माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Monday, November 7, 2022

फोंड्याच्या घाटात

पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात उतरण्यासाठी अनेक घाटवाटा आहेत. पावसाळ्यामध्ये या घाटवाटा निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या असतात. इतर ऋतूंमध्ये देखील त्यांचे सौंदर्य कमी होते असं नाही. त्यामुळे कोकणात प्रवेश करत असताना कोकणातील हे घाट नेहमीच आम्हाला आकर्षित करतात. इथे थांबून इथलं निसर्गसौंदर्य निहाळण्याचा आनंद आम्ही घेत असतो. पावसाळ्यातील इथलं सौंदर्य काही वेगळंच असतं. ते तासंतास न्याहाळत बसणं म्हणजे एक पर्वणीच असते!
चहुकडे पसरलेलं हिरवगार रान, जंगल आणि डोंगरांवरून चाललेली ढगांची मस्ती ही या घाटवटांमधील महत्त्वाची सौंदर्य स्थळं होत. यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या फोंडा घाटातून प्रथमच प्रवास केला. इतर घाटवाटांप्रमाणेच हा देखील निसर्ग सौंदर्याची उधळण करत असलेला एक आकर्षक घाट रस्ता आहे. कोकणात प्रवेश करीत असताना आपले स्वागत इतक्या सुंदर घाटाने होते, तेव्हा प्रवासाची मजा काही औरच असते! 







Friday, November 4, 2022

एक नवखा ट्रेकर

एका कार्यशाळेच्या निमित्ताने अहमदनगरला जाणे झाले. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कार्यशाळा होती. कार्यशाळेची वेळ सकाळी नऊ ते चार अशी होती. पुण्याबाहेरच्या कोणत्याही शहरामध्ये गेलो की तिथल्या इतिहासाची आणि प्राचीन वास्तूंची भेट मी नक्कीच घेतो. यावेळेस अहमदनगरच्या मांजरसुंबा किल्ल्यावर सैर करायची होती. पण कुणीतरी जोडीदार हवा होता. कार्यशाळेच्या विद्यार्थी व्यवस्थापन समितीमध्ये तृतीय वर्षात शिकणारा वैभव शिंदे याच्याकडे माझ्या राहण्याची आणि खाण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तो मूळचा औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री इथला. देवगिरी किल्ल्याच्या परिसरामध्ये राहत असला तरी त्याने तो किल्ला देखील पाहिलेला नव्हता! एकंदरीत त्याने आजवर एकही किल्ला पाहिलेला नव्हता. म्हणून हा माझ्यासोबत किल्ल्यावर येईल की नाही? याची साशंकताच होती. परंतु मी जेव्हा त्याला किल्ल्यावर ट्रेक करण्याकरिता विचारले तेव्हा त्याने लगेचच होकार दिला. त्यामुळे मलाही सोबत मिळाल्याने हायसे वाटले. उद्या सकाळी सहा वाजता तयार रहा, असे मी त्याला सांगितले. एकंदरीत तो आज्ञाधारक वाटत होता.
सहा वाजता तो तयार होईल, याची खात्री देखील होती. बरोबर सकाळी सहा वाजता मी औरंगाबादकडे जाणाऱ्या फाट्यावर पोहोचलो. तो तिथे तयारच होता. आम्ही मार्गक्रमण चालू केले. अर्ध्या तासामध्ये किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. त्याचा आयुष्यातला हा पहिलाच किल्ला होता. माझ्यासोबत त्याने देखील किल्ल्याची पूर्ण भ्रमंती केली. आम्ही फोटो देखील काढले. त्याच्या एकंदरीत हालचालीवरून त्याला हा प्रवास आवडला असावा, असे मला वाटले. श्रीगणेशा तर झालाच होता. आता इथून पुढे महाराष्ट्रातील बाकीचे किल्ले देखील सैर करेल, असं त्यांने मला सांगितलं. आणखी एका मराठी मुलाला किल्ले प्रवासाची आणि करून दिल्याचे समाधान मला त्यादिवशी लाभले होते. मला विश्वास आहे की, इथून पुढच्या सुट्ट्यांमध्ये तो नक्कीच आपली दुर्ग भ्रमंती पुढे चालू ठेवील.


