महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा म्हणजे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये कोरलेली बौद्धलेणी होत. आजही तत्कालीन बहुतांश लेणी सुस्थितीमध्ये आहेत. अर्थात ही त्या काळातील अभियंत्यांची कमालच म्हणता येईल! आपल्या येथील प्रत्येक लेण्यांचे स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य आहे. अशाच वैशिष्ट्यपूर्ण लेण्यांपैकी एक म्हणजे कार्ला लेणी होत.
मागील आठवड्यामध्ये कार्ला लेण्यांना भेट देण्याचा योग आला. तसं पाहिलं तर या डोंगरावरील लेण्यांची संख्या जास्त नाही. सदर लेणी समूहामध्ये असणारे उपासनागृह अर्थात चैत्यगृह मात्र सर्वोत्तम देखण्या लेण्यांपैकी एक असेच म्हणावे लागेल. त्याची आजची स्थिती बघितली तर दोन हजार वर्षांपूर्वीच्या कारागिरांना सलाम करावासा वाटतो. या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या आतील वरच्या भागावर सागवानी लाकडाच्या कमानी लावलेल्या आहेत. इतक्या वर्षांनंतर देखील त्या सुस्थितीत असल्याच्या दिसतात. आजूबाजूच्या खांबांवर अनेक शिलालेख कोरलेले आहेत. प्राचीन वैभव म्हणजे काय? याचे उत्तर या लेण्यांकडे बघून आपले आपल्यालाच मिळून जाते.
Sunday, June 12, 2022
वैभवशाली कार्ला लेणी
Wednesday, February 9, 2022
एका अल्पावधीत ग्लॅमरस झालेल्या किल्ल्याची गोष्ट
त्यादिवशी तिथीनुसार येणारी शिवजयंती शनिवारी आली होती. शिवाय सुट्टीचा दिवस असल्याने आम्ही अर्थात मी आणि माझ्या भावाने हरिहर किल्ला सर करण्याची योजना आखली. पहाटे पाच वाजताच आम्ही नाशिक वरून प्रस्थान केले. थंडी संपून उन्हाळ्याची सुरुवात होऊ लागली होती. परंतु वातावरणात गारवा मात्र कायम होता. त्र्यंबकेश्वर परिसरातील दुगारवाडी हा नाशिक जिल्ह्यातला एक सुप्रसिद्ध धबधबा होय. यापूर्वीच्या वर्षाऋतू मध्ये दुगारवाडीला भेट दिली होती. याच रस्त्यावर ढगांमध्ये लपाछपी खेळणारा हरिहर किल्ला पहिल्यांदा पाहिला होता. त्यामुळे त्याचे भौगोलिक स्थान माहीत होते. दुगारवाडीच्या दिशेने जाणारा हाच मार्ग चालत आम्ही हरिहरच्या दिशेने निघालो होतो. सकाळी सातच्या दरम्यान किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या हर्षेवाडी गावामध्ये आम्ही पोहोचलो. रस्त्यामध्ये कुठेच किल्ल्याच्या नावाची पाटी नव्हती. तसेच रस्ते देखील फारसे चांगले नव्हते. परंतु जंगलातील वळणावळणाचे रस्ते असल्यामुळे प्रवासाचे काही वाटले नाही. तसं पाहिलं तर हर्षवाडी एक आदिवासी गाव होतं. या भागात मानवी वस्ती तशी फार कमीच जाणवली. समोर हरिहर किल्ल्याचे सर सरळसोट पाषाण दिसत होते. कदाचित याच बाजूने वर जाण्यासाठी रस्ता असावा, असे आम्हाला वाटले. सकाळच्या वेळेस या परिसरात कुणीच नसल्यामुळे एका उजाड माळरानावर आम्ही बाईक पार्क केली. हेल्मेट कुठे ठेवायचे? हा प्रश्न होताच. त्यामुळे ते आम्ही बरोबरच घेऊन निघालो. थोडीशी मळलेली पायवाट किल्ल्याच्या दिशेने जाताना दिसली. अजूनही कोणत्याही मनुष्याचे दर्शन आम्हाला झाले नव्हते. किल्ल्याच्या दिशेने जाणारी