचना केलेली असावी. पाय-यांच्या सुरुवातीला दरवाजाच्या शेजारी एक कबर आहे. त्याचा संदर्भ मात्र कुठे सापडत नाही. कातळातील पंधरा-वीस पाय-या चढून गेले की, आपण थेट गडाच्या माथ्यावर पोहोचतो. येथून संपूर्ण सोनगीर गावाचे एकाच दृष्टिक्षेपात दर्शन घेता येते. शिवाय धुळे, आग्रा मार्गावरील वाहतूक ब-याच अंतरापर्यंत न्याहाळताही येते. गडमाथ्यावर जाण्याकरता येथून दोन मार्ग आहेत. डाव्या बाजूने चालत जाऊन सोनगीरची माची पाहता येते. तर उजव्या बाजूने गडाचा मुख बुरूज पाहता येतो. किल्ल्याचा गडमाथा समुद्रसपाटीपासून   सुमारे तीनशे मीटर उंचीवर आहे. तो रुंदीला कमी असून लांबीला जास्त असल्याचे दिसते. सद्यस्थितीत पठार हे सपाट आहे. परंतु या गडमाथ्यावरील काही गोष्टींचे निरीक्षण केल्यास या किल्ल्याच्या एकेकाळच्या वैभवाची जाणीव होते. सोनगीरच्या डावीकडील माचीकडे जाताना ती निमुळती होत गेल्याचे दिसते. तिच्या टोकावरून खाली फारसे अंतर नाही. परंतु तिथून कोणी सहज वरती येऊही शकत नाही. गडमाथ्यावरील तटबंदी ही पूर्णपणे ढासळून गेली आहे. परंतु गडाच्या बाजूंची तटबंदी ही लाल रेखीव दगडांची असल्याचे दिसते. तीही अधूनमधून ढासळलेली आहे. माचीच्या दोन्ही कडांनी चालत गेल्यास येथील ढासळलेले अवशेष दृष्टीस पडतात. किल्ल्याचा मध्यभाग तसा प्रशस्त आहे. त्याच्या उजवीकडील बाजूस किल्ल्याचा मुख्य बुरूज पाहता येतो.
मुख्य बुरुजाकडे जाताना दोन, तीन ठिकाणी हौदासारख्या वास्तू नजरेस पडतात. त्यात तेल व तूप साठवत असल्याचे दिसून येते. त्यांची मोडतोड आज झालेली आहे. या वास्तूला तेलटाके व तूपटाके असेही म्हटले जाते. थोडे पुढे गेल्यावर एक मोठी विहीर लागते. गडावरील ही चौकोनी विहीर खूप खोल आहे. वरून पाहता तिचा तळ ध्यानात येत नाही. पाण्याचा साठा मात्र या विहिरीत सदैव असतो. त्यात दगड टाकून पाण्याच्या सद्य:स्थितीचा अंदाज घेता येतो. या विहिरीची खोली दहामजली इमारतीएवढी असावी, असे म्हटले जाते. तिच्याभोवती सध्या झाडाझुडपांचे साम्राज्य झाले आहे. विहिरीच्या समोरच पुष्करणीचा हौद लागतो. त्याचेही अवशेषच पाहायला मिळतात. सध्या त्याचे चौदा कोनाडे राहिल्याचे दिसतात. याच्याच वर नव्यानेच काही शिवप्रेमी संस्थांनी हवनस्तंभ उभारला आहे. मोक्याच्या ठिकाणी असल्याने तिथून किल्ला दिसतो. तिथून हा ध्वजस्तंभही नजरेस पडतो. मुख्य बुरुजाकडे जाताना पडीक घरांचे अवशेष दिसून येतात. या बुरुजावरील तटबंदीही ढासळलेली आहे. येथून ब-याच लांबपर्यंतचा प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. बुरुजावरील भग्न अवशेष मात्र खान्देशच्या या किल्ल्याच्या एकेकाळच्या वैभवाची कल्पना देऊन जातात. अगदी मोक्याच्या ठिकाणी असणा-या सोनगीरच्या या किल्ल्याची रचना फार भव्यदिव्य नाही. तरीही गतइतिहासात हरवलेल्या वैभवाची साक्ष देत तो अस्तित्वाशी झुंजत उभा आहे.

