माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Monday, June 1, 2026

ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात: पुण्यातून बदामीकडे!

विजयनगर साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे 'हम्पी' आणि चालुक्यांची प्राचीन राजधानी असलेला 'बदामी' किल्ला पाहण्याची आमची गेली चार वर्षे नुसतीच चर्चा सुरू होती. काही ना काही कारणांमुळे हा योग जुळून येत नव्हता. पण यावर्षी मात्र सर्व अडचणी बाजूला सारून, कर्नाटकातील या ऐतिहासिक वारशाच्या पर्यटनाचा आम्ही पक्का बेत आखला.

पहिल्या दिवशी थेट ४५० किलोमीटरचा प्रवास करून बदामीला पोहोचायचा आमचा विचार होता. एका दिवसात हे अंतर पार करणे तसे सहज शक्य होते; परंतु प्रवासाला निघताना नेहमीप्रमाणे पुण्यातूनच बाहेर पडायला आम्हाला बराच उशीर झाला. मजल-दरमजल करत आम्ही महाराष्ट्राची सीमा ओलांडून कर्नाटकात प्रवेश केला, तोवर सूर्य मावळतीला गेला होता. हळूहळू अंधार दाटून येऊ लागला आणि वातावरणात एक वेगळाच बदल जाणवू लागला. पूर्वमोसमी पावसाचे थंड वारे वाहू लागले होते. दूरवर आकाशात विजांचा कडकडाट सुरू होता आणि काहीच वेळात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होणार, याची स्पष्ट चाहूल निसर्ग देत होता.

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून हत्तरगी टोलनाक्याच्या अलीकडे आम्ही आमची गाडी डावीकडे वळवली. इथून पुढे सहा पदरी प्रशस्त महामार्गाची जागा एका दोन पदरी, एकाकी ग्रामीण डांबरी रस्त्याने घेतली. वाहनांची वर्दळ एकदम कमी झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना घनदाट झाडी होती आणि समोरून एखादेच वाहन क्वचितच येत होते. आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली आणि थोड्याच वेळात रिमझिम पावसाला सुरुवात झाली.

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात असलेल्या 'हिडकळ' धरणाच्या अगदी काठाकाठाने आमचा प्रवास सुरू होता. सभोवतालच्या निसर्गरम्य परिसरात रिमझिम पावसासोबतच आता वाऱ्याचा वेगही वाढला. बघता बघता पावसाने रौद्ररूप धारण केले. सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस आणि पूर्णपणे अनोळखी रस्ता... यामुळे आमच्या गाडीचा वेग आपोआपच मंदावला. भर म्हणून की काय, याच निर्जन आणि वादळी परिसरात गुगल मॅपनेही काम करणे बंद केले आणि आम्ही चक्क रस्ता चुकलो!

त्या मुसळधार पावसातच आम्ही एका छोट्या गावात गाडी थांबवली. तिथे एका स्थानिक व्यक्तीला पुढचा रस्ता विचारला. त्याने अत्यंत आपुलकीने, पण अस्खलित 'कन्नड' भाषेत आम्हाला बदामीकडे जाणारा रस्ता समजावून सांगितला. दुर्दैवाने, त्यातला एकही शब्द आम्हाला समजला नाही! तरीही 'हो' ला 'हो' करत आम्ही नुसतीच मान हलवली आणि अंदाजाने समोरच्या रस्त्याला लागलो. सुदैवाने, तोपर्यंत आमच्या दुसऱ्या मोबाईलवर गुगल मॅप पुन्हा सुरू झाला होता.

आता रात्र बरीच झाली होती आणि अशा वातावरणात थेट बदामी गाठणे शक्य नव्हते. त्यामुळे जवळच्याच तालुक्याच्या ठिकाणी, म्हणजेच 'गोकाक' शहरात रात्रीचा मुक्काम करण्याचे आम्ही ठरवले. पुढच्या अर्ध्या तासात आम्ही गोकाकमध्ये पोहोचलो. आता पावसाचा जोर ओसरला होता, पण शहरातील रस्ते पाण्याने तुडुंब भरले होते. मघाशी वादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठाही सुदैवाने पूर्ववत झाला होता. बऱ्याच वेळच्या अंधाऱ्या आणि निर्जन प्रवासानंतर एखाद्या शहराच्या सानिध्यात आल्याने हायसे वाटले आणि आजची रात्र इथेच थांबायचा आमचा निर्णय सार्थ ठरला.

दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यावर हॉटेलच्या खिडकीतून बाहेर पाहिले, तर गावाच्या कडेला असलेला एक सुंदर डोंगर लक्ष वेधून घेत होता. काल रात्रीच्या मुसळधार पावसामुळे तो अगदी हिरवागार आणि ताजातवाना भासत होता. याच डोंगरावर गोकाकचा ऐतिहासिक जुना किल्ला दिमाखात उभा आहे. पण, आमचे मुख्य ध्येय 'बदामी' होते आणि आधीच प्रवासाला उशीर झाल्यामुळे, गोकाकच्या किल्ल्याकडे नाईलाजाने पाठ फिरवून आम्ही आमच्या पुढच्या ऐतिहासिक प्रवासाला लागलो.

--- तुषार भ. कुटे 

#मराठी #कर्नाटक #बदामी #हंपी #कर्नाटक_प्रवास_वृत्तांत




No comments:

Post a Comment