जुन्नरच्या परिसरातील सर्व लहान मोठे डोंगर आणि टेकड्या चढून झाल्या होत्या. म्हणून थोडसं तालुक्याच्या सीमेबाहेर जाण्याचे ठरवलं. आळेफाट्यापासून नाशिकच्या रस्त्यावर बारा किलोमीटर अंतरावर बोटा हे छोटेखानी गाव आहे. नवीन रस्ते प्रकल्पामध्ये या गावाला देखील बायपास रस्ता तयार करण्यात आलेला आहे. याच बायपास रस्त्याने गेल्यावर डावीकडे एक छोटी टेकडी दिसून येते. या टेकडीवर सप्तशृंगी मातेचे मंदिर आहे. आज या मंदिराला भेट द्यायची होती.
घरून निघायला तसा मला उशीरच झाला होता. सूर्योदय झालेला होता. आकाश निरभ्र होतं. आणि नेहमीप्रमाणे पुणे नाशिक महामार्गावरील वाहने ९०-१०० च्या वेगाने प्रवास करीत होती. बोटा गावाच्या बायपासला लागलो तेव्हाच सप्तशृंगीची ही टेकडी व्यवस्थित दिसायला लागली होती. टेकडीच्या माथ्यावर भगवा झेंडा डौलाने फडकत होता. परंतु माथ्यावर मंदिराचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. जवळ आल्यानंतर गाडीचा वेग थोडा कमी केला व रस्त्याशेजारी उभे असलेल्या ग्रामस्थाला मंदिराच्या रस्त्याविषयी विचारले. त्याने रस्त्याची माहिती दिली. मग थोडसं पुढे जाऊन एका मोकळ्या ठिकाणी गाडी महामार्गाच्या बाजूला लावली आणि टेकडी चढायला सुरुवात केली. गुगल मॅप मध्ये देखील मंदिर याच टेकडीवर दाखवण्यात आले होते. पण ते अजूनही मला दिसत नव्हते. रस्ता मात्र बऱ्यापैकी मळलेला दिसत होता.३००-४०० मीटर पर्यंत अगदी कार देखील जाऊ शकेल इतका तो रुंद होता. टेकडीला थोडासा वळसा घालून मग वरच्या दिशेने जाणारी पायवाट दिसून आली. चालताना रस्त्यावरून महामार्गावरून वेगाने वाहणाऱ्या वाहनांचे आवाज सातत्याने येतच होते. आपण मानवी रहदारीपासून दूर नाही याची आठवण ते करून देत होते. इतर टेकड्यांवरील मंदिरांकडे जाण्यासाठी जशी पायवाट असते तशाच प्रकारची तसेच डोंगरावरून येणाऱ्या पाण्याच्या ओहोळाने ती तयार झालेली होती. अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये मी मंदिरापाशी पोहोचलो. पूर्ण टेकडीमध्ये दाट झाडी असणारी ती एकमेव जागा होती. या ठिकाणी बाभळीच्या छोट्या छोट्या झाडांचा भला मोठा पुंजका दिसून आला. या पुंजक्याच्या मागेच एका नैसर्गिक गुहेमध्ये सप्तशृंगी चे मंदिर बांधलेले आहे.
गुहा नैसर्गिक असली तरी काही ठिकाणी विटांचे व बाहेरच्या बाजूला सिमेंटचे तसेच लोखंडाचे देखील बांधकाम दिसून आले. गुहेच्या मध्यवर्ती भागात सप्तशृंगीची भिंतीला जोडलेली मूर्ती दिसत होती. मंदिरावर सन २००३ चे बांधकाम असल्याचे लिहिलेले होते. सूर्य एव्हाना बऱ्यापैकी वर आलेला होता. तिथून दूर दूर पर्यंतचा परिसर आता न्याहाळता येऊ शकत होता. पायथ्याशी असणारे बोटा गाव देखील पूर्ण दृष्टीमध्ये येत होते. शिवाय पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग जवळपास दहा किलोमीटर पर्यंत पाहता येऊ शकत होता. मंदिराच्या आसपास कोणीही नव्हते. एकांतात बसण्यासाठी ही एक उत्तम जागा होती. पण गाड्यांचा गोंगाट त्या एकांताला एकांत म्हणू देत नव्हता.