Friday, March 29, 2013

मंगळग्रह मंदिर, अंमळनेर

भारत हा एक मंदिरांचा प्रदेश आहे. येथे निरनिराळ्या प्रकारची मंदिरे पहायला मिळतात. असेच एक वेगळ्या प्रकारचे मंदिर जळगांव जिल्ह्यातील अंमळनेर इथे पहायला मिळते. हे मंदिर आहे, मंगळग्रहाचे! भारतात मंगळग्रहाची केवळ दोनच मंदिरे आहेत. त्यातील एक मंदिर कोलकता येथे तर दुसरे अंमळनेर येथे आहे. अंमळनेरचा नगरदुर्ग पाहायला गेलो तेव्हा या मंदिराचे दर्शन झाले. अंमळनेर मधील बोरी नदी पार करून गेले की डाव्या बाजुला चोपडा कडे जाण्याकरिता रस्ता आहे. याच रस्त्यावर मंगळग्रह मंदिर आहे. मुख्य बसस्थानकापासून ते सुमारे दोन कि.मी. अंतरावर असावे. मंगळवारी गेल्याने या ठिकाणी मोठी गर्दी होती, त्यामुळे अधिक छायाचित्रे काढता आली नाहीत. श्रद्धाळूंची संख्या मात्र मोठी होती, अगदी ’देऊळ’ प्रमाणेच. नाशिकच्या विहितगांव येथे नवग्रहांचे एक मंदिर आहे, तेथेही मंगळाचे छोटेखानी मंदिर पाहता येते.
.
Mangalgrah Temple Road Way(Chopda Road), Amalner

Sunday, March 24, 2013

देदीप्यमान इतिहासाचा भरभक्कम साक्षीदार: अहमदनगर किल्ला.


सह्याद्रीच्या या प्रदेशात भुईकोट किल्ल्यांचे अस्तित्व तसे कमीच. मराठ्यांच्या राजवटीत गिरिदुर्गांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला व त्याच काळात या किल्ल्यांचे महत्त्वही वाढीस लागले. परिणामी भुईकोट किल्ल्यांचा महाराष्ट्राला मोठा इतिहास नाही. केवळ सपाट भूप्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भुईकोट किल्ल्यांची बांधणी करण्यात आली होती. अशाच काही अभेद्य भुईकोट किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे सुमारे पाचशे वर्षांपासून विविध रोमांचक घटनांचा साक्षीदार बनून बलाढ्यपणे उभा असलेला अहमदनगरचा ‘कोटवण निजाम’ भुईकोट किल्ला. ‘अहमदनगरचा किल्ला’ असेच या भुईकोट किल्ल्याचे प्रचलित नाव.

किल्ल्याची सध्याची भक्कम स्थिती पाहून तो पाचशे वर्षांपूर्वी बांधला असे वाटत नाही, इतक्या सुस्थितीत हा भुईकोट किल्ला आहे. अहमदनगर शहरामध्येच पूर्वेला हा किल्ला वसलेला आहे. त्याचा परीघ एक मैल व ऐंशी यार्ड असून तो आशिया खंडातील सर्वोत्तम भुईकोट किल्ल्यांपैकी एक गणला जातो. महाराष्ट्रातील बहामनी राजवटीच्या अखेरच्या काळात इ. स. 1486 मध्ये राज्याचे पाच तुकडे झाले. यातूनच विभक्त झालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने भिंगार गावाजवळ नवे शहर स्थापन करण्यास सुरुवात केली होती. सन 1490 मध्ये सिना नदीच्या तीरावर हा किल्ला बांधण्यास सुरुवात झाली. सन 1494 मध्ये त्याची बांधणी पूर्ण झाली व हा किल्ला निजामशाहीचा राजधानीचा किल्ला बनला. मलिक अहमदशहामुळेच या शहराला अहमदनगर हे नाव पडले. हा किल्ला स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना मानला जातो.

अहमदनगरच्या या किल्ल्यात फंदफितुरीची कारस्थाने शिजली व भाऊबंदकीची नाट्येही रंगली. अनेक तहाचे प्रसंग व शौर्याचे प्रसंग या किल्ल्याने ‘याचि देही याचि डोळा’ पाहिले. अहमदशहा, बु-हाणशहा, सुलताना चांदबीबी यांची कारकीर्द घडवणारी निजामशाही सन 1636पर्यंत इथे नांदत होती. सन 1636 नंतर मुघल बादशहा शहाजहानने अहमदनगर किल्ल्यावर कब्जा केला. त्या काळात मुघलांचा किल्लेदार मुफलत खान अहमदनगरची बाजू सांभाळत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनाही या किल्ल्याने भुरळ घातली होती. या किल्ल्याची महती ते जाणून होते. शिवरायांच्या सैन्याने या प्रांतात तीन वेळा स्वारी केली होती. मात्र हा किल्ला जिंकण्याची महाराजांची इच्छा अपूर्णच राहिली. कालांतराने मुघल सरदार कवी जंग यांना वैयक्तिक जहागिरी प्रदान करून पेशव्यांनी हा किल्ला आपल्या पदरी पाडून घेतला. पुढे सन 1817मध्ये इंग्रजांनी अहमदनगरवर विजय मिळवला. तदनंतर 1947 पर्यंत हा किल्ला त्यांच्याच ताब्यात होता.