 

Friday, October 28, 2022

सप्तशृंगी मंदिर बोटा

जुन्नरच्या परिसरातील सर्व लहान मोठे डोंगर आणि टेकड्या चढून झाल्या होत्या. म्हणून थोडसं तालुक्याच्या सीमेबाहेर जाण्याचे ठरवलं. आळेफाट्यापासून नाशिकच्या रस्त्यावर बारा किलोमीटर अंतरावर बोटा हे छोटेखानी गाव आहे. नवीन रस्ते प्रकल्पामध्ये या गावाला देखील बायपास रस्ता तयार करण्यात आलेला आहे. याच बायपास रस्त्याने गेल्यावर डावीकडे एक छोटी टेकडी दिसून येते. या टेकडीवर सप्तशृंगी मातेचे मंदिर आहे. आज या मंदिराला भेट द्यायची होती.
घरून निघायला तसा मला उशीरच झाला होता. सूर्योदय झालेला होता. आकाश निरभ्र होतं. आणि नेहमीप्रमाणे पुणे नाशिक महामार्गावरील वाहने ९०-१०० च्या वेगाने प्रवास करीत होती. बोटा गावाच्या बायपासला लागलो तेव्हाच सप्तशृंगीची ही टेकडी व्यवस्थित दिसायला लागली होती. टेकडीच्या माथ्यावर भगवा झेंडा डौलाने फडकत होता. परंतु माथ्यावर मंदिराचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. जवळ आल्यानंतर गाडीचा वेग थोडा कमी केला व रस्त्याशेजारी उभे असलेल्या ग्रामस्थाला मंदिराच्या रस्त्याविषयी विचारले. त्याने रस्त्याची माहिती दिली. मग थोडसं पुढे जाऊन एका मोकळ्या ठिकाणी गाडी महामार्गाच्या बाजूला लावली आणि टेकडी चढायला सुरुवात केली. गुगल मॅप मध्ये देखील मंदिर याच टेकडीवर दाखवण्यात आले होते. पण ते अजूनही मला दिसत नव्हते. रस्ता मात्र बऱ्यापैकी मळलेला दिसत होता.३००-४०० मीटर पर्यंत अगदी कार देखील जाऊ शकेल इतका तो रुंद होता. टेकडीला थोडासा वळसा घालून मग वरच्या दिशेने जाणारी पायवाट दिसून आली. चालताना रस्त्यावरून महामार्गावरून वेगाने वाहणाऱ्या वाहनांचे आवाज सातत्याने येतच होते. आपण मानवी रहदारीपासून दूर नाही याची आठवण ते करून देत होते. इतर टेकड्यांवरील मंदिरांकडे जाण्यासाठी जशी पायवाट असते तशाच प्रकारची तसेच डोंगरावरून येणाऱ्या पाण्याच्या ओहोळाने ती तयार झालेली होती. अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये मी मंदिरापाशी पोहोचलो. पूर्ण टेकडीमध्ये दाट झाडी असणारी ती एकमेव जागा होती. या ठिकाणी बाभळीच्या छोट्या छोट्या झाडांचा भला मोठा पुंजका दिसून आला. या पुंजक्याच्या मागेच एका नैसर्गिक गुहेमध्ये सप्तशृंगी चे मंदिर बांधलेले आहे.
गुहा नैसर्गिक असली तरी काही ठिकाणी विटांचे व बाहेरच्या बाजूला सिमेंटचे तसेच लोखंडाचे देखील बांधकाम दिसून आले. गुहेच्या मध्यवर्ती भागात सप्तशृंगीची भिंतीला जोडलेली मूर्ती दिसत होती. मंदिरावर सन २००३ चे बांधकाम असल्याचे लिहिलेले होते. सूर्य एव्हाना बऱ्यापैकी वर आलेला होता. तिथून दूर दूर पर्यंतचा परिसर आता न्याहाळता येऊ शकत होता. पायथ्याशी असणारे बोटा गाव देखील पूर्ण दृष्टीमध्ये येत होते. शिवाय पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग जवळपास दहा किलोमीटर पर्यंत पाहता येऊ शकत होता. मंदिराच्या आसपास कोणीही नव्हते. एकांतात बसण्यासाठी ही एक उत्तम जागा होती. पण गाड्यांचा गोंगाट त्या एकांताला एकांत म्हणू देत नव्हता.
मंदिर डोंगराच्या माथ्यावर नाहीये तरी डोंगराच्या माथ्याकडे जाण्यासाठी एक छोटेखानी पायवाट मंदिरा शेजारून जाताना दिसली. केवळ एका मिनिटांमध्ये मी त्या टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो. तिथे सप्तशृंगी नावाचा लोखंडी फलक दिसून आला. खरंतर याला फलक म्हणता येणार नाही. लोखंडी सळ्यांनी हे नाव तयार केले होते. कदाचित या नावांमध्ये पूर्वी रोषणाई केलेली असावी. जेणेकरून रात्रीच्या अंधारात देखील ही टेकडी दुरून पाहता येत असेल. टेकडीच्या सर्वोच्च टोकावर खालून दिसत असलेला भगवा झेंडा फडकत होता. मागच्या बाजूला बऱ्यापैकी रान होतं आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा देखील दिसून येत होत्या.
उन्हाची तीव्रता फारशी नव्हती म्हणून बराच वेळ या ठिकाणी ध्यानस्थ बसून राहिलो. हायवे वरच्या वाहनांचे आवाज एकाग्रता होऊ देत नव्हते. मग पुन्हा माघारी फिरलो आणि पाचच मिनिटांमध्ये पायथ्याशी पोहोचलो होतो. गाडी काढली आणि हायवेवर गोंगाट करणाऱ्या त्या वाहनांचा मी देखील पुन्हा एकदा भाग होऊन गेलो.