पायवाट चालतच आम्ही मार्गक्रमण करू लागलो. दोन ते तीन ठिकाणी दगडाचे अवघड पॅचेस होते. ते पार करताना कस लागला. अखेरीस बालेकिल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो. समोर पाहिले तर जवळपास ९० अंशामध्ये असणाऱ्या पायऱ्या दिसल्या आणि काळजामध्ये धस्स झाले. या पायर्या चढून जायच्या? असा प्रश्नवाचक उदगार मनात उमटला. त्या क्षणी त्या पायऱ्या अतिशय अवघड वाटत होत्या. इथपर्यंत आलो तेच खूप झाले... आता परत मागे फिरू या, असाही विचार मनामध्ये आला. परंतु थोडे पुढे गेल्यानंतर समजले की, प्रत्येक पायरीला दोन्ही बाजूंना खोबणी केलेल्या आहेत. त्यांना पकडून वरती जाणार जाता येणे शक्य होते. मग आम्ही धाडस करून त्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. इथून खाली निसटलो तर आजूबाजूला बघायला देखील कोणी नाही, हा विचारच भीतीदायक होता. परंतु हा थ्रिलींग अनुभव घ्यायचा आहे, असे आम्ही मनोमन ठरवले व पायऱ्या चढायला सुरुवात केली. एक एक करत साधारणतः पन्नास एक पायऱ्या चढत आम्ही मुख्य दरवाजापाशी पोहोचलो. किल्ले भ्रमंतीमध्ये आलेला तो आजवरचा एक रोमांचकारी अनुभव होता. दरवाजातून पुढे गेल्यावर एका कोरलेल्या कपारीतून पुढे देखील अशाच प्रकारच्या पायऱ्या तयार केलेल्या दिसल्या. आम्ही त्यादेखील तितक्याच सावधतेने हळूहळू चढत वरच्या दिशेने मार्गक्रमण केले. थोड्याच वेळामध्ये शेवटचा दरवाजा देखील दृष्टीस पडला. तो पार केल्यानंतर किल्ला सर केल्याचे समाधान प्राप्त झाले होते. किल्ल्यावर काहीच वर्दळ नव्हती. काही उघडी मंदिरे, दोन-तीन तळी व एक सर्वोच्च टोक. शिवाय एका बाजूला धान्याचे भव्य कोठार... इतकीच काय ती या किल्ल्याची संपत्ती होती! दूरवर दिसणाऱ्या धान्यकोठारांशी माकडांचा एक समूह उड्या मारताना दिसला. आमची चाहूल लागल्यामुळे त्यातली निम्मी माकडे तर निश्चित पळून गेली असावी. किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावरून खाली उतरताना एक परदेशी आणि एक भारतीय व्यक्ती किल्ला पाहायला आलेली दिसली. या दुर्गदर्शनामध्ये आम्हाला दिसलेले ते दोघेच मनुष्य प्राणी होते. त्यादिवशी एक अद्भुत आणि रोमांचकारी किल्ला बघण्याचे समाधान आम्हाला लाभले.
दहा वर्षानंतर...
मधल्या काळामध्ये पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले. या वाहून गेलेल्या पाण्यामध्ये सोशल मीडिया नावाचा घटक अतिशय वेगाने कार्यरत झाला होता. समाज माध्यमांद्वारे हळूहळू हरिहर किल्ल्याची माहिती सर्वदूर पोहोचली. अगदी हौशे, नवशे आणि गवशे ट्रेकर्स फिरण्यासाठी या किल्ल्यावर तुडुंब गर्दी करू लागले. आमच्या हरिश्चंद्रगडासारखी परिस्थिती या ठिकाणी तयार झाली. गुगलवर तुम्ही नुसते हरिहरगड जरी सर्च केले तरी शेकडो व्हिडीओ, लेख व ब्लॉग तुम्हाला दिसून येतील. इतकी लोकप्रियता या किल्ल्याने मधल्या काळात प्राप्त केली. खऱ्याखुऱ्या ट्रेकर्सपेक्षा निव्वळ हुल्लडबाजी करायला येणाऱ्या पर्यटकांची इथे अधिक गर्दी होऊ लागली. याची प्रचिती या वर्षी केलेल्या ट्रेकमध्ये आम्हाला आली.