अहमदनगरच्या या किल्ल्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे याचा वापर अनेक राजकीय कैदी ठेवण्यासाठी बर्‍याच वेळा केला गेला. किल्ल्याच्या भक्कमतेमुळे मुघल, पेशव्यांपासून इंग्रजांपर्यंत अनेकांचे बंदिवान या किल्ल्यात कैद होते. सन 1767 मध्ये तोतया सदाशिवराव भाऊ, 1776 मध्ये पेशव्यांचे सरदार सखाराम हरी गुप्ते तसेच चिंतो रायरीकर, नाना फडणवीस, मोरोबा दादा, बाळोबा तात्या, सदाशिव मल्हार, भागीरथीबाई शिंदे इत्यादींना या किल्ल्यात कैदी म्हणून राहावे लागले होते. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर इंग्रजांनी अनेक जर्मन कैद्यांना कैद करून ठेवण्यासाठीही या किल्ल्याचा वापर केला होता. तसेच 1942 मध्ये ‘चले जाव’ आंदोलनात इंग्रजांनी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची धरपकड केली. पंडित नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, गोविंद वल्लभ पंत, आचार्य नरेंद्र देव, सरदार पटेल, पंडित हरिकृष्ण मेहताब, आचार्य कृपलानी, डॉ. सय्यद मेहबूब, डॉ. वट्टामी सीतारामय्या, असफ अली, डॉ. पी. सी. घोष, आचार्य शंकरराव देव या काँग्रेस नेत्यांना या किल्ल्यात बंदिस्त केले गेले होते. चौथ्या शिवाजी महाराजांचा गूढ मृत्यू याच ठिकाणी झाला. कैदेत असताना पंडित नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, मौलाना आझाद यांनी ‘गुबार-ए-खातिर’, पी. सी. घोष यांनी ‘हिस्ट्री ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन’ हे ग्रंथ याच किल्ल्यात लिहिले.

अहमदनगरच्या मध्यवर्ती व तारकपूर या दोन्ही बसस्थानकांपासून हा किल्ला जवळपास सारख्याच अंतरावर आहे. दोन्ही बसस्थानकांवरून किल्ल्याकडे जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध होतात. त्यामुळे केवळ दहा मिनिटांतच किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचता येते. सध्या किल्ला भारतीय सैन्यदलाच्या ताब्यात असल्याने आत त्यांचा बंदोबस्त दिसून येतो. मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला भारताचा राष्ट्रध्वज डौलाने फडकताना दिसतो. इंग्रजांनी पेशव्यांकडून किल्ला ताब्यात घेतला व किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी इंग्रज सेनापती ऑर्थर वेलस्ली याने किल्ल्याजवळील चिंचेच्या झाडाखाली बसून न्याहारी केली होती. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ इथे चार तोफा ठेवण्यात आल्या आहेत. जुन्या मजबूत बनावटीच्या तोफा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पाहण्यास मिळतात. किल्ल्याच्या संपूर्ण बाजूने खोल खंदक आहेत. त्या काळी या खंदकाबाहेर मातीच्या उंच टेकड्या असत. यामुळे किल्ल्याची बांधणी सहजासहजी बाहेरून ध्यानात येत नसे. आज खंदकाच्या बाहेरच्या बाजूने सिमेंटची भिंत व त्यावर कुंपण केले आहे. पूर्वी खंदकात मगरी व सुसरी ठेवल्या जायच्या, जेणेकरून चहुबाजूंनी किल्ल्याचे संरक्षण व्हावे. या अंडाकृती किल्ल्याला एकूण 22 बुरूज आहेत. आजही ते खूप सुस्थितीत असल्याचे दिसतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूने बुरुजांवर चढून किल्ला पाहण्यास सुरुवात करावी. याच बाजूला खाली जुन्या काळातील तुरुंग दिसून येतात. तसेच किल्ल्याचे दरवाजे आजही शाबूत असल्याचे दिसतात.   इथून बुरुजांवर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. अहमदशहाने आपल्या पराक्रमी सेनापती व कर्तबगार सरदारांची नावे या सर्व बुरुजांना दिली होती. परंतु त्यांचे उल्लेख इतिहासाच्या पानांत आढळत नाहीत.  मात्र अनेक ठिकाणी शिळांवर  फारसी, अरबी भाषेतील मजकूर दिसून येतो.

किल्ल्याच्या मध्यभागात व तटबंदीच्या आतल्या बाजूस एकूण सहा राजमहाल होते. या किल्ल्यात इंग्रजांनी एक झुलता पूल बांधला होता. आपत्तीप्रसंगी बाहेर पडता यावे, याकरिता या पुलाचा वापर होत असे. किल्ल्याच्या मध्यवर्ती ठिकाणी ‘नेता कक्ष’ नावाची जागा आहे. इंग्रजांनी भारतीय नेत्यांना याच ठिकाणी स्थानबद्ध केले होते. पंडित नेहरूंच्या काही वस्तू येथे पाहता येतात. तसेच काही नेत्यांच्या हस्ताक्षरातील पत्रेही या ठिकाणी संग्रही आहेत. पाचशे वर्षांच्या रोमांचक इतिहासाचा साक्षीदार असलेला अहमदनगर किल्ला खर्‍या अर्थाने महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांचा राजाच शोभतो.

Published in daily Divya Marathi dated: 17th March  2013
मूळ लेख: लिंक.