 

Monday, September 19, 2022

लेण्यांतील महादेव

लहानपणीपासूनचा तो आमचा ओळखीचाच डोंगर होता. रात्रीच्या अंधारात त्याचा काळाकभिन्न आकार देखील ओळखीचा झाला होता. परंतु काही महिन्यांपासून त्याच्यावर रात्री लाईटचे खांब दिसायला लागले. दिवसा इतक्या दुरून ते दिसत नव्हते. परंतु रात्रीच्या अंधारामध्ये तिथल्या दिव्यांचा प्रकाश व्यवस्थित दिसून यायचा. वरती जाणाऱ्या रस्त्यावर हे विजेचे खांब लावलेले होते. वीज मात्र पूर्ण डोंगराच्या माथ्यापर्यंत नेलेली नव्हती. मध्यभागाच्या खालीच शेवटचा खांब दिसत होता. म्हणजेच त्या भागामध्ये कुठलेसे मंदिर निश्चितच होते. मग एक दिवस ठरवले की या मंदिराला भेट देऊन यायची.
गुगल मॅपवर त्याचा माग घेतला तेव्हा समजले की इथे एक छोटीशी गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये मंदिर बांधलेले आहे. मग एक दिवस सकाळीच मॉर्निंग वॉकच्या उद्देशाने या डोंगराच्या दिशेने मार्गक्रमण चालू केले. मुंबईच्या दिशेने जाताना पिंपरी पेंढार गाव सोडले की लगेचच उजवीकडे जाणारा एक छोटेखानी काँक्रीटचा रस्ता लागला. अगदी थोड्याच अंतरावर त्याला पुन्हा दोन फाटे फुटलेले दिसले. उजवीकडचा रस्ता डोंगरापलीकडील म्हसवंडी गावामध्ये जातो. तर डावीकडचा पिंपरी पेंढार मधील खारावणे या वस्तीच्या दिशेने जातो. हाच रस्ता पकडला आणि पुढे चालू लागलो. थोड्याच अंतरावर वाडीची मुख्य वस्ती लागली. तशी बऱ्यापैकी मोठी वस्ती या ठिकाणी दिसून येत होती. वस्ती संपली की एक कच्चा रस्ता डोंगराच्या दिशेने जाताना दिसला.
सकाळच्या प्रहरी या रस्त्यावर चिटपाखरू देखील नव्हते. सूर्य वर आलेला. परंतु ढगांमागे झाकोळलेला होता. त्याची किरणे अधून मधून पडत. परंतु पावसाळी वातावरणामुळे बहुतांश तो झाकलेलाच दिसत होता. वातावरण तसं शांत होतं. रमतगमत प्रवास करण्यासारखा तो परिसर होता आणि त्याला वातावरणाची देखील साथ लाभली होती. थोड्याच अंतरावर डावीकडे एक छोटासा पाझर तलाव दिसून आला. पावसाळ्याची ही सुरुवातच होती. त्यामुळे अगदी कमी प्रमाणात पाणी त्यामध्ये साठलेले दिसले. विविध पक्षांची रेलचेल आजूबाजूच्या झाडांवर दिसून येत होती. निसर्गाचे ते मनमोहक संगीत ऐकत काही काळ तिथेच उभा राहिलो. पक्ष्यांना ओळखण्याचा प्रयत्न करत होतो. नावाचं काही घेणेदेणे नव्हतं पण त्यांचे ते निरनिराळे आवाज मन तृप्त करत होते. कदाचित त्यांनाही माझी चाहूल लागली असावी. म्हणूनच थोड्याच वेळात एका मोठ्या थव्याने तेथून काढता पाय घेतला. आता समोरच्या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या देवराईमधून पक्षांचा किलकिलाट ऐकू येत होता. अंतर बरंच असलं तरी वातावरणातल्या त्या नैसर्गिक शांततेमध्ये तो आवाज मन प्रसन्न करत होता.
मग असाच पुढे चालू लागलो. थोडीशी वस्ती देखील तिथे होती. इथूनच उजव्या बाजूला देवराईची सुरुवात होती. प्राथमिक शाळेमध्ये शिकत असताना कधीतरी आमची सहल या भागात आली होती. त्यानंतर बहुतेक २५ ते ३० वर्षांनी मी या ठिकाणी आलो होतो! जुन्या आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न केला. कदाचित याच ठिकाणी बसून आम्ही खेळ खेळलो होतो आणि रमत गमत डबे देखील संपवले होते! आज तो भाग पूर्णपणे देवराईने फुललेला होता. त्या देवराईच्या कडेकडेने गेल्यावर एका ठिकाणी डाव्या बाजूला जाणारा रस्ता होता. कुणाचं तरी बरंच मोठ शेतीक्षेत्र या ठिकाणी दिसून आलं. शिवाय गावठी गायींचा एक मोठा गोठा देखील होता. तो मागे पडल्यावर थोड्याच अंतरावर उजव्या दिशेला जंगलामधून डोंगराच्या दिशेने जाणारा जाणारी एक मस्तपैकी रुळलेली पायवाट दिसून आली. या क्षणी त्या पूर्ण परिसरामध्ये मी एकटाच मनुष्यप्राणी होतो!