मंदिर डोंगराच्या माथ्यावर नाहीये तरी डोंगराच्या माथ्याकडे जाण्यासाठी एक छोटेखानी पायवाट मंदिरा शेजारून जाताना दिसली. केवळ एका मिनिटांमध्ये मी त्या टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो. तिथे सप्तशृंगी नावाचा लोखंडी फलक दिसून आला. खरंतर याला फलक म्हणता येणार नाही. लोखंडी सळ्यांनी हे नाव तयार केले होते. कदाचित या नावांमध्ये पूर्वी रोषणाई केलेली असावी. जेणेकरून रात्रीच्या अंधारात देखील ही टेकडी दुरून पाहता येत असेल. टेकडीच्या सर्वोच्च टोकावर खालून दिसत असलेला भगवा झेंडा फडकत होता. मागच्या बाजूला बऱ्यापैकी रान होतं आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा देखील दिसून येत होत्या.
उन्हाची तीव्रता फारशी नव्हती म्हणून बराच वेळ या ठिकाणी ध्यानस्थ बसून राहिलो. हायवे वरच्या वाहनांचे आवाज एकाग्रता होऊ देत नव्हते. मग पुन्हा माघारी फिरलो आणि पाचच मिनिटांमध्ये पायथ्याशी पोहोचलो होतो. गाडी काढली आणि हायवेवर गोंगाट करणाऱ्या त्या वाहनांचा मी देखील पुन्हा एकदा भाग होऊन गेलो.
Friday, October 28, 2022
सप्तशृंगी मंदिर बोटा
Monday, September 19, 2022
लेण्यांतील महादेव
लहानपणीपासूनचा तो आमचा ओळखीचाच डोंगर होता. रात्रीच्या अंधारात त्याचा काळाकभिन्न आकार देखील ओळखीचा झाला होता. परंतु काही महिन्यांपासून त्याच्यावर रात्री लाईटचे खांब दिसायला लागले. दिवसा इतक्या दुरून ते दिसत नव्हते. परंतु रात्रीच्या अंधारामध्ये तिथल्या दिव्यांचा प्रकाश व्यवस्थित दिसून यायचा. वरती जाणाऱ्या रस्त्यावर हे विजेचे खांब लावलेले होते. वीज मात्र पूर्ण डोंगराच्या माथ्यापर्यंत नेलेली नव्हती. मध्यभागाच्या खालीच शेवटचा खांब दिसत होता. म्हणजेच त्या भागामध्ये कुठलेसे मंदिर निश्चितच होते. मग एक दिवस ठरवले की या मंदिराला भेट देऊन यायची.
गुगल मॅपवर त्याचा माग घेतला तेव्हा समजले की इथे एक छोटीशी गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये मंदिर बांधलेले आहे. मग एक दिवस सकाळीच मॉर्निंग वॉकच्या उद्देशाने या डोंगराच्या दिशेने मार्गक्रमण चालू केले. मुंबईच्या दिशेने जाताना पिंपरी पेंढार गाव सोडले की लगेचच उजवीकडे जाणारा एक छोटेखानी काँक्रीटचा रस्ता लागला. अगदी थोड्याच अंतरावर त्याला पुन्हा दोन फाटे फुटलेले दिसले. उजवीकडचा रस्ता डोंगरापलीकडील म्हसवंडी गावामध्ये जातो. तर डावीकडचा पिंपरी पेंढार मधील खारावणे या वस्तीच्या दिशेने जातो. हाच रस्ता पकडला आणि पुढे चालू लागलो. थोड्याच अंतरावर वाडीची मुख्य वस्ती लागली. तशी बऱ्यापैकी मोठी वस्ती या ठिकाणी दिसून येत होती. वस्ती संपली की एक कच्चा रस्ता डोंगराच्या दिशेने जाताना दिसला.