हर्षवाडी गावामध्ये आता नव्याने टोलनाका सदृश फाटक उभारले गेले होते. तिथे पावत्या पाडण्याची देखील सुविधा करण्यात आली होती. शिवाय आम्ही सकाळी साडे सहाच्या दरम्यान या पोहोचलो. सुट्टीचा दिवस नसून देखील तोवर बऱ्याच गाड्या पार्किंगमध्ये आधीपासूनच उभ्या असलेल्या दिसल्या. त्यातील एक टेम्पो ट्रॅव्हलर दुरून कुठून तरी आलेली होती. तिच्यामध्ये असेच अतिउत्साही पर्यटक आल्याचे दिसत येत होते. किल्ल्याच्या मुख्य पायर्यांपर्यंत चढून गेलो तोवर फारशी गर्दी नव्हती. वातावरण आल्हाददायक झालेले होते. शिवाय सूर्यही बऱ्यापैकी वर आलेला होता. एकंदरितच फोटोग्राफीसाठी एक उत्तम वातावरण तयार झाले होते. तेव्हाच दहा वर्षांपूर्वीचा हरिहरगड आठवला. इथवर येईपर्यंत चार ते पाच ठिकाणी विविध खाद्यपदार्थांची दुकाने व उपहारगृहे देखील उघडलेली दिसली. शनिवार-रविवारी कदाचित इथे तुडूंब गर्दी होत असावी. आजूबाजूच्या गावकऱ्यांना रोजगाराचे नवे दालन उघडले असले तरी किल्ल्यावर प्लॅस्टिकच्या कचऱ्याची बरीच गर्दी देखील दिसून आली. आपल्या परिसरातील किल्ले आजही या प्लास्टिकच्या विळख्यात अजून वेगाने अडकत असल्याचे दिसतात. हरिहर याच दिशेने वेगाने प्रगती करताना वाटला. बालेकिल्ल्याच्या पायर्या चढायला सुरुवात केली व मध्यावर जाऊन थांबलो. तेवढ्यात किल्ल्यावरील माकडांचे आमच्यावर आक्रमण झाले. ही माकडे माणसाळल्यासारखी अतिशय जवळ येत होती. अगदी बॅगला हात लावून तिथे काही सापडते का, याची देखील चाचपणी करत होती! दहा वर्षांपूर्वी हीच माकडे आम्हाला पन्नास फुटावरून बघून पळून गेली होती. आज त्यांची बरीच उत्क्रांती झालेली दिसली! उत्साही पर्यटकांमुळे किल्ल्यांवरील माकडे माणसाळतात आणि त्याचा त्रास सर्वांनाच होतो. तशीच गत झाली होती. उतरताना देखील या माकडांनी इतर पर्यटक आणि ट्रेकर्सना बराच त्रास दिला. कोणत्या प्राण्यांना भूतदया दाखवायची? याचे प्रशिक्षण देखील मानवप्राण्याला द्यायला हवे, असे वाटून गेले. माकडांना माणसाने टाकलेल्या खाद्य पदार्थांची सवय झाल्यामुळे आता ते स्वतःचे खाद्य स्वतः शोधताना दिसत नाहीत. पायर्या चढून वर गेल्यावर मुख्य दरवाजाच्या समोरच अजून एक दुकान थाटलेले दिसले. येथून वर जाण्याचा रस्ता लवकर समजत नव्हता. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो तोवर खालून येणाऱ्यांची बरीच गर्दी झालेली होती. शिवाय बराच आरडाओरडा देखील ऐकू येत होता. यावरूनच सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर काय अवस्था असेल, याचा अंदाज बांधता आला. एकेकाळी अतिशय निर्जन व शांत असलेला किल्ला एक 'भयावह' पर्यटन स्थळ झालेला दिसून आला. किल्ल्याच्या माथ्यावर माकडे नसल्यामुळे यावेळेस किल्ला पूर्ण बघता आला, हे सौभाग्यच मानावे असे होते. किल्ला उतरताना विविध प्रकारच्या पर्यटकांची गर्दी दिसून आली. वर सांगितल्याप्रमाणे हौसे, नवसे आणि गवशे अशा सर्वच श्रेणीतील सो-कॉल्ड ट्रेकर्स किल्ल्यावर येत होते. हाफ चड्डी घातलेले, टाईट जीन्स घातलेले आणि थ्री-फोर्थ पॅन्ट घालून देखील ट्रेकिंग करणारे अनेक नवट्रेकर्स किल्ला चढताना दिसले. सोशल मीडिया एखाद्या किल्ल्याला किती ग्लॅमरस रुप देऊ शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण हरिहरच्या रूपाने दिसून आले. खाली येईपर्यंत हर्षेवाडी गावात देखील वाहनांची बरीच गर्दी झालेली दिसली.