जंगल तसं फारसं घनदाट नव्हतं. शिवाय पशुपक्ष्यांच्या आवाजामध्ये तिथली नैसर्गिक शांतताही जास्त भंग पावत नव्हती. वाटसरूंचा हा नेहमीचा रस्ता असल्याचे दिसत होते. म्हणून मी देखील हिमतीने त्या जंगलातल्या वाटेने चालू लागलो. आता दूरवरून मोरांच्या ओरडण्याचे देखील आवाज येऊ लागले होते. कुठेतरी माकडांची मस्ती चालू होती. त्यामुळे झाडांचे शेंडे हलताना दिसायचे. अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये काँक्रिटच्या पायऱ्या दिसायला लागल्या. लेण्यांच्या दिशेने जाण्यासाठी गावकऱ्यांनीच या पायऱ्या बांधल्या असाव्यात. पायऱ्यांचा रस्ता हा पूर्ण नव्हता. मध्येच चांगली पायवाट लागायची आणि काही ठिकाणी खोदलेल्या पायऱ्या दिसत होत्या. या पायऱ्या चढत वर आल्यानंतर जंगलाची तीव्रता काही अंशी कमी झालेली दिसली. मागे पाहिले तर बऱ्यापैकी मोठा परिसर दृष्टिक्षेपामध्ये आलेला होता. ज्या मुख्य रस्त्यावरून आतमध्ये वळालो तो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ देखील येथून दिसायला लागला होता. आपल्या शेती क्षेत्रावर विविध कामे करणारे शेतकरी देखील आता दिसत होते.
डोंगराच्या दिशेने मार्गक्रमण चालूच ठेवले. वळणावळणाचा आणि चढणीचा तो रस्ता दहा मिनिटांमध्येच सपाटीवर आला. उजव्या बाजूला थोडे चालत गेल्यानंतर डोंगराला असणारी ती अनारम्य नैसर्गिक गुहा दिसायला लागली. पर्वताच्या पोटामध्ये असणारं ते नैसर्गिक लेणं त्याचा नैसर्गिकपणा जपून होतं. याच लेण्यांमध्ये शिवलिंगाची स्थापना केल्याचे दिसले. आजच्या युगातील टाइल्स आणि सिमेंटचा लेप लावून लेण्यांमध्ये मंदिर सजवलेलं होतं. सकाळी सकाळी कुणीतरी येथे दिवा लावून गेलं होतं. मी पोहोचलो त्यावेळेस मात्र हा परिसर पूर्णतः निर्मनुष्य होता. शांत आणि निवांत होता. डोंगराच्या पोटामध्ये आपण बसलेलो आहोत आणि समोर अख्खा तालुका न्याहाळत आहोत, असं भासत होतं. पशु-पक्षांची किलबिल अजूनही निसर्ग संगीत तयार करीत होतं आणि खालच्या घनदाट जंगलामध्ये मोरांचे चित्कार देखील अधून मधून ऐकू येत होते. निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आवडेल अशीच ती अद्भुत जागा होती. शिवाय पावसाळी वातावरण असल्याने वातावरणातील आल्हादपणा मन एकाग्र करायला मदत करीतच होता.
बराच वेळ तिथेच शांतपणे बसून राहिलो. अजूनही एक चतुर्थांश डोंगर चढलेलो होतो. म्हणजेच अजूनही बराचसा डोंगर चढायचा बाकी होता. या डोंगराच्या मुख्य माथ्यावर काय असावे? ही उत्सुकता मला देखील होती. मघाशी थोडं चढून आल्यावर जिथे डावीकडे वळालो त्याच ठिकाणी उजवी दिशेने जाणारा देखील एक रस्ता होता. कदाचित तोच डोंगर माथ्याकडे जात असावा.
अजूनही परतीसाठी बराच वेळ होता म्हणून डोंगर माथ्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. लेण्यांपासून परत फिरताना जाणारा रस्ता याच डोंगराला काहीसा वळसा मारून वरच्या दिशेने जातो. हा वळसा पूर्ण झाला. त्या ठिकाणी सरळसोट रस्ता डोंगर माथ्याच्या दिशेने जाताना दिसला. डोंगराच्या मागच्या बाजूने बहुतांश परिसर दृष्टीक्षेपात येत होता. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा, नारायणगाव, ओतूर आणि जुन्नर हे चारही मोठी गावे या ठिकाणावरून दिसत होती! कदाचित अतिशय कमी ठिकाणांपैकी हे एक ठिकाण असावे. अधून मधून पावसाचे भुरभुरणारे थेंब पडत होते. परंतु ते लागून राहिले नाहीत. वातावरणातील मंद ओली हवा मन प्रसन्न करत होती. असं वाटत होतं की याच ठिकाणावरून तासनतास हा परिसर न्याहाळत बसावा.
वातावरणातील शांतता विलक्षण होती म्हणूनच पशुपक्ष्यांचे आवाज सुस्पष्टपणे ऐकू येत होते. या डोंगराच्या माथ्यावर कुणीतरी झेंडा लावलेला होता. कदाचित त्या ठिकाणी आणखी छोटेसे मंदिर बनवलेले असावे. या डोंगर माथ्याकडे जायची इच्छा होती परंतु वेळ तितका शिल्लक राहिलेला नव्हता. म्हणून आलेल्या रस्त्याने पुन्हा मागे फिरलो. प्रत्यक्ष आपल्याच गावामध्ये इतका सुंदर मनोहारी आणि नयनरम्य परिसर आहे, याची प्रचिती मला देखील पहिल्यांदाच आली होती!