सकाळच्या प्रहरी या रस्त्यावर चिटपाखरू देखील नव्हते. सूर्य वर आलेला. परंतु ढगांमागे झाकोळलेला होता. त्याची किरणे अधून मधून पडत. परंतु पावसाळी वातावरणामुळे बहुतांश तो झाकलेलाच दिसत होता. वातावरण तसं शांत होतं. रमतगमत प्रवास करण्यासारखा तो परिसर होता आणि त्याला वातावरणाची देखील साथ लाभली होती. थोड्याच अंतरावर डावीकडे एक छोटासा पाझर तलाव दिसून आला. पावसाळ्याची ही सुरुवातच होती. त्यामुळे अगदी कमी प्रमाणात पाणी त्यामध्ये साठलेले दिसले. विविध पक्षांची रेलचेल आजूबाजूच्या झाडांवर दिसून येत होती. निसर्गाचे ते मनमोहक संगीत ऐकत काही काळ तिथेच उभा राहिलो. पक्ष्यांना ओळखण्याचा प्रयत्न करत होतो. नावाचं काही घेणेदेणे नव्हतं पण त्यांचे ते निरनिराळे आवाज मन तृप्त करत होते. कदाचित त्यांनाही माझी चाहूल लागली असावी. म्हणूनच थोड्याच वेळात एका मोठ्या थव्याने तेथून काढता पाय घेतला. आता समोरच्या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या देवराईमधून पक्षांचा किलकिलाट ऐकू येत होता. अंतर बरंच असलं तरी वातावरणातल्या त्या नैसर्गिक शांततेमध्ये तो आवाज मन प्रसन्न करत होता.
मग असाच पुढे चालू लागलो. थोडीशी वस्ती देखील तिथे होती. इथूनच उजव्या बाजूला देवराईची सुरुवात होती. प्राथमिक शाळेमध्ये शिकत असताना कधीतरी आमची सहल या भागात आली होती. त्यानंतर बहुतेक २५ ते ३० वर्षांनी मी या ठिकाणी आलो होतो! जुन्या आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न केला. कदाचित याच ठिकाणी बसून आम्ही खेळ खेळलो होतो आणि रमत गमत डबे देखील संपवले होते! आज तो भाग पूर्णपणे देवराईने फुललेला होता. त्या देवराईच्या कडेकडेने गेल्यावर एका ठिकाणी डाव्या बाजूला जाणारा रस्ता होता. कुणाचं तरी बरंच मोठ शेतीक्षेत्र या ठिकाणी दिसून आलं. शिवाय गावठी गायींचा एक मोठा गोठा देखील होता. तो मागे पडल्यावर थोड्याच अंतरावर उजव्या दिशेला जंगलामधून डोंगराच्या दिशेने जाणारा जाणारी एक मस्तपैकी रुळलेली पायवाट दिसून आली. या क्षणी त्या पूर्ण परिसरामध्ये मी एकटाच मनुष्यप्राणी होतो!
जंगल तसं फारसं घनदाट नव्हतं. शिवाय पशुपक्ष्यांच्या आवाजामध्ये तिथली नैसर्गिक शांतताही जास्त भंग पावत नव्हती. वाटसरूंचा हा नेहमीचा रस्ता असल्याचे दिसत होते. म्हणून मी देखील हिमतीने त्या जंगलातल्या वाटेने चालू लागलो. आता दूरवरून मोरांच्या ओरडण्याचे देखील आवाज येऊ लागले होते. कुठेतरी माकडांची मस्ती चालू होती. त्यामुळे झाडांचे शेंडे हलताना दिसायचे. अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये काँक्रिटच्या पायऱ्या दिसायला लागल्या. लेण्यांच्या दिशेने जाण्यासाठी गावकऱ्यांनीच या पायऱ्या बांधल्या असाव्यात. पायऱ्यांचा रस्ता हा पूर्ण नव्हता. मध्येच चांगली पायवाट लागायची आणि काही ठिकाणी खोदलेल्या पायऱ्या दिसत होत्या. या पायऱ्या चढत वर आल्यानंतर जंगलाची तीव्रता काही अंशी कमी झालेली दिसली. मागे पाहिले तर बऱ्यापैकी मोठा परिसर दृष्टिक्षेपामध्ये आलेला होता. ज्या मुख्य रस्त्यावरून आतमध्ये वळालो तो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ देखील येथून दिसायला लागला होता. आपल्या शेती क्षेत्रावर विविध कामे करणारे शेतकरी देखील आता दिसत होते.