यंदाच्या नाशिक दौऱ्यातील पहिल्याच किल्ल्याची भ्रमंती एका वेगळ्या दृष्टिकोनातून करता आली, त्यासाठीच हा लेखप्रपंच.
Saturday, May 22, 2021
अणे घाट
घाट चढून वरती गेल्यावर उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता घाटाच्या डोंगर माथ्याच्या दिशेने जातो. त्याच दिशेने मीही मार्गक्रमण सुरु केले. बराच अंतर गेल्यावर रस्ता अधिक कठीण होत असल्याचे जाणवले आणि मी बर्यापैकी घाटाच्या डोंगरांवर आलो आहे, असेही जाणवले. इथून पुढे पायी चालावे म्हणून गाडी रस्त्याच्या कडेला लावली व पदभ्रमंती चालू केली. तसा हा परिसर निर्जन होता. अगदी दूरवर एखादं घर दिसून यायचं. बाकी सर्व परिसर हा शेतीचा होता. घाट महामार्गावर असल्यामुळे व इथल्या शांततेमुळे घाटातील गाड्यांचे आवाज व्यवस्थित ऐकू येत होते. शिवाय संध्याकाळच्या प्रसंगी आपल्या घरट्याकडे जाण्यासाठी चाललेली पक्ष्यांची किलबिलही व्यवस्थित ऐकून येत होती. पंधरा-वीस मिनिटांच्या भ्रमंतीनंतर काही घरे दिसून आली आणि तिथूनच दूरवर ते छोटेखानी मंदिर दिसून येत होते. तिथे जाण्याचा रस्ता फार बिकट नव्हता. एका छोट्याशा टेकडीच्या कडेकडेने मार्ग काढत मी मंदिराच्या दिशेने निघालो. थोड्याच अंतरावर टेकडी संपली आणि पुन्हा पश्चिमेकडे जाणारा सूर्य व्यवस्थित दिसायला लागला. एव्हाना मी पूर्णपणे घाटमाथ्यावर आलेलो होतो. खालचा रस्ता आता व्यवस्थित दिसत होता. वाहतुकीची हालचालही लक्षात येत होती. या ठिकाणी एक विस्तीर्ण माळरान दिसून आले. अनेक गुरे इथे चरत होती. पावसाळा संपून केवळ एकच महिना झाला होता. त्यामुळे गवत बऱ्यापैकी ओले व दाट होते. त्यातली पायवाट मात्र व्यवस्थित दिसत होती. कदाचित या रस्त्यावरून सातत्याने ये-जा होत असावी, असे वाटले. मंदिर आता खूपच जवळ आले होते. दोनच मिनिटाच्या प्रवासानंतर मी मंदिराच्या जवळ पोहोचलो. अतिशय छोटा उंचवटा व त्यावर बांधलेले ते मंदिर खूप सुंदर भासत होते. थोड्याच अंतरावर काहीशी झाडी दिसू लागली. शिवाय अजूनही परिसर निर्जन होता. मंदिराच्या प्रवेशद्वारी एक श्वान कदाचित त्याचे रक्षण करत असताना दिसत होता. दूरदूरवर केवर माळरान दिसत होते. मी घाटाच्या डोंगरांच्या बरोबर मागच्या बाजूला आलेलो होतो. एक नितांत शांतता या ठिकाणी अनुभवायला मिळाली. तिचा आनंद घेत पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो. परत फिरताना घाटाचा व्यवस्थित अंदाज येत होता. डोंगराच्या दिशेने जाऊन रस्त्यांची पाहणी केली. झाडी फारशी नव्हतीच. त्यामुळे डोंगरमाथ्यावरून घाटातील वळणदार रस्ते व्यवस्थित दिसत होते. माळशेज घाटापुढे या घाटाची उंची तशी काहीच जाणवली नाही. पण एका आगळ्या वेगळ्या वाटेने डोंगरमाथ्यावर फिरण्याचा आनंद मात्र घेता आला.