गुगल लोकेशन: https://goo.gl/maps/MUf86CfPyatL8NmT9

 








 


Sunday, June 12, 2022

वैभवशाली कार्ला लेणी

महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा म्हणजे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये कोरलेली बौद्धलेणी होत. आजही तत्कालीन बहुतांश लेणी सुस्थितीमध्ये आहेत. अर्थात ही त्या काळातील अभियंत्यांची कमालच म्हणता येईल! आपल्या येथील प्रत्येक लेण्यांचे स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य आहे. अशाच वैशिष्ट्यपूर्ण लेण्यांपैकी एक म्हणजे कार्ला लेणी होत.
मागील आठवड्यामध्ये कार्ला लेण्यांना भेट देण्याचा योग आला. तसं पाहिलं तर या डोंगरावरील लेण्यांची संख्या जास्त नाही. सदर लेणी समूहामध्ये असणारे उपासनागृह अर्थात चैत्यगृह मात्र सर्वोत्तम देखण्या लेण्यांपैकी एक असेच म्हणावे लागेल. त्याची आजची स्थिती बघितली तर दोन हजार वर्षांपूर्वीच्या कारागिरांना सलाम करावासा वाटतो. या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या आतील वरच्या भागावर सागवानी लाकडाच्या कमानी लावलेल्या आहेत. इतक्या वर्षांनंतर देखील त्या सुस्थितीत असल्याच्या दिसतात. आजूबाजूच्या खांबांवर अनेक शिलालेख कोरलेले आहेत. प्राचीन वैभव म्हणजे काय? याचे उत्तर या लेण्यांकडे बघून आपले आपल्यालाच मिळून जाते.