डोंगराच्या दिशेने मार्गक्रमण चालूच ठेवले. वळणावळणाचा आणि चढणीचा तो रस्ता दहा मिनिटांमध्येच सपाटीवर आला. उजव्या बाजूला थोडे चालत गेल्यानंतर डोंगराला असणारी ती अनारम्य नैसर्गिक गुहा दिसायला लागली. पर्वताच्या पोटामध्ये असणारं ते नैसर्गिक लेणं त्याचा नैसर्गिकपणा जपून होतं. याच लेण्यांमध्ये शिवलिंगाची स्थापना केल्याचे दिसले. आजच्या युगातील टाइल्स आणि सिमेंटचा लेप लावून लेण्यांमध्ये मंदिर सजवलेलं होतं. सकाळी सकाळी कुणीतरी येथे दिवा लावून गेलं होतं. मी पोहोचलो त्यावेळेस मात्र हा परिसर पूर्णतः निर्मनुष्य होता. शांत आणि निवांत होता. डोंगराच्या पोटामध्ये आपण बसलेलो आहोत आणि समोर अख्खा तालुका न्याहाळत आहोत, असं भासत होतं. पशु-पक्षांची किलबिल अजूनही निसर्ग संगीत तयार करीत होतं आणि खालच्या घनदाट जंगलामध्ये मोरांचे चित्कार देखील अधून मधून ऐकू येत होते. निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आवडेल अशीच ती अद्भुत जागा होती. शिवाय पावसाळी वातावरण असल्याने वातावरणातील आल्हादपणा मन एकाग्र करायला मदत करीतच होता.
बराच वेळ तिथेच शांतपणे बसून राहिलो. अजूनही एक चतुर्थांश डोंगर चढलेलो होतो. म्हणजेच अजूनही बराचसा डोंगर चढायचा बाकी होता. या डोंगराच्या मुख्य माथ्यावर काय असावे? ही उत्सुकता मला देखील होती. मघाशी थोडं चढून आल्यावर जिथे डावीकडे वळालो त्याच ठिकाणी उजवी दिशेने जाणारा देखील एक रस्ता होता. कदाचित तोच डोंगर माथ्याकडे जात असावा.
अजूनही परतीसाठी बराच वेळ होता म्हणून डोंगर माथ्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. लेण्यांपासून परत फिरताना जाणारा रस्ता याच डोंगराला काहीसा वळसा मारून वरच्या दिशेने जातो. हा वळसा पूर्ण झाला. त्या ठिकाणी सरळसोट रस्ता डोंगर माथ्याच्या दिशेने जाताना दिसला. डोंगराच्या मागच्या बाजूने बहुतांश परिसर दृष्टीक्षेपात येत होता. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा, नारायणगाव, ओतूर आणि जुन्नर हे चारही मोठी गावे या ठिकाणावरून दिसत होती! कदाचित अतिशय कमी ठिकाणांपैकी हे एक ठिकाण असावे. अधून मधून पावसाचे भुरभुरणारे थेंब पडत होते. परंतु ते लागून राहिले नाहीत. वातावरणातील मंद ओली हवा मन प्रसन्न करत होती. असं वाटत होतं की याच ठिकाणावरून तासनतास हा परिसर न्याहाळत बसावा.
वातावरणातील शांतता विलक्षण होती म्हणूनच पशुपक्ष्यांचे आवाज सुस्पष्टपणे ऐकू येत होते. या डोंगराच्या माथ्यावर कुणीतरी झेंडा लावलेला होता. कदाचित त्या ठिकाणी आणखी छोटेसे मंदिर बनवलेले असावे. या डोंगर माथ्याकडे जायची इच्छा होती परंतु वेळ तितका शिल्लक राहिलेला नव्हता. म्हणून आलेल्या रस्त्याने पुन्हा मागे फिरलो. प्रत्यक्ष आपल्याच गावामध्ये इतका सुंदर मनोहारी आणि नयनरम्य परिसर आहे, याची प्रचिती मला देखील पहिल्यांदाच आली होती!
गुगल लोकेशन: https://goo.gl/maps/MUf86CfPyatL8NmT9
Sunday, June 12, 2022
वैभवशाली कार्ला लेणी
महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा म्हणजे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये कोरलेली बौद्धलेणी होत. आजही तत्कालीन बहुतांश लेणी सुस्थितीमध्ये आहेत. अर्थात ही त्या काळातील अभियंत्यांची कमालच म्हणता येईल! आपल्या येथील प्रत्येक लेण्यांचे स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य आहे. अशाच वैशिष्ट्यपूर्ण लेण्यांपैकी एक म्हणजे कार्ला लेणी होत.