Friday, May 7, 2021
कानिफनाथाच्या डोंगरावर
हायवेवरून दुरच्या डोंगरावर असणारं ते मंदिर बऱ्याचदा मी पाहिलं होतं. पण
तिथे जाण्याचा निश्चित रस्ता माहीत नव्हता. अशावेळी गुगल मॅप पुन्हा मदतीला
धावला. आळे गावाच्या बरोबर मागच्या डोंगरांमध्ये असणारं ते मंदिर गुगल
मॅपवर शोधून काढलं. हे मंदिर होतं कानिफनाथाचं आणि गाव होतं कोळवाडी.
दुपारचं ऊन ओसरल्यानंतर आळे गावात प्रवेश केला. इथून एक रस्ता संत
ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी मंदिराकडे अर्थात संतवाडीच्या दिशेने जातो.
याच रस्त्यावर थोड्या अंतरावर एक फाटा उजवीकडे कोळवाडीच्या दिशेने जातो. हे
वळण घेतलं आणि समोरच्या डोंगरावर कानिफनाथाचे ते मंदिर दिसून यायला लागलं.
मुख्य फाट्यापासून सुमारे दोन किलोमीटरवर कोळवाडी गाव असावं. गावात
पोहोचल्यावर पुनश्च एक रस्ता उजवीकडे डोंगराच्या दिशेने जाताना दिसला. हा
डांबरी रस्ता नसला तरी त्याची स्थिती बर्यापैकी चांगली होती. आजूबाजूला
फक्त शेतीच शेती नजरेत येत होती. दहा मिनिटांमध्ये मी डोंगराच्या पायथ्याशी
असणाऱ्या एका जंगलामध्ये पोहोचलो. इथे पुर्णतः शांतता होती. फक्त झाडांवर
फिरणाऱ्या पक्ष्यांचे आवाज येत होते. मानवी अस्तित्वाचा कोणताच आवाज ऐकू
आला नाही. जंगलाच्या सुरुवातीलाच गाडी पार्क केली आणि पदभ्रमंतीला सुरुवात
केली. वारा नसल्यामुळे जंगलातील सर्व झाडे स्तब्ध होती. थोड्याच वेळामध्ये
जंगल संपले आणि डोंगरावर जाणाऱ्या पायवाटेला सुरुवात झाली. सुरुवातीलाच
सिमेंटच्या पायऱ्या याठिकाणी बनवलेल्या दिसून आल्या. कदाचित या मार्गाने
नियमितपणे गावकरी डोंगरावर कानिफनाथांच्या दर्शनाला जात असावेत. थोडं चढुन
गेल्यावर पायवाट आणखीन मळलेली दिसून आली. पायऱ्या संपल्या होत्या. पण
दगडांच्या साहाय्याने अनेक ठिकाणी पायऱ्या निर्मिल्याच्या दिसून येत
होत्या. झाडांची गर्दी कमी झाली होती. पण डोंगरावरून आलेले मोठमोठाले दगड
रस्त्यामध्ये दिसून येत होते. पावसाळ्यात याच मार्गाने पाणी खाली येत
असावे, असेही भासत होते. वाट उत्तम आणि वळणावळणाची होती. सूर्य मावळतीकडे
झुकत होता आणि मी सूर्याच्या विरुद्ध दिशेने डोंगरावर चढत चाललो होतो.