मागील आठवड्यामध्ये कार्ला लेण्यांना भेट देण्याचा योग आला. तसं पाहिलं तर या डोंगरावरील लेण्यांची संख्या जास्त नाही. सदर लेणी समूहामध्ये असणारे उपासनागृह अर्थात चैत्यगृह मात्र सर्वोत्तम देखण्या लेण्यांपैकी एक असेच म्हणावे लागेल. त्याची आजची स्थिती बघितली तर दोन हजार वर्षांपूर्वीच्या कारागिरांना सलाम करावासा वाटतो. या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या आतील वरच्या भागावर सागवानी लाकडाच्या कमानी लावलेल्या आहेत. इतक्या वर्षांनंतर देखील त्या सुस्थितीत असल्याच्या दिसतात. आजूबाजूच्या खांबांवर अनेक शिलालेख कोरलेले आहेत. प्राचीन वैभव म्हणजे काय? याचे उत्तर या लेण्यांकडे बघून आपले आपल्यालाच मिळून जाते.
Wednesday, February 9, 2022
एका अल्पावधीत ग्लॅमरस झालेल्या किल्ल्याची गोष्ट
त्यादिवशी तिथीनुसार येणारी शिवजयंती शनिवारी आली होती. शिवाय सुट्टीचा दिवस असल्याने आम्ही अर्थात मी आणि माझ्या भावाने हरिहर किल्ला सर करण्याची योजना आखली. पहाटे पाच वाजताच आम्ही नाशिक वरून प्रस्थान केले. थंडी संपून उन्हाळ्याची सुरुवात होऊ लागली होती. परंतु वातावरणात गारवा मात्र कायम होता. त्र्यंबकेश्वर परिसरातील दुगारवाडी हा नाशिक जिल्ह्यातला एक सुप्रसिद्ध धबधबा होय. यापूर्वीच्या वर्षाऋतू मध्ये दुगारवाडीला भेट दिली होती. याच रस्त्यावर ढगांमध्ये लपाछपी खेळणारा हरिहर किल्ला पहिल्यांदा पाहिला होता. त्यामुळे त्याचे भौगोलिक स्थान माहीत होते. दुगारवाडीच्या दिशेने जाणारा हाच मार्ग चालत आम्ही हरिहरच्या दिशेने निघालो होतो. सकाळी सातच्या दरम्यान किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या हर्षेवाडी गावामध्ये आम्ही पोहोचलो. रस्त्यामध्ये कुठेच किल्ल्याच्या नावाची पाटी नव्हती. तसेच रस्ते देखील फारसे चांगले नव्हते. परंतु जंगलातील वळणावळणाचे रस्ते असल्यामुळे प्रवासाचे काही वाटले नाही. तसं पाहिलं तर हर्षवाडी एक आदिवासी गाव होतं. या भागात मानवी वस्ती तशी फार कमीच जाणवली. समोर हरिहर किल्ल्याचे सर सरळसोट पाषाण दिसत होते. कदाचित याच बाजूने वर जाण्यासाठी रस्ता असावा, असे आम्हाला वाटले. सकाळच्या वेळेस या परिसरात कुणीच नसल्यामुळे एका उजाड माळरानावर आम्ही बाईक पार्क केली. हेल्मेट कुठे ठेवायचे? हा प्रश्न होताच. त्यामुळे ते आम्ही बरोबरच घेऊन निघालो. थोडीशी मळलेली पायवाट किल्ल्याच्या दिशेने जाताना दिसली. अजूनही कोणत्याही मनुष्याचे दर्शन आम्हाला झाले नव्हते. किल्ल्याच्या दिशेने जाणारी पायवाट चालतच आम्ही मार्गक्रमण करू लागलो. दोन ते तीन ठिकाणी दगडाचे अवघड पॅचेस होते. ते पार करताना कस लागला. अखेरीस बालेकिल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो. समोर पाहिले तर जवळपास ९० अंशामध्ये असणाऱ्या पायऱ्या दिसल्या आणि काळजामध्ये धस्स झाले. या पायर्या चढून जायच्या? असा प्रश्नवाचक उदगार मनात उमटला. त्या क्षणी त्या पायऱ्या अतिशय अवघड वाटत होत्या. इथपर्यंत आलो तेच खूप झाले... आता परत मागे फिरू या, असाही विचार मनामध्ये आला. परंतु थोडे पुढे गेल्यानंतर समजले की, प्रत्येक पायरीला दोन्ही बाजूंना खोबणी केलेल्या आहेत. त्यांना पकडून वरती जाणार जाता येणे शक्य होते. मग आम्ही धाडस करून त्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. इथून खाली निसटलो तर आजूबाजूला बघायला देखील कोणी नाही, हा विचारच भीतीदायक होता. परंतु हा थ्रिलींग अनुभव घ्यायचा आहे, असे आम्ही मनोमन ठरवले व पायऱ्या चढायला सुरुवात केली. एक एक करत साधारणतः पन्नास एक पायऱ्या चढत आम्ही मुख्य दरवाजापाशी पोहोचलो. किल्ले भ्रमंतीमध्ये आलेला तो आजवरचा एक रोमांचकारी अनुभव होता. दरवाजातून पुढे गेल्यावर एका कोरलेल्या कपारीतून पुढे देखील अशाच प्रकारच्या पायऱ्या तयार केलेल्या दिसल्या. आम्ही त्यादेखील तितक्याच सावधतेने हळूहळू चढत वरच्या दिशेने मार्गक्रमण केले. थोड्याच वेळामध्ये शेवटचा दरवाजा देखील दृष्टीस पडला. तो पार केल्यानंतर किल्ला सर केल्याचे समाधान प्राप्त झाले होते. किल्ल्यावर काहीच वर्दळ नव्हती. काही उघडी मंदिरे, दोन-तीन तळी व एक सर्वोच्च टोक. शिवाय एका बाजूला धान्याचे भव्य कोठार... इतकीच काय ती या किल्ल्याची संपत्ती होती! दूरवर दिसणाऱ्या धान्यकोठारांशी माकडांचा एक समूह उड्या मारताना दिसला. आमची चाहूल लागल्यामुळे त्यातली निम्मी माकडे तर निश्चित पळून गेली असावी. किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावरून खाली उतरताना एक परदेशी आणि एक भारतीय व्यक्ती किल्ला पाहायला आलेली दिसली. या दुर्गदर्शनामध्ये आम्हाला दिसलेले ते दोघेच मनुष्य प्राणी होते. त्यादिवशी एक अद्भुत आणि रोमांचकारी किल्ला बघण्याचे समाधान आम्हाला लाभले.
दहा वर्षानंतर...
मधल्या काळामध्ये पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले. या वाहून गेलेल्या पाण्यामध्ये सोशल मीडिया नावाचा घटक अतिशय वेगाने कार्यरत झाला होता. समाज माध्यमांद्वारे हळूहळू हरिहर किल्ल्याची माहिती सर्वदूर पोहोचली. अगदी हौशे, नवशे आणि गवशे ट्रेकर्स फिरण्यासाठी या किल्ल्यावर तुडुंब गर्दी करू लागले. आमच्या हरिश्चंद्रगडासारखी परिस्थिती या ठिकाणी तयार झाली. गुगलवर तुम्ही नुसते हरिहरगड जरी सर्च केले तरी शेकडो व्हिडीओ, लेख व ब्लॉग तुम्हाला दिसून येतील. इतकी लोकप्रियता या किल्ल्याने मधल्या काळात प्राप्त केली. खऱ्याखुऱ्या ट्रेकर्सपेक्षा निव्वळ हुल्लडबाजी करायला येणाऱ्या पर्यटकांची इथे अधिक गर्दी होऊ लागली. याची प्रचिती या वर्षी केलेल्या ट्रेकमध्ये आम्हाला आली.