उन्हाची तीव्रता कमी झाली असल्याने दमछाक होत नव्हती. अगदी पंधरा
मिनिटांमध्येच डोंगराच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचलो. येथून आजूबाजूचा
विस्तीर्ण परिसर नजरेच्या टप्प्यात आला होता. शिवाय दूरवर सूर्यकिरणांचा
अभिषेक होत असलेला नारायणगड किल्लाही व्यवस्थित दिसत होता. सूर्यकिरणांच्या
वर्षावामुळे आजूबाजूचा परिसर प्रकाशमय झाला होता. त्यामुळे मध्यभागी
असलेला नारायणगड अधिक उठून दिसत होता. पहिला डोंगर संपल्यानंतर थोडीशी
सपाटी लागली आणि पुढच्या चढाकडे मार्गक्रमण चालू केले. इथपर्यंत पायवाट
अतिशय चांगली होती. पुढची पायवाट काही शांत जंगलातल्या रस्त्याने पुढे जात
होती. चढण सुरु झाली नि पायर्यांची रचना केलेला रस्ता दिसू लागला.
डोंगराच्या वरच्या भागात असलेले हे जंगल पायथ्यापासूनही व्यवस्थित दिसत
होते. इथे पोहोचल्यावर मात्र त्याची शीतलता मन प्रसन्न करून गेली. आता
चढाईचा रस्ता सुरू झाला होता. ही चढण आधीच्या सर्व चढणीपेक्षा अधिक तीव्र
होती. परंतु पायर्यांचा मार्ग असल्याने ती अवघड जाणवत नव्हती. आजूबाजूला
उगवलेले गवत अजूनही आपला हिरवा रंग ठेवूनच होते. वळणावळणाची ती वाट हळूहळू
डोंगरमाथ्याकडे जाऊ लागली. अतिउच्च माथ्यावर पोहोचल्यावर वरील मंदिराचे
अस्तित्व झाडीतून दिसायला लागले होते. डोंगराच्या पूर्ण माथ्यावर आलो
तेव्हा पुन्हा सूर्यकिरणे अंगावर पडायला लागली व समोरच पूर्ण मंदिर स्पष्ट
दिसायला लागलं. अलीकडच्या काळातच त्या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार झाला
असावा, असे दिसले. शेजारीच रहाण्यासाठी एक छोटेसे झोपडीवजा घर दिसून आले.
मी मंदिरापाशी पोहोचलो तेव्हा आजूबाजूला कोणीही नव्हते. एव्हाना मागच्या
बाजूचा परिसरही दिसायला लागला होता. मागील बाजूस बऱ्याच अंतरापर्यंत झाडीच
झाडी दिसून आली. जंगलाची घनता मात्र अधिक नव्हती. शिवाय त्या बाजूने
डोंगरावर उतरण्यासाठी एक पायवाट जाताना दिसली. समोरच्या डोंगरावर दूरवर एक
छोटेखानी दर्गा दिसत होता. डोंगराच्या पायथ्यापासून हे दोन्ही डोंगर सलग
वाटत होते. परंतु इथे आल्यावर ते एकमेकांपासून वेगळे असल्याचे दिसले.
समोरच्या डोंगरावरील दर्ग्याकडे जाण्यासाठी कानिफनाथांचा हा डोंगर पूर्ण
उतरून समोरचा डोंगर चढावे लागत होते. पायवाटेने थोडे खाली उतरलो आणि उजव्या
बाजूला एका भव्य पाषाण नजरेस पडला. तिथे बसून समोरचा विस्तीर्ण परिसर
न्याहाळता येऊ शकत होता. मनन, चिंतन आणि ध्यान करण्यासाठी ही एक सर्वोत्तम
अशी जागा होती. सूर्य बऱ्यापैकी पश्चिम क्षितिजाकडे झुकलेला होता. त्यामुळे
सूर्याची कोवळी किरणे अंगावर तीव्रतेने पडत नव्हती. या ठिकाणी बसून समोरचा
परिसर तासनतास न्याहाळत बसावा, असे वाटत होते. पण दहा मिनिटांमध्ये मी घरी
लवकर जायचे म्हणून तेथून काढता पाय घेतला. पुन्हा मंदिरापाशी आलो तोवर
कोणीतरी वाटसरू मंदिरात आल्याचा दिसला. मंदिराच्या मागच्या बाजूने पुन्हा
परतीच्या वाटेला लागलो. उतरताना मात्र फारसे कष्ट पडले नाहीत. परंतु एक
सुंदरश्या ट्रेकचा आनंद घेतल्याचे समाधान मात्र लाभले.
#ऑक्टोबर #२०२०



