हर्षवाडी गावामध्ये आता नव्याने टोलनाका सदृश फाटक उभारले गेले होते. तिथे पावत्या पाडण्याची देखील सुविधा करण्यात आली होती. शिवाय आम्ही सकाळी साडे सहाच्या दरम्यान या पोहोचलो. सुट्टीचा दिवस नसून देखील तोवर बऱ्याच गाड्या पार्किंगमध्ये आधीपासूनच उभ्या असलेल्या दिसल्या. त्यातील एक टेम्पो ट्रॅव्हलर दुरून कुठून तरी आलेली होती. तिच्यामध्ये असेच अतिउत्साही पर्यटक आल्याचे दिसत येत होते. किल्ल्याच्या मुख्य पायर्यांपर्यंत चढून गेलो तोवर फारशी गर्दी नव्हती. वातावरण आल्हाददायक झालेले होते. शिवाय सूर्यही बऱ्यापैकी वर आलेला होता. एकंदरितच फोटोग्राफीसाठी एक उत्तम वातावरण तयार झाले होते. तेव्हाच दहा वर्षांपूर्वीचा हरिहरगड आठवला. इथवर येईपर्यंत चार ते पाच ठिकाणी विविध खाद्यपदार्थांची दुकाने व उपहारगृहे देखील उघडलेली दिसली. शनिवार-रविवारी कदाचित इथे तुडूंब गर्दी होत असावी. आजूबाजूच्या गावकऱ्यांना रोजगाराचे नवे दालन उघडले असले तरी किल्ल्यावर प्लॅस्टिकच्या कचऱ्याची बरीच गर्दी देखील दिसून आली. आपल्या परिसरातील किल्ले आजही या प्लास्टिकच्या विळख्यात अजून वेगाने अडकत असल्याचे दिसतात. हरिहर याच दिशेने वेगाने प्रगती करताना वाटला. बालेकिल्ल्याच्या पायर्या चढायला सुरुवात केली व मध्यावर जाऊन थांबलो. तेवढ्यात किल्ल्यावरील माकडांचे आमच्यावर आक्रमण झाले. ही माकडे माणसाळल्यासारखी अतिशय जवळ येत होती. अगदी बॅगला हात लावून तिथे काही सापडते का, याची देखील चाचपणी करत होती! दहा वर्षांपूर्वी हीच माकडे आम्हाला पन्नास फुटावरून बघून पळून गेली होती. आज त्यांची बरीच उत्क्रांती झालेली दिसली! उत्साही पर्यटकांमुळे किल्ल्यांवरील माकडे माणसाळतात आणि त्याचा त्रास सर्वांनाच होतो. तशीच गत झाली होती. उतरताना देखील या माकडांनी इतर पर्यटक आणि ट्रेकर्सना बराच त्रास दिला. कोणत्या प्राण्यांना भूतदया दाखवायची? याचे प्रशिक्षण देखील मानवप्राण्याला द्यायला हवे, असे वाटून गेले. माकडांना माणसाने टाकलेल्या खाद्य पदार्थांची सवय झाल्यामुळे आता ते स्वतःचे खाद्य स्वतः शोधताना दिसत नाहीत. पायर्या चढून वर गेल्यावर मुख्य दरवाजाच्या समोरच अजून एक दुकान थाटलेले दिसले. येथून वर जाण्याचा रस्ता लवकर समजत नव्हता. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो तोवर खालून येणाऱ्यांची बरीच गर्दी झालेली होती. शिवाय बराच आरडाओरडा देखील ऐकू येत होता. यावरूनच सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर काय अवस्था असेल, याचा अंदाज बांधता आला. एकेकाळी अतिशय निर्जन व शांत असलेला किल्ला एक 'भयावह' पर्यटन स्थळ झालेला दिसून आला. किल्ल्याच्या माथ्यावर माकडे नसल्यामुळे यावेळेस किल्ला पूर्ण बघता आला, हे सौभाग्यच मानावे असे होते. किल्ला उतरताना विविध प्रकारच्या पर्यटकांची गर्दी दिसून आली. वर सांगितल्याप्रमाणे हौसे, नवसे आणि गवशे अशा सर्वच श्रेणीतील सो-कॉल्ड ट्रेकर्स किल्ल्यावर येत होते. हाफ चड्डी घातलेले, टाईट जीन्स घातलेले आणि थ्री-फोर्थ पॅन्ट घालून देखील ट्रेकिंग करणारे अनेक नवट्रेकर्स किल्ला चढताना दिसले. सोशल मीडिया एखाद्या किल्ल्याला किती ग्लॅमरस रुप देऊ शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण हरिहरच्या रूपाने दिसून आले. खाली येईपर्यंत हर्षेवाडी गावात देखील वाहनांची बरीच गर्दी झालेली दिसली.
यंदाच्या नाशिक दौऱ्यातील पहिल्याच किल्ल्याची भ्रमंती एका वेगळ्या दृष्टिकोनातून करता आली, त्यासाठीच हा लेखप्रपंच.
Saturday, May 22, 2021
अणे घाट
घाट चढून वरती गेल्यावर उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता घाटाच्या डोंगर माथ्याच्या दिशेने जातो. त्याच दिशेने मीही मार्गक्रमण सुरु केले. बराच अंतर गेल्यावर रस्ता अधिक कठीण होत असल्याचे जाणवले आणि मी बर्यापैकी घाटाच्या डोंगरांवर आलो आहे, असेही जाणवले. इथून पुढे पायी चालावे म्हणून गाडी रस्त्याच्या कडेला लावली व पदभ्रमंती चालू केली. तसा हा परिसर निर्जन होता. अगदी दूरवर एखादं घर दिसून यायचं. बाकी सर्व परिसर हा शेतीचा होता. घाट महामार्गावर असल्यामुळे व इथल्या शांततेमुळे घाटातील गाड्यांचे आवाज व्यवस्थित ऐकू येत होते. शिवाय संध्याकाळच्या प्रसंगी आपल्या घरट्याकडे जाण्यासाठी चाललेली पक्ष्यांची किलबिलही व्यवस्थित ऐकून येत होती. पंधरा-वीस मिनिटांच्या भ्रमंतीनंतर काही घरे दिसून आली आणि तिथूनच दूरवर ते छोटेखानी मंदिर दिसून येत होते. तिथे जाण्याचा रस्ता फार बिकट नव्हता. एका छोट्याशा टेकडीच्या कडेकडेने मार्ग काढत मी मंदिराच्या दिशेने निघालो. थोड्याच अंतरावर टेकडी संपली आणि पुन्हा पश्चिमेकडे जाणारा सूर्य व्यवस्थित दिसायला लागला. एव्हाना मी पूर्णपणे घाटमाथ्यावर आलेलो होतो. खालचा रस्ता आता व्यवस्थित दिसत होता. वाहतुकीची हालचालही लक्षात येत होती. या ठिकाणी एक विस्तीर्ण माळरान दिसून आले. अनेक गुरे इथे चरत होती. पावसाळा संपून केवळ एकच महिना झाला होता. त्यामुळे गवत बऱ्यापैकी ओले व दाट होते. त्यातली पायवाट मात्र व्यवस्थित दिसत होती. कदाचित या रस्त्यावरून सातत्याने ये-जा होत असावी, असे वाटले. मंदिर आता खूपच जवळ आले होते. दोनच मिनिटाच्या प्रवासानंतर मी मंदिराच्या जवळ पोहोचलो. अतिशय छोटा उंचवटा व त्यावर बांधलेले ते मंदिर खूप सुंदर भासत होते. थोड्याच अंतरावर काहीशी झाडी दिसू लागली. शिवाय अजूनही परिसर निर्जन होता. मंदिराच्या प्रवेशद्वारी एक श्वान कदाचित त्याचे रक्षण करत असताना दिसत होता. दूरदूरवर केवर माळरान दिसत होते. मी घाटाच्या डोंगरांच्या बरोबर मागच्या बाजूला आलेलो होतो. एक नितांत शांतता या ठिकाणी अनुभवायला मिळाली. तिचा आनंद घेत पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो. परत फिरताना घाटाचा व्यवस्थित अंदाज येत होता. डोंगराच्या दिशेने जाऊन रस्त्यांची पाहणी केली. झाडी फारशी नव्हतीच. त्यामुळे डोंगरमाथ्यावरून घाटातील वळणदार रस्ते व्यवस्थित दिसत होते. माळशेज घाटापुढे या घाटाची उंची तशी काहीच जाणवली नाही. पण एका आगळ्या वेगळ्या वाटेने डोंगरमाथ्यावर फिरण्याचा आनंद मात्र घेता आला.





















